शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

समजूतदारपणा की न्यूनगंड..?


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


समजूतदारपणा की न्यूनगंड..?


===================================


मी आज सकाळी दिनांक १/९/२०२३, शुक्रवार रोजी वर्गात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली होती.हजेरी घेऊन झाल्यावर अध्ययन अध्यापन आटोपले होते.मी वर्गाच्या बाहेर पडणार इतक्यात वर्गातील विद्यार्थ्यांमधून एकाचा कुणाचा तरी आवाज आला..

" सर, आज पवनचा वाढदिवस आहे...!"

हे वाक्य कानी पडताच मी, वर्गातील शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या पवन कडे बघू लागलो. मी पवन यास म्हणालो की,

" का रे बेटा पवन, सकाळी परिपाठाच्या वेळी का बरं नाही सांगितले की, माझा वाढदिवस आहे म्हणून.! आपण त्याचवेळी तुझे अभिनंदन केले असते ना..!" 

शाळेतील परंपरेनुसार ज्यांचा वाढदिवस असतो, त्यास परिपाठाच्या वेळी शुभेच्छा देण्याचा रीतिरिवाज असल्याने मी तसे बोललो.

यावर पवन काहीही बोलला नाही.मला वाटलं आजारी आहे की काय म्हणून मी त्यास पुन्हा विचारले की, " का रे का बरं नाही सांगितले..?" तो थोडासा उदास दिसत होता.

शेवटी वर्गाचा वर्गप्रमुख अनिकेत गोरे मला म्हणाला...

" सर, मुलांना वाटण्यासाठी त्याच्याकडे चॉकलेट नव्हते, म्हणून त्याने आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून सांगितले नाही..!"


हे ऐकून मन गहिवरून आलं. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांच्या जाणीवा जागृत ठेवून आपला आनंद झाकून ठेवणारी देखील मुलं असतात हे मी प्रत्यक्ष बघत होतो. बहुतांशी आर्थिदृष्ट्या गरीब विद्यार्थी आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कमालीची समजूतदार झालेली असतात याची जाणीव झाली होती. आपल्या पालकांची परिस्थिती अन् त्यानुसार निर्णय घेणारी अशी कित्येक मुले आहेत. पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अन् त्यातून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने घेतलेला निर्णय बघून मला खूप गहिवरून आले होते. त्याचा हा समंजसपणा होता की न्यूनगंडाची भावना..?  या विचारता मी पडलो होतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर असे जाणवले की,आपल्या अवतीभोवती असणारा मानवी घटक आपापल्या आर्थिक परिस्थिती नुसार उपक्रमाचा आनंद घेत आहे.मात्र माझी परिस्थिती तसा आनंद घ्यायला मला परवानगी देत नाही.त्यामुळं मी माझा आनंद असाच गुदमरून टाकणार. तो आनंद काहीतरी वस्तू आनंदाने कुणाला तरी देऊन साजरा करणार तर नाहीच,पण तो आनंद व्यक्त सुध्दा करणार नाही या मानसिक अवस्थेत असे कित्येक विद्यार्थी आपलं आयुष्य जगत आहेत. हा मनोभाव अशा कित्येक सर्व सामान्य परिस्थिती मधील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात येत असणार. पवन त्या समस्त विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत होता.


माझ्या नजरेसमोर लगेच शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले चॉकलेट अन् ते दृश्य आले. ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटले होते त्याचे कारण एकतर त्यांच्या घरच्यांनी त्यासाठी पैसे दिले होते किंवा मुलांनी हट्ट करून ते आणले होते. त्यामुळे त्यांना चॉकलेट वाटप करणे शक्य झाले होते.मात्र पवनची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कदाचित त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी इच्छा असूनही चॉकलेट वाटप करणे शक्य झाले नव्हते. 


ज्यावेळी शाळेतील काही विद्यार्थी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपला जन्मदिन साजरा करतात, त्याचवेळी त्याच शाळेत असाही एक मानवी घटक असतो, जो हे असे आर्थिक भुर्दंड बसणारे उपक्रम साजरे करू शकत नाही. विशेषतः सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात त्या शाळेतील काही शिक्षक देखील दणक्यात वाढदिवस साजरा करत असलेली आपण बघत असतो. नव्हे नव्हे ती एक परंपरा बनू पाहत आहे. आपण ज्या सामाजिक अन् भौतिक परिसरात वावरत असतो, तिथल्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीनुसार निर्णय घेणारी पिढी हरवत चालली आहे का..? हा उथळ चंगळवाद आहे का..? त्याचवेळी त्याच भौतिक परिसरात विद्यार्थ्यांचा  असाही एक गट असतो, जो की हे असे खर्चिक उपक्रम तो साजरे करू शकत नाही.तो विद्यार्थी अशा  खर्चिक उपक्रमाच्या  प्रसंगी स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण करून मानसिकदृष्ट्या औदासीन्य अवस्थेत जात असतो.ज्या शाळेत मूळात आर्थिक संपन्न किंवा मध्यमवर्गीय पालकांची पाल्ये शिकत असतात तिथल्या विद्यार्थ्यांत अशी मानसिक औदासीन्य असलेली वृती दिसून येणार नाही,कारण तिथल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या नसल्यात जमा असतात.मात्र याउलट सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात तिथं मात्र याचा विरोधाभास दिसून येत असतो.


शिक्षक - शिक्षिका यांनी देखील सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या मुलांच्या समोर स्वतःचा भंपक म्हणून मिरविणारे खर्चिक वाढदिवस साजरे करू नये. तरच शाळेच्या कोपऱ्यातील नाजूक अन् परिस्थितीने गांजलेले निरागस मन सृजनशील होऊन त्यांच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे असे काही शिक्षक अन् शिक्षिका माझ्या  पाहण्यात आलेले आहेत, ज्यांनी त्यांचा जन्मदिन शाळेत धुमधडाक्यात साजरा केलेला आहे. ज्यांची वाढदिवस साजरा करण्याची क्षमता नाही,अशा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आर्थिक, सामाजिक दुर्बल निरागस मनांना / विद्यार्थांना अशावेळी काय वाटले असेल..?

माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी सेवेत अद्याप पर्यंत तरी विद्यार्थ्यांच्या समोर भंपक वाढदिवस साजरा केलेला नाही. नव्हे नव्हे मी शाळेत माझा वाढदिवस साजरा केलेलाच नाही. याचा एकच प्रांजळ हेतू असा की, आपल्या अवतीभोवती असलेले निरागस अन् आर्थिक , सामाजिक परिस्थितीने रंजलेले गांजलेले बालमन न्यूनगंड अवस्थेत जाऊ नये. यात मी माझा मोठेपणा मिरवत आहे असे कृपया कुणीही समजू नये ही नम्र अपेक्षा.🙏


ता.क. - वरील लेखातील मत माझे वैयक्तिक आहे.कृपया कुणीही वैयक्तिक घेऊ नये ही नम्र अपेक्षा..!🙏🏻


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १ सप्टेंबर २०२३, शुक्रवार, शुभ रात्री.


२ टिप्पण्या:

  1. मी स्वतः आता पर्यंतच्या माझ्या २८ वर्षाच्या औपचारिक आयुष्यात अन् औपचारिक ठिकाणी स्वतः च्या जन्मदिनाच्या सोहळ्याला अजिबात येऊ दिलेलं नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यामुळे ज्यांच्या आयुष्यात असे सोहळे साजरे होऊ शकत नाही त्या नाजुक मनामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला नको हा प्रांजळ हेतू..!

    कृपया कुणीही यात माझा मीच गौरव करत आहे असे समजू नये ही नम्र विनंती..! विषयानुसार व्यक्त झालो आहे बाकी काही नाही.🙏🏻

    वंदे मातरम्
    नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
    दिनांक - २/९/२०२३, शनिवार, शुभ सकाळ

    उत्तर द्याहटवा