शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ११ )







मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️


 देवभूमी..! 🕉️

(भाग क्रमांक  ११ )


===================================


बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरातून निघताना मन अगदी गहिवरुन येत होते. जिथं आपलं मन मोकळं होतं, जिथं आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवतं, जिथं अस्तित्व कुणाच्या तरी अधीन होऊन समरसून गेलेलं असतं, जिथं प्रेम, भक्ती हृदयातून व्यक्त केलेली असते,  जिथं आपली संपूर्ण चेतना समोरच्या अस्तित्वाला श्रद्धेने समर्पित केलेली असते, अशा ठिकाणाहून निरोप घेताना मन , त्या त्यावेळी अंतर्मनातून अश्रू ढाळत असते. त्या भावूक मनाला कुणीही, कितीही समजावून सांगूनही ते आपलं रुदन सुरूच ठेवत असते. आम्ही  बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात, बाबा केदारनाथाच्या गर्भगृहात आपलं मन मोकळं केलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आमचं मन बाबा केदारनाथला अधीन होऊन समरसून गेलेलं होतं. या अखिल विश्वातील सर्वात सुंदर असणारा भाव म्हणजे प्रेम अन् भक्ती..! त्या प्रेमाचा अन् भक्तीचा भाव बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात जाणवला होता. हा भावूक अनुभव आमच्या हृदयातून निघता निघता निघत नव्हता. मात्र   मानवी आयुष्याला त्याग अन् निरोप यांना सोबत घेऊनच आपलं आयुष्य व्यतीत करायचे असते हा शाश्वत विचार स्वीकारून त्या पवित्र  स्वर्गीय हवा वाहणाऱ्या परिसराचा निरोप घेतला होता. मी सह परिवार बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसराला निरोप दिला होता.निरोप हा पुन्हा कधीतरी भेट होण्यासाठीच दिला जातो यावर माझा विश्वास होता.  बाबा केदारनाथचा निरोप घेताना मी अगोदरच बाबा केदारनाथाला अगदी हृदयातून व्यक्त झालो होतो की,  " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..!  तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!" हे व्यक्त केलेले विचार राहून राहून मनात येत होते, तसतसे आमची पावलं आता बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून बरीच पुढे आली होती.


थोरला चिरंजीव नमन हा सर्वात पुढे चालू लागला होता. आम्हाला आता पुन्हा हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील केदार घाटी पुन्हा पायी चालत चालत जाऊन उतरून गौरी कुंड येथे पोहोचायचे होते. चालता चालता नमन एकदम थांबला अन् रस्त्याच्या उजव्या बाजूला बघत मला म्हणाला..

" दादा, तिकडं जेवण वाटप सुरू आहेत. आपण प्रसाद घेऊ अन् मग केदार घाटी उतरायला सुरुवात करू..!"

माझ्या नियोजनात गौरी कुंड ते नंदी बेस कँप अन् पुन्हा उतरताना बाबा केदारनाथ मंदिर परिसर ते गौरी कुंड या पायी प्रवासात जेवण करणे नव्हते. त्याचं कारण, जेवणामुळे शरीराला जडत्व येईल किंवा पोट बिघडण्याची शक्यता होती.या कारणामुळे फक्त आणि फक्त द्रव पदार्थ घेऊन पायी प्रवास नियोजित होता. मी थोरला चिरंजीव नमन याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.धाकटा चिरंजीव नयन याने थोरल्याच्या स्वरात स्वर मिळवला अन् मला बोलते केले.मी माझ्या पत्नीकडे बघून विचारले..

" तुझे काय मत आहे ,हे दोघं म्हणतात तसं प्रसादाचे जेवण करून पुढील प्रवासाला  लागायचे की, रस्त्यात लस्सी, सरबत प्यायचे..?"

यावर माझ्या पत्नीने लगेच उत्तर दिले...

" मुलं म्हणतायेत तर आपण जेवणं करू अन् मग पुढील पायी प्रवासाला सुरुवात करू..!"

 माझ्या पत्नीच्या होकारानंतर आम्ही चौघे जण ज्या बाजूला लंगर सुरू होते तिकडे जाऊ लागलो.


जिथं जेवणं सुरू होती, तिथं पोहोचल्यावर लक्षात आले की, अतिशय कडाक्याच्या थंडीत शीख पंथातील काही तरुण स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लंगर मधील भोजन प्रसाद वाटप करत होते. आम्ही रांगेत उभे राहून आम्ही ताटात भोजन प्रसाद घेतला अन् काहीसे दूर एका कट्ट्यावर जेवण करायला बसलो. काही वेळात जेवणं उरकली. तिथल्या बांधवांचे आभार मानले अन् दुपारच्या साडे बारा वाजता आम्ही गौरी कुंड कडे पायी मार्गस्थ झालो.  रस्ता आता ओळखीचा झालेला असल्यामूळे अंतिम ठिकाण कुठे अन् किती दूर आहे याचा अंदाज घेऊन आम्ही झपझप पावलं टाकत केदार घाटी उतरू लागलो होतो.केदार घाटीची उतरंड बऱ्याच ठिकाणी तीव्र होती, त्यामुळं उतरतांना पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. गौरी कुंड पासून बाबा केदारनाथकडे येताना केदार घाटी चढताना गुढग्यावर अन् मांडीवर ताण खूप पडला होता. आता बाबा केदारनाथ ते गौरी कुंड उतरतानाच्या  पायी प्रवासात पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. आम्ही काल दिनांक २०/५/२०२३ रोजी गौरी कुंड येथून दोन काठ्या सोबत घेतलेल्या होत्या. गौरी कुंड ते बाबा केदारनाथकडे चढणीच्या रस्त्यावर काठीची गरज पडली नव्हती.मात्र बाबा केदारनाथ ते गौरी कुंडकडे येताना अतिशय उतरणीच्या रस्त्यावर सोबत घेतलेल्या काठीचे महत्त्व लक्षात येऊ लागले होते. काठीचा खूप आधार वाटू लागला होता. अरुंद रस्त्याने वर चढून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढलेली असल्याने घोड्यांचा धक्का बसू नये म्हणून खूप कडेने आम्ही चालू लागलो होतो.काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता.रस्त्यावर घोड्यांच्या विष्ठेमुळे त्यात पुन्हा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल खूप झाला होता. पाय निसटून पडण्याचा धोका खूप होता. पायी उतरणारे काही भाविक पडत देखील होते. खेचर / घोड्यावर बसून वर चढून जाणाऱ्यांपेक्षा वरतून खाली गौरी कुंड कडे उतरणारे खेचर / घोडे बऱ्याच ठिकाणी पाय निसटून पडत होते. घोड्यावर खेचरावर बसलेले काही भाविक देखील खाली पडताना आढळून येऊ लागले होते. उतरणाऱ्या एका घोड्याने आमचा धाकटा चिरंजीव नयन यास धक्का दिला. इतक्यात नयनला त्याच्या आईने पटकन पकडले. जर यदा कदाचित नयन यास त्याच्या आईने पटकन पकडले नसते तर बाजूला असणाऱ्या दरीत नयन हमखास पडला असता. खूप अघटीत घडले असते.त्या धक्क्यामुळे नयन खूप घाबरुन गेला होता. आता आम्ही चालण्याचा क्रम बदलला होता. सर्वात पुढे मी , माझ्या मागे नयन , त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी थोरला चिरंजीव नमन अशा क्रमाने आम्ही गौरी कुंड कडे पायी प्रवास सुरू केला होता. थंडीचा कडाका खूपच जास्त प्रमाणात जाणवू लागला होता.


उतरताना काही ठिकाणी काही मार्ग आम्ही जुना निवडला होता. जो मार्ग जून २०१३ मधील विध्वंसक त्रासदी मध्ये वाहून गेला होता, तो मार्ग काही ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडताना काहीसा जवळचा होता त्यामुळं जुन्या मार्गाचा वापर करू लागलो होतो. मात्र जुना मार्ग बांधणीचा अजिबात नव्हता. निव्वळ दगड धोंडे, खाच खळगे, खड्डे इत्यादी समस्यांनी भरलेला होता. नव्या अन् जुन्या रस्त्याच्या अंतरात फारसा फरक नव्हता.आम्हाला निघून दीड तास झाला होता.थकवा आला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात आम्ही थांबलो. अमूल लस्सी पिलो.थांबल्यामुळे मांडीत गोळे यायला लागले होते. आता दुपारचे सव्वा दोन वाजले होते. अधून मधून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. प्रचंड गारठा होता. बसल्यावर थंडीची तीव्रता जास्तच जाणवायला लागली होती. लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारच्या सव्वा दोन वाजता पुन्हा पुढे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. 


अतिशय तीव्र उताराच्या अरुंद रस्त्याने आम्ही चौघेजण उतरू लागलो होतो. इतक्यात माझ्या जॅकेटच्या आतील शर्टच्या खिशातील मोबाईल खणखणला. अरुंद रस्ता, त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची, घोड्यांची गर्दी त्यामुळं मी आलेला कॉल घेतला नाही. भीती वाटत होती, आपण आलेला कॉल घ्यावा अन् बोलताना किंवा मोबाईल खिशातून काढताना एखाद्या घोड्याने धक्का दिला तर...काय होईल यामुळे मी कॉल घेतला नाही. काही वेळापूर्वी नयनला घोड्याचा धक्का बसला होता. नशीब, त्याच्या आईने नयनला पटकन पकडले. त्या प्रसंगानंतर आम्ही खूपच सावधपणे पुढील रस्ता मार्गक्रमण करू लागलो होतो. पुन्हा कॉल आला. कुणाचा कॉल आहे हे बघून घ्यावा असे वाटले. आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबलो. आलेला कॉल अनोळखी होता.मी कॉल उचलला . एकलहेरा ता.गंगापूर येथील माजी विद्यार्थीनीचा तो कॅला होता. दीदीचे लग्न होते अन् मला आवर्जून लग्नाला या सर असं आग्रहाचं निमंत्रण तिने दिले होते. त्या माजी विद्यार्थीनीच्या लग्न तिथीला मी हजर राहू शकणार नव्हतो, कारण तेंव्हा मी इकडेच उत्तराखंड प्रवासातात राहणारा होतो. त्यामुळं दीदीला सर्व परिस्थिती सांगितली अन् लग्नास अनुपस्थित राहण्याचे कारण सांगितले. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अन् कॉल बंद केला. मोबाईलची रेंज खूप कमी होती. अधून मधून फोन कॉल कट होत होता. इतक्यात लगेच दुसरा कॉल आला.हा कॉल ओळखीचा होता. जळगाव येथील माजी विद्यार्थी प्रकाश शिंदे याचा तो कॉल होता. कॉल घेतला अन् प्रकाशने त्याच्या घर भरणी करीता आवर्जून निमंत्रण दिले. मात्र प्रकाशला देखील प्रवासाची परिस्थिती सांगितली. रेंज खूपच कमी होती. अखेर कॉल वरील बोलणे बंद केले. पुन्हा मोबाईल जॅकेटच्या आत मध्ये ठेवून दिला.आकाशात काळया ढगांनी दाटी करायला सुरुवात केली होती. आमच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे  रेन कोट होते.जरी यदा कदाचित पाऊस सुरू झालाच तर रेन कोट परिधान करून पुढील पायी प्रवास करावा लागणार होता.पावसाच्या चाहूल मुळे आम्ही लवकरात लवकर पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो.


रामबाडा दृष्टीक्षेपात आले होते. शरीरात प्रचंड थकवा जाणवू लागला होता. मांडीत अन् पोटरीत गोळे येऊ लागले होते. त्यात रस्ता पूर्णतः किंवा अर्धा मोकळा नव्हता. येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चालणे अजून अडचणीचे ठरू लागले होते. रामबाडा आले म्हणजे आपण अर्ध्या अंतरावर पोहोचलो असा अर्थ होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ मंदिर या पायी प्रवासातील अंतरावरील रामबाडा हे ठिकाण ऐन मध्यावर आहे. रामबाडाहुन बाबा केदारनाथ कडे जाताना रस्त्याची अतिशय उंचीची चढण आहे.याचाच अर्थ बाबा केदारनाथ कडून रामबाडाकडे येताना रस्त्याची उतरंड अतिशय तीव्र उतरण आहे. थोडक्यात रामबाडा पासून बाबा केदारनाथ कडे अन् बाबा केदारनाथ पासून रामबाडाकडे जाताना अन् येताना पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी ठरते. शरीराच्या अन् मनाच्या परीक्षेत आम्ही सहभागी होऊन गौरी कुंड कडे मार्गस्थ झालो होतो. शरीर खूप थकले होते, मात्र मन अजूनही टवटवीत होते. आयुष्याचे सगळे प्रवास मनाच्या सुदृढ क्षमतेवरच होत असतात याला प्रमाण मानून आम्ही आमच्या थकलेल्या शरीराला ,आमच्या अजूनही टवटवीत असणाऱ्या मनाने ताजेतवाने केले होते. 

इतक्यात पावसाला सुरुवात झाली....


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३०  डिसेंबर  २०२३, शनिवार.


क्रमशः

 

रविवार, १० डिसेंबर, २०२३

देवभूमी - भाग क्रमांक १०







 





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  १० )

===================================

२१ मे २०२३ ची पहाट झाली होती. रात्रभर शांत झोप झाली नव्हती. तरी देखील पहाटे उठण्याची सवय असल्यामुळे नियमित वेळेला जाग आली होती. मुलं झोपलेली होती.मी अन् माझी धर्मपत्नी केदारनाथ येथील नंदी बेस कॅम्पच्या बाहेर आलो. पहाटेचे साडे चार वाजलेले होते. आजूबाजूला पांढरा शुभ्र हिमालयाचा उत्तुंग पर्वत असल्याने फारसा अंधार जाणवत नव्हता. थंडी मात्र जीवघेणी होती. पुन्हा नंदी बेस कॅम्प मध्ये आलो अन् पहाटेच्या पाच वाजता दोन्ही मुलांना झोपेतून उठवले. नंदी बेस कॅम्पच्या समोरील बाजूला शुश्रुषा / प्रात:विधी ची सोय होती.पहाटे साधारणतः एक तासात आम्ही अगदी फ्रेश होऊन आम्ही पुन्हा त्याच हॉटेल मध्ये आलो होतो जिथं आम्हाला मध्यरात्री आम्ही संकटात असताना एका देव माणसाने प्यायला कोमट पाणी दिले होते. मात्र मध्यरात्री ज्या व्यक्तीने कोमट पाणी प्यायला दिले होते ती व्यक्ती तिथं दिसत नव्हती.दुसरी एक महिला भगिनी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना पाणी, चहाची सोय करून देऊ लागली होती. माझ्या पत्नीने चहा घेतला अन् आम्ही उर्वरीत तिघांनी फक्त कोमट पाणी पिले. आता सकाळचे सात वाजले होते.बाजूलाच एका पत्र्याच्या शेड मध्ये एक दवाखाना अन् औषध विक्री केंद्र होते. तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सेवा करत होते. ते माणसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात नव्हते, मात्र त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून समजले होते की ते संघाचे स्वयंसेवक आहेत अन्  फक्त सेवाभाव म्हणून भाविकांची सेवा करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची एवढ्या प्रचंड थंडीत दिली जाणारी निस्वार्थ सेवा बघून त्यांच्या कार्याला विनम्र वंदन केले. केदारनाथ मंदिराच्या परिसरात मुक्कामी असलेल्या भक्तांची संख्या कमी प्रमाणात असल्याने रस्त्याने अजून तरी वर्दळ दिसत नव्हती. आम्ही पुन्हा नंदी बेस कँप येथे पोहोचलो.  काल  झालेला प्रचंड थकवा , रात्रीच्या आरामामुळे काही प्रमाणात कमी झाला होता. तसे बघितले तर रात्रभर शांत झोप अशी लागलीच नव्हती. एखाद्या फ्रिज मध्ये आपल्याला कुणीतरी रात्रभर ठेवले आहे याचं मानसिकतेत आमच्या शरीराने  रात्रभर आराम केला होता. नंदी बेस कॅम्प सोडण्यापूर्वी तिथल्या कर्मचाऱ्यांचे  या अशा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये देत असलेल्या विनम्र सेवे बद्दल विनम्र आभार व्यक्त करून आम्ही नंदी बेस कॅम्प मधून साधारणतः सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला होता. बाबा केदारनाथ मंदिर साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर होते.

आयुष्यात सकाळी पहिल्यांदा आजूबाजूला पांढर शुभ्र हिमालयाचा विस्तीर्ण परिसर डोळ्याचे पारणे फेडत होता.महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंग मंत्रांतील' हिमालये तू केदारम ' या ओळींची आठवण आली अन् आपोआप मुखातून हर हर महादेव असा जयघोष बाहेर पडला होता. माझ्या मागे सर्वांनी मोठ्या आवाजात हर हर महादेव असा जयघोष केला. समोर दूरवर बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. आमच्या उजव्या, डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा विस्तीर्ण अन् उत्तुंग पर्वत होता. आता हा हिमालय पर्वत आमचा मित्र असल्यासारखा जाणवू लागला होता. एखाद्याच्या सहवासात काही क्षण , वेळ गेला की, त्याच्याशी मानवी मनाची एक भावनिक विण तयार होते. आम्ही काल दिनांक २० मे २०२३ च्या दुपार पासून ते आज २१ मे २०२३ च्या या आत्ताच्या सकाळच्या क्षणापर्यंत याचं हिमालयाच्या सानिध्यात होतो. हिमालय म्हणजे बाबा केदारनाथ अन् बाबा केदारनाथ म्हणजे हिमालय हे घट्ट नाते आमच्या सोबत होते. काल बाबा केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात दर्शन घेतले होते, त्यामुळं आज बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घ्यायचे ठरले होते. सकाळचे नऊ वाजले होते. मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय वेगवान प्रवाह होता.पुल ओलांडून आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो होतो. बरेच भक्तगण हवाई मार्गाने येत होते. मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली होती. बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घेतले. मी सोबत संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी  संग्रहित केलेली विविध मंत्रांची नित्य नियम विधी पुस्तिका आणलेली होती. त्यात ऋग्वेद, सामवेद, शिव रक्षा, इत्यादी मधील मंत्र पुष्पांजली होती. त्यातील बहुतांशी भाग मुखोदगत होता, तरी पण सदरील पुस्तिकेत बघून आम्ही सर्वजण बाबा केदारनाथ मंदिराच्या बाजूला बसून नित्य नियम विधीचे श्रद्धेने वाचन केले.

बाबा केदारनाथ मंदिराचा ज्यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी  जिर्णोद्धार केला होता त्या थोर विभूतीच्या, विद्वत्तेच्या, साधुत्वाच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. जसजसे परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांचे समाधी स्थळ जवळ येऊ लागले होते, तसतसे तिथला परिसर नियोजित अन् वर्तुळाकार बांधकामाने सुशोभित दिसू लागला होता. आज तिथला परिसर जो काही सुनियोजित बांधकाम अवस्थेत दिसत होता त्याचे संपूर्ण श्रेय एका देव माणसाला होते. भारताचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदीजी यांच्या अपार श्रद्धेने अन् विकसित हेतूने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचा विकास झाला आहे. आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे वर्तुळाकार मार्गाने आम्ही काहीसे खोलवर असणाऱ्या ठिकाणी पोहोचलो होतो. आमच्या समोर आदी शंकराचार्य स्वामी यांची भव्य मूर्ती होती. ज्या थोर विभूतीने आपल्या बौद्धिक अन् वाकचातुर्याने त्याकाळी हिंदू संस्कृतीचा ध्वज उंच फडकवला होता त्या थोर साधुत्वाच्या समाधी स्थळी आम्ही शांतचित्ताने उभे राहिलो होतो. साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचा कालखंड, त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधा, त्यावेळची इथली परिस्थिती सगळं काही अंतर्मनात येऊ लागले होते. कोणत्या अदभुत शक्तीने झपाटलेली माणसं असेल ही..? श्रद्धेच्या कोणत्या शिखरावर विराजमान झालेली माणसं असेल ही..? अखंड भारत पादाक्रांत करून आपल्या विचारांना प्रसारित करत असताना कोणती दिव्य शक्ती आदी शंकराचार्य यांच्या सोबत वावरत असेल..? या अशा कित्येक अनाकलनीय , गूढ प्रश्नांचे काहूर माझ्या मनात उठलं होतं.आपण अशा अदभुत विद्वत्तेच्या, शक्तीच्या समोर नतमस्तक होतोय यापेक्षा दुसरं अजून काय हवं एका श्रद्धेय मनाला..!  आदी शंकराचार्य स्वामी यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी अखंड भारत पादाक्रांत करून अन् हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे अदभुत कार्य तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा कोणती तरी नैसर्गिक  दिव्य शक्ती सोबत असते. आमच्या सारखे कित्येकजण आजच्या काळातील विविध वाहनाच्या मदतीने गौरी कुंड पर्यंत आले होते. काहीजण गौरी कुंड पासून ते बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात पायी चालत आले होते. एवढी सुख सुविधा असताना देखील आम्ही अन् आमच्या सारखे आलेले सर्व भक्तगण शारीरिक थकव्याने गळून गेलो होते. त्याकाळी आजच्या सारखी कोणतीही आधुनिक सुविधा नसताना हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणे हा तुमच्या आमच्या सर्व सामान्य लोकांच्या मानसिकतेच्या पलिकडचा विषय आहे. आपण फक्त त्या अदभुत अन् महान व्यक्तिमत्वांच्या कार्यासमोर , त्यांच्या स्मृतीस्थळासमोर फक्त नतमस्तक व्हायचे असते.जिथं विज्ञान संपते तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होते असे कुठेतरी माझ्या वाचण्यात आले होते. त्याची अध्यात्मिक प्रचिती याची देही याचि डोळा येऊ लागली होती.मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं बऱ्याच वेळ आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी असणाऱ्या आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्ती समोर एकाग्रतेने उभे होतो.

थोड्या वेळानं तिथं असणाऱ्या पुरोहितांच्या हस्ते आम्ही आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी , आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्तीच्या सानिध्यात विधी पूजा  केली. वीस पंचवीस मिनिटे मंत्रपुष्पांजली,विधी पूजा सुरू होती. मंत्रपुष्पांजली,विधी पूजा आटोपल्या नंतर आम्ही गुरूंचे अन् आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचे मनोभावे दर्शन घेतले. सकाळचे अकरा वाजले होते. गौरी कुंड कडे पुन्हा पायी चालत जाण्याचे नियोजन होते.बाबा केदारनाथ मंदिर ते गौरी कुंड हा पायी प्रवास होणार असल्यामुळे त्या प्रवासाला अंदाजे सात ते आठ तास लागणार होते. दुपारी बारा वाजता जरी आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे पायी प्रवासाला सुरुवात केली तरी रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही गौरी कुंड येथे पोहोचू शकणार होतो. त्यामुळं आम्ही आता लवकरात लवकर बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे मार्गस्थ होण्याचा एकमताने निर्णय घेतला.

पुन्हा एकदा आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो. शेवटचे पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला, मंदिराला, बाबा केदारनाथ महादेवाला हृदयात श्रद्धेने बंदिस्त केले. माझ्या डोळ्याचा कडा पाणावल्या होत्या. आपण आपल्या जिवलगाला सोडून जात आहोत हा भावूक श्रद्धेय भाव माझ्या अंतर्रमनात आला होता. अतिशय थंडगार असणाऱ्या तिथल्या जमिनीवर आम्ही सर्वजण साष्टांग दंडवत करून बाबा केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झालो होतो. निरोपाचा क्षण , भावूक मनाला गहिवरून सोडतो. आपण आपल्या इष्टाला, आपल्या श्रध्येयाला, ज्यांच्या भेटीचे स्वप्न मी माझ्या पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर बाबा केदारनाथाला निरोप देताना माझे सर्व शरीर अतिशय थंडगार वातावरणात अजून थंडगार झाले होते. भेट आणि निरोप हा मानवी शाश्वत आयुष्याचा भाग आहे. असा भाग जो कोणत्याही मानवी आयुष्याला चुकलेला नाही.आपल्या आवडत्या व्यक्तीची, स्थळाची भेट होताना मनाला आनंद मिळतो मात्र त्याच आवडत्या व्यक्तीचा, स्थळाचा निरोप घेताना मन गहिवरून जाते. हा भावनिक अनुभव त्यांनाच येतो ज्यांचं मन अन् तन कुठेतरी अगदी अंतर्मनातून गुंतलेले असते. भक्तांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून हळूहळू पुढे पुढे चालू लागलो होतो. एखादे लहान बाळ किंवा एखादं प्रेमळ मन जसे आपल्या आवडत्या व्यक्तीला निरोप दिल्यानंतर पुन्हा पुन्हा जसे मागे वळून त्या आवडत्या व्यक्तीकडे , स्थळाकडे पाहत असते, तशी अवस्था माझी, माझ्या पत्नीची अन् दोन्ही मुलांची झाली होती. आम्ही जसेजसे बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो होतो तसतसे आम्ही अधून मधून बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला बघत होतो. 

बाबा केदारनाथ मंदिर परिसराला निरोप देताना मी माझ्या मनात  बाबा केदारनाथला म्हणालो की, " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..!  तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!

आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्याने जयघोष केला...

" हर हर महादेव..!" 🙏🏻🕉️🙏🏻
" बाबा केदारनाथ की जय..!"
" श्री. पारेश्र्वर महादेव की जय..!"
" सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय..!"
 " वंदे मातरम्..!"

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १०  डिसेंबर  २०२३, रविवार

क्रमशः



शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

ॲनिमल


 


चिंतन ©️


ॲनिमल


===================================


अखेर एका माणसाने ॲनिमल बघितला अन् संदीप भाऊ रेड्डी वांगा हे राम गोपाल वर्मा यांचं नेक्स्ट व्हर्जन आहे यापेक्षा दुसरं काही विशेष जाणवलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत राम गोपाल वर्मा यांनी सर्वप्रथम टोकाचा हिंसाचार रसिकांच्या समोर सत्या या चित्रपटाद्वारे दाखवला होता. ती मालिका राम गोपाल वर्मा यांनी पुढे त्यांच्या कित्येक चित्रपटात दाखवली. आक्रमक अन् गुन्हेगारी मानवी आयुष्यातील प्रत्येक मानवी घटकांचा स्वभाव, कला, कौशल्य इत्यादी बाबींचे नेक्स्ट व्हर्जन मधील सादरीकरण म्हणून संदीप भाऊ रेड्डी यशस्वी झाले आहेत असे वाटते..


ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरने छान अभिनय केला आहे. माणसातील पुरुषी वर्चस्वाच्या , वयाच्या विविध छटा सादर केल्या आहेत. रश्मिका मंदाना या नटीने देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेषतः ज्यावेळी तिला समजते की, आपल्या नवऱ्याचे ( रणबीर कपूर) बाहेरच्या स्री सोबत अनैतिक संबंध आहेत.त्यावेळी रश्मिका मंदानाने सादर केलेला अभिनय छान वाटला. त्यावेळी तिने आपल्या नवऱ्याला दिलेले उत्तर त्या नवऱ्यांना आहे ज्यांचे स्वतः ची पत्नी सोडून इतर स्री बरोबर बाहेरख्याली अनैतिक संबंध असतात.बऱ्याचदा एक स्री आपल्या नवऱ्याचे बाहेरच्या स्री सोबतचे अनैतिक संबंध मारून मुटकून सहन करते. जरी तिने विरोध केला तरी तो विरोध बऱ्याचदा पेल्यातील वादळ ठरते. मात्र एखाद्या स्रीने जर आपल्या नवऱ्याला फक्त सांगितले किंवा माहीत झाले की, तिचेही पर पुरुषाच्या सोबत बाहेरख्याली अनैतिक संबंध आहेत तर त्यावेळी पुरुषी मनोवृत्ती आक्रमक होऊन स्री वर हिंसा करू पाहते.ही पुरुषी आक्रमक मनोवृत्ती पूर्वी,आज अन् भविष्यात देखील वेळोवेळी समाजात बटबटीतपणे दिसून आलेली होती, आहे अन् दिसून येत राहील. अनैतिक संबंध या विषयावर ॲनिमल चित्रपटात प्रखर भाष्य केले आहे. त्या अभिनयाच्या प्रसंगात रश्मिका मंदाना अन् रणबीर कपूर भाव खाऊन गेले आहेत.


बाप अन् मुलाच्या भावविश्वाचा पसारा देखील ॲनिमल मध्ये आहे. प्रत्येक बाप अन् मुलगा यांनी स्वतः ला आपल्या एकमेकांच्या आयुष्यात ठेवून आत्मचिंतन करायला हवे यावर भाष्य केले आहे. बरीच उत्तरे सापडतात. 


आपला मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये यांनी थोडक्यात पण दमदार अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटात नाना पाटेकर नंतर एखाद्या मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपट अभिनेत्याच्या डोळ्याला डोळा भिडवून केलेला अभिनय जाम भारी आहे.


बॉबी देओल यांना चित्रपटात कमी वेळ मिळाला आहे, पण जो वेळ मिळाला आहे तो वेळ आपल्या मुक अभिनयाने उंचीवर नेला आहे.


चित्रपट प्रेक्षकांना एक सवय आहे, जी या चित्रपटाच्या वेळी पण मला दिसून आली. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू झाली की, बहुतांशी प्रेक्षक उठून निघून जायला प्रारंभ करतात. मी मात्र अगदी शेवट पर्यंत थांबून कलाकृती बघत असतो. ॲनिमल चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू होती अन् अगदी बोटावर मोजण्या इतकेच प्रेक्षक चित्रपटगृहात होते. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली संपली अन् सर्वात शेवटी काही वेळ जो काही अंगावर येणारा रक्तपात दिसून आला आहे तो प्रसंग बघून लोकेश कनगराज यांच्या विक्रम चित्रपटाच्या अगदी शेवटी थैमान घालणाऱ्या रक्तपाताची आठवण करून गेला.


ऐंशीच्या दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील मणिरत्नम दिग्दर्शित अन् कमल हसन अभिनित एक सर्वोत्तम चित्रपट आहे वेलू नायकन..! वेलू नायकनचा जर रिमेक करायचा झाला तर त्यात कमल हसनची वेलू नायकन डॉनची भूमिका आजच्या पिढीतील सर्व अभिनेत्यांपैकी रणबीर कपूरच सर्वोत्तम प्रकारे वेलू नायकन सादर करू शकतो. एक रसिक प्रेक्षक म्हणून मला असे वाटते. 


असो, शुभ रात्री मित्रांनो..! 🙏🏻😊🌹


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९/१२/२०२३, शनिवार.