शनिवार, ४ एप्रिल, २०२६

' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'


 


#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'


===================================


आम्ही दिनांक ३/४/२०१६, रविवार रोजी भल्या सकाळी पालखेड परिसरातून निघून नाशिक येथे पोहोचलो होतो.

निमित्त होते,प्रिय जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची होती आमच्या या बालमित्राला ,सदरील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मौजे बाजार वाडगाव, ता. गंगापूर येथे करायची होती.


मात्र सदरील प्रवासाला निघण्यापूर्वी एक दिवस अगोदर प्रिय बालमित्र संजुचा मला फोन आला की,

" नंदू, ,आपल्याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची आहे.तुला सोबत यावेच लागेल. अजुन एखादी अनुभवी जाणकार व्यक्ती सोबत घे..!"


हे ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर लगेच माननीय कौराजी पाटील निघोटे ( सरपंच हडस पिंपळगाव ) नाव आले. त्याचं कारण असं की,मी हडस पिंपळगाव, ता.वैजापूर येथे जवळजवळ आठ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली होती.या संपूर्ण कालावधीत याच गावातील जय बाबाजी भक्त परिवारातील माझे गुरुबंधू माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा एक सकारात्मक अन् अतिशय खंबीर नेतृत्व म्हणून जवळून परिचय झाला होता. विशेष म्हणजे धार्मिक अन् सामाजिक कामासाठी कौराजी पाटील निघोटे यांची समर्पण वृत्ती जवळून पाहिली होती. मी दुसऱ्याच क्षणी कौराजी पाटील निघोटे यांना फोन केला अन् म्हणालो..

" पाटील, जय बाबाजी, वंदे मातरम्..! उद्या आपल्याला सकाळी लवकर नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती आणायला जायचे आहे. तुम्हाला यायला जमेल का..?"

माननीय कौराजी पाटील निघोटे यांनी लगेच होकार दिला अन् सांगितले की,

" गुरुजी, तुम्हीं या,मी जळगाव फाटा फाट्यावर सकाळी येऊंन थांबतो..!"

(स्थानिक परिसरात याला लाडमसरी / लाडले अन्सारी फाटा देखील म्हणतात.) 

सहजवृत्तीने, सहकार्यवृत्तीने चांगल्या कार्यासाठी कौराजी पाटील निघोटे यांनी प्रवासासाठी होकार दिला होता. सकाळी सहा वाजता नियोजित ठिकाणी यावे असे ठरले.मी लगेच माझ्या बालमित्राला फोन करून पुढील नियोजन सांगितले.


मी पहाटे ५:३० वाजता लासूर स्टेशन येथून निघून जळगाव फाट्यावर पहाटे ५:४५ ला पोहोचलो. कौराजी पाटील निघोटे अगोदरच येऊन बसलेले होते.पालखेड ( शेड फाटा ) फाट्याहुन जिवलग बालमित्र डॉ.संजू राऊत व जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी यांच्या सोबत पुढील प्रवासाला चार चाकी वाहनात निघालो. माझी दुचाकी पालखेड फाट्यावर एका दुकानासमोर उभी करून दिली होती.


नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती घेतली.याकामी कौराजी पाटील निघोटे यांचा अनुभव कामी आला होता. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.आम्ही हॉटेल मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली,मात्र कौराजी पाटील निघोटे म्हणाले की,

" गुरुजी, आपण इथून जवळच असलेल्या बाबाजी आश्रमात जाऊ,दर्शन घेऊ अन् तिथंच आश्रमातील जेवण करू..!"

आम्ही होकार देऊन आश्रमात जाऊन दर्शन घेऊन,मस्तपैकी वरण पालक भाजी,बाजरीच्या भाकरी सोबत काला कुस्करून पोटभरून जेवण केले.ही भोजन व्यवस्था फक्त आणि फक्त कौराजी पाटील निघोटे यांच्या , आश्रमातील परिचयामूळेच शक्य झाली होती.भक्तीचा,दर्शनाचा अन् जेवणाच्या तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


माननीय कौराजी पाटील निघोटे अतिशय कडक शिस्तीच्या स्वभावाचे व्यक्तिमत्व..! आम्ही ज्यावेळी हडस पिंपळगाव येथे शिक्षक म्हणून सेवा करत होतो तेंव्हा आम्हा सर्व शिक्षकांना सकारात्मक कार्यासाठी नेहमी पाठिंबा देत होते.आदरणीय कौराजी पाटील निघोटे हे तत्त्वनिष्ठ,स्वाभिमानी अन् वेळ प्रसंगी लवचिक अन् शिस्तीचे पाईक म्हणून देखील मला खूप भावलेले आहेत.शाळेत काही पाल्यांच्या तक्रारी आल्यावर जबाबदार व्यक्ती म्हणून त्या बाबी कौराजी पाटील निघोटे यांच्या कानावर घातल्या जात असायच्या.त्या त्या प्रत्येकवेळी कौराजी पाटील यांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी अन् शिक्षकांसाठी स्वीकारलेल्या संरक्षणवृत्तीचे, समाजहिताचे वेळ प्रसंगी कठोर शिस्तीचे धोरण स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी अंगिकारले होते. वेळ प्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांना योग्य त्या शब्दात समजावून सांगून शाळेच्या हितासाठी केलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद अन् अभिमानास्पद होते. आजकाल इथून तिथून अशी निर्भीड, तत्त्वनिष्ठ वेळ प्रसंगी कठोर, लवचिक समाजहितासाठी कार्य करणारी सार्वजनिक आयुष्यातील पिढी अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. शाळेत ,विद्यार्थ्यांची, कोणतीही समस्या निर्माण झाली तर माननीय कौराजी पाटील निघोटे सर्वात पुढे येऊन यातून सहजसुंदर मार्ग काढायचे.चांगल्या कामासाठी शिक्षकांना नेहमी पाठबळ देत होते. त्यांच्या सरपंच कार्यकाळात आणि सरपंच पदावर नसल्यावर सुध्दा ,शिक्षकांसाठी खूप मोठा मानसिक आधार माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा होता.


प्रस्तुत फोटो स्थळ : पंचवटी नाशिक. 


सोबत : माझे प्रिय बालमित्र डॉ.गणेश वाणी व डॉ.संजय राऊत.तसेच सोबत हडस पिंपळगाव,ता.वैजापूर येथील माजी सरपंच आदरणीय कौराजी पाटील निघोटे.


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

भेट दि.३/४/२०१६ रविवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा