शुक्रवार, १२ जून, २०२०

चिंतन " भारदस्त व्यक्तिमत्व... आचार्य प्र.के.अत्रे...! "







#चिंतन ©️

" भारदस्त व्यक्तिमत्व - आचार्य प्र.के.अत्रे...! "

=====================================

आज दिनांक १३ जून २०१७ रोजी आचार्य प्र.के.अत्रे यांचा स्मृतिदिन..! (निधन दि.१३ जून १९६९)
त्यानिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. 🙏💐   
 गीतकार,निर्माता,दिग्दर्शक, पटकथाकार,पत्रकार,विडंबणकार,शिक्षक,राजकारणी,इ.थोडक्यात कला क्षेत्रात अत्रे काय नव्हते.....तर सर्वच होते. बहुआयामी माणूस.ज्याला कुणाला स्वतःच्या जीवनाविषयी नैराश्य आले असेल त्याने आचार्य अत्रे लिखित " मी कसा झालो " हे पुस्तक अवश्य वाचावे.मी भाग्यवान,मला ते पुस्तक "वैजिनाथ वाचनालय, वैजापूर" येथून इ.स.१९९९ सालीच वाचायला मिळाले.

अत्रेनीं- तो मी नव्हेच,कवडी चुंबक, वंदे मातरम्,मोरूची मावशी,इ.अनेक अजरामर नाटके लिहिली.आम्ही,फक्त..मुलामुलांनी पालखेड,ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथे श्री.पारेश्वर विद्यालयात इ.स.१९९०-९१ साली इ.९ वी मध्ये शिकत असताना " कवडी चुंबक " नाटक करण्याचे ठरविले..आमचे सदासर्वकाळ आदरणीय शिक्षक गुरुजी जी.एम.भगत सर ,ते नाटक दिग्दर्शित करणार होते. मला त्यातील " पंपू शेठ " ही व्यक्तिरेखा दिली होती. काही दिवस रंगीत तालिम सुध्दा झाली.पण ..सरांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते नाटक बासनात गुंडाळावे लागले.अन् आमचे स्वप्न,स्वप्नच राहिले..!

आचार्य अत्रे यांचे अनेकांसोबत राजकीय मतभेदही व्हायचे. मग निर्णय काय घ्यावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठरवायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे खूप जवळचे संबंध होते. गाडगेमहाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या सर्वांविषयी अत्रे यांना प्रचंड आदर होता. आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजत पदक प्राप्त झाले होते. त्याआधी त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण केला होता, जो भारतातील राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळवणारा पहिला चित्रपट होता. फुले यांच्यावरील चित्रपटातील पहिल्या दृश्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. बाबासाहेब आणि अत्रे यांचे प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले.

प्र. के. अत्रे सक्रीय राजकारणात होते. त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, मात्र ते अनैतिक कधीही झाले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर गेल्यावर अत्रेंनी जे अग्रलेख लिहिले ते सावरकरांवरील " अक्षय मृत्यूलेख " आहेत. अत्रे काँग्रेसपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत सर्वांशी मैत्री ठेवून होते आणि त्यांच्याशी त्यांनी टोकाचे वादही घातले. 

अत्रे हे खरेतर शिक्षणतज्ज्ञ. मराठी भाषाविषयक त्यांची शैक्षणिक पुस्तकं आजही वाचली, तर कुणाचीही मराठी भाषा सुधरू शकते. मराठी भाषा, मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी राजकीय, सामाजिक लढा एकहाती पेलला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.समकालीन साहित्यिकांबरोबरचे त्यांचे टोकाचे वाद प्रचंड गाजले. ना. सी. फडके, हे त्याचे उत्तम उदाहरण. परंतु नंतर ज्यांच्याशी वाद घातला, टोकाचे शत्रूत्व केले त्यांच्यांशी हात मिळवणे, मैत्री करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला. 

संयुक्त महराष्ट्र आंदोलनाचे प्र. के. अत्रे हे एक प्रमुख नेते होते. ‘मराठा’ हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.

प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र समितीचा भाग होते. अत्रेंबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे वा लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार करणे, हे त्यांनी कधीच केले नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या बालकासारखे होते व आयुष्यभर तसेच राहिले.

वरील मुख्य लेखातील खालील ओळींचे स्पष्टीकरण..

" लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे..."

याचा अर्थ असा की, काही माणसं जगाच्या नजरेत भरावी म्हणून नैतिक वागतात,मात्र प्रत्यक्षात ती तशी नसतात. आचार्य अत्रे अशा प्रकारे ढोंगी आयुष्य कधीच जगले नाही.

अन्..." लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार ...."

याचा अर्थ असा की, काही गोष्टी जरी समाजातील काहींच्या दृष्टीने योग्य नसेल, म्हणून त्यांनी त्या टाळल्या नाहीत.
उदाहरणार्थ काही राजकीय पक्ष,विचारधारा काहींच्या दृष्टीने विरोधाच्या होत्या,म्हणून आचार्य अत्रे यांनी त्यांच्याशी मैत्रीचे संबंध तोडले नाहीत.
लोकं काय म्हणतील, याच्यापेक्षा ,आपल्या इच्छेनुसार , मनानुसार त्यांचं वर्तन राहिले.
सारांश काय तर..आचार्य अत्रे,हे कोण काय म्हणेल, या भानगडीत न पडता,आपल्या निव्वळ स्वतंत्र विचाराने तहहयात जगले.

आचार्य अत्रे कधीही बरोबर किंवा चूक नव्हते. अत्रे हे एकमेवद्वितीय होते. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणारा चित्रपट बनवणारा माणूस, फुलेंच्या जीवनावर चित्रपट बनवून राष्ट्रपती रजत पदक मिळवून देणारा माणूस, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा माणूस, टोकाचे प्रेम आणि टोकाचा द्वेष ज्याने झेलला तो माणूस महाराष्ट्राचा हिमालय होता. असं एखादंच क्षेत्र असेल, जे अत्रेंनी गाजवायचं ठेवलं असेल. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रेम आणि ऋण या दोन्हींची उंची इतर कुणालाच गाठता येणार नाही एवढं आहे. 

मी, मे २०१७ या महिन्यात सहपरिवार मुंबईत गेलो होतो.तेथे गेल्यावर सर्वप्रथम मनोमनी वंदन केले अर्थातच अत्रे यांना, कारण प्र.के. अत्रेंच्या रोखठोक भूमिकेमुळे देखील मुंबई आपली राहिली व मराठी माणूस तेथे तग धरून उभा राहिला.

संयुक्त महाराष्ट्रात मुंबई राजधानी झाली. प्र.के. अत्रे यांनी आपल्या हजरजबाबी, उपरोधिक वक्तृत्व शैलीने आणि विनोदाने शेकडो तास भाषणं करून मराठी माणसाला जागा केला. प्र.के. अत्रे यांचे मुंबईत स्मारक असायला हवे.

वि.र.काळे लिखित "आचार्य अत्रे:महाराष्ट्रातील बलदंड व्यक्तिमत्त्व " या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आचार्यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी काढलेले उदगार खूपच समर्पक आहे ....

" उद्या जर माझी समाधी बांधायची वेळ आलीच तर त्यावर एकच वाक्य लिहा --हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील;पण हा कृतघ्न कधीही नव्हता.."

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनी माझ्यातर्फे या महान अवलियास विनम्र श्रद्धांजली..! 🌹🙏🏻

वंदे मातरम्..!

 ता.क.: या लेखाचे हक्क माझ्याकडे राखून आहेत.कुणीही लेखाच्या शेवटी स्वतः चे नाव लिहून कॉपी पेस्ट करू नये.असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..! 

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: १३ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा