मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
बुवा तिथे बाया – एक अपूर्ण राहिलेली आठवण..!
=====================
आम्ही पालखेड येथे श्री.पारेश्वर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकायला होतो.त्यावेळी आमचे गुरुवर्य आदरणीय जी.एम.भगत सर यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ हे नाटक करण्याचे ठरविले होते.नाटकाचे नाव ऐकल्या ऐकल्या आम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना गुदगुल्या झाल्या होत्या.आम्ही पालखेडकर मुळातच नाटकी अन् कलेवर निस्सिम प्रेम करणारे असल्याने उत्कृष्ट लेखकाचे नाटक असल्याने ’ बुवा तिथे बाया ’ हे धाडसी नाटक करण्याचे ठरविले होते.
त्यावेळी आजच्या सारखी अद्ययावत पुस्तके मिळण्याचे ऑनलाइन व्यवस्था नव्हती. सदरील नाटकाचे पुस्तक तत्कालीन औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे मिळेल या आशेने आमच्याच वर्गातील वर्गमित्र रमेश घोडके अन् मी पालखेड येथून पहाटे पायी चालत निघून परसोडा रेल्वे स्टेशनवर भल्या सकाळी पोहोचलो. तिथून सकाळच्या रेल्वेने छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरातील सर्व पुस्तकांचे दुकाने पालथे घातले मात्र आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नाही.
रिकाम्या हाताने अन् अर्धवट उपाशी पोटाने आम्ही पुन्हा परतीच्या संध्याकाळच्या रेल्वेने परसोडा रेल्वे स्टेशनवर उतरून पालखेड येथे परतलो होतो. सदरील नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे आम्ही काही विद्यार्थी अन् आमचे गुरुवर्य आदरणीय भगत सर नाराज झालो होतो.
आमच्या पालखेड गावात जी काही अत्यंत मोजकी नाटकं आम्हा पालखेडकरांनी आपल्या कलासक्त अभिनयाने सादर करून अजरामर केलेली आहेत त्यात आदरणीय भगत सर दिग्दर्शित अन् थोर लेखक वसंत सबनीस लिखित ’ विच्छा माझी पुरी करा ’ या नाटकाचा आजही पालखेड गावाच्या नाट्य परंपरेतील इतिहासात आवर्जून उल्लेख केल्या जातो.माझे मोठे बंधू सुनील भाऊ, अंबादास भाऊ घोडके, नारायण भाऊ रोठे इत्यादी वर्गमित्रांनी भगत सर दिग्दर्शित विच्छा माझी पुरी करा या नाटकाला आपापल्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्यातल्या त्यात या नाटकातील नारायण भाऊ रोठे यांनी " हल्या... हप्प...थिर्र...या अजरामर वाक्याने या नाटकाला अन् नारायण भाऊ रोठे यांच्या सर्वोत्तम अभिनयाला आमच्या पालखेड गावातील नाट्य परंपरेत अजरामर केलेले आहे.
जर यदा कदाचित आम्हाला त्यावेळी आचार्य अत्रे लिखित ’ बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले असते तर कदाचित पालखेड येथील नाट्य इतिहासात आमच्याही नाटकाची नोंद झाली असती.
साधारणतः बावीस वर्षापूर्वी मी, माझी पत्नी आमचा थोरला चिरंजीव त्यावेळी थोरला चिरंजीव छोटासा होता असे आम्ही सह परिवार दुचाकीवर प्रवास करून एका धर्मगुरुचे दर्शन घ्यायला गेलो होतो.दर्शन घेतले.त्या धर्मगुरूच्या बाजूला एका भांड्यात सफरचंद अन् दुसऱ्या भांड्यात गोड गोड साखरेचे दाणे होते.आम्ही श्रद्धेने दर्शन घेतले.आम्हाला दर्शन झाल्यावर संबंधित धर्मगुरूने गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद दिला.आम्ही तो प्रसाद अत्यंत श्रद्धेने घेतला.थोड्याच वेळात तिथे आलिशान चारचाकी गाडीतून काही श्रीमंत माणसं आले.त्यांचे वस्र अन् अंगावरील सोन्याच्या भरजरी दागिन्यांवरून हाय प्रोफाईल भक्त जाणवत होते.त्या श्रीमंत भक्तांनी पण त्या धर्मगुरूचे दर्शन घेतले.मात्र यावेळी त्या धर्मगुरूने बाजूला. असलेल्या भांड्यातील सफरचंद एक एक करून त्या श्रीमंत भक्तांना प्रसाद म्हणून दिले. हे दृश्य पाहून मी विचार केला की, आम्ही सर्व सामान्य आहोत म्हणून आम्हाला गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद आणि नुकतेच आलेले हाय प्रोफाईल भक्त श्रीमंत आहेत म्हणून त्यांना सफरचंद..! कुणाला काहीही वाटो मात्र हा भेदभावच होता.एखादा इथे लॉजिक लावेल की, प्रसाद आहे जो दिला तो घ्यावा वगैरे..! मात्र हे लॉजिक निव्वळ तकलादू ठरते. गोष्ट छोटी होती, मात्र त्या प्रसंगावरून माझी त्या धर्मगुरु वरील श्रध्दा समाप्त झाली ती कायमची..!
प्रभू श्रीरामने शबरीचे उष्टे बोरे खाल्ले , श्रीकृष्णाने आपला गरीब मित्र सुदामा याला सन्मानाने जवळ घेतले अन् छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय सर्व सामान्य कुटुंबातील माणसांना आपलंसं केले.श्रीमंती, ऐश्वर्य , शक्ती असतानाही सर्व सामान्यांना जे समानतेची वागणूक देतात ते आपले अनुकरणीय आदर्शवादी पूर्वज आहेत. आपल्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या समता अन् बंधुता या मूल्यांचे मूळ स्रोत हेच राष्ट्रपुरुष आहेत. कुठलाही सामाजिक भेदभाव करणारे आदर्शवादी कधीच नसतात.
मी काही वर्षापूर्वी प्रत्येक धर्मातील ढोंगी धर्मगुरुंवर एक लेख लिहिला होता.जर यदा कदाचित सर्च करून उपलब्ध झालाच तर पुन्हा शेअर करील. प्रत्येक धर्माच्या आडून त्या त्या धर्मातील काही ढोंगी धर्मगुरु, तत्त्वचिंतक , उपदेशक, आपापल्या धर्मातील देवभोळे असणाऱ्यांना फसवून आपल्या पिशव्या, थैल्या, तिजोऱ्या भरून आर्थिक संपन्न होतात अन् त्यात भरडल्या जातात काही स्री अन् पुरुष..! विशेषतः यात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात भरडल्या जातो.
मात्र इथेही एक मेख आहे. पीडित अन् पीडिता जर स्वतःहून आपल्या आयुष्याला उध्वस्त करून घेत असेल तर..?
हा देखील मोठा सामाजिक प्रश्न आहे.याचे उत्तर बुद्धिवंतांच्या सहज लक्षात येईल.
बाकी मौन सर्वार्थ साधिके..!😷🙏
ता.क. - आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे धर्म आणि धर्मगुरु यांच्यावरील अनेक जालीम बौद्धिकं सदैव प्रासंगिक आहेत.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २४/३/२०२६, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा