" मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो..!"
======================
आज दिनांक १२/१२/२०१८ रोजी सकाळी दररोजच्या पेक्षा लवकरच म्हणजे सकाळी ९ वाजताच माझ्या सध्याच्या जि.प. अंधारी ,ता. सिल्लोड प्रशालेत पोहचलो होतो.घाईतच शाळेतील मुख्य गेटजवळ पोहचलो..कारण कधी वर्गात जाईल अन् कधी जेवणाच्या डब्ब्यातील थोडेफार खाईल असे झाले होते. मला खूप भूक लागली होती.
इतक्यात मला माझ्या एका मुलीने आवाज दिला....
ऋतुजा - " ओ....सर...इकडं या....!"
मी - " अगं ,दीदी...मी नंतर येतो...!"
शिवानी- " सर, तुम्ही इकडं या म्हणजे या...तिकडं जाऊ नका...!"
मला शेवटी त्या माझ्या मुलींकडे जावेच लागले.तिथं गेल्यावर पाहिलं तर या माझ्या मुली मस्तपैकी अंगत..पंगत करून जेवायला बसल्या होत्या. त्यातील समीक्षा दीदी मला म्हणाली....
" सर, तुम्ही दुपारी आमच्या सोबत जेवायला बसतात पण आज सकाळी बसा..!"
मी- " मला पण लई भूक लागली आहे...!"
असं म्हणून मीही पटकन बसलो..माझा जेवणाचा डबा काढणार इतक्यात समीक्षा दीदी म्हणाली....
" सर,तुमचा डब्बा तसाच राहू द्या...आमच्यातच जेवायला बसा..! "
मीही काहीही आढेवेढे न घेता बसलो.कारण मी कितीही म्हणालो असतो की ," मी माझाच जेवणाचा डब्बा खातो ...!"
तर ते कदापि शक्यच नव्हते..! कारण माझ्या या मुलींचा न भूतो न भविष्यती असलेला नेहमीचा प्रेमळ मायेचा आग्रह..! आणि तो मायेचा आग्रह नाकारण्याची माझ्यात तरी हिम्मत नाहीच..!
मी त्यांच्याशी बोलू लागलो...
" कागं...दीदी..तुम्ही एवढ्या सकाळी जेवणाचा डबा घरून तयार करून आणतात...खरंच तुमच्या आईचे तुमच्यावर खूप खूप उपकार आहेत की नाही..!"
वैष्णवी - " सर,आम्ही आमच्या आईला मदत करून येतो..!"
मी - " तुम्ही सगळ्या शेताच्या वस्तीवर राहता..तुमची वस्ती अन् शाळा किती अंतर असेल बरं..?"
समीक्षा-" दोन ते तीन किलोमीटर..!"
ऋतुजा - " सर,आम्ही पहाटेच उठून अंघोळ करून जेवणाचा डबा घेऊन गावात असलेल्या ट्युशन ला पायी येतो.. सकाळी ६ वाजता...! कधी सायकलवर पण येतो. कधी आमचे वडील आणून सोडतात...!"
मला खूप आश्चर्य वाटले.. मी विचारले.....
" मग तुम्ही घरून कधी निघता..?"
निकिता - " पहाटे...५:४० ते ५:४५ दरम्यान निघतो आम्ही..!"
मी - " कमाल आहे दीदी तुमची...! तुमच्यापेक्षा तुमच्या आईची..! ती माऊली तुम्हाला सगळ्यांना जेवणाचा डबा तयार करून पाठवून देते..! तिला कधीही विसरू नका...खूप उपकार आहेत तिचे तुमच्यावर..!"
एवढ्यात मुख्य गेट कडून मोठ्याने आवाज आला...
" का... हो...सर... काल...तुम्ही आमच्या हॉटेल वर काम्हून नाही आले...?"
मी मागे वळून पाहिले तर मागून मला आवाज देत..देत अभिषेक तोडकर येत होता.माझ्या अगदी जवळ आल्यावर मला पुन्हा म्हणाला....
" काय सर..काल आपल्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होते...त्यामुळं माझ्या वडिलांनी हॉटेल लावले होते...तुम्ही कांम्हून नाही आले हो....? मी तुम्हाला लई पाहिलं पण तुम्ही सापडलेच नाही...!"
मी- " अरे,..माझ्यावर पार्किंगची जबाबदारी होती..तिकडं होतो मी..!"
अभिषेक - " जाऊ द्या...मी सकाळीच आमच्या हॉटेल मधून खास तुमच्यासाठी गरमागरम सोयाबीन मिक्स मसाला भात आणला आहे...खा...तेवढा...!"
मी - " अरे, कशाला आणला..?"
अभिषेक - " नाही हो..सर...घ्या खाऊन..!मला कालच तुम्हाला वडा द्यायचा होता...पण जाऊ द्या...आता सोयाबीन मिक्स मसाला भात घ्या..!"
काल आमच्या अंधारी प्रशालेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन असल्याने आम्ही सगळेच धावपळीत व्यस्त होतो.त्यामुळे अभिषेकची मी, न भेटायची तक्रार योग्यच होती..!
मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो..माझ्या मुलींच्या प्रेमळ जेवणाच्या आग्रहाने..!
मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो माझ्या मुलाच्या प्रेमळ आग्रह असणाऱ्या प्रेमळ प्रेमाने..!
शेवटी एका माणसाच्या आयुष्यातील त्याची तृप्तता तरी काय असते हो...?
तर ती असते...त्या माणसाला निव्वळ प्रेमानं मिळणाऱ्या भावूक गोष्टींनी..होणारी तृप्त भावना..!
ती असते...त्याच्या देवकन्या कडून मिळणाऱ्या निरागस प्रेमळ प्रेमानं दिलेली जिवंत अनुभूतीच्या रूपाने...!
ती असते..आपल्या नात्यात अनौपचारिक भाव ठेवणाऱ्या मुलाकडून...!
खूप खूप धन्यवाद माझ्या मुलामुलींनाे...! आणि .....
वंदन तुम्हाला....तुमच्यातील ममत्वाला...!
तुमचा हा मायेचा आग्रह माझ्याकडून कधीही विसरणे अशक्य आहे...!माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील शेत, वस्तीवरून येणारी सर्व माझी मुलं,मुली माझ्या मोजक्या आदर्शांपैकी एक आहेत..! आमच्यातील मायेचं नातं फक्त एका दिवसापूरत्या फोटोसेशन पुरते मर्यादित नसून ते दररोजच्या शालेय दिवसांचे चिरंजीव संजीवन आहे..!
मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो..!
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १२ डिसेंबर २०१८
वेळ: सकाळी ९ वाजता.
व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १२ डिसेंबर २०१९



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा