बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

शौर्य तीर्थक्षेत्र भेट, गिरगाव चौपाटी लगत..!" " हुतात्मा तुकाराम ओंबळे "



 

मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" शौर्य तीर्थक्षेत्र भेट, गिरगाव चौपाटी लगत..!"

            " हुतात्मा तुकाराम ओंबळे "

_________________________________________

                                                          

आम्ही मे २०१७ च्या सुरुवातीच्या आठवड्यात मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलं धार्मिक तीर्थक्षेत्र, आधुनिक तीर्थक्षेत्र यांचे मनोभावे दर्शन व वैज्ञानिक कुतूहलापोटी प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलो. में २०१७ च्या परतीच्या प्रवासात वेरावल -गुजरातहून दुपारी १:२०ला रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सकाळी ७:३४ला पोहचली.सकाळी फ्रेश झालो व मुंबईचा वडा पावचा नाश्ता केला.वास्तविक ज्योतिर्लिंग सोमनाथला जातांना ज्यावेळी मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उतरलो होतो;त्यावेळी तेथील गर्दी पाहून व गतकाळातील याच ठिकाणी आपल्या अस्मितेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या स्मृति जाग्या झाल्या होत्या...! परंतु सोमनाथला जातानाच्या प्रवास नियोजनात मुंबईचे आधुनिक तीर्थक्षेत्र-तारांगण व विज्ञान केंद्र दर्शन होते.आणि त्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतलाही..! मात्र सोमनाथहून येतानांच्या प्रवास नियोजनात दर्शन घेण्याची व नतमस्तक होण्याची सारखी हुरहूर लागली होती...!


 एका असामान्य तीर्थक्षेत्राची, एका असामान्य शूरवीराच्या प्राणाच्या बलिदानाने पूनित झालेल्या " शौर्य तीर्थक्षेत्र " ला भेट देण्याची...! ते " शौर्य तीर्थक्षेत्र " होते सिंधू सागराच्या किनाऱ्यावरील गिरगाव चौपाटीच्या मुख्य रस्त्यालगत..!आणि त्या शौर्य तिर्थक्षेत्राचे वंदनीय शौर्य पूरूष होते..."हुतात्मा तुकाराम ओंबळे साहेब( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)...!! 


 टॅक्सीतून उतरून आम्ही अथांग सिंधू सागराला नजरेत सामावून घेतले..!मुख्य रस्त्यावर आलो.एका शहर पोलिसाला मी विचारले 

" साहेब,इथे शौर्य पूरूष तुकाराम ओंबळेजींचे स्मारक कुठे आहे..?" माझा हा प्रश्न ऐकुन ते शहर पोलिस आश्चर्यचकित व अभिमानास्पद नजरेने माझ्याकडे काही क्षण बघतच राहिले..!मग काही क्षणानंतर त्यांनी प्रेमाने ,आत्मीयतेने आमची चौकशी केली..!मी त्यांच्या मानसिकतेचा बरोबर अंदाज लावला की, बहुदा हुुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या स्मारकाची चौकशी केल्याने त्यांना खूप आनंद झाला होता..!आम्हाला दुरून ते ठिकाण दाखवून ते आपल्या सेवेसाठी गेले..!


गिरगाव चौपाीवरील मुख्य रस्त्यालगतच ते "शौर्य स्थळ " होते..!आम्ही सर्वजण मी ,माझी पत्नी,थोरला मुलगा चि.नमन व धाकटा मुलगा चि.नयनने त्या महान ,देशरक्षणासाठी स्वत:चा प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या थोर सुपुत्रास विनम्र वंदन केले..!याच ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राने (त्याला राष्ट्र म्हणायच्या सूध्दा स्थितीत ते सध्या नाही..) पाकिस्तानने दि.२६/११/२००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या अजमल कसाब नावाच्या राक्षसी अतिरेक्याला जिवंत पकडले होते ...हुुतात्मा तुकाराम ओंबळेजींनी...!मात्र त्या नराधमाने ओंबळेजींना बंदुकीच्या गोळ्यांंनी घायाळ केले होते..! स्वतः घायाळ होवून सूध्दा ओंबळेजींनी क्रूरकर्मा दहशतवादी कसाबला आपल्या वज्रबाहूपाशातून सोडले नव्हते..!


अखेर तो क्रूरकर्मा जिवंत पकडला गेला; परंतु भारतमातेचा थोर सुपुत्र तुकाराम ओंबळेजी धारातीर्थी पडले..! धारातीर्थी पडले ते सर्वसामान्य मुंबईकरांचे,भारतवासियांचे प्राण वाचविण्यासाठी..! हे विचारचक्र माझ्या मनात चालू होते...!त्या "शौर्य तीर्थक्षेत्राला "पूनश्च एकदा वंदन करून आम्ही पुन्हा त्याच शहर पोलिसांकडे आलो.कारण आमचा टॅक्सी थांबा तेथे होता..!मुंबईच्या भीषण गरमीत,खूप जाम करणा-या वाहनांना मार्ग दाखवित आपली सेवा ते शहर पोलिस साहेब इमानेइतबारे करत होते..! उष्णतेची परवा न करता..!त्यांची व माझी फक्त नजरभेट झाली..!त्यांना पाहून मला माझ्या सावलीतील नोकरीचा असणारा पोकळ गर्व पार गलितमात्र झाला..!मनोमनी त्यांनाही वंदन केले..!त्या शहर पोलिस साहेबांच्या नजरेत " आमचा कुणीतरी सन्मान केला, शौर्य तिर्थक्षेत्राला भेट देऊन ...!" हा आत्मगौरवाचा भाव मला जाणवला..! एवढ्या घाईत देखील त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले..!आम्हाला खूप आनंद झाला होता..!


आमची या "शौर्य तीर्थक्षेत्राला" भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते..! "शौर्य तीर्थक्षेत्र " हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या पुतळ्याखालील लिहिलेल्या ओळी मनात म्हणत होतो... 

                                                               

" प्राणाचे देऊनी बलिदान..वाचविले असंख्य प्राण... हे शूरवीरा ,आपणास मुंबईकरांचा प्रणाम...!!!  

                                

वंदे मातरम्..!

                                                      

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:२५ मे २०१७

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

आली माझ्या घरी ही दिवाळी


 

आमचे गाव आमची माणसं..!


" आली माझ्या घरी ही दिवाळी..! "


=================================


काही गाणी , अजरामर होऊन जातात, ती त्यांच्यातील गोडव्यामुळे..! लाडू,करंजी, बत्तासे इत्यादी अनेकानेक स्वादिष्ट पदार्थांची चव त्यात नक्कीच असते, कित्येक पिढ्यानपिढ्या..!


जसे की, " आली माझ्या घरी ही दिवाळी..!"

 हे अष्टविनायक चित्रपटातील गीत माझ्या बालपणापासून ऐकत आलेलो आहे.दरवर्षी दिवाळीच्या दिवशी हे गीत , कुणा मराठी रसिक माणसाने ऐकले नसेल असा शोधूनही सापडणार नाही..! एकवेळ ' मराठी रसिक ' माणूस दिवाळीचे फराळ करणार नाही,पण " आली माझ्या घरी ही दिवाळी..!" हे अतिशय सुमधुर गीत ऐकतोच..! 🎼


हे सुमधुर गीत मी आयुष्यात पहिल्यांदा लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ऐकले होते, ज्यावेळी मी पालखेड, ता.वैजापूर येथे इयत्ता चौथी मध्ये होतो. तो प्रसंग देखील माझ्या लक्षात आहे. माझ्या वडिलांची जूनी सायकल पंक्चर झालेली होती आणि थोडीफार दुरुस्ती करायची होती.सायकलचे पंक्चर काढण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी मी हाफ सदरा अन् हाफ चड्डीवर , सायकल लोटत लोटत आमच्याच गल्लीतील थोडेसे दूर असलेले बाळू काका गायकवाड मिस्तरी यांच्याकडे घेऊन गेलो होतो. माझ्या वडिलांनी मला दिवाळीच्या सणानिमित्त नवीन हाफ सदरा अन् हाफ चड्डी, आमच्याच गल्लीतील पारस भाऊ जैन टेलर यांच्याकडून शिवून घेतले होते. मी जरी सायकल लोटत लोटत चाललो होतो तरी देखील अंगात नवीन कपडे घातलेले असल्याने एखाद्या मिरवणुकीतील सन्माननीय माणसासारखा चाललो होतो..! आमच्या बालपणी, मुलांचा हाफ चड्डी अन् हाफ सदरा अगदी आवडीचा पोशाख होता.सायकलची दुरूस्ती आणि पंक्चर काढून झाले इतक्यात बाळू काकांच्या घराच्या जवळच असणाऱ्या अतिशय उंचावरील ग्रामपंचायत इमारतीतून , रेडिओ वर सुरू असलेले " आली माझ्या घरी ही दिवाळी..! " हे गीत ऐकू येऊ लागले होते..! मी तिथंच थांबलो,अन् पूर्ण गीत ऐकले अन् मग घरी गेलो होतो..! त्याकाळी करमणुकीचे सर्वात प्रभावी साधन रेडिओच होता..! तेंव्हा पासून या गीताच्या प्रेमात जे पडलो ते आजतागायत..!


आज त्या सुमधुर आठवणीतील प्रसंगाला जवळ जवळ पस्तीस वर्षे उलटून गेली,पण या गाण्याची आठवण अन् त्यातील गोडवा आजही लक्षात आहे..! आजही जेंव्हा जेंव्हा हे गीत ऐकू येते तेंव्हा तेंव्हा या सुमधुर गाण्याच्या पहिल्या आठवणीतील प्रसंगाची आठवण नक्कीच येते..! जन्मभूमीची अन् तिथल्या आठवणीतील प्रसंगाची ,माणसांची आठवण निदान मला तरी सदैव टवटवीत करत असतात..! आठवणी ह्या, सतत आपल्या भोवती पिंगा घालत असतात,फक्त आपण त्या आठवणी किती अन् कशा जपून ठेवतो यावर त्या आठवणींचे आयुष्य अवलंबून असते..! त्यातल्या त्यात आयुष्यातील कोणतीही पहिली आठवण ,भावूक माणसाच्या हृदयात कायम संजीवन असते..!😊🙏


असो, सर्व भारतीयांना दिवाळी लक्ष्मीपूजन निमित्त मनःपूर्वक सुमधुर शुभेच्छा..!🌹🙏


वंदे मातरम्..!


एक रसिक मराठी माणूस - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक- १४/११/२०२०, लक्ष्मीपूजन, शनिवार

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

मनोहारी मित्र, मनोहर गावडे..!


 

मला प्रवासात भेटलेली माणसं.


" मनोहारी मित्र, मनोहर गावडे..! "


=================================


" तू कितनी भी खुबसुरत क्यु ना हो ए जिंदगी,

खुशमिजाज दोस्तो के बगैर अच्छी नहीं लगती...! "


🙏🌹👬


नात्याच्या बाबतीत सर्व प्राण्यांमध्ये समृध्द प्राणी माणूस..! त्याच माणसाच्या नात्यातील समृध्द नाते दोन...! त्यापैकी एक आईचे अन् दुसरे मित्रांचे..! आता काहींना असे वाटेल की, इतर नाते, समृध्द नात्यात असतात की नाही..? नक्कीच असतील..! पण नात्यातील सूक्ष्म विण ज्या प्रकारे माणूस, आपल्या आईजवळ अन् मित्राच्या जवळ गुंफतो, तितकं इतर नात्याच्या जवळ अणू - रेणू इतका नाही गुंफू शकत, असे मला वैयक्तिक वाटते..!अणू - रेणू इतका फरक असतोच..!


माझा डी. एड चा प्रिय वर्गमित्र मनोहर गावडे ( जि.प.शिक्षक खुलताबाद अन् ह.मु. औरंगाबाद ) अन् मी त्याच मैत्रीच्या नात्यात , त्याच मैत्रीची विण घट्ट बांधून आहोत..! प्रिय मित्र मनोहर, आम्हा सर्व तत्कालीन डी एड बॅच मधील सर्वात प्रेरणादायी मित्र..! आम्ही वैजापूर आणि गंगापूर मधील काही मित्र, कन्नड येथे डी. एड चे शिक्षण घेत असताना, बहुदा त्याकाळी जगातील सर्वात असुविधांनी युक्त असणाऱ्या वसतिगृहात राहत होतो. आमचा हा जिवलग मित्र मनोहर, वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज आश्रमात वास्तव्यास होता. तिथून दररोज कॉलेजला ये जा करायचा..!


आमच्या तत्कालीन डी. एड कालखंडातील आठवणी ,या आजही आमच्या तत्कालीन बॅच मधील आम्हा काही मित्रांना आनंदाने जगायला मदत करतात.प्रिय मित्रा मनोहर , तू आपल्या डी. एड बॅच मधील सर्वात प्रेरणादायी मित्र आहेस..! तुझे आज पर्यंतचे आयुष्य अन् त्यातून तू प्राप्त केलेले आत्मिक समाधान सर्वकाही ग्रेट आहे..! मित्रा मनोहर, तू जेंव्हा शिक्षक म्हणून नोकरीला नव्हतास तेंव्हा रिक्षा चालवून आत्मनिर्भर होत गेलास..!आमच्या तत्कालीन वर्गातील सर्वांचा सर्वोच्च प्रेरणास्थान ,आमचा जिवलग मित्र, मनू ..! कोणतेही पाठबळ नसताना ,एका धार्मिक आश्रमात वास्तव्यास राहून शिक्षण घेऊन स्वतच्या आयुष्यात स्वाभिमानाने उभा राहणे, निव्वळ प्रेरणादायी आहे..! माझे अन् मनोहर मध्ये मैत्रीची विण घट्ट होण्यास मदत झाली ती, संत जनार्दन स्वामी मौनगीरी महाराज ( वेरूळ ) यांच्यावरील आमच्या श्रद्धेमुळे..!🙏


डी. एड ला असताना प्रिय मित्र मनोहर आणि मी ज्या हक्काने आणि आत्मीयतेने आमचा डी. एड चा अतिशय जिवलग मित्र विनय जोशी ( हल्ली कार्यरत, प्रशाला कन्नड ) याच्या घरी जायचो ते नाते आजच्या पिढीत निर्माण होताना दिसत नाही..! विशेष म्हणजे आपला अतिशय प्रिय मित्र विनय वसंतराव जोशी ,कन्नडकर याचा स्वभाव आणि विनयच्या स्वर्गीय आईचा स्वभाव हा ईश्वराने निर्माण केलेल्या प्रेमाच्या नात्यातील सर्वोच्च श्रेणीतील होता, त्यामुळं हे भावूक अन् प्रेमळ नाते वृध्दिंगत होत गेले..! विनयच्या आणि त्याच्या आईच्या, म्हणजेच आपल्या आईच्या प्रेमाची ,मायेची फुंकर आपल्याला ,त्याकाळी नेहमी लाभलेली होती..! आमच्या त्या अतिशय जिवलग मित्रावर, विनय जोशीवर नंतर नक्कीच लिहिल..!


आमच्या तत्कालीन डी एड बॅच मधील सर्व मित्रांमध्ये ,प्रिय मनोहर हा सर्वात समजूतदार मित्र होता..! त्याला हा समजूतदारपणा ,हा परिस्थितीने शिकविला होता..! परिस्थिती आणि परिसर माणसाला सगळं काही शिकवत असते, अगदी तसेच मनोहरच्या बाबतीत झाले. डी एड ला असताना आणि आताही मी, वैयक्तिक माझ्या अंतर्मनातील बऱ्याच विचारांना ,या मित्राजवळ व्यक्त करत असतो, कारण नात्यातील खोली..! आयुष्यात काही अतिशय खाजगीत असलेले प्रिय मित्र असतात, ज्यांच्याजवळ आपण सर्व रंगांची उधळण करत असतो, त्यापैकीच एक प्रिय मित्र मनोहर..! आजही कुठेही प्रवास असेल तर, सहसा मी मनोहरच्या सोबत असतोच..! त्या असलेल्या सोबतीत ,आजच्या आमच्या प्रपंचातील, आयुष्यातील आठवणींवर उकल काढण्याचा प्रयत्न करत असतो.


असो, आम्हा दोघांकडून सर्व भारतीयांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारस निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🙏


जय बाबाजी..!

वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - १२/११/२०२०, गुरुवार, वसुबारस

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

आयुष्याची शिलाई..!



 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


            " आयुष्याची शिलाई..! "


================================


आयुष्य...! प्रत्येकाचं व्यक्तित्व आणि प्रत्येकाचं अस्तित्व दर्शविणारे असते..! याच व्यक्तित्वात अन् अस्तित्वात माणूस, आपल्या आयुष्याचा गाडा हाकत दररोज जगत असतो आणि त्याच जगण्यात त्याच्या आयुष्याच्या उसवलेल्या कपड्यांना आयुष्याची शिलाई करत असतो..! माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या माझ्या अस्तित्वाच्या चाळिशी उलटलेल्या कपड्यांवर विविध माणसांच्या सोबतीने आयुष्याची शिलाई अगदी पक्क्या धाग्याने गुंफत आलेलो आहे..! त्यात  पालखेड, लासूर स्टेशन, जळगाव, हडस पिंपळगाव, सोनवाडी  एकलहेरा, औरंगाबाद आणि आता अंधारी येथील माझ्या अस्तित्वाच्या खुणा अन् त्यांच्या धाग्यांना शिवत आलो आहे..! वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोड  तालुक्यातील माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या शिलाईचे धागे जसे जमेल तसे अगदी निव्वळ प्रेमानं विणत आलो..! काही धागे अगदी कडक मांज्या सारखे देखील भेटले,अशांच्या द्वारे आपला गळा कापून घेण्यापेक्षा माघार घेऊन शिल्लक असलेल्या आयुष्याच्या शिलाईला अजुन उसवण्यापासून वाचवत गेलो..!


आज दिनांक ६/११/२०२० रोजी संध्याकाळी नवीन विकत घेतलेल्या बेड शिटला कडेकडेने शिवून घेण्यासाठी बजाजनगर परिसरात आम्ही उभयतांनी , कुणी या नवीन कापडाला शिवून देतो का..याचा शोध घेण्यासाठी आलो होतो. अखेर आपल्या आयुष्याचे जेष्ठ धागे ,मन लावून शिवत असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तित्वाला पाहिलं अन् थांबलो तिथं..! माझी पत्नी ,माझ्या बालमित्राच्या घरी गेली अन् मी , आयुष्याच्या अस्तित्वाची शिलाई शिवणाऱ्या त्या ज्येष्ठाच्या सानिध्यात गेलो, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाची शिलाई समजून उमजून घेण्यासाठी..!


स्थळ - मोहटा देवी मंदिर ते सारा वृंदावन वसाहत तिसगाव रस्ता - बजाजनगर, औरंगाबाद.


नाव - तिर्थस्वरुप नारायण जाधव काका, मुळ राहणार - आन्वा, ता. भोकरदन ह.मु.बजाजनगर. औरंगाबाद


ज्येष्ठांना बोलतं केलं अन् त्यांच्या आपल्यातील काही परिचयाच्या खाणाखुणा निघाल्या की, गप्पांच्या फडांमध्ये माझ्यासारखा माणूस स्वतच्या आयुष्याची शिलाई, त्याच ज्येष्ठांच्या अनुभवाच्या धाग्यातून शिवत जातो..! गप्पांच्या ओघात मी , अंधारी येथे नोकरी करतो हे सांगितल्या बरोबर काकांचे डोळे चमकून गेले. मी लगेच अंदाज लावला की, काकांच्या नात्यांच्या आठवणीतील धागे अंधारी गावाशी नक्कीच बांधलेले असणार आणि ते खरं निघालं..! तिर्थस्वरुप जाधव काका यांचे बरीच पाहुणे मंडळी अंधारी गावात आहे,असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत गेले..!


तिर्थस्वरुप जाधव काका , शिवणकाम करण्यासाठी सकाळी ९:३० वाजता येतात अन् थेट संध्याकाळी ६ वाजता घरी जातात.दुपारी घरी जाऊन जेवण करून येतात अन् पुन्हा शिलाईचे धागे गुंफत बसतात..! जुन्या उसवलेल्या कपड्यांना शिवून देणे हे काम काका अगदी मन लावून करतात..! तिर्थस्वरुप जाधव काका  यांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटतो आहे,कारण काकांची मुलं त्यांची खूप काळजी घेतात, त्यांना खूप जीवही लावतात. तिर्थस्वरुप जाधव काका यांच्या अंगी शिवणकाम ही कला असल्यानं ,घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका ..! 


माझ्या आयुष्यातील आता पर्यंतच्या वाटचालीत शिलाईचे धागे अन् त्यांना सुंदर अशी गुंफण करणारे सतत भेटत गेले..! पालखेड येथे पारस जैन टेलर, नितीन जैन टेलर आणि लासूर स्टेशन येथे जितू भाऊ जैस्वाल टेलर अन् पुन्हा नितीन जैन टेलर..! या सर्वांनी त्यांच्या सुरेख अशा प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेतलेले आहे..! आता औरंगाबाद येथील बजाजनगर परिसरातील तिर्थस्वरुप जाधव काका यांचाही सामावेश त्याच प्रेमळ सहवासरूपी धाग्यात मला गुंफून घेणार हे नक्की..! इथून पुढं माझं भविष्यातील कधीमधी निवांत बसण्याचं अन् माझ्या उरलेल्या आयुष्याच्या धाग्यांची शिलाई शिवण्याचं हक्काचं ठिकाण राहील,तिर्थस्वरुप जाधव काका यांचं हे पवित्र ठिकाण...! 


रात्रीची चाहूल लागायला लागली होती, तिर्थस्वरुप जाधव काका यांचा निरोप घेताना म्हणालो..

" काका, तुमच्या सवडीने ,माझ्या घरी नेईल तुम्हाला..! कृपया नाही म्हणू नका..!"

यावर काकांना झालेला निव्वळ आत्मीय आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होता..! मी निघताना  काका आवर्जून म्हणाले..

" गुरुजी, पुन्हा नक्की या बरं का..!"

मी - " अहो, तुम्ही नाही म्हणले तरी मी येतच जाणार आहे..! माझा मोबाईल नंबर असू, अन् तुमचाही द्या..! अधून मधून करीत जाईल प्रेमानं खुशाली..!"


आम्ही रस्त्यानं घरी येत होतो त्यावेळी माझ्या मनात पुन्हा तोच विचार येत होता की, जुनी माणसं घरी निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याला ,आपल्या आवडत्या कलेच्या माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात..! जुनी माणसं, कशा प्रकारे खरीखुरी आत्मनिर्भर आहेत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तिर्थस्वरुप जाधव काका..! हाच आपला खरा भारत आहे..! जो खरा भारत हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत मराठी साहित्यिक शंकर पाटील यांच्या साहित्यात आढळला, जो खरा भारत थोर लेखक आर.के. लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज मध्ये आढळला..! जो खरा भारत लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात पदोपदी जाणवला; आणि भारतातील मध्यमवर्गीय माणसाला आपल्या लेखणीतून समर्थपणे व्यक्त करणाऱ्या  थोर लेखक व.पू.काळे यांच्या साहित्यात..! तो खरा भारत माझ्यामते इथच आहे, तिर्थस्वरुप जाधव काकांच्या आसपास..!


बजाजनगर परिसरातील माझ्या सर्व मित्रांना माझी नम्र विनंती असेल की, तिर्थस्वरुप जाधव काका यांच्याकडे नक्की तुमचे शिवणकाम घेऊन जा अन् खऱ्याखुऱ्या भारतातला आत्मनिर्भर करायला मदत करा..!🙏


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ६/११/२०२०, शुक्रवार