चिंतन ©️
तो देखील धर्म आहे.
=====================
माझे सह परिवार गेल्या काही दिवसांपूर्वी वर्ष श्राद्ध निमित्त जाणे झाले होते. यथा योग्य पद्धतीने पूजा सुरू झाली होती. मात्र पौरोहित्य करणारे जे गुरू होते ते पूजा , मंत्र उच्चारण करत असताना त्यांच्या तोंडात एका बाजूला धूम्रपान युक्त बार ठेवून मंत्र उच्चारण करत होते.
मला संबधित पौरोहित्य करणाऱ्या गुरूंचे ते वर्तन पवित्र मंत्र उच्चारण करताना अजिबात योग्य वाटले नाही. विशेष म्हणजे संपूर्ण पूजा विधी मंत्र संपे पर्यंत पौरोहित्य करणाऱ्या गुरूंच्या तोंडात धूम्रपान युक्त बार होता. पूजा आटोपल्यावर संबंधित गुरूंनी योग्य ती दक्षिणा ठेवायला सांगितली.मी अजिबात दक्षिणा ठेवली नाही. मी स्वतः हिंदू आहे.हिंदू धर्मातील पूजा विधी पद्धती यावर माझा विश्वास देखील आहे.मात्र जर पौरोहित्य करणारे गुरुवर्य जर पूजा विधी मंत्र उच्चारण करताना स्वतः नैतिक बंधने पाळत नसतील तर आपणही अशा गुरूंना दक्षिणा का म्हणून द्यावी..? त्यांचा धर्मोपदेशक म्हणून सन्मान का करावा..? मी संबंधित गुरूंना या विषयी नम्र भाषेत काहीच बोललो नाही, कारण स्थळ अन् वेळ योग्य वाटली नाही.
असेच ' काही शिक्षकांचे ' देखील असते. शिक्षक देखील गुरुवर्य असतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर धूम्रपान करतात. यातून असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर कोणता आदर्श प्रस्तुत करत असतात..? हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. सगळं शहाणपण औपचारिक शिक्षणानेच येते असं अजिबात नाही असे माझे ठाम मत आहे. त्याला जोड स्वतः हुन अंगिकारलेल्या नैतिक मूल्यांची देखील असावी लागते. फार तर अगदी १००% नैतिक मूल्यांची जोपासना जरी शक्य झाली नाही तरी निदान काही बाबतीत जसे की वेळ, स्थळ या बाबतीत तर स्वतः हून बंधने पाळावीच लागतील. तो देखील धर्म आहे. बाकी नुसत्या फुशारक्या , आत्मप्रौढी, अन् एका विशिष्ट वलयात दिसणं यापेक्षा वेगळं काहीच नाही.
मला जे वाटलं ते मी नम्रपूर्वक व्यक्त केले आहे. माझ्या वरील व्यक्त होण्याचा ' सर्वजण ' असे न समजता ' काहीजण ' असे समजून ज्यांन त्यानं यावर खरचं आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे असे वाटते. माणसाच्या आयुष्यात समाज हा आपलं निरीक्षण करणारा सर्वात मोठा अन् सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करणारा सर्वोत्तम निरीक्षक असतो. एवढ्या मोठ्या सर्वोत्तम निरीक्षकाच्या समोर ज्यानं त्यानं जरा जपून..! पृथ्वीवरील माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याने आपापल्या सोयीनुसार आत्मिक सुखाच्या अन् भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे. ज्यातून त्याला आत्मिक समाधान अन् सुख प्राप्ती होत असते. या बाबी निर्माण करताना प्रत्येक मानवी समूहाची, घटकांची काही जबाबदारी याचं मानवी समाजाने निश्चित केलेली आहे. तिचं संतुलन बिघडले तर दृश्य स्वरूपात व्यक्त न होणारे, मात्र जाणवणारे सामाजिक प्रश्न निर्माण होतात. आणि जाणवणारे सामाजिक प्रश्न समाजव्यवस्थेतील सामाजिक सन्मानासाठी त्रासदायक ठरू लागतात.
मी व्यक्त केलेल्या वरील विचारांनुसार मीच स्वतः फार दीड शहाणा , नैतिक मूल्यांची खाण असलेला आहे असे कुणीही कृपया अजिबात समजू नये.मात्र वेळ, स्थळ या बाबतीत स्वतः हून काही सामाजिक बंधने पाळावीच लागतील. तो देखील धर्म आहे..!
जय श्रीकृष्ण..!
वंदे मातरम्
धूम्रपानाचा विरोधक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १३/५/२०२५, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा