बुधवार, १२ एप्रिल, २०२३

आशेच्या भांगाची नशा भारी..!


 


चिंतन ©️


आशेच्या भांगाची नशा भारी..!


===================================


नागराज आण्णा मंजुळे, हा माणूस जे काही सादर करतो ते एकदम जब्राट असतं. प्रत्येक सादरीकरणात सामाजिक आशय ठासून भरलेला असतो.त्या आशयाला संवेदना, घुसमट इत्यादी अनेक मानवी भावनांचे कांगोरे असतात.पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, झुंड अन् आता घेऊन आलाय घर बंदूक बिरयानी - आशेच्या भांगाची नशा भारी..!

घरातल्या बंदुकीच्या धाकात बिरयानी एकदम भारी चवदार जमून आली आहे.


नागराज आण्णा मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटांचे वैशिष्टये म्हणजे त्यात अचूक ठिकाणी , अचूक वेळी मर्मावर बोट ठेवणारी अचूक दृश्य होय. घर बंदूक बिरयानी मध्ये देखील ही अचूकता, अचूक वेळी मर्मावर बोट ठेवणारी दाखविण्यात नागराज आण्णा मंजुळे माझ्या मते यशस्वी झाला आहे. घर बंदूक बिरयानी मधील मला जाणवलेली अचूक वेळी अचूक दृश्य पुढील प्रमाणे होय..


या चित्रपटात ज्यावेळी श्रीमंत राजकीय बापाची टवाळखोर तरुण मुलं धुडगूस घालत असतात, त्यावेळी तिथं पोलीस अधिकारी राया पाटील ( नागराज आण्णा मंजुळे) यांची एन्ट्री होते.त्या टवाळखोर तरुणांना राया पाटील धो धो धुतो.त्यावेळी त्यातील एक तरुण, राया पाटील यांना निर्ढावलेल्या आवाजात पुढील आशयाचा संवाद म्हणतो की, " तुम्हाला माहित नाही माझा बाप कोण आहे..?"

यावर राया पाटील ( नागराज आण्णा मंजुळे) त्याला पुढील आशयाचे प्रत्त्युत्तर देतो "आम्ही एकाच बापाला ओळखतो..!" 

असे म्हणून तो राया पाटील बाजूला होतो अन् त्याच्या पाठीमागे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतो.

या दृष्यातून नागराज आण्णा मंजुळे यांनी अचूक वेळी, कमीत कमी दृश्यात अचूकता टिपली आहे.


दुसरा प्रसंग पुढील प्रमाणे होय..

राजकीय नेत्याच्या घरी वंचित समाजातील हलगी वाजविणारे लोक कलाकार हलगी वाजवत असतात. त्यांना त्यांच्या कलेचा मोबदला तर दूर, उलट त्यांच्या हलगीला फोडल्या जाते. त्यांना अपमानित केल्या जाते. त्याच ठिकाणी थोड्या वेळाने राजकीय पुढाऱ्यांचे निर्ढावलेले तरुण राया पाटील यांना अपमानित करून माफी मागायला लावतात.राया पाटील माफी देखील मागतो.मात्र अतिरेक होतो. राया पाटील तिथून बाहेर पडतो.बाहेर ते वंचित लोक कलाकार हिरमुसल्या सारखे बसलेले असतात.राया पाटील यांच्या लक्षात येते की, यांचा घोर अपमान त्या तरुणांनी अन् राजकीय नेत्याने केलेला असतो.त्यावेळी राया पाटील त्या हलगी वादकांना एकदम भारी हलगी वाजवायला सांगतो अन् त्या राजकीय नेत्याला अन् तिथल्या तरुणांना बदड बदड बदडतो. त्यावेळी हलगी वादकांनी हलगीचा जो ठेका धरला आहे तो निव्वळ अप्रतिम आहे. त्या प्रत्येक ठेक्यात वंचित समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला म्हणून आनंद दर्शवण्यात आला आहे.


राया पाटील यांचं अन् त्यांच्या पत्नीचे खटके उडत असतात.मात्र राया पाटील यांचं त्यांच्या पत्नीवर निस्सीम प्रेम असते.आपल्या पत्नीला चहा बनवून देणारा हळव्या मनाचा राया पाटील अन् ज्यावेळी दोघे मतभेदांमूळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात ते राया पाटील भिन्न भिन्न मानसिकतेत असतात. एकटे राहणारे राया पाटील यांना जंगलात डाकूंना पकडण्यासाठी जायचे असते, त्यावेळी ते एक कप चहा पितात अन् दुसरा चहाचा कप तसाच ठेवून जातात.आपल्या प्रिय पत्नीवर असणाऱ्या निस्सीम प्रेमाची ती सवय त्यातून अचूकपणे दर्शवली आहे.


घर बंदूक बिरयानी चित्रपटात विनोदी पद्धतीने नक्षलवाद , पोलीस, त्यांचं कुटुंब, समाजव्यवस्था इत्यादी अनेक बाबींवर भाष्य करण्यात आले आहे.या चित्रपटातील गुरा नावाची एक डाकू व्यक्तिरेखा आहे. तो त्याच्यावर झालेला अन्याय, समाजव्यवस्थे विरुद्ध त्याची चीड आकाश ठोसर समोर मोठमोठ्याने व्यक्त करतो. त्यावेळी आकाश ठोसर याला समजत नाही की, हा त्याची ही चीड माझ्या समोर कशाला व्यक्त करत आहे म्हणून. आकाश ठोसर वैतागून जातो. आपली खदखद जिथं व्यक्त करायला हवी तिथं व्यक्त करायला हवी असा रोख आकाश ठोसर याचा असतो. यातून योग्य तो संदेश गेला आहे.आपली खदखद योग्य त्या ठिकाणी व्यक्त करायला हवी.नसता ती नाहक बडबड ठरते. मात्र या दृश्यातून मनातली खदखद व्यक्त झाली.


घर बंदूक बिरयानी मधील काही दृश्य आजच्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्त्व करतात. प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात प्रशासकीय व्यवस्था अन् त्यात भरडला जातो तो इतर..! याच अत्यंत प्रभावी सादरीकरण चित्रपटाच्या शेवटी ज्यावेळी जंगलात डाकू विरुद्ध पोलीस यांच्यात चकमक सुरू असते त्यावेळी दर्शविलेले आहे.राया पाटील सारखे प्रामाणिक अधिकारी हे सर्व बघून चक्रावून जातात.


नागराज आण्णा मंजुळे हे आपल्या चित्रपटातून सामाजिक समस्येवर अचूक बोट ठेवतात. जसे फॅन्ड्री चित्रपटाच्या शेवटी जसा जब्या हातात दगड घेऊन मारतो दाखवले आहे.तो दगड जातीयवादी समाजव्यवस्थेला फेकून मारलेला असतो. घर बंदूक बिरयानी मध्ये देखील समाजव्यवस्था व त्यातील समस्या इत्यादींवर अचूक भाष्य करणारे अनेक दृश्य आहेत.


बाकी चित्रपटाच्या शेवटी आमदाराचा स्विय सहायक म्हणून किशोर कदम यांची एन्ट्री अन् त्यांचे संवाद याच चित्रपटाच्या पुढील भागाची उत्कंठा नक्कीच वाढवतात.


प्रिय नागराज आण्णा मंजुळे, घर बंदूक बिरयानीच्या पुढील भागाची प्रचंड उत्सुकता वाढीस लागली बरं का..! 

कारण, आशेच्या भांगाची नशा भारी..!👌😊


वंदे मातरम्..!


एक रसिक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १२/४/२०२३, बुधवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा