#चिंतन ©️
वय होते..
======================
वय होते झुलायचे अन् झुलवायचे
एकमेकांच्या सोबत खोड्या करायचे
हा कोण तो कोण हे कधी शिवलं नाही
एकमेकांशिवाय कधी करमलं नाही ||१||
होता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा
म्हणून कधी कुणी जाणवला नाही निराळा
कुणी म्हणतं काही दिवस असतात मंतरलेले
आम्हीच होतो त्यातील आतुरलेले ||२||
गत आयुष्याला देखील हेवा वाटला असेल
ते आमच्या मैत्रीला बघून खुदकन हसलं असेल
हळुवार वयात होत्या फक्त तीनच वर्ग खोल्या
मात्र त्या संबंध आयुष्याला त्या पुरून उरल्या ||३||
प्रगत अप्रगत या भानगडीत आम्ही पडलो नाही
सगळेच एक सारखे यापेक्षा दुसरं काही जगलो नाही
कमीत कमी गरजातील आम्ही होतो श्रीमंत
खात्रीने सांगतो आमच्या पैकी कुणीही नव्हता संत ||४||
शेणा मातीच्या अभ्यासिकेत अभ्यासही भरपूर केला
एकमेकांना वाचविण्यासाठी सभ्यतेचा आव देखील आणला
आम्ही होतो पौगंडावस्थेतील निशाचर
तत्कालीन गावातील माहित होते चराचर ||५||
आता फक्त आठवणी आहेत त्या क्षणांच्या
काहीजणाच्या वर्तमानात नसलेल्या देहाच्या
वर्तमानात प्रत्येकजण स्थिरावला आहे
आपापल्या आयुष्यात रममाण झाला आहे ||६||
आला दिवस जात आहे
जाताना आयुष्य घेऊन जात आहे
हे दयाघना प्रेमात अंतर ठेवू नको
मैत्रीच्या विश्वात अंतर ठेवून जगणं नको ||७||
वंदे मातरम्
पद्य लेखन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील पद्य लेखन कॉपीराइट केलेले असून पद्य लेखनाचे संपूर्ण हक्क राखून आहेत.)
दिनांक - १६/५/२०२५, शुक्रवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा