सोमवार, १९ जानेवारी, २०२६

गर्दीतला एकांत...!


 


#चिंतन ©️


गर्दीतला एकांत...!


===================


समाजात राहूनही एकांतात राहण्याची कला ओशोंनी सांगीतली आहे.ही जीवन कला खूप संयमित आहे.खूप माणसांच्या गर्दीत माणूस स्वत:चे अस्तित्वच विसरून जातो.अनायासे त्याचा दूष्परिणाम स्वत:च्या शारिरीक,मानसिक,भावनिकतेवर कमालिचा होतो.


आणि हो....समाज म्हणजे गर्दी नव्हे...! तर समाज हा एकमेकांच्या परस्परपूरक विचारांनी वेढलेला असला तरच मानवास वरील मूल्यांचा परमानंद घेता येतो.उगीचच गर्दीत राहून सामाजिक एकांतवासाला मानवाने मूकू नये.फक्त गर्दी आणि समाज यांचे नीट सूक्ष्म आकलन व्हावे तरच ओशोंच्या वरील विचारधनाचा नीट अर्थ समजणे सोपे होईल.


मी या अशा गर्दीतील एकांताचा खूप खूप आनंद घेत असतो, स्वतः ला त्यात शोधण्यासाठी...आणि त्याद्वारे काहीतरी शिकण्यासाठी..! जी माणसं गर्दीत खूप खूप उथळ असतात..वास्तविक तीच माणसं आतून खूप एकटी असतात. याचा अर्थ असा नव्हे की, गर्दीत अजिबात राहूच नये किंवा आपले विचार व्यक्त करू नये. उलट आहे त्या गर्दीचा स्वतः मधील एकांत शोधण्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. मी माझ्या दैनिक प्रवासात,समाजात,विविध ठिकाणाच्या गर्दीत याचा पुरेपूर उपयोग करून घेत असतो...गर्दीतील एकांताचा आनंद घेण्यासाठी.


वास्तवातील एकांत हा शोधावा लागतो.तो स्वतः हून कधीच प्राप्त होत नाही.एकांत आपल्याला आत्मिक शोध अन् त्यातून स्वतःचे वैगुण्य अन् वैराग्य दाखवत असतो. एकांतात बसणं अन् एकांत अनुभवणे ह्या दोन्ही मानसिक बाबी / अवस्था पूर्णतः भिन्न भिन्न आहेत.एकांतात आपण शारीरिकदृष्ट्या बसू शकतो, मात्र त्या बसण्यात मग ते एकट्यात असो अथवा अनेकात, त्यात स्वतःला शोधता आले पाहिजे. 


एकांतात बसलेली व्यक्ती बऱ्याचदा काहींना एकलकोंडी किंवा मनोरुग्ण वाटू शकते. हे देखील अर्धसत्य आहे,कारण काही माणसं एकांतात जातात, त्याला कारण त्यांचा भुतकाळ कुणाच्यातरी त्रासाने , दुःखाने त्रासलेला असतो.कुणाच्यातरी त्रासाने विरक्त आयुष्य जगणं अन् स्वतः हून, स्वतःच्या मनाला निवांत करण्यासाठी, आत्मिक शोध घेण्यासाठी एकांत शोधणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भिन्न असतात 


तसेच काहीजण एकांत पसंद करतात, त्याचे कारण त्यांचा भुतकाळ कुणाच्यातरी त्रासाने , दुःखाने त्रासलेला नसतो.तर अशांना एकांत हवा असतो तो स्वतःच्या मनाला निवांत करण्यासाठी..!स्वतःचा शोध घेण्यासाठी..! मग हा एकांत एकट्यात असू शकतो किंवा गर्दीत देखील एकांत असू शकतो..! कुणी एकांतात बसलेला आहे म्हणजे तो अथवा ती एकलकोंडी किंवा मनोरुग्ण आहे असा अंतिम निष्कर्ष काढून समाज आपापल्या व्याख्या त्या संबंधित व्यक्ती विषयी तयार करत असतो. हे योग्य नसते. 


थोडक्यात एकांत ही अनेकांत राहून जीवन जगण्याची मानवाची सामाजिक कला आहे..!  


असो, काल दिनांक १९/१/२०१७ रोजी आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचा स्मृतिदिन होता.

(मृत्यू दिनांक - १९.१.१९९०) 

त्यानिमित्त या महान तत्त्ववेत्त्यास विनम्र अभिवादन..! 🙏🏻 


वंदे मातरम्...!

                                                                 

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २० जानेवारी २०१७