रविवार, ९ जुलै, २०२३

संवेदनशील मनाचा कलाकार - गुरुदत्त "


 


चिंतन ©️


" संवेदनशील मनाचा कलाकार - गुरुदत्त "


===================================


हिंदी चित्रपट सृष्टीत काही कलाकार अतिशय संवेदनशील श्रेणीत त्यांनी स्थान मिळविलेले आहे.त्यात सर्वात उंच शिखरावर अढळ ध्रुव स्थान प्राप्त केलेले आहे गुरुदत्त यांनी..!


हिंदी चित्रपट सृष्टीत कित्येक कलाकारांच्या प्रेमाच्या कथा ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या होऊन गेलेल्या आहेत.त्यात प्रामुख्याने दोन प्रेमकथांची गारूड आजही ,त्याकाळच्या कलाकारांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्यासह मोजक्या रसिकांच्या मनावर   हळुवारपणे स्थान टिकवून आहे. त्या दोन स्वप्नवत प्रेमकथांपैकी एक अमिताभ - रेखा अन् दुसरी अजरामर स्वप्नवत प्रेमकथा गुरुदत्त - वहिदा रेहमान..! या दोन्ही प्रेमकथांमध्ये सत्यता किती होती यापेक्षा या दोन्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रेमकथांवर संवेदनशील रसिक प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केले, करत आहेत अन् तहहयात करत राहतील हे प्रेमळ सत्य आहे.


गुरुदत्त साहेब, यांची अजरामर कलाकृती " कागज के फूल " ही हिंदी चित्रपट सृष्टीतील माझ्या मते आज पर्यंतची सर्वात उत्कृष्ट संवेदशील प्रेमकथा..! एखादा पुरुष, एखाद्या स्त्री वर किती निस्सीम प्रेम करतो त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गुरुदत्त अन् वहिदा रेहमान अभिनित कागज के फूल हा हिंदी चित्रपट होय. मोजक्या संवेदनशील भारतीय रसिकांवर ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन अन् रेखा अभिनित " सिलसिला " या चित्रपटाची जादू आहे अगदी त्याच प्रमाणे गुरुदत्त अन् वहिदा रेहमान यांच्या " कागज के फूल " या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. अर्थात आजच्या काळातील " ढिंगच्यांग ढिच्यांग " पिढीला या दोन्ही सर्वोत्तम कलाकृती बहुदा भावणार नाहीत..!


मृत्यू ,प्रत्येकाला येणारच,पण आपला भविष्यातील मृत्यू कसा होईल याचं धाडसी  चित्रीकरण देखील गुरुदत्त यांनी " कागज के फूल " याच सर्वोत्तम चित्रपटात स्वतः दिग्दर्शित करून प्रस्तुत केलेलं आहे. आता हा योगायोग की अजुन दुसरं काय माहित नाही. कागज के फूल चित्रपटाची सुरुवात अन् शेवट फक्त आणि फक्त गुरुदत्त साहेबच प्रस्तुत करू शकतात. एक कलाकार अन् दिग्दर्शक म्हणून हे काम अजिबात सोपे नव्हते,पण गुरुदत्त यांनी ही किमया त्यांच्यातील संवेदनशीलता जपलेल्या कलाकाराने सहज साध्य केली आहे.  कागज के फूल या चित्रपटात स्व. गुरुदत्त यांनी मानवी आयुष्याच्या ऐश्वर्याच्या शिखरावरील अन् मनाने उध्वस्त झालेला पुरुष अतिशय सुरेखपणे प्रस्तुत केलेला आहे.


काही माणसं त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, ते त्यांच्या आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या तरी ग्लॅमर असलेल्या आयुष्यात जगत असतात. ग्लॅमर असलेलं हे आयुष्य मात्र बऱ्याचदा खूप नाटकी ठरतं. तिथं भावना, प्रेम या बाबी तकलादू ठरतात.तिथं असतं फक्त आणि फक्त चलनी नाणं अन् सौंदर्याचा अन् राजबिंडेपणाचा पोकळ वावर..! याच तकलादू बाबींवर कित्येकजण भाळून स्वतः ला किंवा इतर सहभागी भिन्न लिंगी व्यक्तीला त्यात ओढून घेतात अन् जगत असतात, दिखाव्याचे आयुष्य..!  फारच कमी जणांच्या आयुष्यात फक्त  दिखाव्याचे आयुष्य न येता त्याच भावस्पर्शी  आयुष्याला वास्तवाची किनार लाभते. याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर धर्मेंद्र अन् हेमामालिनी यांचं देता येईल. अजूनही कुणी असेल पण ग्लॅमर असलेल्या आयुष्यातील चिरतरुण प्रेमाचं कायमचं अस्तित्व माझ्या मते धर्मेंद्र अन् हेमामालिनी यांनी आजतागायत जपलेलं आहे. इतर बरेचजण चकाकी लाभलेल्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत होरपळत राहिले अन् त्यातच काहींचा करुण अंत झाला.


गुरुदत्त साहेब यांनी खूप भावपूर्ण व्यक्त केलं आहे, कदाचित ती त्यांची व्यथा देखील असेल, जे कागज के फूल या चित्रपटात आहे...


" देखी जमानेकी यारी ,

बिछडे सभी बारी बारी ,

मतलबकी दुनिया सारी ,

बिछडे सभी बारी बारी "


" वक्त ने किया क्या हसी सितम

तुम रहे ना तुम, हम रहे ना हम


असो आज गुरुदत्त साहेब यांचा जन्मदिन आहे.

( जन्मदिन - ९/७/१९२५ )

त्यानिमित्त या संवेदनशील मनाच्या कलाकाराला माझ्याकडुन विनम्र अभिवादन..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -९/७/२०२३, रविवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा