शनिवार, २२ एप्रिल, २०२३

दिलू..!





आमचे गाव आमची माणसं ©️

दिलू..!

====================================

प्रिय बालमित्र दिलू ,मी काल तुला शेताच्या बांधावरून पार बेंबीच्या देठापासून ओरडून आवाज दिला अन् तूही तुझी दुचाकी थांबवून मला बघितल्यावर खूप आनंदित होऊन आलास..! मी ज्यावेळी तुला खूप मोठ्ठ्याने आवाज दिला, त्यावेळी माझ्या सोबत असलेली माझी पत्नी देखील चक्रावून गेली की, ' हे एवढे मोठ्याने कुणाला ओरडून आवाज देऊ राहिले..?' मात्र भेट झाल्यावर ज्यावेळी मित्रा दिलू , तुझी ओळख माझ्या पत्नीला करून दिली त्यावेळी तिलाही समजले की, ही मैत्री जुनी आहे अन् त्यात अघळपघळपणा आहे. 

जे जुने नाते असते, तिथं जास्त प्रमाणात मानवी भाव भावनांची नवनिर्मिती करण्याची गरज पडत नाही. जुन्या नात्यात आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातील ठेवा जतन करून ठेवलेला असतो. जुन्या जाणत्या नात्याला खूप जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज पडत नाही. म्हणून जुनी नाती दीर्घकाळ टिकत असावीत. बालमित्र हे असेच जुने नाते असते, जे दीर्घकाळ टिकणारे असते.तिथं जास्त प्रमाणात स्पष्टीकरण द्यायची गरज पडत नाही.आपण किती शाहजूक आहोत हे फक्त आपल्या बालमित्रांनाच माहीत असते. इतर नाती यापासून कोसोदूर असतात. मी स्वतः ला खूप नशीबवान समजतो की, मला असे खूप जिवलग बालमित्र भेटले ज्यांच्या जवळ अगदी हृदयातून व्यक्त होत गेलो अन् तेही व्यक्त होत गेले. आपल्याला ठिकाण्यावर आणण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपले आई वडील अन् बालमित्रात असते असे माझे ठाम मत आहे.कारण ही नाती आपल्या आयुष्यातील सर्वात जुनी नाती असतात. जसे आम्ही काही बालमित्र ज्यावेळी एकमेकांना भेटत असतो, त्यावेळी एकमेकांना ठिकाण्यावर आणण्याचे कार्य करत असतो. आम्हीही माणूस आहोत, आमच्या कडूनही चुका होत असतात. आमच्या चुकांना ठिकाण्यावर आणणारे आम्हा काही बालमित्रांचे आई वडील आज हयात नाहीत, मात्र आम्हा एकमेकांना ठिकाण्यावर आणणारे जिवलग बालमित्र आहेत जे ही भूमिका निभावत असतात..! ज्यांच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात थोडेफार दोरीत राहू शकलो, शकतो अन् शकू..! मात्र असे खूपच कमी माणसं असतात, ज्यांच्या आयुष्यात बालमित्र सोडून आयुष्यातील प्रवासात जे इतर मित्र भेटले , ज्यांच्यात अशी नात्याची निर्मिती झाली. मात्र अशांचे प्रमाण खूप अत्यल्प आहे.
 
मित्रा दिलू, आपण थोड्या वेळात गतकाळातील आयुष्याच्या कित्येक गोधड्या उधडून काढल्या. त्या आठवणीतील कित्येक गोधड्या उधडून काढत असताना एकजण त्यावेळी आपल्या दोघांच्याही विचारांच्या धाग्यात यायचा अन् तो म्हणजे आपला खूप जिवलग बालमित्र स्व.शाम मुरलीधर शेळके..! प्रिय बालमित्र स्व. शाम हा आजही आपल्यात आहे, त्याचं दर्शन आपल्या अनेक मित्रांच्या भेटीत होत असते. फक्त अशावेळी शाम प्रत्यक्ष नसतो, तर अप्रत्यक्ष उपस्थित असतो. त्याची उपस्थिती आठवणीच्या रूपाने असते.

मला आयुष्यात ऐश्वर्य असणारे माणसं भेटली, पण ऐश्वर्यसंपन्न असणारी फारच मोजकी भेटली. माझ्या मते फक्त ऐश्वर्य असणारी माणसं अहंकारी असतात. त्यांच्यात अनेक दृश्य अदृश्य अहंकारी वृत्तीचा अहंकार असतो.मात्र ऐश्वर्यसंपन्न माणूस हा मनाने खूप श्रीमंत असतो.तिथं दृश्य अदृश्य स्वरूपातील अहंकार औषधालाही सापडत नाही. खूप अघळपघळ स्वभाव असतो अशा गोड माणसांचा..! त्यात आमचा प्रिय मित्र दिलू नक्कीच आहे. आज आपली खूप कमी वेळ भेट झाली,पण त्या भेटीत खूप काही बोललो..! आग्रहाचं खूप निमंत्रण झालं, पण वेळ नव्हती..! आपल्या गतकाळात ज्या पार्ट्या ( येथे पार्ट्या याचा अर्थ त्या तश्या ओल्या अर्थाने अर्थ अपेक्षित नाही अन् राजकीय अर्थाने तर अजिबात नाही. कारण आम्ही काही बालमित्र भेटल्यावर अन् त्यात मी सहभागी असल्यावर या अशा दोन्ही पार्ट्यांना आम्ही कोलतो..!) असो, आपल्या गतकाळात ज्या पार्ट्या अर्थात दाळ बट्टीच्या केल्या होत्या , तो आग्रह आज तू पुन्हा केलास,पण मित्रा मला पुढील प्रवासासाठी उशीर झाला असता..! त्यामुळं आपल्या आपल्या सोयीच्या पार्टीचे नियोजन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. भविष्यात तो योग नक्कीच जुळून आणू. मी तुला आज तेच सांगितले की, दाळ बट्टीची पार्टी करू मात्र त्यावेळी एक खंत असेल अन् ती म्हणजे त्यात प्रिय बालमित्र स्व. शाम शेळके सहभागी नसेल..!

प्रिय बालमित्र दिलू उपाख्य दिलीप सूराशे या माझ्या बालमित्रावर मी माझ्या ब्लॉगवर यापूर्वी देखील एक लेख लिहिलेला आहे.दिलीप सारखे क्रिकेट खेळाडू ग्रामीण भागात खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. दिलीपला जर नव्वदच्या दशकात योग्य ते मार्गदर्शन लाभले असते तर खात्रीने सांगतो, हाच आमचा प्रिय मित्र दिलीप, वरच्या स्तरावर एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला गेला असता.मात्र परिस्थिती अन् परिसर यामुळे असे होऊ शकले नाही. पालखेड येथील गतकाळातील आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघाचा दिलीप ओपनर फलंदाज होता. तसेच आमच्या पालखेड गावात माझ्या पाहण्यात फारच मोजकी अशी माणसं आहेत ,ज्यांच कधीही कुणाशीही भांडण झालेलं नाही, त्यात हा माझा प्रिय बालमित्र दिलीप सुराशे एक आहे..!

असो, मित्रा दिलू, भेटू पुन्हा कधीतरी..! 😊🙏🏻

वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २३/४/२०२३, रविवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा