मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ३)
===================================
हरिद्वारहून सकाळी नऊ वाजता निघाल्यापासून ते थेट दुपारी बारा वाजेपर्यंत आमचा बस प्रवास सुरूच होता.दुपारी उंचच उंच असणाऱ्या पर्वत रांगातील घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवणं आटोपली होती. साधारणतः अर्धा तास थांबून आमचा बस प्रवास पुन्हा सुरू झाला होता. आमची बस संध्याकाळी पाच वाजता सोनप्रयाग येथे पोहोचणार होती. मात्र हे वेळापत्रक रस्त्यावरील ट्रॅफिक जाम अन् इतर काही नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती जर आली तर पोहोचण्याचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडून पडणार होते.
केदारनाथ बद्रीनाथ रस्त्यावरील प्रवासात सर्वात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. त्याचं कारण रस्त्याच्या रुंदीकरणाला असणारी मर्यादा अन् आहे त्या रस्त्यावर एकमेकांना समजून घेत वाट मोकळी करून देणारे विविध वाहनांचे चालक..! मला या प्रवासात एक खूप चांगला अनुभव हा आला की, चार चाकी वाहन चालक अजिबात कट न मारता आपली वाहने चालवत होती.विशेषत: समोरून जर एखादे चार चाकी वाहन आले तर सामंजस्याची भूमिका घेऊन कोणत्यातरी वाहनाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणे होय. माणसाच्या आयुष्यात उपलब्धता कमी असली की, तो आहे त्या परिस्थितीत समजूतदार होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण होते. याच्या उलट आपल्या इतर मैदानी प्रदेशात रस्त्याच्या मार्गांची उपलब्धता भरपूर किंवा बऱ्यापैकी मोकळी असते.एवढे असूनही आपल्या परिसरात चालक समोरच्या वाहनाला कट मारण्यात ड्रायव्हर कुळातील काहीजण पुरुषार्थ समजतात..! अर्थात याला जे अपवाद आहेत ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
पर्वतीय प्रदेशातील घाट रस्त्यावरून प्रवास करत असताना ज्याचा प्रवाश्यांना नेहमी मानसिक अन् शारीरिक त्रास होतो तो म्हणजे ट्रॅफिक जाम मध्ये अडकणे होय.त्या मानसिक अवस्थेत आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. हवेत खूप गारवा जाणवत होता.आता आपण हिमालयाच्या भौगोलिक वातावरणात आलो आहोत याची थंडगार हवेच्या स्पर्शाने जाणीव व्हायला लागली होती. स्पर्श हा बोलका असतो, याची जाणीव हिमालयाच्या थंडगार हवेच्या स्पर्शाने झाली होती. बस मध्ये बसून बसून पाय एकसारखे राहिल्यामुळे काहीसे अवघडून गेले होते.साधारणतः एक तास आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती.अखेर ट्रॅफिक जाम हळूहळू सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती. आमच्या बसचा पुढील प्रवास सुरू झाल्याने मनात खूप हायसे वाटले होते.
आकाशात काळ्याशार ढगांची गर्दी दिसू लागली होती. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत अडकत आमचा बस प्रवास सुरू होता.अखेर सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुर पार्किंग येथे आमची बस रात्री ८:३० वाजता पोहोचली होती.पाऊस सुरू झाला होता.थंडगार वारा, त्यात पावसाचे थंडगार थेंब यामुळं शरीर अजून गारठून जायला लागले होते. वास्तविक आमची बस सोनप्रयाग पर्यंत जाणार होती.आमचा शेवटचा थांबा तोच होता,परंतु पुढे प्रचंड गर्दी असल्यामुळे सर्व वाहने सीतापुर येथच थांबवली जात होती. उतरल्यावर सोबतच्या सर्वांना आवश्यक त्या सूचना अन् चालण्याचा क्रम ठरवून दिला होता. अंधार पडला होता.मी सर्वात पुढे हातात विजेरीचा (बॅटरी) प्रकाश सुरू करुन मार्गस्थ झालो होतो. उर्वरीत सर्वजण क्रमाने येत होते.थंडी, पावसाचे थंडगार थेंब अन् वाहनांच्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही सर्वजण पुढे पुढे सोनप्रयागच्या दिशेने निघालो होतो. वेगात चालणे आवश्यक होते, कारण सोनप्रयाग येथील लोखंडी पुलाच्या जवळील जीप स्थानकावरून जीपने गौरी कुंड येथे मुक्कामी पोहोचणे आवश्यक होते. रात्री दहा नंतर वर जाण्यास समस्या येऊ शकली असती. जर यदा कदाचित समस्या निर्माण झाली तर उघड्यावर कडाक्याच्या थंडीत सर्वांचीच तारांबळ झाली असती.
साधारणतः तीन किलोमीटर अंतर पायी चालत गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस मामांना गौरी कुंड येथे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विचारले.त्यांनी आमची आवश्यक ती कागदपत्रे बघितली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे का याविषयीची कागदपत्रे बघितली. तेंव्हा कुठे त्यांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. पोलिस मामांनी आवर्जून सांगितले की, लवकरात लवकर जा..! तुम्हाला अगोदरच उशीर झाला आहे. अर्थात त्यांनी हे हिंदीतून सांगितले होते.पुन्हा वेगाने पायी प्रवास सुरू केला अन् जीप स्थानकावर पोहोचलो.जीप उभीच होती.आम्ही सर्वजण त्यात बसलो अन् साधारणतः रात्री ९:१५ वाजता सोनप्रयाग येथून गौरी कुंड कडे प्रस्थान केले. सोनप्रयाग ते गौरी कुंड हा प्रवास खूपच नागमोडी वळणे घेत घेत सुरू होता. रात्रीचा अंधार असल्यामुळे बाजूच्या खोल खोल दरीतील काहीही दिसत नव्हते. दिसत होता,फक्त जीपच्या लाईटच्या प्रकाशातील समोरचा रस्ता अन् समोरून येणारी वाहने.सोनप्रयाग ते गौरी कुंड या मार्गावर फक्त जीपला प्रवास करण्यास परवानगी होती. जीप मालक बहुतांशी पहाडी क्षत्रिय राजपूत कुळातील होते. त्यांची देहबोली अन् वंदनीय योगी आदित्यनाथ यांच्या विषयी असलेली त्यांची परम श्रद्धा त्यांच्या बोलीतून जाणवत होती.
रात्री साधारणतः १० वाजता गौरी कुंड येथील जीप स्थानकावर पोहोचलो होतो.तिथून पुढे पुन्हा पायी चालत जावे लागणार होते.पुढे जीप प्रवास करण्यास परवानगी नव्हती.आम्ही पुन्हा त्याच नियोजित क्रमनुसार चालते झालो होतो.आता थंडीचा कडाका भयंकर जाणवायला लागला होता. गौरी कुंड येथील एका अरुंद गल्लीच्या गर्दीतून आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो होतो.रात्रीचे साधारणतः १०:३० वाजले होते.अधून मधून पावसाचे अतिशय थंडगार थेंब पडत होते.रात्रीचे जेवणं मुक्कामाच्या ठिकाणीच उरकून घेतली.पाणी पिल्या जात नव्हते. अतिशय थंडगार पाणी होते.
जेवणं आटोपली होती. दिवसभराचा प्रवास अन् त्यातून शारीरिक एकच स्थिती त्यामुळं अंग कडक झाल्यासारखे जाणवत होते.रात्रीचे अकरा वाजले होते.उद्या पहाटे चार वाजता उठायचे असे नियोजित झाले होते.
गौरी कुंड येथे आपण महादेवाच्या घरी वास्तव्य करत आहोत हा सुखद अन् श्रद्धेय अनुभव घेत घेत शरीर अंथरुणावर टाकून दिले अन् आस लागली होती, उद्याची..! उद्या आपण आयुष्याचे चिरंतन सत्य असलेल्या मृत्यूच्या इष्टला म्हणजेच महादेवाला भेटायला जाणार आहोत याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.स्मशानातील सत्य अन् त्याच शाश्वत सत्याचा स्वामी केदारनाथ महादेव याची कधी भेट होईल अन् कधी नाही याची श्रद्धेय आतुरता लागली होती. झोपेपूर्वी मी, माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलांनी जन्मभूमी पालखेड येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव अन् संत जनार्दन स्वामी महाराज यांचा मनोभावे श्रद्धेने जयजयकार केला अन् झोपी गेलो..!
वंदे मातरम्
हर हर महादेव..!🙏🏻🕉️👌
एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ४ /९ /२०२३, श्रावण मास, तिसरा सोमवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा