रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

" प्रेमळ गणेशराव देशपांडे सर..! "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


" प्रेमळ गणेशराव देशपांडे सर..! "


====================================


माझ्या शिक्षकी पदाच्या कारकिर्दीत लाभलेल्या सर्वोत्तम मित्रांपैकी गणेशराव देशपांडे सर..!


सरांची आज दिनांक १० ऑगस्ट २०१६ रोजी जिल्हाबदली होऊन ते गावाजवळ गेल्याचे समजले,खूप दू:ख झाले.एका अतिषय जीवलग मित्राचा सहवास आता लाभणार नाही.सरांचे आणि माझे कौटूंबिक संबंध होते.मी व देशपांडे सर ज्यावेळेस वैजापूर तालूक्यात,शेजारी-शेजारी गावात सोनवाडी व राहेगाव केंद्र,लासूरगाव,या.वैजापूर येथे नोकरीस होतो तेव्हा बहूतांशी प्रशिक्षणास आम्ही सोबतच असायचो.वैजापूरहून येतांना हमखास पालखेडला जायचो.माझी स्वर्गवासी आई रूचकर स्वयंपाक करायची.सरांना माझ्या आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा.


माझी किंवा सरांची कोणतीही अडचण असो आम्ही सतत एकमेकांना सहकार्य करत होतो.मला आजही चांगले स्मरणात आहे,३१ मार्च २००३रोजी मध्यरात्री माझा थोरला मूलगा चि.नमनला तो दिड वर्षाचा असतांना तापेत झटका आला होता.मी व देशपांडे सर लासूर स्टेशन येथे शेजारी राहत होतो.एवढ्या रात्री देशपांडे सर अन् मी शेजारील लासुरगावात जाऊन इंगळे भाऊ यांची जीप घेऊन आलो होतो. देशपांडे सर देखील मध्यरात्री आमच्या सोबत औरंगाबादला आले होते. डॉ. खनाळे हॉस्पिटल औरंगाबाद येथे आम्हाला पोहोचवून सर, रात्री पुन्हा घरी परत गेले होते. पुन्हा दूस-या दिवशी देखील आले होते..! खरच सर, ते तूमचे आपलेपणाचे वागणे माझ्या मनाला खूपच भावले अन् कायमचे अढळ स्थान प्राप्त करून गेले..!देशपांडे सर लासूर स्टेशन येथे संध्याकाळी माझ्या घराकडे फिरायला यायचे तेव्हा भानवाडी रेल्वे गेट जवळ बसून आम्ही दोघेच तासन तास गप्पांच्या विश्वात रमून जायचो..!


मागील काही महिण्यांपासून देशपांडे सर लासूर स्टेशन येथे त्यांच्या घरी एकटेच राहत होते.मी रात्री त्यांच्या घरी जात असे.त्या वेळी सर,वेगवेगळी गाणी ऐकवत असे.सरांनाही अद्रकचा कडक चहा प्यावासा वाटला तर सर,हक्काने माझ्या घरी यायचे.इतकी हक्काने त्रास देणारी मैत्री आमच्यात निर्माण झाली होती.अर्थात ती मैत्री जीवंत असे पर्यंत असणारच..परंतू त्यात सहवास नसणार..!


देशपांडे सरांचा स्वभाव म्हणजे अजातशत्रू..! मी कधीच सरांना कोणासोबत भांडतांना पाहिले नाही.सिधा-साधा स्वभाव..चटकन् कूणावरही विश्वास ठेवणारा माणूस...!देशपांडे सर, तूम्ही गावाकडे गेलात याचे मला दू:ख आहे परंतू तूमच्या कौटूंबिक जबाबदारीच्या हेतूने हा निर्णय योग्य आहे.फक्त एक ठामपणे सांगतो की,तूमच्या सारखा मित्र होणे नाही..आठवण काढत जा...आणि हो...भविष्यात कौटूंबिक सूख,दू:खच्या वेळी अवश्य हाक द्या...!


मी जि.प.प्रा.शा. सोनवाडी, केंद्र - लासुरगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो, अन् ढेकु नदीच्या पलीकडे राहेगाव येथे गणेशराव देशपांडे सर कार्यरत होते. दोन्ही गावांचे अंतर साधारणतः अर्धा किलोमीटर आहे. एकदा बऱ्यापैकी विनोद झाला होता. पावसाळ्याचे दिवस होते.आमची दुपारी केंद्र स्तरावर बैठक होती. ढेकू नदीला कमरे इतके पाणी आलेले होते.देशपांडे सरांनी त्यांची दुचाकी आमच्या शाळेत लावली अन् पायी चालत नदीच्या पाण्यातून जाऊन त्यांच्या शाळेत गेले.पुन्हा थोड्या वेळाने आमच्या शाळेत आले ,तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत किर्द त्यांच्याच शाळेत राहून गेली.पुन्हा सर, नदीतून चालत जाऊन किर्द घेऊन आले.आता त्यांच्या दुचाकीची चावी त्यांच्याच शाळेत राहून गेली होती. शेवटी सरांनी ती चावी वसंत राऊत सरांना आणायला सांगितली अन् माझ्या दुचाकीवर आम्ही पुढील बैठकीसाठी केंद्रीय शाळेत गेलो होतो. कामाच्या तणावात माझ्यासह बऱ्याच जणांना असा विसरण्याचा अनुभव येत असतो, जो गणेशराव देशपांडे सरांना आला होता.


काही काळानंतर गणेशराव देशपांडे सरांची बदली माझी जन्मभूमी पालखेड येथे झाली होती.देशपांडे सरांचा स्वभाव अजातशत्रू अन् अगदी सिधा साधा..! माझा प्रिय बालमित्र शेख फारुख बागवान हा त्यावेळी पालखेड केंद्रातच कार्यरत होता.मी देशपांडे सरांच्या पश्चात माझा बालमित्र शेख फारुख सर याला, देशपांडे सरांच्या निर्मळ स्वभावाची पूर्ण कल्पना दिली अन् त्यांना पुरेपूर मदत करण्याचे आग्रहाने सांगितले होते. जो पर्यंत देशपांडे सर माझी जन्मभूमी पालखेड येथे कार्यरत होते तो पर्यंत माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याने मी अपेक्षा केल्या पेक्षाही खूप जास्त प्रमाणात गणेशराव देशपांडे सरांना सहकार्य केले होते.विशेष म्हणजे माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याचे वडील तीर्थस्वरुप शेख गौस चाचा यांनी अगदी स्वतच्या लेकरासारखे देशपांडे सरांना जीव लावला होता.मी अधून मधून पालखेड येथे जायचो त्या त्या वेळी शेख फारुख याच्या घरी मायेची भेट घेण्यासाठी हमखास जायचो. शेख फारुख सर याच्या कुटुंबाचे आमच्या कुटुंबावर थेट आमच्या आजोबांच्या काळापासून सौख्य असल्याने मी, ती निव्वळ मायेची अन् ऋणानुबंधाची परंपरा टिकवून ठेवून होतो. गेल्या गेल्या शेख फारुख याचे वडील मला म्हणायचे..

" जाधव, तू टेन्शन मत ले, देशपांडे हमारा बच्चा है..! गाव मे मेहफुज है वो..!!"

हे ऐकल्यावर समाधान वाटायचे.सरकारी नोकरी करताना आपल्या गावातून माझ्या जिवलग मित्राला, देशपांडे सरांना जे सहकार्य प्रिय बालमित्र शेख फारुख सर अन् त्याच्या कुटुंबाकडून मिळाले ते देशपांडे सरांच्या अन् माझ्याही चिरकाल स्मरणात नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही..!


शेवटी राहवत नाही म्हणून म्हणतो की, देशपांडे सरांच्या गायनशैलीला योग्य व्यासपीठ मिळाले नाही.जर ते योग्य व्यासपीठ मिळाले असते तर देशपांडे सरांची गायन क्षेत्रात उत्तूंग भरारी उंच गेली असती, एवढा सरांचा स्वर मंजुळ आहे..!


असो,आपल्या मित्रत्वाच्या सहजीवनात माझ्याकडून कळत-नकळत तूमच्या भावविश्वास ठेच पोहचली असेल तर मनोभावे क्षमा करावी..! 🙏🏻

                                             

वंदे मातरम्.!


तूमचा जीवलग मित्र:नंदन विष्णूपंत जाधव पालखेडवाले, ह.मु. लासूर स्टेशन, ता. गंगापूर


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १० ऑगस्ट २०१६

स्थळ: आमचं घर - लासूर स्टेशन.

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

" आनंदाचा स्रोत, आदरणीय भावराव पाटील शेळके..!"


 

आमचे गाव, आमची माणसं


" आनंदाचा स्रोत, आदरणीय भावराव पाटील शेळके..!"


====================================


माणसाचं आयुष्य सतत या ना त्या कारणाने नैराश्यात सापडलेले असते.कधी हे नैराश्य स्वनिर्मित असते तर कधी हेच नैराश्य अवतीभोवतीच्या मानवी घटकांच्या विकृत वागण्याने आलेले असते. अशा भिन्न भिन्न प्रकारच्या मानवी नैराश्याच्या पेकटात लाथ मारून स्वतच्या आसपास देखील अजिबात येऊ न देणारी माणसं हल्लीच्या जगात अतिशय अल्पसंख्यांक होत चालली आहेत..! अशी माणसं अखंड आनंदाचा स्रोत असतात.अशी माणसं सदाबहार या मानवी स्वभावाच्या वर्तनात येत असतात. अशी अतिशय दुर्मिळ मानवी स्वभावाच्या वर्तनाची माणसं ज्याच्या सानिध्यात आली, त्याने बरेचसे मानवी मनोरुग्णाच्या आजारांना नक्कीच पळवून लावलेले असते..!


वरील उल्लेखित सदाबहार मानवी वर्तनाचे अन् आपल्या सदैव आनंदी स्वभावाचे अगदी चपखल उदाहरण आमच्या पालखेड गावात आहे,अन् त्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे आदरणीय भावराव पाटील शेळके..!


जसजशी माणसाने विज्ञानाच्या मदतीने प्रगती केली किंवा आधुनिकतेचे फॅड बोकाळले तसतसे कित्येक माणसांच्या मनाच्या व्यथा वाढतच गेल्या. अशा कित्येक मनोरुग्णांना, उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एखाद्या डॉ. मनोविकारतज्ज्ञांकडे जाऊन स्वतच्या मनाची तपासणी करून घ्यावी लागते..!   या अशा अनेक मानवी व्यथांवर अन् मनोरुग्णांवर  प्रेमळ अन् सदाबहार औषध आमच्या पालखेड गावात आहे अन् ते  म्हणजे आदरणीय भावराव पाटील शेळके..! 


मी लहानचा मोठा वयाने झालो,पण अद्याप पर्यंत तरी आदरणीय भावराव पाटील शेळके यांना कधीही नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसांच्या मानवी मनाचे प्रतिनिधित्व करताना पाहिलेले नाही..! हे मत फक्त वैयक्तिक माझेच नसून आमच्या पालखेड गावातील ज्यांनी ज्यांनी आदरणीय भावराव पाटील शेळके यांचं सानिध्य मिळविलेले आहे त्या सर्वांचं असणारच त्यात तिळमात्र शंका नाही..!


आदरणीय भावराव पाटील शेळके सध्या शरीराच्या वयाने थकले आहेत,पण त्यांचं मनाचं वय आजही शंभर देवनंदाच्या मनानांही लाजवेल असे चिरतरुण आहे. आदरणीय भावराव पाटील शेळके यांना मी किंवा माझ्या समकाळातील कुणी एखादा तरुण भेटला अन् त्या भेटीत सर्व चवींची बरसात झाली नाही, असे कधीही होणारच नाही..! अशी ही माणसं, निख्खळ  आयुष्यावर प्रेम करणारी असल्याने यांनाच मानवी आयुष्याचा खरा अर्थ समजलेला आहे असे वाटते.  आयुष्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या अतिषयी मोजक्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय भावराव पाटील शेळके  यांच्या रूपाने  ग्रेट व्यक्तिमत्व आमच्या पालखेड गावात आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो..!🙏🏻


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्याशी संवादात.. आचार्य अत्रे यांचे मार्मिक शालजोडे सापडतील..! लोकशाहीर दादा कोंडके यांच्या संवादाची झलक पाहायला मिळेल..! थोर लेखक शंकर पाटील यांची जी तळमळ ग्रामीण जीवनाविषयी होती ती पाहायला मिळेल..! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुश्राव्य भजनांची सुरेल मैफिल ऐकायला मिळेल..! एखाद्याच्या वर्तनावर परखड पण चपखल बसणारे भाष्य ऐकायला मिळेल..! एवढेच नव्हे तर आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे भाष्य देखील ऐकायला मिळेल..! वास्तविक आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी वरील उल्लेखित साहित्यिकांचे ,विचारवंतांचे विचार ऐकलेले ,वाचलेले नाही,पण उपजत समयसूचकता अन् गुण असल्याने सहज सोप्या शब्दात भाष्य करण्याची त्यांची शैली निव्वळ अप्रतिम आहे..!


आमच्या पालखेड गावात मी तिथे वास्तव्यास होतो तेंव्हा तीन भजनी मंडळे होती.श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ अन् ब्रम्हानंदी भजनी मंडळ..! या तिन्ही भजनी मंडळाच्या कळत नकळतपणे आपापसात स्पर्धा असायच्या..! कोण किती सुश्राव्यपणे भजने गातो या बाबतीत प्रत्यक्षात नाही,पण अप्रत्यक्षपणे ही स्पर्धा असायची.या तिन्ही भजनी मंडळांपैकी श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विविध संतांच्या अभंग रचना शास्त्रीय पद्धतीने गायन करत असायचे.पण ब्रम्हानंदी भजनी मंडळ यांचे गायन अन् अभंग रचना प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध गीतांवर आधारित असायच्या. जे मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध प्रकारच्या गीतांच्या चाली ऐकून असतील त्यांना लक्षात आले असेलच की, एका विशिष्ट ठेक्यावर अन् उंच स्वरात त्या गीतांचे गायन करावे लागते. आमच्या पालखेड गावातील ब्रम्हानंदी भजनी मंडळाची धुरा प्रामुख्याने सांभाळली होती ती ,आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी..! उंच आवाजात अन् सुश्राव्य चालीत विविध ब्रम्हानंदी भजने गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! मी स्वतः या भजनांचा निस्सीम चाहता होतो ,आहे अन् राहील.गावात जेंव्हा ब्रम्हानंदी भजनी मंडळाची कुणाच्या घरी भजने असायची तेंव्हा त्याचा रसास्वाद कधी मधी एक श्रवणीय प्रेक्षक म्हणून घेतला आहे. या भजनांची एक पद्धत आहे,ती अशी की, जेंव्हा एखादी अभंग रचना संपली की, मध्येच एक चारोळी पद्धतीची एक सुश्राव्य चालीत रचना उंच स्वरात गायिल्या जायची..! पूर्णपणे नीट आठवत नाही पण त्यापैकी काही शब्द पुढीलपैकी असायचे..


"बोलो भाई, माता पिता की जय,

बोलो भाई सब संतन की जय,

सियावर रामचंद्र की जय..!"


आणि वरील उंच स्वरातील रचना गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! पहाडी आवाजात अन् सुश्राव्य चालीत ऐकण्याची मज्जाच वेगळी असायची..!


माझ्या तीर्थरूप आईचा स्वर्गवास झाल्यावर तेरावा विधी झाल्यानंतरच्या रात्री आम्ही आमच्या पालखेड येथील घरी ब्रम्हानंदी भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते.त्यावेळी आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी गायिलेले विविध भजने ऐकण्याची शेवटची संधी मला मिळाली होती..! जवळ जवळ पहाटेच्या चार वाजेपर्यंत भजने सुरू होती अन् त्या भजनांचे मुख्य आधारस्तंभ होते, आदरणीय भावराव पाटील शेळके..!


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या विषयीची एक आठवण माझ्या हृदयात कायमची कोरल्या गेलेली आहे ,ती पुढीप्रमाणे..


मी त्यावेळी नोकरीला लागलेलो नव्हतो. साधारणतः जानेवारी १९९५ च्या आसपासचा प्रसंग आहे. मी आमच्या पालखेड गावातील एका केश कर्तन दुकानात डोक्याची कटिंग करायला गेलो होतो. कटिंग करायला त्या दुकानात खुर्चीवर बसलो, इतक्यात गावातील एक व्यक्तीने उंच स्वरात संवाद करत  मला खुर्चीवरून उठवले कारण त्या व्यक्तीला अगोदर कटिंग करायची होती. मीही कोणताही आढावेढा न करता खुर्चीवरून उठलो होतो.मात्र दुकानाच्या बाहेर उभे असलेले आदरणीय भावराव पाटील शेळके यांना ही गोष्ट आवडली नाही.ते दुकानात आले अन् मला म्हणाले..

" तू, खुर्चीवरून कम्हून उठला..? तुझा नंबर आहे तूच बस..! तुला कोण उठून देतो ते मी पाहतो..!"

आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी असे म्हंटल्यावर खुर्चीवर बसलेली व्यक्ती निमूटपणे उठली अन् मी त्याच खुर्चीवर बसलो अन् माझी कटिंग करून घेतली होती. हा प्रसंग काहींच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, पण माझ्या मते असेच इतर विषयाशी निगडीत प्रसंग अन् याच अशा प्रसंगात कळत नकळतपणे उभी राहणारी माणसं, , माझ्या सारख्या स्वयंघोषित अजातशत्रू माणसांच्या हृदयात  कायमचे सन्मानाचे अढळ स्थान मिळवून  असतात. मला खुर्चीवरून उठवून देणारी व्यक्ती सध्या हयात नाही, पण मला पुन्हा स्थान मिळवून देणारे आदरणीय भावराव पाटील शेळके अगदी ठणठणीत आहे..! मी भविष्यात पालखेड गावात कदाचित स्थायिक होणारही नाही, पण आदरणीय भावराव पाटील शेळके यांचा वडिलकीच्या प्रेमळ, मायाळू अन् वयाने ज्येष्ठ असूनही नेहमी मित्रत्वाचे नाते जपणाऱ्या आठवणींचा सहवास कायमचा माझ्या हृदयात असेल ,अगदी सन्मानाने..!🙏🏻


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या सारख्या आनंदी वृत्तीच्या अन् चहुमुखी व्यक्तीच्या आयुष्यभर  प्रेमात राहावं असं  हे ,ग्रेट व्यक्तिमत्व आहे..!माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आदरणीय भावराव पाटील शेळके यांना त्रिवार वंदन..!

🙏🏻🙏🏻🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ८ ऑगस्ट २०२१, रविवार.