आमचे गाव आमची माणसं ©️
" आनंदी अद्दु उपाख्य अब्दुल सलाम शेठ..! "
========================
आनंदी आयुष्य जगण्यासाठी फार काही लागत नाही.फक्त निगर्वी स्वभाव , समोराच्यात सहजपणे मिसळून जाण्याची वृत्ती अन् त्याच्या सोबत एखाद्या विषयी असलेली जाणीव असावी लागते.या गोष्टी ज्याला अंगिकारता आल्या त्याला आनंदी आयुष्य सहज जगता येते असे मला वाटते. माझा अन् पालखेड गावातील काही जणांचा अतिशय प्रेमळ संबंध जो आला त्यात आनंदी आयुष्य कसं जगावं यात मला वैयक्तिक काही माणसं नितांत आवडून गेली आहे.नव्हे नव्हे त्या पालखेडकरांनी ज्या प्रकारे आपल्या आयुष्यावर नितांत आनंदी प्रेम केलं आहे , त्या त्यांच्या आनंदाच्या निस्सीम प्रेमात आजतागायत आहे अन् तहहयात राहील हा प्रेमळ विश्वास आहे.अर्थात मला सर्व पालखेडकर नितांत आवडतात.विशेष म्हणजे त्यातील ज्यांचा माझ्या आयुष्याशी वैयक्तिक भावनिक अन् कौटुंबिक संबंध आला, त्यांच्यावर मी अनेक लेख लिहिलेले आहेत.त्यातील प्रत्येकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव भिन्न भिन्न होता आणि आहे.एक समानता त्यांच्यात जाणवली अन् ती म्हणजे आमची एकमेकांविषयी असलेली निखळ प्रेमळ भावना..!यातील काहीजण हयात आहेत तर काहीजण स्वर्गवासी झालेले आहेत.
आपल्या आनंदी आयुष्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांपैकी एक पुष्प जिवलग बालमित्र अन् प्रेमळ गावकरी शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू शेठ यावर व्यक्त होतो आहे.
शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू..!
आम्ही समकालीन मित्रमंडळी शेख अब्दुल सलाम यास प्रेमाने अद्दू या नावाने हाक देत होतो.अर्थात त्या प्रेमात आजही अंतर पडलेले नाही.अद्दू हा माध्यमिक शाळेत आमच्या मागील वर्गातील मित्र..! अगदी मनमोकळ्या स्वभावाचा असलेला हा आमचा प्रिय मित्र..! आम्ही काही बालमित्र सुरुवातीपासून अद्दूच्या बोलक्या स्वभावाच्या प्रेमात आहोत. अद्दूचे पूर्ण कुटुंब मोसंबी खरेदी विक्री व्यापार उद्योगात असल्याने अद्दूला दुनियादारी जरा लवकरच समजली.व्यावहारिक ज्ञानात कमालीचा हुशार..! आम्हा काही मित्रांच्या अनुभवानुसार अद्दूच्या स्वभावात जातीपातीचे अन् धर्माच्या भेदाभेदीचे संकुचित विचार कधी आलेच नाहीत. याला कारणीभूत अद्दूच्या स्व. वडिलांचे म्हणजेच तीर्थस्वरूप स्व. अहमद चाचा शेठ बागवान यांचे प्रेमळ संस्कार नक्कीच आहेत.आमच्या पालखेड गावाचे जे ग्रामदैवत आहे, त्या श्री. पारेश्वर महादेवाच्या यात्रेच्या वेळी धार्मिक कामासाठी ग्रामस्थ जी वर्गणी गोळा करायचे त्यात तीर्थस्वरूप स्व. अहमद चाचा शेठ बागवान नेहमी पुढाकार घेऊन अगोदर वर्गणी द्यायचे.अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व होते अहमद चाचा..! आपल्या वडिलांचे संस्कार कळत नकळतपणे अद्दूवर झाले अन् तोही गावातील गोर गरिबांच्या मदतीला धावून गेलेला आहे.तसेच कोणताही भेदभाव न मानता आम्हा काही मित्रांच्या सोबत गावातील ग्रामदैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात आलेला आहे अन् धार्मिक उपक्रमात सहभागी देखील झालेला आहे. त्याचं हे वर्तन समृध्द भारताच्या समृध्द अन् प्रगल्भ वैचारिक सिध्दांताचे प्रतिनिधित्व नक्कीच करते.ज्या ज्यावेळी प्रिय मित्र अद्दुची अन् माझी भेट झाली त्या त्यावेळी आम्ही एकमेकांना आपुलकीने " वंदे मातरम् " म्हणतोच.त्यात आजतागायत खंड पडलेला नाही.
प्रिय मित्र अद्दू शेठ , माझ्या लग्नाच्या वेळी पुढाकार घेऊन हक्काचा वऱ्हाडी झाला होता. माझे काही जिवलग बालमित्र तर सोबत होतेच, पण अगदी लग्न मंडपात येई पर्यंत प्रिय मित्र अद्दू सोबत होता. कुणाच्याही लग्नातील आठवणी ह्या, आयुष्यात सदैव गुलाबी रंगाच्या असतात.त्यात मित्र जर सोबत असतील तर विवाह सोहळा सार्थकी झाल्याचे प्रेमळ समाधान नक्कीच लाभते हा माझा स्वानुभव आहे.
शेख अब्दुल सलाम उपाख्य अद्दू याची अन् माझी भावनिक नात्याची वीण घट्ट असण्याचे अजुन एक महत्त्वाचे कारण म्हणजे शेख अब्दुल सलाम शेठ उपाख्य अद्दूचे माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांवर असलेले आदरयुक्त प्रेम..! माझ्या स्व.वडिलांच्या शिस्तप्रिय स्वभावाच्या अन् अतिशय बिकट परिस्थितीतून स्वतः ला सिध्द करण्याच्या मूल्यांच्या निस्सीम प्रेमात अद्दू शेठ होता. पालखेड येथे माझे वडील जेंव्हा जेंव्हा असायचे तेंव्हा तेंव्हा आमच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर माझ्या वडिलांच्या सोबत कित्येकवेळा याच प्रिय जिवलग मित्र अद्दूला गप्पा मारताना मी बघितलेले आहे.मी जेंव्हा लासूर स्टेशन येथे वास्तव्यास आलो तेंव्हा देखील प्रिय जिवलग मित्र अद्दू, लासूर स्टेशन येथील माझ्या घरी माझ्या वडिलांना अधून मधून भेटायला नक्कीच यायचा. अद्दू हा मूळचा मोसंबी व्यापारी असल्याने सतत फिरस्तीवर असायचा.जेंव्हा जेंव्हा त्याची चक्कर लासूर स्टेशन येथे व्हायची ,अगदी न चुकता बऱ्याचदा रविवारी किंवा संध्याकाळी माझ्या वडिलांची फक्त प्रेमापोटी भेट घ्यायचा. माझे स्व.तीर्थरूप वडील बऱ्याचदा शक्यतो लासूर स्टेशन येथील माझ्या घरातील वरील खोलीत आराम करत असायचे. प्रिय मित्र अद्दू घरी आल्या आल्या मला मास्टर किंवा मास्तर असे उल्लेखित करून म्हणत असे.
" मास्टर, दादा का मूड कैसा है..? बातचीत हो सकती हैं ना..?"
मी त्याला होकार द्यायचो अन् मग अद्दू वरच्या खोलीत जाऊन दादांशी कित्येकवेळ गप्पा मारायचा.मी सोबत असायचो नाहीतर मी खाली येऊन माझे काम करत असायचो. प्रिय मित्र अद्दू घरी आल्यावर " मास्टर, दादा का मूड कैसा है..? बातचीत हो सकती हैं ना..?" असे विचारण्याचे कारण असे असायचे की, अद्दूला माझ्या स्व वडिलांचा अतिशय शिस्तप्रिय स्वभाव पूर्णपणे माहीत होता.समोरच्याच्या स्वभावाला अनुसरून समोरच्याच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन आपलं सुसंकृत वर्तन करणे हे अप्रतिम कौशल्य प्रिय मित्र अद्दू शेठ यांच्या अंगी होते अन् आहे हे या कृतीवरून सहज लक्षात येते. सध्या अद्दू शेठ छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झालेला आहे. तसेच काहीकाळ पालखेड गावातील ग्रामपंचायतीचा सदस्य देखील राहिलेला आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या राजकीय बैठकीत प्रिय मित्र अद्दू शेठ याचे सार्वजनिक आयुष्य सुरु आहे.
माझ्या तीर्थरूप वडिलांचा स्वर्गवास झाल्यावर प्रिय मित्र अद्दू शेठ छ्त्रपती संभाजीनगर येथील माझ्या घरी सांत्वनासाठी आल्यावर खूप वेळ निवांत बसला होता. विशेष म्हणजे त्यावेळी कोविडची भीतीदायक परिस्थिती चहूकडे होती. शासनाने समाजजीवनावर कोविड महामारी मूळे बरीच बंधने घातलेली होती. त्याही भीतीदायक परिस्थितीमध्ये प्रिय मित्र अद्दू माझ्या घरी आला होता अन् आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील असा भावनिक आधार देऊन गेला होता.हे नाते एका निस्सीम प्रेमाचे होते.हे नाते एका तरुणाचे, एका वयोवृध्द व्यक्तीवर आदर असण्याचे होते.
माणसाच्या आयुष्यात दुःख अन् वेदना खूप काही शिकवून जाते.अशावेळी जी जी माणसं कृतीतून आधार देऊन जातात ती माणसं त्या विधात्याने आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेली असतात.एखाद्या माणसाच्या आयुष्यात दुःख अन् वेदना ज्या ज्यावेळी निर्माण होते त्या त्यावेळी एखाद्याने प्रत्यक्ष कृतीतून , भावनिक आधार देऊन जी मायेची फुंकर घातलेली असते ती मानवी मन असणाऱ्या भावनिक माणसाच्या चिरकाल स्मरणात राहते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.त्यावेळी नक्कीच पटते की, तो जगाचा नियंता कुठेतरी अस्तित्वात आहे म्हणून..! हे माझे भावविचार त्या त्या माणसाच्या रूपातील त्या त्या देवदुतांना समर्पित आहेत, ज्यांनी ज्यांनी कुणाच्या तरी दुःखात अन् वेदनेत त्या जगाच्या विधात्याचे प्रतिनिधित्व केलेलं आहे..!
अख्ख्या भारतभर व्यापार निमित्त प्रवास करणाऱ्या अन् त्या प्रवासात भेटलेल्या माणसांची दुनियादारी स्वतः मध्ये आत्मसात करून आनंदी आयुष्य जगणाऱ्या प्रिय मित्र शेख अब्दुल सलाम अहमद शेठ बागवान उपाख्य अद्दू याचा आज जन्मदिन आहे.त्यानिमित्त या जिवलग मित्राला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹🙏🏻
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १ मार्च २०२३, बुधवार.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा