#चिंतन ©️
आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.
=====================
लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, आता आशा दीदी गेल्या.मृत्यूच्या डोहात दोन स्वर कायमचे विसावले. जरी लता दीदी आणि आशा दीदी यांच्या वर्तमानातील आयुष्यातील स्वर कायमचे थांबले असले तरी त्यांनी गायन केलेला प्रत्येक स्वर पिढ्यानपिढ्या, स्वरांची पूजा करणाऱ्या कित्येक भक्तांना ऐकू येत राहील.
काही चित्रपटावर लिहायला हळुवार मन थांबते.कारण त्या चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवाचे असते.व्यक्त करायला लागलो की भावना स्तब्ध होते.माझ्या भावविश्वात असे दोनच चित्रपट आहेत ज्यांना फक्त आणि फक्त अनुभवून आत्मिक आनंद प्राप्त करत असतो.त्या भावविश्वातील एक चित्रपट आहे सी.प्रेमकुमार लिखित अन् दिग्दर्शित ' 96’ आणि दुसरा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे गुलजार साहेब लिखित आणि दिग्दर्शित इजाजत..! या दोन्ही चित्रपटांवर लिहायला लेखणी थांबते , कारण ह्या दोन्ही चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवत असतो. काही भावना व्यक्त न करता हृदयाच्या देव्हाऱ्यात जपून ठेवायच्या असतात.
माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखादे दीर्घ काव्य ठरावे असा एकमेव चित्रपट आहे अन् तो म्हणजे इजाजत..! इजाजत चित्रपटाची कथा अन् पटकथा जर थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी लिहिली असती तर तो काहीसा प्रखर भाष्य करणारा चित्रपट झाला असता.मात्र इजाजत चित्रपटाला साहित्य विश्वातील अत्यंत मृदु , संवेदनशील लेखक कवी गुलजार साहेब यांनी प्रस्तुत केले आणि एक अत्यंत तरल भावनाशील चित्रपट इतिहासात अजरामर झाला.
संपूर्ण इजाजत चित्रपटच एक छानसे काव्य आहे अन् त्या काव्यातील सर्वोत्तम काव्य आहे...
" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.."
या दीर्घ पद्य रचनेला जेंव्हा गुलजार साहेब यांनी लिहिले अन् संगीतकार पंचमदा ( आर. डी.बर्मन ) यांच्या समोर ठेवले तेंव्हा पंचमदांना वाटले चित्रपटातील सीन लेखन असावे. मात्र गुलजार साहेब यांनी सांगितले हा मजकूर सीन लेखन नसून काव्य लिहिले आहे.यावर पंचमदा बुचकळ्यात पडले अन् आश्चर्यचकित होऊन म्हणाले...
" एवढे मोठे काव्य..? "
बाजूला आशा दीदी भोसले बसलेल्या होत्या.त्यांनी या काव्याच्या पहिल्या ओळी गुणगुणल्या. असे करत करत एका अजरामर गीताच्या , दीर्घ काव्याला संगीतात बंदिस्त करून रसिकांच्या समोर पंचमदांनी प्रस्तुत केले." मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." या काव्यातील प्रत्येक ओळ तरल भावूक मनाच्या भावना व्यक्त करते. एखादे सुंदरसे फूल एखाद्या स्रीने आपल्या डोक्यावर लावावे अन् त्या फुलाचे सौंदर्य वाढवावे तसेच काहीसे या काव्यामुळे आशा दीदी यांनी गुलजार साहेब यांच्या या काव्याचे सौंदर्य अजून वाढवून इतिहासात अजरामर केले. याचं काव्य लिखाण बद्दल गुलजार साहेब यांना आणि अत्यंत सुरेल आवाजात गायन केल्या बद्दल आशा दीदी भोसले यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आत्मिक आनंद देणाऱ्या बाबींना जपून ठेवून निवांत वेळी अनुभवायचे असते.जसे की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात गुलजार साहेब लिखित दिग्दर्शित इजाजत चित्रपटाला अनुभवत असतो.
असो, आज गायन क्षेत्रातील चतुरस्त्र सारस्वत आशा दीदी भोसले यांचा स्वर्गवास झाला आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
फोटो स्रोत : सोशल मीडिया
वंदे मातरम्
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १२/४/२०२६, रविवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा