रविवार, २ जुलै, २०२३

लक्ष्मी आईचा आषाढ निवद..!


 


आमचे गाव आमची माणसं.©️


लक्ष्मी आईचा आषाढ निवद..!


==================================


कुणी आमची टिंगलटवाळी करा, आमच्या आई वरून हेटाळणी करा,पण आम्ही आमच्या आईला , आमच्या परंपरागत श्रद्धेने आई लक्ष्मीला पुजणार..! आषाढ महिना आला की, आमच्या सारख्या कित्येक भक्तांना ओढ लागते ती आषाढ महिन्यातील आईला  द्यावयाच्या निवदाची..! यालाच थोडेफार शिक्षण घेतले की, ' नैवेद्य ' असेही म्हणतात.आषाढ महिन्यातील कोणत्याही एका दिवशी किंवा ज्यांना वेळ अन् सवड असेल  त्यांनी शुक्रवारी किंवा मंगळवारी लक्ष्मी आईला निवद दाखवण्याची आमची रीत आहे.


पालखेड येथे बालपणी आमच्या घरी माझ्या स्व.आईने आषाढ महिन्यात लक्ष्मी आईला निवद केला की, तो निवद लक्ष्मी आईला श्रद्धेने न्यायची जबाबदारी माझीच असायची. जर मी उपलब्ध नसेल तर माझी आई स्वतः घेऊन जायचीच..! आमच्या पालखेड गावाच्या पूर्व दिशेला जळगाव अन्  काटे पिंपळगाव कडे जे रस्ते जातात त्याच्या अगदी कोपऱ्यावर गावच्या लक्ष्मी आईचे देऊळ आहे. पत्र्याचे वरून आच्छादन अन् बाजूच्या भिंती असे एकंदरीत त्या देवळाचे बाह्य रूप..!आता कसे आहे माहीत नाही. आमच्या घरापासून लक्ष्मी आईचे देऊळ साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर होते.माझ्या सोबत लक्ष्मी आईला श्रद्धेने  निवद न्यायला माझा खूप जिवलग बालमित्र स्व.आप्पा सूराशे , सोमनाथ गायकवाड , रमेश गायकवाड हमखास असायचे. गावातील नाटकाच्या ओट्या जवळून स्व .शाम शेळके आम्हाला येऊन मिळायचा.त्यावेळी स्व. शाम शेळके अन् माझ्यात मैत्री नव्हती.तो आमच्या सोबत यायचा तो गर्दीत इतरांना दमदाटी करायला.मुळातच शाम शेळके हा लई आचपळ होता, त्यामुळं त्याच्याकडे इतर बरीच अंगभूत कौशल्ये विकसित झालेले होते.


लक्ष्मी आईला निवद दाखवून झाला की, देवीच्या समोर जे निवद गावातील इतर भक्तांनी ठेवलेले असायचे, त्यापैकी भारी कोणकोणते याचा शोध आम्ही घायचो. भारी शोधलेले निवद हळूच बाजूला घायचो अन् त्यावर मस्तपैकी ताव मारायचो..!😋 तेंव्हा पासून मनात एक कायमची श्रद्धा निर्माण झाली अन् ती म्हणजे कोणत्याही देवाला / देवीला ज्यांनी कुणी शाकाहारी निवद , प्रसाद दाखवलेला असतो, तो आपल्यासाठीच आहे ही भावना घर करून बसली.आपणही देवाचे , देवीचे भक्त आहोत, मग देवाला दाखवलेला प्रसाद अथवा निवद यावर आपलाच पहिला हक्क ही भावना निर्माण झाली. अशीच कृती  आम्हा काही बालमित्रांकडून श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात व्हायची. जेंव्हा आमच्या घराच्या जवळच असलेल्या श्री.पारेश्र्वर महादेवाच्या देवळात उन्हाळ्यात गावातील काही भक्त मंडळी आंबे वहायचे.आम्ही काही बालमित्र टपूनच बसलेलो असायचो.गावातील एखाद्या भक्ताने महादेवाच्या पिंडीवर आंबा ठेवला की, आम्ही , तो किंवा ती किंवा ते भक्त कधी तिथून निघून जातात याची वाट बघत असायचो.एकदा का ते भक्त तिथून निघून गेले की, आळीपाळीने आंबे वाटून घ्यायचो. मस्तपैकी वेशीच्या बाहेर किंवा हनुमान मंदीरात बसून खायचो.


आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी समदे गाव लक्ष्मी आईच्या दर्शनाला गावच्या बाहेर निघत असे.आताही निघत असेल अशी आशा करुया. गावातील डफ वाजविणारे वादक मंडळी सर्वात पुढे असायचे. फारसे नीट आठवत नाही. आषाढ महिन्यात की इतर वेळी नक्की सांगता येणार नाही. बहुदा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशीच आमच्या पालखेड गावातील शेळके पाटील घराण्यातील पाच जण गावातील नागरिकांच्या  सर्वात पुढे हातात शस्त्र घेऊन पंचप्यारे या पोषखात असायचे. दरवर्षी तो मान शेळके पाटील घराण्यातील पाच जणांना असायचा.


आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी समदे गाव लक्ष्मी आईच्या दर्शनाला गावच्या बाहेर लक्ष्मी आईच्या देवळाच्या परिसरात गोळा व्हायचे. तिथे आम्हा बऱ्याच मित्रांना आमचा प्रिय बालमित्र स्व.शाम शेळके अन् त्याच्या सोबत्यांचा धाक वाटायचा.धाक वाटायचे कारण असे की, शाम शेळके अन् त्याचे काही मित्र कोणती तरी एका वनस्पतींची पाने हातात लपून आणायचे. त्या वनस्पतीला आम्ही ' आग्या वनस्पती ' असे म्हणत असे.शाम शेळके अन् त्याचे काही मित्र इतर काही मुलांच्या शरीराला ती आग्या वनस्पती चोळून द्यायचे.ती  आग्या वनस्पती एकदा का शरीराला चोळली की, जिथं चोळली तिथं खूप अंगार, आग व्हायची. यामुळे आम्ही काही अहिंसा परमो धर्म मानणारे मित्र, शाम शेळके अन् त्याच्या मित्रांपासून जरा लांब लांबच असायचो.


आता काळ बदलला. आधुनिकतेचे सर्वदूर वादळ वाहू लागले आहे.मात्र मी अन् माझे काही बालमित्र अजूनही त्याच गतकाळातील आठवणी अन् आईच्या श्रद्धा  जपत आमचं आयुष्य व्यतीत करत आहोत. शेवटी श्रद्धा तरी काय असते..? माझ्या मते ज्यामुळे आपलं मन आनंदी अन् हृदयात आत्मानंद निर्माण होतो ती कृती म्हणजे श्रद्धा..! जशी की आम्ही आजही आजच्या या धकाधकीच्या जीवनात, आधुनिकतेच्या वादळी आयुष्यात आषाढात लक्ष्मी आईला निवद दाखवण्याची श्रद्धा कृतीतून बाळगून आहोत.


ता.क. - आज आम्ही सह परिवार छत्रपती संभाजीनगर येथे लक्ष्मी आईच्या देवळात निवद आईला अर्पण केला. तो निवद तिथं उपस्थित असलेल्या एका गरजवंत महिलेने अन् तिच्या लेकरांनी आम्ही काहीसे दूर झाल्यानंतर घेतला.आईच्या अन् तिच्या लेकरांच्या मुखी निवद गेल्याचे खूप आत्मिक समाधान लाभले..! बालपण अन् बालपणीचे मित्र यांची प्रकर्षाने आठवण आली.


असो, सर्व भक्तांना आषाढ महिन्यातील लक्ष्मी आईच्या पूजनाच्या श्रद्धेय शुभेच्छा..!


लक्ष्मी आई की जय..!

वंदे मातरम्


 नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २ जुलै २०२३, रविवार, ( आषाढ ) शुभ संध्या.

1 टिप्पणी: