मला प्रवासात भेटलेली माणसं.©️
ऋण, मुलींचे..!
==================================
काही मुलींचे ऋण आयुष्यात उतरवणं या जन्मी तरी शक्य नाही. माया अन् निस्सीम निरागसता याचे सर्वात पवित्र नाते या जन्मी मला लाभले.
मी जेंव्हा एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत सेवेत होतो, तेंव्हा अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले. दरवर्षी तिथली लक्ष्मी मातेची जत्रा असायची.मुली आदल्या दिवशीच मला मायेनं मात्र कडक शब्दात सांगायच्या...
' सर, उद्या आमच्या गावची जत्रा आहे.उद्या जेवणाचा डबा आणू नका बरं का..! जर आणला तर पहा मग..!!आपण मस्तपैकी जत्रातून आणून खाऊ, खाऊ."
होकार देण्याशिवाय पर्याय नसायचा, कारण काहींना अन् काही आग्रहाला नकार देणं म्हणजे पाप असं माझे वैयक्तिक मत आहे. मुली या नियतीने भूतलावर पाठवलेल्या देव कन्या असतात, या मताचा मी..! त्यामुळं नकार देऊन कशाला आपण देवाला दुखवायचे..? यामुळे निमुटपणे जत्राच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र बसून मनसोक्तपणे खाऊ खायचो. जेंव्हा नियतीने भावना अन् माया यांचं एकत्रित नातं निर्माण करण्याचे ठरवले असेल त्यावेळी त्याच नियतीने स्री हे नाते निर्माण केले.त्याच स्री चा सुंदर अन् पवित्र आविष्कार मुलगी होय. त्यांच्या सोबत आयुष्याचे काही दिवस व्यतीत केले, करत आहे हा त्या नियतीच्या जवळ जाण्याचा पवित्र मार्ग आहे असे मला वाटते.
आयुष्यात काही विद्यार्थिनी खूपच आपुलकीच्या भेटल्या. एकलहेरा ता. गंगापूर येथे त्यावेळी इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेली गायत्री दीदी सुदाम भाऊ औसरमल नावाची एक अतिशय सुसंस्कारित कन्या देखील भेटली.तिच्या घरी काहीही गोड धोड पदार्थ तयार केला की, एका डब्यात घालून तो गोड पदार्थ हमखास शाळेत घेऊन यायचीच. तो गोड गोड पदार्थ म्हणजे एक प्रकारे नियतीने तिच्या देव कन्या मार्फत दिलेला प्रसाद समजूनच खावा लागायचा. तिथं नकार नसायचा..! असायचा फक्त आणि फक्त भावपूर्ण अन् श्रद्धायुक्त होकार..! इतरही सर्व विद्यार्थिनी खूपच मायाळू होत्या, पण गायत्री दीदीच्या मायाळू स्वभावात मला माझ्या स्व.आईचा आग्रह, माया अन् निरपेक्ष वृत्ती जाणवायची. याच अशा अनेकानेक आशीर्वादामुळे आयुष्यात, आयुष्याच्या सोबत जगावेसे वाटले , वाटते अन् वाटत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
इ.स. जून १९९५ मध्ये जळगाव, ता. वैजापूर येथे शिक्षक म्हणून सेवेत असताना, ऐन पावसाळ्यात माझी दुचाकी गावापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतर अलीकडेच लावावी लागत असे. पुढील रस्ता अतिशय चिखलाचा असल्याने पुढे गाडी घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. मी पुढे पायी जायचो.बिब्बण भाई यांच्या वस्तीच्या अलीकडे रस्त्यावरच माझी दुचाकी लावत असायचो.त्यावर एक कव्हर टाकून मी पुढे शाळेत जायचो. गाडीवरील कव्हर जरी यदा कदाचित उडून गेले तरी भाडाईत पाटील वस्तीवरील शाळेत इयत्ता सातवी मध्ये येणाऱ्या मुली ते कव्हर पुन्हा गाडीवर टाकून द्यायच्या. त्या मुलींनी अतिशय निर्विकार मनाने हे काम केले होते. वास्तविक त्या मुलींना मी स्वतः सांगितलेले नव्हते की, तुम्ही असे काम करा म्हणून..! पण कौटुंबिक संस्कार अन् जाणीव यामुळे त्या मुलींकडून असे कार्य होत होते.आता त्या सर्व कन्या आपापल्या सुखी संसारात सुखी आहेत.याचं आत्मीयतेने हडस पिंपळगाव, सोनवाडी, ता. वैजापूर येथील अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले अन् अंधारी येथील मुलींचे आशीर्वाद लाभत आहे. मुलींकडून मिळालेले आशीर्वाद हेच संजीवन, कारण त्यात माया असते.
काही आठवणी आपल्यातील माणूस अजूनही जिवंत आहे याची जाणीव करून देऊन माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र देतात हेच खरं..! माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात अनेक विद्यार्थी भेटले, मात्र त्या सर्वांमध्ये माझ्या स्व. आईची माया जाणवली ती फक्त मुलींमध्ये..! नियतीने माणसाच्या आयुष्यात जे काही भाव बंधने निर्माण केलीत, त्यापैकी अतिशय पवित्र भाव बंधने मुलींमध्ये निर्माण केली आहेत.पुरुष अनेकवेळा उद्दामपणा दाखवून आपलं पुरुषत्व वेळोवेळी सिद्ध करत असतो,मात्र स्री आपल्यातील भावना व्यक्तपणे तर कधी अव्यक्तपणे व्यक्त करून त्याच नियतीने तिला निर्माण केल्याचं सार्थ आयुष्य स्वतः जगत असते.
माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलींच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी बोलणाऱ्या अन् वर्तन करणाऱ्या एकमेव शिक्षिका भगिनी भेटल्या. त्याचं नाव आदरणीय पंचशीला जाधव मॅडम..! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता . गंगापूर येथे त्या मुख्याध्यापिका होत्या. याविषयी आम्ही सोबत कार्यरत असताना मी, आदरणीय जाधव मॅडमशी बोललो होतो अन् त्यांना याबद्दल विनम्र वंदन देखील केले होते. आदरणीय जाधव मॅडम मुलींशी एकरूप होऊन त्यांच्याशी एक आई म्हणून वर्तन करायच्या. आज शाळेतील शिक्षिका भगिनींपैकी कितीजणी पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलीच्या मैत्रिणी आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मुलींना त्यांच्या समस्या इत्यादी बाबी व्यक्त करताना सामाजिक समस्या जाणवत असते. माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात भेटलेल्या या संदर्भातील अनुभवावर आधारित लिहावं वाटते,पण सामाजिक मर्यादा जाणून स्वतः च्या लेखणीला थांबून अव्यक्त राहतो. या अनुभवात, मुलींच्या समस्येत, भावनिक अडचणीत मला भेटलेली अन् भेटत असलेली मुलगी , माझी स्व. आई म्हणून भेटली अन् माझ्याजवळ व्यक्त झाली एवढं त्यात पावित्र्य होते हे बाबा केदारनाथाच्या पावित्र्या सारखं पवित्र सत्य..! सामाजिक बंधनामुळे मी त्यावर जास्त काही लिहीत नाही .मुली कुणाच्याही जवळ आपल्या समस्या व्यक्त करत नसतात. त्यांना ज्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते तिथेच त्या आपल्या समस्या व्यक्त करत असतात हा माझा स्वानुभव आहे. पुरुष आपल्या समस्या भावना उथळपणे व्यक्त करून मोकळा होत असतो,पण स्री आपल्या समस्या अन् भावना तेंव्हाच अन् त्याच व्यक्तीजवळ व्यक्त करत असते, जिथं तिला समोरच्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते.ती समोरची व्यक्ती पुरुष असला तरी त्यात ती आपली आई शोधण्याचा भावूक प्रयत्न करत असते अन् समोरच्या स्री शिक्षिका मध्ये जर स्वतः ची आई जाणवली नाही तर ती अव्यक्तच राहते. मला माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात एक कन्या म्हणून अन् आपण स्वतः त्यांची आई आहोत याची जाणीव होऊन काही प्रसंगात जगायला मिळाले हे नशीबच म्हणावे.
आज याची आठवण यायचे कारण असे की, आत्ताच समजले की, आज राष्ट्रीय कन्या दिवस आहे म्हणून..! त्यामुळं यावर काहीतरी मनातून लिहावं म्हणून व्यक्त झालो.
ता.क. - वरील लेखात माझ्या बाबतीत मी व्यक्त केलेला मजकूर हा माझा आत्मगौरव आहे असे कृपया वाचकांनी समजू नये ही नम्र विनंती. आजचा दिनविशेष अन् त्या अनुषंगाने माझे अनुभव अन् आत्मविचार व्यक्त केले आहेत, बाकी काही नाही.🙏🏻
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २४/९/२०२३, रविवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा