चिंतन
भगवा ध्वज , चिरंतन अस्तित्वाची जाणीव..!
===============================
भगवा ध्वज, आपलं अस्तित्व अन् आपल्या जाज्वल्य इतिहासचे सर्वाभिमुख प्रतीक आहे..! भगव्या ध्वजात सर्व ध्वजांना सामावून घेण्याची पवित्र उदारमतवादी शक्ती आहे..!
भगवा ध्वज हा पहाटेच्या सुमारास सूर्योदय होण्याचा पूर्वी पसरणाऱ्या धूसर भगव्या प्रकाशा सारखे शांत , शितलतेचे प्रतीक आहे..! भगवा ध्वज हा सूर्योदयाच्या वेळी पसरणाऱ्या भगव्या मंद सूर्य प्रकाशाचे शांत प्रतीक आहे.हाच मंद भगवा सूर्य प्रकाश, आपल्याला आपल्या दररोजच्या सुरू होणाऱ्या आयुष्याला नवसंजीवनी ची प्रेरणा देतो..! हाच भगवा सूर्य प्रकाश,दुपारी ज्यावेळी प्रखरता निर्माण करतो त्यावेळी तो आपल्याला आयुष्यात प्रखरातही खूप आवश्यक आहे हेच दर्शवतो..! हीच प्रखरता आपल्याला कणखर बनवते, हेच या सकाळच्या मूळच्या भगव्या रंगाच्या पण ऐन दुपारी दिसणाऱ्या प्रखर सूर्य प्रकाशाची शिकवण आपल्याला निसर्ग देतो..! ज्यावेळी सूर्य नारायण, अस्ताला जात असतो, त्यावेळी तो पुन्हा आपल्या मूळच्या भगव्या रूपात येतो अन् आपल्या सर्व सजीवांचे आयुष्य देखील असेच जिथून सुरुवात झाले पुन्हा तिथेच संपणार याचं त्याच मूळ स्वरूपात आपल्याला दर्शन घडवून देतो..!
संध्याकाळच्या भगव्या सूर्य प्रकाशाचे अस्तित्वच मुळी पुन्हा उद्या निर्माण होण्यासाठी असते.उद्या पुन्हा तोच भगवा रंग सूर्य प्रकाशाच्या रूपाने, या आपल्या संपूर्ण सृष्टीला आपल्या चिरंतन ,शाश्वत अन् संजीवन अस्तित्वाची जाणीव करून देतो..! कारण तो सूर्य प्रकाशाचा भगवा रंग, आपल्या प्रकाशातून भगव्या ध्वजाचे आरोहण करत आहे, अनादी काळापासून..!🙏🏻
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात याच भगव्या ध्वजाच्या अस्तित्वासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली..! प्राणांची आहुती दिलेल्या कित्येकांच्या जिवंत प्राणांची श्रद्धा सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हेच होते..! मागचा पुढचा विचार न करता फक्त एकच विचार त्याकाळच्या कित्येकांना माहीत होता,अन् तो विचार होता छत्रपती शिवाजी महाराज..! त्याचं कारणही तसंच होतं.आपल्या अस्तित्वाची निशाणी भगवा ध्वज हा सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती, आई जिजाऊंनी दिला होता..! त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हा विचार सर्वांना सुरक्षित, विश्वासू अन् पवित्र वाटत होता, आजही आहे अन् भविष्यातही असेल..!
उगीचच कुणी कुणासाठी आपले प्राण तळहातावर ठेवून कशाला आपल्या आयुष्याचा शेवट करील..? कुणी कुणासाठी आपल्या आयुष्याचा शेवट करायला तेंव्हाच तयार होत असतो जेंव्हा समोरचा आदर्श, जाज्वल्य ध्येयासाठी तितक्याच मोलाचा सत्पुरुष असावा लागतो..! मध्ययुगीन भारताच्या इतिहासात असे सत्पुरुष थोर व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवाजी महाराज..!
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यानंतर रयतेचे राज्य आई जिजाऊ अन् छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या हिंदवी स्वराज्याची जीवनप्रणाली प्रत्यक्षात अस्तित्वात आली..! ६ जून १६७४ रोजी जरी रयतेच्या कल्याणाचा अन् आनंदाचा क्षण प्रत्येक रयत अनुभवत होती,पण माझ्या मते याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंतर्मनातून अतिशय भावूक झालेले असणार यात तिळमात्र शंका नाही..! कारण ज्या ज्या मावळ्यांनी, गुप्तहेरांनी, सर्व सामान्य माणसांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते ते सर्वजण त्यादिवशी किल्ले रायगड येथील उत्सवात सहभागी नव्हते..! अशावेळी त्या सर्वांच्या कायमच्या अनुपस्थितीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असतील,पण डोळ्यांच्या ओल्या कडा दाखवता येत नव्हत्या..! त्याचंही कारण हेच की,बऱ्याचदा कुटुंब प्रमुखाला आपल्या जबाबदारीच्या पदावर असल्यावर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी कित्येकदा भावना लपवाव्या लागतात..! अगदी असेच काहीसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी झाले असणार..! मात्र आपल्या अंतर्मनातील हा भावनिक हिंदोळा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई जिजाऊ यांच्याजवळ नक्कीच व्यक्त केला असेल..! आपल्या अंतर्मनातील भावनिक हिंदोळा व्यक्त करावा, अशी एकच व्यक्ती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ होती अन् ती महान व्यक्ती म्हणजे आई जिजाऊ..! कोणताही भावूक माणूस आपल्या अंतर्मनातील भावनिक हिंदोळा, कुणाजवळ तरी व्यक्त करतच असतो..!कधी तो व्यक्त होणार भावनिक हिंदोळा सार्वजनिक असतो तर कधी एखाद्या जिवाच्या माणसाजवळ..!
सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे त्याकाळी प्रस्थापितांच्या करिता नव्हतेच..! सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी यांचं आयुष्य उपेक्षितांच्या, शोषितांच्या, विस्थापितांच्या करिता खर्ची पडले..!छत्रपती शिवाजी महाराज सारखे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही..!
भगवा ध्वज , चिरंतन अस्तित्वाची जाणीव असणारा ध्वज..! या भगव्या ध्वजाचा सन्मान आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी होत आहे..! त्याबद्दल याच भगव्या ध्वजाच्या अस्तित्वासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, झटणाऱ्या कित्येक थोर राष्ट्र पुरुषांना विनम्र अभिवादन..!🙏🏻
वंदे मातरम्..! 🚩🙏🏻🚩
व्हिडिओ स्रोत - यु tube
चित्रपट - फत्तेशिकस्त
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - ६ जून २०२१, रविवार,
शिवराज्याभिषेक दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा