शनिवार, १४ मार्च, २०२०

प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!😊



चिंतन

प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतो..!😊
===================================

समाजात वावरताना नेहमी आनंदी दिसणाऱ्या माणसाच्या अंतर्मनात एक खूप  खोलवर दुःखाची किनार असते..!कदाचित  यामुळेच अशी माणसं निदान दृश्य स्वरूपात का होईना..आपला आनंद व्यक्त करत असतात..!कारण त्या दुःखाची किंमत यांनाच चांगली माहीत असते..! म्हणून अशी माणसं जगाला हसवत असतात,स्वतचं दुःख लपवून..!

आणि प्रत्येकात एक चावटपणा देखील लपलेला असतो..! फक्त कुणी आपला चावटपणा दृश्य स्वरूपात व्यक्त करत असतो,तर कुणी सभ्यपणाचा आव आणून तो चावटपणा लपवत असतो..! मात्र एक नक्की,प्रत्येकात चावटपणा असतोच..! दादा कोंडके यांनी त्यांच्यातील चावटपणा आपल्या अभिनयाद्वारे,संवादाच्या माध्यमातून नेहमी बिनधास्तपणे व्यक्त केला..! कोणताही आडपडदा ठेवला नाही..!

थोडक्यात वरील दोन्ही परीच्छेदावरून माझ्या मते प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतोच..!😊 फक्त कधी त्याला समाजात वावरताना नेहमी आनंदी दिसणाऱ्या माणसाच्या अंतर्मनात एक खूप  खोलवर दुःखाची किनार लाभलेली असते..! तर कधी त्याच्यातील चावटपणा दृश्य स्वरूपात उघडपणे व्यक्त होत असतो..!
मात्र प्रत्येकात दादा कोंडके लपलेला असतोच..!

माझ्या पिढीतील मराठी माणसाने मनापासून दोन मराठी माणसांवर निस्सीम प्रेम केले..! त्यातील एक होते वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् दुसरे होते शाहीर दादा कोंडके..! विशेष म्हणजे या दोघांनीही एकमेकांवर सुध्दा निस्सीम प्रेम केलं..!  दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांना बाळासाहेब ठाकरे यांनी राजाश्रय मिळवून दिला..!

साधा सरळ मराठी माणूस हा साध्या साध्या गोष्टींवर प्रेम करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शाहीर दादा कोंडके..! दादा कोंडके यांनी मराठी माणसाची अचूक नाडी ओळखली अन् मराठी माणसाला तहहयात हसवत राहिले..!दादा कोंडके कोणत्याच अँगलने हिरो दिसत नव्हते..! मात्र सगळ्या अँगलांना दादा कोंडके हिरो दिसत होते हे विशेष..! म्हणून त्यांचे सलगपणे सुपरहिट चित्रपट तयार होऊन जागतिक रेकॉर्ड झाले..! दादा कोंडके म्हणजे द्विअर्थी शब्दांचे चालते फिरते विद्यापीठ होते.त्यांच्या चित्रपटांची नावं,त्यातील संवाद,गाणी सगळं कसं द्विअर्थी असायचे..! त्यामुळं प्रत्येक मराठी माणसात लपलेला दादा कोंडके खदखदून हसायचा..! दादा कोंडके यांचे विनोद म्हणजे वरण भात स्टाईल चे कधीही नव्हते..! त्यांच्या विनोदात नेहमी  गावरान मिरचीचा ठेचा,कांदा,लसूण अन् भाकरीची अस्सल चव असायची..! कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातील खेड्यातील सर्व मराठी रसिक माणसांनी दादा कोंडके यांच्यावर भरभरून प्रेम केलं..!

अभिनेत्री उषा चव्हाण, गायक महेंद्रकपुर,  संगीतकार राम लक्ष्मण यांची चवदार भेळ म्हणजे दादा कोंडके यांचे मराठी चित्रपट..! " च्या मायला " या गावरान बोली शब्दाला दादा कोंडके यांनीच आपल्या बोलण्याच्या विशिष्ट लकबितून जनमानसात पोहोचविले..! एवढंच नाही..!लांब लचक नाडीच्या हाफ चड्डीला देखील जनमानसात लोकप्रिय केले तेही दादा कोंडके यांनीच..!

लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके याचं आत्मचरित्र " एकटा जीव " लिहिलं आहे.त्यातील दादा कोंडके यांनी व्यक्त केलेल्या खालील भावना एक भावूक माणूस म्हणून माझ्या सारख्या अनेकांना आत्मचिंतन करायला भाग पाडतात..! दादा कोंडके यांनी व्यक्त केलेल्या भावना खालील प्रमाणे....

" माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो. अशी ब-याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वत:चीच समजूत घालत असतो..!"

वरील ओळी दादा कोंडके यांच्या स्वतच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप काही सांगून जातात..!
कधी त्याच खोलवर रुतलेल्या दुःखाला कुठेतरी पाहिलं की, त्याचं दुःखावरची खपली निघते अन्........
अंतर्मन अश्रू ढाळत त्या दुःखाला गोंजारत आपल्या  व्यथा  दिसणाऱ्या आनंदाला ऐकवतं असतं...! 😔

असो,आज दिनांक १४ मार्च २०२० रोजी महान मराठी चित्रपट अभिनेते शाहीर दादा कोंडके यांचा स्मृतिदिन आहे..!( मृत्यू दिनांक - १४/३/१९९८) त्यानिमित्त दादा कोंडके यांना विनम्र अभिवादन..!

ता.क.: जगातील सर्वात दुःखी माणूस, नेहमी दृश्य स्वरूपात हास्य व्यक्त करत असतो..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १४ मार्च २०२०, शनिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा