चिंतन ©️
ॲनिमल
===================================
अखेर एका माणसाने ॲनिमल बघितला अन् संदीप भाऊ रेड्डी वांगा हे राम गोपाल वर्मा यांचं नेक्स्ट व्हर्जन आहे यापेक्षा दुसरं काही विशेष जाणवलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत राम गोपाल वर्मा यांनी सर्वप्रथम टोकाचा हिंसाचार रसिकांच्या समोर सत्या या चित्रपटाद्वारे दाखवला होता. ती मालिका राम गोपाल वर्मा यांनी पुढे त्यांच्या कित्येक चित्रपटात दाखवली. आक्रमक अन् गुन्हेगारी मानवी आयुष्यातील प्रत्येक मानवी घटकांचा स्वभाव, कला, कौशल्य इत्यादी बाबींचे नेक्स्ट व्हर्जन मधील सादरीकरण म्हणून संदीप भाऊ रेड्डी यशस्वी झाले आहेत असे वाटते..
ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरने छान अभिनय केला आहे. माणसातील पुरुषी वर्चस्वाच्या , वयाच्या विविध छटा सादर केल्या आहेत. रश्मिका मंदाना या नटीने देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेषतः ज्यावेळी तिला समजते की, आपल्या नवऱ्याचे ( रणबीर कपूर) बाहेरच्या स्री सोबत अनैतिक संबंध आहेत.त्यावेळी रश्मिका मंदानाने सादर केलेला अभिनय छान वाटला. त्यावेळी तिने आपल्या नवऱ्याला दिलेले उत्तर त्या नवऱ्यांना आहे ज्यांचे स्वतः ची पत्नी सोडून इतर स्री बरोबर बाहेरख्याली अनैतिक संबंध असतात.बऱ्याचदा एक स्री आपल्या नवऱ्याचे बाहेरच्या स्री सोबतचे अनैतिक संबंध मारून मुटकून सहन करते. जरी तिने विरोध केला तरी तो विरोध बऱ्याचदा पेल्यातील वादळ ठरते. मात्र एखाद्या स्रीने जर आपल्या नवऱ्याला फक्त सांगितले किंवा माहीत झाले की, तिचेही पर पुरुषाच्या सोबत बाहेरख्याली अनैतिक संबंध आहेत तर त्यावेळी पुरुषी मनोवृत्ती आक्रमक होऊन स्री वर हिंसा करू पाहते.ही पुरुषी आक्रमक मनोवृत्ती पूर्वी,आज अन् भविष्यात देखील वेळोवेळी समाजात बटबटीतपणे दिसून आलेली होती, आहे अन् दिसून येत राहील. अनैतिक संबंध या विषयावर ॲनिमल चित्रपटात प्रखर भाष्य केले आहे. त्या अभिनयाच्या प्रसंगात रश्मिका मंदाना अन् रणबीर कपूर भाव खाऊन गेले आहेत.
बाप अन् मुलाच्या भावविश्वाचा पसारा देखील ॲनिमल मध्ये आहे. प्रत्येक बाप अन् मुलगा यांनी स्वतः ला आपल्या एकमेकांच्या आयुष्यात ठेवून आत्मचिंतन करायला हवे यावर भाष्य केले आहे. बरीच उत्तरे सापडतात.
आपला मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये यांनी थोडक्यात पण दमदार अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटात नाना पाटेकर नंतर एखाद्या मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपट अभिनेत्याच्या डोळ्याला डोळा भिडवून केलेला अभिनय जाम भारी आहे.
बॉबी देओल यांना चित्रपटात कमी वेळ मिळाला आहे, पण जो वेळ मिळाला आहे तो वेळ आपल्या मुक अभिनयाने उंचीवर नेला आहे.
चित्रपट प्रेक्षकांना एक सवय आहे, जी या चित्रपटाच्या वेळी पण मला दिसून आली. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू झाली की, बहुतांशी प्रेक्षक उठून निघून जायला प्रारंभ करतात. मी मात्र अगदी शेवट पर्यंत थांबून कलाकृती बघत असतो. ॲनिमल चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू होती अन् अगदी बोटावर मोजण्या इतकेच प्रेक्षक चित्रपटगृहात होते. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली संपली अन् सर्वात शेवटी काही वेळ जो काही अंगावर येणारा रक्तपात दिसून आला आहे तो प्रसंग बघून लोकेश कनगराज यांच्या विक्रम चित्रपटाच्या अगदी शेवटी थैमान घालणाऱ्या रक्तपाताची आठवण करून गेला.
ऐंशीच्या दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील मणिरत्नम दिग्दर्शित अन् कमल हसन अभिनित एक सर्वोत्तम चित्रपट आहे वेलू नायकन..! वेलू नायकनचा जर रिमेक करायचा झाला तर त्यात कमल हसनची वेलू नायकन डॉनची भूमिका आजच्या पिढीतील सर्व अभिनेत्यांपैकी रणबीर कपूरच सर्वोत्तम प्रकारे वेलू नायकन सादर करू शकतो. एक रसिक प्रेक्षक म्हणून मला असे वाटते.
असो, शुभ रात्री मित्रांनो..! 🙏🏻😊🌹
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ९/१२/२०२३, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा