मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️
" प्रेमळ गणेशराव देशपांडे सर..! "
====================================
माझ्या शिक्षकी पदाच्या कारकिर्दीत लाभलेल्या सर्वोत्तम मित्रांपैकी गणेशराव देशपांडे सर..!
सरांची आज दिनांक १० ऑगस्ट २०१६ रोजी जिल्हाबदली होऊन ते गावाजवळ गेल्याचे समजले,खूप दू:ख झाले.एका अतिषय जीवलग मित्राचा सहवास आता लाभणार नाही.सरांचे आणि माझे कौटूंबिक संबंध होते.मी व देशपांडे सर ज्यावेळेस वैजापूर तालूक्यात,शेजारी-शेजारी गावात सोनवाडी व राहेगाव केंद्र,लासूरगाव,या.वैजापूर येथे नोकरीस होतो तेव्हा बहूतांशी प्रशिक्षणास आम्ही सोबतच असायचो.वैजापूरहून येतांना हमखास पालखेडला जायचो.माझी स्वर्गवासी आई रूचकर स्वयंपाक करायची.सरांना माझ्या आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा.
माझी किंवा सरांची कोणतीही अडचण असो आम्ही सतत एकमेकांना सहकार्य करत होतो.मला आजही चांगले स्मरणात आहे,३१ मार्च २००३रोजी मध्यरात्री माझा थोरला मूलगा चि.नमनला तो दिड वर्षाचा असतांना तापेत झटका आला होता.मी व देशपांडे सर लासूर स्टेशन येथे शेजारी राहत होतो.एवढ्या रात्री देशपांडे सर अन् मी शेजारील लासुरगावात जाऊन इंगळे भाऊ यांची जीप घेऊन आलो होतो. देशपांडे सर देखील मध्यरात्री आमच्या सोबत औरंगाबादला आले होते. डॉ. खनाळे हॉस्पिटल औरंगाबाद येथे आम्हाला पोहोचवून सर, रात्री पुन्हा घरी परत गेले होते. पुन्हा दूस-या दिवशी देखील आले होते..! खरच सर, ते तूमचे आपलेपणाचे वागणे माझ्या मनाला खूपच भावले अन् कायमचे अढळ स्थान प्राप्त करून गेले..!देशपांडे सर लासूर स्टेशन येथे संध्याकाळी माझ्या घराकडे फिरायला यायचे तेव्हा भानवाडी रेल्वे गेट जवळ बसून आम्ही दोघेच तासन तास गप्पांच्या विश्वात रमून जायचो..!
मागील काही महिण्यांपासून देशपांडे सर लासूर स्टेशन येथे त्यांच्या घरी एकटेच राहत होते.मी रात्री त्यांच्या घरी जात असे.त्या वेळी सर,वेगवेगळी गाणी ऐकवत असे.सरांनाही अद्रकचा कडक चहा प्यावासा वाटला तर सर,हक्काने माझ्या घरी यायचे.इतकी हक्काने त्रास देणारी मैत्री आमच्यात निर्माण झाली होती.अर्थात ती मैत्री जीवंत असे पर्यंत असणारच..परंतू त्यात सहवास नसणार..!
देशपांडे सरांचा स्वभाव म्हणजे अजातशत्रू..! मी कधीच सरांना कोणासोबत भांडतांना पाहिले नाही.सिधा-साधा स्वभाव..चटकन् कूणावरही विश्वास ठेवणारा माणूस...!देशपांडे सर, तूम्ही गावाकडे गेलात याचे मला दू:ख आहे परंतू तूमच्या कौटूंबिक जबाबदारीच्या हेतूने हा निर्णय योग्य आहे.फक्त एक ठामपणे सांगतो की,तूमच्या सारखा मित्र होणे नाही..आठवण काढत जा...आणि हो...भविष्यात कौटूंबिक सूख,दू:खच्या वेळी अवश्य हाक द्या...!
मी जि.प.प्रा.शा. सोनवाडी, केंद्र - लासुरगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो, अन् ढेकु नदीच्या पलीकडे राहेगाव येथे गणेशराव देशपांडे सर कार्यरत होते. दोन्ही गावांचे अंतर साधारणतः अर्धा किलोमीटर आहे. एकदा बऱ्यापैकी विनोद झाला होता. पावसाळ्याचे दिवस होते.आमची दुपारी केंद्र स्तरावर बैठक होती. ढेकू नदीला कमरे इतके पाणी आलेले होते.देशपांडे सरांनी त्यांची दुचाकी आमच्या शाळेत लावली अन् पायी चालत नदीच्या पाण्यातून जाऊन त्यांच्या शाळेत गेले.पुन्हा थोड्या वेळाने आमच्या शाळेत आले ,तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत किर्द त्यांच्याच शाळेत राहून गेली.पुन्हा सर, नदीतून चालत जाऊन किर्द घेऊन आले.आता त्यांच्या दुचाकीची चावी त्यांच्याच शाळेत राहून गेली होती. शेवटी सरांनी ती चावी वसंत राऊत सरांना आणायला सांगितली अन् माझ्या दुचाकीवर आम्ही पुढील बैठकीसाठी केंद्रीय शाळेत गेलो होतो. कामाच्या तणावात माझ्यासह बऱ्याच जणांना असा विसरण्याचा अनुभव येत असतो, जो गणेशराव देशपांडे सरांना आला होता.
काही काळानंतर गणेशराव देशपांडे सरांची बदली माझी जन्मभूमी पालखेड येथे झाली होती.देशपांडे सरांचा स्वभाव अजातशत्रू अन् अगदी सिधा साधा..! माझा प्रिय बालमित्र शेख फारुख बागवान हा त्यावेळी पालखेड केंद्रातच कार्यरत होता.मी देशपांडे सरांच्या पश्चात माझा बालमित्र शेख फारुख सर याला, देशपांडे सरांच्या निर्मळ स्वभावाची पूर्ण कल्पना दिली अन् त्यांना पुरेपूर मदत करण्याचे आग्रहाने सांगितले होते. जो पर्यंत देशपांडे सर माझी जन्मभूमी पालखेड येथे कार्यरत होते तो पर्यंत माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याने मी अपेक्षा केल्या पेक्षाही खूप जास्त प्रमाणात गणेशराव देशपांडे सरांना सहकार्य केले होते.विशेष म्हणजे माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याचे वडील तीर्थस्वरुप शेख गौस चाचा यांनी अगदी स्वतच्या लेकरासारखे देशपांडे सरांना जीव लावला होता.मी अधून मधून पालखेड येथे जायचो त्या त्या वेळी शेख फारुख याच्या घरी मायेची भेट घेण्यासाठी हमखास जायचो. शेख फारुख सर याच्या कुटुंबाचे आमच्या कुटुंबावर थेट आमच्या आजोबांच्या काळापासून सौख्य असल्याने मी, ती निव्वळ मायेची अन् ऋणानुबंधाची परंपरा टिकवून ठेवून होतो. गेल्या गेल्या शेख फारुख याचे वडील मला म्हणायचे..
" जाधव, तू टेन्शन मत ले, देशपांडे हमारा बच्चा है..! गाव मे मेहफुज है वो..!!"
हे ऐकल्यावर समाधान वाटायचे.सरकारी नोकरी करताना आपल्या गावातून माझ्या जिवलग मित्राला, देशपांडे सरांना जे सहकार्य प्रिय बालमित्र शेख फारुख सर अन् त्याच्या कुटुंबाकडून मिळाले ते देशपांडे सरांच्या अन् माझ्याही चिरकाल स्मरणात नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही..!
शेवटी राहवत नाही म्हणून म्हणतो की, देशपांडे सरांच्या गायनशैलीला योग्य व्यासपीठ मिळाले नाही.जर ते योग्य व्यासपीठ मिळाले असते तर देशपांडे सरांची गायन क्षेत्रात उत्तूंग भरारी उंच गेली असती, एवढा सरांचा स्वर मंजुळ आहे..!
असो,आपल्या मित्रत्वाच्या सहजीवनात माझ्याकडून कळत-नकळत तूमच्या भावविश्वास ठेच पोहचली असेल तर मनोभावे क्षमा करावी..! 🙏🏻
वंदे मातरम्.!
तूमचा जीवलग मित्र:नंदन विष्णूपंत जाधव पालखेडवाले, ह.मु. लासूर स्टेशन, ता. गंगापूर
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १० ऑगस्ट २०१६
स्थळ: आमचं घर - लासूर स्टेशन.

