सोमवार, ३ एप्रिल, २०२३

हुरहूर

 मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


हुरहूर..!


====================================


दिनांक २/४/२०२३, रविवार रोजी दुपारनंतर लासूर स्टेशन येथे सपत्नीक गेलो होतो.निमित्त होतं माझे कौटुंबिक स्नेही प्रिय बंधू संग्राम कुंटे यांच्या स्व.वडिलांच्या स्वर्गवास नंतर सांत्वनपर गृहभेट..!


गृहभेट झाल्यावर मी अन् माझी पत्नी पुढील प्रवासासाठी करंजगावला निघणार तोच रस्त्यात एका चाळिशी उलटलेल्या व्यक्तीने मला आवाज दिला.मी दुचाकी थांबवली.ती व्यक्ती माझ्या जवळ आली अन् मला म्हणाली..

" का हो सर, इतक्या दिवस कुठे होता तुम्ही..? लई दिवसांनी दिसू राहिले, तुमच्या हरित क्रांती प्रतिष्ठानने  लई भारी काम केलं..!"

मी त्या समोरच्या व्यक्तीला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरंच  ओळखत नव्हतो. पण मी त्यांना ओळख आहे असं दाखवून इतक्या दिवसांपासून लासूर स्टेशन येथे न दिसण्याचे कारण सांगितले. जवळ जवळ दहा मिनिटे मी त्या व्यक्तीशी बोलत होतो.माझी पत्नी बाजूला उभी राहून ऐकत होती. अखेर मला पुढे जाण्याची घाई असल्याने मी त्या व्यक्तीचा " राम राम " म्हणून निरोप घेतला.


मी रस्त्याने माझ्या पत्नीला सांगितले की, " बघ, नेहमी दिसणारी व्यक्ती कित्येक दिवसांपासून  एखाद्या व्यक्तीला दिसली नाही तरी हुरहूर लागते.मात्र असेही असते की, एखाद्या  अपरिचित  व्यक्तीला , त्यांच्या दृष्टीने परिचित असलेली व्यक्ती  दिसली नाही तरी हुरहूर लागते. दिसणं अन् न दिसणं या दोन शब्दांच्या मधील क्षण म्हणजेच आयुष्य..! आता ,बघ या व्यक्तीला मी ओळखत पण नाही,पण तो मला ओळखतो.म्हणजेच त्याला मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत या ना त्या निमित्ताने दिसत असेल.कित्येक दिवस झाले मी दिसलो नाही अन् त्यांचं मन साशंक झाले. एखादी व्यक्ती कित्येक दिवसांपासून कुणाला दिसली नाही.कोणताही संपर्क झाला नाही किंवा प्रसारमाध्यमांतून दिसली नाही की, मन हुरहूर करू लागते.हा मानवी वर्तनाचा मानवी मनाला हुरहूर करायला लावणारा प्रकार कोविडच्या आगमनानंतर विशेष करून जाणवू लागला आहे. 


कित्येक माणसं न दिसल्याने खरचं मनाला हुरहूर लागते. आपण जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत लासूरगाव रस्त्याने मी पायी असो अथवा दुचाकीवर , माझे त्यांच्याकडे लक्ष असो अथवा नसो संजय भाऊ शर्मा मला बघून त्यांच्या दुकानातून मोठ्याने " वंदे मातरम् गुरुजी..!" अशी हाक द्यायचे. आज जेंव्हा आपली गाडी संजय भाऊ शर्मा यांच्या दुकानासमोरून गेली तेंव्हा ती हुरहूर मनाला लागून गेली..! कारण संजय भाऊ शर्मा आज हयात नाहीत. त्यांचं दिसणं होतं, आज दिसणं नाही या दरम्यान जे क्षण होते तेच आयुष्य..! "


आमची दुचाकी रस्त्याने मार्गक्रमण करत करत 

करंजगाव, ता. वैजापूर येथील कोळसे पाटील यांच्या वस्तीवर पोहोचली होती. माझे कौटुंबिक स्नेही आदरणीय कोळसे सर यांच्या वयोवृध्द मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वनपर गृहभेट दिली अन् पुन्हा पुढील प्रवासाला लागलो.


मनात हुरहूर या शब्दाने पिंगा घातला होता.आत्मचिंतन विचारचक्र सुरू होते. " A Wednesday या हिंदी चित्रपटात एक खूप छान दृश्य आहे. मुंबई येथे दररोज लोकलने एकाच मार्गावर प्रवास करणारे प्रवासी असतात. त्यांचं एकमेकांना दररोजचे भेटणे होत असते. काहींचे दररोजचे  भेटणे फक्त एकमेकांकडे स्मित हास्य करून होत असते.त्या दैनिक प्रवासातील एक तरुण प्रवासी , आपल्या सोबत दररोज प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला  म्हणजेच नसिरुद्दीन शहा यांना आपल्या हाताच्या बोटातील अंगठी  काहीही न बोलता फक्त हाताची बोटे दाखवून स्मित हास्य करतो. ते जेष्ठ नागरिक नसिरुद्दीन शहा ओळखतात की , त्या तरुणाची एंगेजमेंट झाली आहे अन्  त्याची निशाणी तो मोठ्या कौतुकाने आपल्याला  दाखवत आहे. ते ज्येष्ठ नागरिक देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन फक्त स्मित हास्य करून त्याला शुभेच्छा देतात. मात्र कित्येक दिवस जातात तो तरुण त्या दररोजच्या लोकल प्रवासात दिसत नाही. मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू होतो अन् एका दररोज दिसणाऱ्या मात्र व्यक्तिगत परिचय नसलेल्या नात्याचा शेवट होतो.दररोजच दिसणं थांबून जातं.


" आम्ही अंधारीला दररोज जाणारे काही प्रवासी बसने प्रवास करणारे कायमचे होतो आणि आजही आहोत. त्या बसमध्ये शक्यतो दररोज दोन जण कंडक्टर अन् ड्रायव्हर  फिक्स असायचे. दोघेही मुस्लिम..! खूपच प्रेमळ माणसं..! आमच्या दररोजच्या प्रवासातील मी  किंवा डॉ. गिरी सर किंवा भगिनी शिक्षिका.  एकजण जरी आला नाही तरी फोन करून आम्हाला संपर्क करतील, आम्ही  येई पर्यंत बस थांबवतील आम्ही आलो की मग निघतील.इतकं घट्ट प्रेमाचे नाते निर्माण झाले होते.विशेषत: माझ्यासाठी हमखास फोन करायचे.कारण त्यांना माहित होते मला मुख्य बस स्टँडवर दुरून यावे लागते म्हणून..! एक वर्षापूर्वी पासून  दोघेही दिसेना.मला नेहमी हुरहूर लागून असायची की, हे दोघेही चाचा आता आपल्या बसमध्ये का येत नसावेत..? अखेर काही महिन्यांपूर्वी मला त्या जोडीगोळीतील कंडक्टर चाचा , छत्रपती संभाजीनगर मुख्य बस स्थानकात पुणे बस मध्ये दिसले.मी त्यांच्याकडे धावत जाऊन खुशाली विचारली अन् आता तुम्ही दोघेजण आता अंधारी मार्गे बस मध्ये का येत नाहीत असे विचारले.यावर त्या चाचांच्या डोळ्यात अश्रू आले अन् मला म्हणाले..

" गुरुजी, हमारा ड्रायव्हर साथीदार कोविड में चल बसा | हम अंधारी के तरफ साथ साथ काम पर रहते थे | अब उधर आने को दिल नही करता | उधर आये तो दोस्त की बहुत याद आती हैं..!" मी कंडक्टर चाचा यांचे सांत्वन केले अन् मुख्य बस स्थानकात काही वेळ गप्पा मारल्या.आम्ही एकमेकांनी पुढील प्रवासासाठी निरोप घेतला, पुन्हा भेटण्यासाठी..!


माणसाचे दररोजचे एकमेकांना दिसणं हेच आयुष्य..! एखादा माणूस कायमचा जेंव्हा दिसत नाही तो क्षण किंवा तिथून पुढचं आयुष्य सगळं पूर्वीच्या आठवणींवर व्यतीत करायचे असते. परिचित अथवा अपरिचित व्यक्तीला बघून आपल्याला त्या भेटीच्या वेळी काही वेळ का होईना बरं वाटतं. वरील मजकुरात उल्लेख केला आहे ते पुन्हा उल्लेखित करतो.. नेहमी दिसणारी व्यक्ती कित्येक दिवसांपासून आपल्याला दिसली नाही तरी हुरहूर लागते.मात्र असेही असते की एखाद्या  अपरिचित  व्यक्तीला , त्यांच्या दृष्टीने परिचित असलेली व्यक्ती  दिसली नाही तरी हुरहूर लागते. दिसणं अन् न दिसणं या दोन शब्दांच्या मधील क्षण म्हणजेच आयुष्य..!


ता. क. - दिसणं अन् न दिसणं या दरम्यान जे क्षण असतात तेच आयुष्य..! 


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३/४/२०२३, सोमवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा