सोमवार, १० जून, २०२४

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन


रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन







 I







चिंतन ©️

रयतेचा स्वातंत्र्यदिन - शिवराज्याभिषेक दिन

==================================

वैयक्तीक अथवा सामूहिक मानवी मन स्वतंत्र असणं हे त्या त्या मानवी मनाच्या अवतीभोवती असणाऱ्या मानवी स्वातंत्र्याच्या सामाजिक वातावरणावर अवलंबून असते. जर वैयक्तिक अथवा सामूहिक मानवी मनाला कुणीतरी शारीरिक , भावनिक किंवा मानसिकरीत्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर तिथली मानवी मने एकतर पारतंत्र्यात जातात किंवा मनाने खचून जातात. प्राचीन भारताच्या कालखंडात जर बघितले तर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने राजकीय स्थैर्य अन्  त्या पाठोपाठ राज्य निर्माण करणाऱ्या अन् तिथल्या खचलेल्या समाजमनाचे नेतृत्व म्हणून त्या नेतृत्वाचा उदय होतो. चंद्रगुप्त मौर्य आपल्या नेतृत्वगुणांनी मोठे मौर्य साम्राज्य निर्माण करतो. 

इतिहास हे त्या त्या कालखंडाचे अपत्य असते. इतिहास असे अपत्य आहे जे की, त्या त्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येक कालखंडाचा इतिहास मग त्यातली व्यक्तिमत्वे देखील आलीत ती सर्व कर्माने एकसारखीच असतील असे नसते. प्रत्येकाचे कार्य , कार्य करण्याची पद्धती कालपरत्वे बदलत जाते. एकमात्र नक्की त्या त्या कालखंडाला पोषक असणाऱ्या सामाजिक परिस्थितीनुसार राज्यकर्ते अन् त्यांनी निर्माण केलेल्या राजव्यवस्था निर्माण होत गेल्या अन् त्यातून समाजमनाला आपलंसं वाटणारे नेतृत्व त्या त्या कालखंडात उदयाला येत गेले. हा इतिहास आहे , हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील असेल यात तिळमात्र शंका नाही. याला कोणताही कालखंड अपवाद नाही. फरक फक्त इतकाच की, त्या त्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती नुसार त्या त्या कालखंडातील समाजमनाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते निर्माण होतात हा इतिहास ,हेच वर्तमान आहे अन् हेच भविष्य देखील आहे.

मध्ययुगीन भारताच्या कालखंडात जर डोकावून बघितले तर माझ्या मते आपल्या भारतवर्षात दोन असे महान राज्यकर्ते झाले ज्यांना सर्व सामान्य , तळागाळातील समाजमनाने अगदी हृदयातून स्वीकारले अन् साथ दिली. त्यांना अशा समाजमनाने अगदी हृदयातून स्विकरणायचे कारण होते त्या महान राज्यकर्त्यांचे आपल्या रयतेशी , त्यातल्या त्यात सर्व सामान्य रयतेशी असलेलं अत्यंत प्रेमळ प्रामाणिक नाते होय. त्याच सर्व सामान्य लोकांनी या दोन्ही राष्ट्र पुरुषांवर जीवापाड प्रेम केले अन् कृतीतून साथ देखील दिली.  मध्ययुगीन भारताच्या कालखंडातील ते दोन महान राज्यकर्ते होते महाराणा प्रतापसिंह महाराज अन् छत्रपती शिवाजी महाराज..! 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. येथे ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी  शब्द नसून त्यामागे खूप मोठा सामाजिक अर्थ अभिप्रेत आहे. तत्कालीन काळात  आपलं स्वार्थी हित जोपासणारे, गोर गरिबांवर अत्याचार , अन्याय करणारे या सर्वांना फाट्यावर मारून अगदी तळागाळातील सर्व सामान्य लोकांना सोबत घेऊन आपलंसं करून राजसत्ता स्थापित कुणी केली  असेल तर ती सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी..! त्यामुळं ' रयत ' हा फक्त तीन अक्षरी शब्द नसून त्या मागे छत्रपती शिव प्रभूंनी निर्माण केलेली अन् स्थापित केलेली संस्कृती आहे. अशी संस्कृती जिथं आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास हाय प्रोफाईल लोकांपेक्षा समर्पण वृत्ती अन् जाणीव असणाऱ्या सर्व माणसाला केंद्र बिंदू मानून ' रयतेचे राज्य ' प्रारंभ झाले. आणि याचे सर्वोतोपरी श्रेय जाते त्या महान व्यक्तिमत्त्वाला ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र नामोल्लेखाने पुजतो.

मानवी आयुष्याला सर्वात प्रिय काय असेल तर तर स्वातंत्र्य असते. समस्त जणांच्या मनात स्वातंत्र्याची चेतना प्रज्वलित करण्यात ज्या पवित्र अन् श्रद्धेय मनाने आपल्या कृतीतून सिद्ध केले ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज होते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला जो स्वातंत्र्याचा आशावाद दाखवला होता तो त्यांनी रयतेचे राज्य स्थापित करून पूर्णत्वास नेला. तो मंगलमय पवित्र दिवस होता ६ जून १६७४. याच दिवशी गोर गरीब, वंचित, दीन दुबळ्या , सर्व सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक किल्ले रायगड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला होता. ही घटना तिथून पुढच्या समस्त भारतीय समाजमनावर दीर्घकालीन परिणाम करणारी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा तिथून पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत गेला. शून्यातून , स्वकर्तृत्वाने, श्रद्धा अन् जाणीव असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन अंधारलेल्या मार्गातून पुढे जाऊन रयतेचे राज्य निर्माण केल्या जाऊ शकते याची प्रचिती आली. शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा त्या समस्त सर्व सामान्य लोकांचा होता, ज्यांना असे जाणवले होते की,कुणीतरी आपला माणूस राजसत्तेत सिंहासनावर आरूढ झाला आहे याची प्रचिती आली होती. सर्व सामान्य लोकांची हीच प्रेरणा आपल्या भारतात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी निमित्त ठरली. प्राचीन भारताच्या कालखंडात महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या रूपाने लोकशाहीची पाळेमुळे रोवण्यासाठी जो प्रारंभ झाला होता, त्याचा वेलू गगनावरी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उंचच उंच गेला. शिवराज्याभिषेक सोहळा रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून गेला होता. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्यांची एखादी कृती रयतेतील शेवटच्या मानवी घटकाला सुखावून जाते तेंव्हा तिथं खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य स्थापन झाल्याचा सामाजिक अर्थ वास्तवात उतरत असतो. हे भाग्य छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, कर्म अन् धर्माने प्राप्त केले होते. त्यामुळं समस्त लोकांच्या हृदयात शिवराज्याभिषेक सोहळा ही घटना स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी क्रांतिकारी घटना होती.

दिनांक ६ जून २०२४ , गुरुवार रोजी सकाळी छत्रपती शिवरायांचे मूळ गाव तीर्थक्षेत्र वेरूळ येथील स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले गढी परिसर - जि. छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय नेत्रदीपक ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी अन् माझी धर्मपत्नी पहाटेच तीर्थक्षेत्र वेरूळ येथे उपस्थित झालो होतो. आमचं नशीब, या पुण्यवान अन् अभिमानास्पद प्रसंगात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. माझा जिवलग मित्र, जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व तथा गुरू बंधू मनोहर गावडे ( जि.प. शिक्षक ) तसेच राजेंद्र भाऊ पवार आणि त्यांचे इतर सर्व  सहकारी यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिषेक सोहळ्याचे खूपच छान नेत्रदीपक नियोजन केले होते. पहाटेच संपूर्ण परिसराला फुलांनी, आसन व्यवस्था इत्यादी आकर्षक पद्धतीने सजवले होते. १२५ जोडप्यांच्या शुभहस्ते , प्रत्येक जोडप्याच्या समोर असलेल्या शिवप्रभूंच्या मूर्तीवर वेद शास्त्र संपन्न ब्रम्हवृंदाच्या मुखातून निघणाऱ्या पवित्र मंत्रांच्या उच्चारात पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाचे अतिशय नियोजपूर्वक आयोजन करण्यात आले होते. कुठेही नियोजन चुकणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. शिव प्रभूंचा पूजन सोहळा श्रध्देने संपन्न झाल्यानंतर जे पती पत्नी पूजन सोहळ्याला बसले होते त्यांना , त्यांनी अभिषेक करून पूजन केलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती आयोजकांकडून श्रद्धापूर्वक सप्रेम भेट दिली.  एक श्रद्धेय अन् उत्कृष्ट नियोजन अन् आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे हृदयातून मनःपूर्वक कौतुक..!

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून जगण्याला प्रेरणा देणारा मूलमंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कित्येकांना प्रेरणा मिळाली.कित्येक पिढ्या जगल्या जिवंत राहिल्या आहेत अन् राहणार आहेत. प्रत्येकाचे  जगणं भिन्न भिन्न होते, आहे अन् राहील इतकेच..!

लेखाच्या शेवटी डॉ. सदाशिवराव शिवदे लिखित असलेल्या काव्यातील काही ओळी व्यक्त करून सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवरायांना विनम्र वंदन करून थांबतो.( काव्य ओळी स्रोत -  यू ट्यूब )

शककर्त्यांचा मेरुमनी तू , राजश्रींचा राजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा 

महान मंदिर महाराष्ट्राचे , सुफलीत संचित संह्याद्रीचे
संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा , पावित्र्याच्या तेजा 
युगंधराचा योगी अन् तू सामर्थ्याचा सर्जा  || १ ||

छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
हर हर महादेव 
वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक - १० जून २०२४, सोमवार.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा