आमचे गाव, आमची माणसं..!
" संघर्षातून तयार झालेला अधिकारी - आदरणीय नारायणराव कुमावत सर..!"
==============================
संघर्ष..! हा शब्द फक्त साडे तीन अक्षरचाच आहे, पण याच साडे तीन अक्षराच्या शब्दातून तयार झालेली अनेक माणसं,समाजातील इतर सर्व मानवी घटकांच्या करिता प्रेरणादायी झालेली आहेत.अर्थात तो संघर्ष स्वतच्या किंवा इतर मानवी घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक अन् आर्थिक हितासाठी केलेला असेल तरच..! नसता उगीचच संघर्ष करायचा अन् त्यातून जर स्वतच्या किंवा समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक फलनिष्पत्ती निघत नसेल तर असा संघर्ष हा पूर्वीही,आताही अन् भविष्यातही असा संघर्ष करणाऱ्यांना स्वतः ला किंवा समाजाला त्रासदायकच ठरलेला आहे..! आमच्या पालखेड गावात असेही काही ग्रेट पालखेडकर होऊन गेलेले आहेत अन् आहेत,ज्यांचा संघर्ष हा त्यांच्या स्वतच्या किंवा समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक फलनिष्पत्ती देऊन गेलेला आहे..! यातील काही ग्रेट पालखेडकर, माझ्या समकालीन पिढीतील, पण वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणारी होती अन् सध्या आहेत.यात अभिमानाने अन् कौतुकाने ज्यांचा उल्लेख करावा असे आमचे कौटुंबिक स्नेही आदरणीय नारायणराव कुमावत सर..! ( शिक्षण विस्तार अधिकारी )
आदरणीय नारायणराव कुमावत सर..!
( शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प. जालना )
आदरणीय नारायणराव कुमावत सर यांची घरची परिस्थिती बेताचीच होती,त्यामुळं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन् महाविद्यालयीन आयुष्यात जो, त्याकाळी इतर सधन कुटुंबातील मुलांचा कसा का असेना जो शान शौक असायचा तो यांच्या वाट्याला आला नाही.मात्र एक होतं, मनाला आनंदीत करून जाईल तो शान शौक करायला पैसा अन् आर्थिक श्रीमंतीच लागते असे काहीही नाही..! तर माझ्या मते आपल्या आयुष्यातील आनंदी शान शौक करायला आपल्या अवतीभोवती सामाजिक भान अन् माणसांची जाण असलेली मित्रमंडळी असली की, आयुष्याचा आनंद उत्सव साजरा करणारा शान शौक नक्कीच पूर्ण होतो..! तो आनंद उत्सव, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन मित्रांच्या सहवासात आदरणीय नारायणराव कुमावत सरांनी साजरा केला..!
श्री.पारेश्वर विद्यालय पालखेड येथून आदरणीय नारायणराव कुमावत सरांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. स्वतः ची अतिशय किरकोळ तब्येत अन् गावातील काही इतर मित्रांच्या सहवासात विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता.खिशात जेमतेम पैसे अन् सोबतीला त्याच परिस्थितीशी जुळवून घेणारे मित्रमंडळ..! आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत घेत याच महाविद्यालयात बी.ए. शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर इ. स.१९९३ -९४ मध्ये एम. ए. ( मराठी ) पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण तर पूर्ण झाले होते,पण आता पुढं काय..?
हा प्रश्न आ वासून उभा राहिला होता.
आदरणीय नारायणराव कुमावत यांचे वडील स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत, गावात, आसपासच्या परिसरात गवंडी काम करायचे. माझे सख्खे मोठे चुलते स्व. कचरू आण्णा चंपतराव जाधव यांनी मला एकदा सांगितले होते की,
" आपल्या गावातील गीताराम कुमावत अन् मी एकाच दिवशी जन्माला आलेलो आहोत, अशी माझी आई मला म्हणायची..!"
स्व. कचरू आण्णा अन् स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत यांची खूप चांगली मैत्री देखील होती.बऱ्याचदा या दोघांना आमच्या गल्लीतील ओट्यावर बसून गप्पांचा फड रंगवताना मी पाहिलेलं होते. स्व. कचरू आण्णा जाधव अन् स्व. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत यांची खूप चांगली मैत्री असण्याचे ,माझ्या मते दोन कारणं होती.त्यापैकी एक , दोघांचा जन्मदिन एकच होता अन् दुसरे कारण म्हणजे दोघेही रसिक अन् कलेवर निस्सीम प्रेम करणारी माणसं होती. माझे चुलते संवादिनी ( हार्मोनियम ) वाजविण्यात तरबेज होते,तर तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत तबला , मृदुंग वाजविण्यात तरबेज..! त्यामुळं यांची मैत्री विशेष होती.
आदरणीय नारायणराव कुमावत यांचे एम.ए.शिक्षण पूर्ण झाले होते.वर उल्लेख केल्याप्रमाणे आता पुढं काय..?हा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. तीर्थस्वरुप गीताराम काका कुमावत गवंडी काम करायचे.आदरणीय नारायणराव कुमावत सर, आपल्या वडिलांच्या हाताखाली गवंडी काम करायला जाऊ लागले होते. गावातील एक उच्च शिक्षित तरुण कधी मजुरी तर कधी गवंडी काम करू लागला होता.आपल्या वडिलांना मदत करू लागला होता.
अखेर इ. स.१९९६ मध्ये विभागीय मंडळ मार्फत बी.एड करिता भरती प्रक्रिया सुरू झाली होती. वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इमारतीत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार होती.आदरणीय नारायणराव कुमावत यांनी सदरील प्रवेश प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याचे ठरविले.जर सरकारी कोट्यातून नंबर नाहीच लागला तर,खाजगी कोट्यातून फी होती १२,५००₹..! आता प्रश्न उभा राहिला होता पैशाचा..! जर यदा कदाचित सरकारी कोट्यातून नंबर नाहीच लागला तर म्हणून १२,५००₹ सोबत घ्यायचे होते,पण एवढे पैसे आई वडीलांकडे अजिबात नव्हते. अखेर आदरणीय नारायणराव कुमावत यांचे स्नेही मित्रमंडळ अन् आमच्या पालखेड गावातील अतिशय शांत सुस्वभावी स्व.रामकृष्ण भाऊ पाटील रोठे, काशिनाथ जाधव इत्यादींनी पैश्यांची जमवाजमव केली अन् आदरणीय नारायणराव कुमावत वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात सकाळीच ९ वाजता दाखल झाले. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. संपूर्ण दिवसभर आलेल्या तरुणांचा बी.एड करिता नंबर कोणत्या ना कोणत्या कॉलेजला लागत होता.अखेर संध्याकाळी ६:३० वाजता सरकारी कोट्यातून बी.एड करिता नंबर लागल्याची ऑर्डर ताब्यात मिळाली. रामकृष्ण परमहंस बी.एड कॉलेज उस्मानाबाद येथे नंबर लागला होता.
आदरणीय नारायणराव कुमावत यांनी इ. स.१९९६-९७ मध्ये बी.एड चे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले होते.इ.स. १९९८ मध्ये निवड मंडळाची, माध्यमिक शिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. दिनांक २९/६/१९९८ रोजी माध्यमिक शिक्षक पदासाठी तोंडी परीक्षा दिली.अखेर दिनांक २२/१२/१९९८ रोजी जिल्हा परिषद मध्यामिक शिक्षक म्हणून राणी उंचेगाव ,ता. घनसावंगी, जि.जालना येथे प्रथम नेमणूक मिळाली.
आदरणीय नारायणराव कुमावत यांच्या आई वडिलांना खूप खूप आनंद झाला होता.आपल्या मुलाने कठीण परिस्थिततून घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाल्याचे आत्मिक समाधान त्यांना मिळाले होते.
काळाच्या ओघात आदरणीय नारायणराव कुमावत सरांना जानेवारी २००३ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती अंबड येथे पदोन्नतीने नेमणूक मिळाली.अंबड,भोकरदन, बदनापूर पंचायत समिती मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली,तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली..! सध्या आदरणीय नारायणराव कुमावत सर, जिल्हा परिषद जालना येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
आज आम्ही काही मित्र जे की आदरणीय नारायणराव कुमावत सरांच्या पेक्षा वयाने लहान आहोत ते अन् काही कुमावत सरांच्या आसपास वयातील मित्र भूतकाळ आठवतो तेंव्हा गतकाळातील आदरणीय नारायणराव कुमावत सरांचा संघर्ष आठवून आज त्याचं फळ त्यांना मिळाल्याचं आत्मिक समाधान नक्कीच मिळते.जेंव्हा तोच गतकाळ आठवतो तेंव्हा त्यातील काही गमतीशीर आठवणी देखील आनंदीत करून जातात. त्यांचं एक उदाहरण सांगतो. जेंव्हा आदरणीय नारायणराव कुमावत सरांना नोकरी लागलेली नव्हती तेंव्हाची गोष्ट आहे.नारायणराव कुमावत त्याकाळी अतिशय किरकोळ तब्येतीचे होते.आमच्या पालखेड गावातील स्व.पुंडलिक सुराशे यांच्या घरासमोर नारायणराव कुमावत अन् विजू गायकवाड या दोघांमध्ये कशावरून तरी कुरबुर झाली होती. मी त्यावेळी बाजूलाच उभा होतो. विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत दोघांच्याही शारीरिक तब्येत त्याकाळी आमच्या पालखेड गावात अतिशय किरकोळ तब्येतींपैकी एक होत्या..! शाब्दिक चकमक वाढत गेली होती. स्व.पुंडलिक सूराशे यांच्या ओट्याच्या बाजूला भला मोठ्ठा बाहुबली दगड होता.तो दगड नारायणराव कुमावत सरांच्या वजनापेक्षा दहा पट वजनदार होता.विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत यांच्या कुरबुरीचे रूपांतर हातघाईवर यायला लागले होते,पण अद्याप प्रत्यक्ष आले नव्हते. अखेर रागारागाने वैतागून नारायणराव कुमावत यांनी तो आयुष्यात कधीही न उचलता येणारा भला मोठ्ठा बाहुबली दगड उचलण्याचा प्रयत्न केला होता. कुमावत सरांना तो अशक्यप्राय बाहुबली दगड उचलून विजू गायकवाड याच्या अंगावर किंवा डोक्यात घालायचा होता.😊 तो बाहुबली दगड उचलण्याचा खूप कन्हुन कन्हुन प्रयत्न केला पण नारायणराव कुमावत सर,तो बाहुबली दगड उचलण्याच्या प्रयत्न करत असताना फक्त कन्हत होते..! बाकी तो बाहुबली दगड अनु रेणू इतका सुद्धा जागेवरून हलला नव्हता..!😊 अखेर विजू गायकवाड अन् नारायणराव कुमावत या तत्कालीन अतिशय किरकोळ तब्येतीच्या दोन मित्रांचे लुटुपुटुचे भांडणं ,तिथे उपस्थित आम्ही मित्रांनी , दोघांचा चेव ओसरल्यावर मिटविले होते..!😊🙏🏻👬 आज तोच प्रिय बालमित्र विजू गायकवाड वैजापूर येथे दैनिक पुढारीचा नामांकित अन् अतिशय निर्भिड वर्तमानपत्र पत्रकार आहे.आज जेंव्हा कधी मी आणि बालमित्र विजू गायकवाड पालखेड येथे गावच्या यात्रेच्या निमित्ताने जातो तेंव्हा स्व. पुंडलिक सुराशे यांच्या घराच्या समोरून जाताना तो भला मोठ्ठा बाहुबली दगड अन् किरकोळ तब्येतीच्या मित्रांची भांडणं आठवून हसू येते..!😊
आदरणीय नारायणराव कुमावत सरांच्या आयुष्यात माझा प्रिय बालमित्र नंदकिशोर जाधव पाटील याचं खूप मोठं योगदान आहे हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे..!
माझ्या स्वर्गीय तीर्थरूप वडिलांना आदरणीय नारायणराव कुमावत सरांचा अतिशय अभिमान होता. त्याचं कारण बहुदा दोघांच्या अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन यश प्राप्त करणे हाच एकसमान धागा होता.मला नेहमी माझे स्व.तीर्थरूप वडील म्हणायचे की,
" आपल्या गावातील नारायण कुमावत अन् रायभान बाबा त्रिभुवन यांनी ज्या खडतर परिस्थितीत अन् अतिशय गरिबीतून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतः ला सिद्ध केलं आहे,ते खूप कौतुकास्पद आहे..! या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी शैक्षणिक नव्हती की घरी फार काही प्रॉपर्टी नव्हती,पण या दोघांनीही आपली जिद्द, मेहनत अन् बुध्दीच्या बळावर स्वतः ला समाजात सिद्ध केलं..! "
असो, आमच्यासाठी आदरणीय नारायणराव कुमावत सर, स्व.रायभान बाबा त्रिभुवन अन् माझे स्व.वडील नेहमी वंदनीय होते,आहे अन् सदैव राहील..! कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुलमंत्राचा, शिक्षणाचा खरा अर्थ यांनी समजून घेऊन स्वतः ला समाजात सिद्ध केले होते अन् आहे..!🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक -१३ मे २०२१, गुरुवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा