शुक्रवार, ३० जुलै, २०२१

" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"



चिंतन


" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"


===================================


दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी अमावस्या असा काही सण,उत्सव आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!

 

गटारी अमावस्या हे नामकरण धूम्रपान करणाऱ्या काही लोकांनी केले आहे...! दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची) म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏


कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...! वेळी च सावध व्हा.. उद्या धूम्रपान करणारे अन् न करणारे देखील काही विकृत माणसं म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!


तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏


तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..!


त्या पिणाऱ्यांच्या दारू पिण्याविषयी काहीही हरकत नाही..! तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, फक्त गटारी अमावस्या हे नामकरण योग्य नाही हाच मुख्य मुद्दा आहे. 


अंधारावर विजय मिळविणा-या प्रकाशाचे पूजन..दिप अमावस्या या नावाने ओळखले जाते..! आषाढातील अमावास्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते..! जे दिवे आपल्या आयुष्यात प्रेरणेचा उजेड देतात,त्याच दिव्यांचे स्वच्छ धुवून पुसून पूजन करण्याचा आजचा पवित्र उत्सव..! 


दिव्यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात ऋण असते..! हा तोच दिवा असतो, जो प्रकाश देताना जात,पंथ धर्म इ.विविध प्रकारचा भेदभाव अजिबात करत नाही..! दिव्यांच्या प्रकाशाने सर्वजण उजळून निघतात..! त्याच दिव्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा पवित्र उत्सव... आषाढ अमावस्या दिपपूजा...!


आम्ही पालखेडला असतांना बालपणी श्री.पारेश्वर महादेव मंदिर,संत जनार्दन स्वामी आश्रमात दिपप्रज्वलन करून दिप-पूजन करायचो..! माझी स्व.आई , दरवर्षी,घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची,नंतर चौरंग, किंवा पाटावर सर्व दिवे मांडून त्यांचे पूजन करायची..! त्या निमित्ताने स्व.आईची आज, खूप आठवण आली..! आईच्या स्वर्गवासानंतर आमच्या कुटुंबात ही जबाबदारी अर्थातच माझ्या धर्मपत्नीने सांभाळली आहे..!


ता.क.: जुनाट सवयी एकदम बदलत नसतात,थोडा दम मारावा लागतो..!☺


वंदे मातरम्...!!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ जूलै २०१७
 

गुरुवार, २९ जुलै, २०२१

" सांत्वनपर गृहभेट - नागपूर ...! "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" सांत्वनपर गृहभेट ...! "


=====================================


" आई, तू स्वतः ला एकटी समजू नकोस..!आम्ही ही तुझी मुलं तुझ्या सोबत आहोत..!"


असं म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या आईला मायेनं जवळ केलं होतं..!


 दिनांक २९ जुलै २०१८ रोजी सांत्वनपर गृहभेटीचे निमित्त होते आमचा प्रिय मित्र,वर्गमित्र मनोहर दशरथ गावडे याचे स्वर्गीय वडील, दशरथ काका गावडे यांच्या नागपूर येथील मूळ घरी निधनानंतर त्यांच्या घरी भेट देण्याचे..! काकांचे वृध्दापकाळात येणाऱ्या आजाराने निधन झाले..अन् आमच्या मित्रावर, त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली..!


आपली भारतीय संस्कृती हेच शिकविते की,कुणाच्या शोकावस्थेत जर आपला भावनिक आधार दिला गेला तर तो आधार, आयुष्याला पुन्हा उभे राहायला बळकटी देऊन जातो..! 


आम्ही मनूच्या घरी दिनांक २९ जुलै २०१८ रोजी संध्याकाळी पोहचल्या..पोहचल्या , मनु ची आई, दुखाश्रू ढाळत आमच्या जवळ येऊन बसली..!माऊलीचा ,आयुष्याचा जोडीदार गेल्यामुळे ती खूप भावूक झाली..अन् आपल्या भावनांना वाट करून दिली आमच्याजवळ..!मला राहवले नाही.मी लगेच माऊली जवळ जाऊन बसलो,आईच्या पाठीवर हात ठेवला.आमच्या सर्व मित्रांच्या एकच भावना होत्या.....


" अगं, आई..तू स्वतः ला एकटी समजू नकोस! आम्ही ही तुझी मुलं तुझ्या सोबत आहोत..!"


खूप हायसं वाटलं माऊलीला..! आई,शेवटी म्हणाली..

" पोरांनो,लई लांबून आलात रे..! " माझ्या मनूच्या प्रेमाखातर आला..! आई,शोकमग्न झाली होती..! मी पुन्हा..पुन्हा आईच्या पाठीवर हात ठेवून तिच्या मुलाचा भावनिक आधार तिला देऊ पाहत होतो..! माझ्या सोबत आलेले आम्ही सर्व मनु चे जिवलग मित्र,सचिन अजमेरा,विनोद पाटील,सुभाष ठेंगडे पा. व संजय होळकर पा. ही सर्व आईला प्रत्येक क्षणाला भावनिक आधार देत होती..!


शेवटी मी एकांतात विचार करू लागलो की, माणसाच्या आयुष्यात सत्ता, संपत्ती,पद प्रतिष्ठा पेक्षा भावना खूप काही देऊन जाते.ज्याचे मोल कशातच नसते.आम्ही केवळ आमच्या प्रिय मित्राच्या भावनिक नात्यापोटी,त्या माऊलीच्या ,आमच्या प्रती असणाऱ्या भावनिक ओढी पोटी इतक्या दुरहून..थेट औरंगाबादहून ...इथं नागपूर ला आलो होतो..! ही त्या निस्सीम भावनेची तर किमया होती..! काहिंकडे खूप काही असते..पण..भावनाशून्य जगून अशी माणसं सजीवातील मुर्दाड निर्जीवा सारखी आयुष्य जगत असतात..!


आमच्या प्रिय मित्राच्या मनोहरच्या हृदयात असलेल्या भावनेशी,आईच्या हृदयात असलेल्या भावनेशी...आमच्या भावनेची ही झालेली " सांत्वनपर गृहभेट " खूप काही देऊन गेली..! 

वंदे मातरम्..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


सांत्वनपर गृहभेट दिनांक: २९ जूलै २०१८

स्थळ: नागपूर ( विदर्भ )

शनिवार, २४ जुलै, २०२१

" गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |



चिंतन


" गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |


=============================


जेंव्हा जेंव्हा माझ्या दाढीतील दिसणारा एक एक पांढरा केस, मला माझ्यातील ययाति ची आठवण करून देतो,

तेंव्हा तेंव्हा मी प्रौढ होत जातो |


तो पांढरा केस, कित्येक गुलाबी आठवणींना धूसर करतो,

त्याच्याकडे पाहून जीव कासावीस होऊन जातो |


गतकाळातील दाढीतील काळ्याभोर केसांच्या रम्य आठवणी जाग्या होऊन जातात,

त्याच केसांच्या प्रेमळ आठवणीत आजचे पांढरे केस सुखावून जातात |


ऐन तारुण्यात याच दाढीत हजारो केस, निव्वळ होते काळे,

आता त्या आठवणींना उराशी बाळगून मी आजच्या पांढऱ्या केसांना रोज कुरवाळे |


काळे केस, तारुण्य प्रदर्शित करतात,

तर..

पांढरे केस, आपल्यातील प्रौढत्वाची जाणीव करून देतात |


केस तेच असतात, फक्त त्यांचे रंग बदलतात ,

त्याचं रंगांच्या अर्थाची परिभाषाचे भाव देखील आपल्याला खूप काही जाणीव करून देतात |


माणसांच्या वर्णात, पांढऱ्यांना असतो मान,

केसांच्या विश्वात काळ्यांचा होत असतो सन्मान,

माणसाच्या अशा कित्येक विकृतींनी माणुसकी शरमेने खाली घालते आपली मान |


गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |

आता आयुष्य याच पांढऱ्यांच्या सोबत पडत आहे अंगवळणी !


ता.क. - मी काही पट्टीचा कवी नाही, पण वरील कविता जशी जमेल तशी लिहिली आहे अन् आत्ताच पोस्ट करत आहे, काळया पांढऱ्या रंगाची दाढी असणाऱ्या रसिक मायबापांच्या चरणी..! 😊🙏🏻


वंदे मातरम्..!


एक तात्पुरता कवी - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील कविता कॉपीराइट केलेली असून या कवितेचे संपूर्ण हक्क याच कवीकडे आहेत.)


दिनांक - २५/७/२०२१, रविवार
 

गुरुवार, २२ जुलै, २०२१

" मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!"


 


आमचे गाव, आमची माणसं..!


" मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!"


=============================


इ. स.१९८७,


स्थळ : पालखेड येथील स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांचे गावातल्या रसिकांनी खचाखच भरलेले घरगुती व्हिडिओ थिएटर,


तिकीट दर : २ ₹ ,


चित्रपट : प्यासा सावन,


गीताचे बोल : " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...


आमच्या पालखेड गावात त्याकाळी करमणुकीचे साधन स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांचे गावातल्या रसिकांनी खचाखच भरलेले घरगुती व्हिडिओ थिएटर होते.सदरील व्हिडिओ थिएटर साधारणतः पंधरा बाय वीस आकाराच्या खोलीत होते.दररोज संध्याकाळी वैजापूर येथून व्हिडिओ कॅसेट यायची. कॅसेट आल्यावर आम्ही काही अती रसिक मित्र, व्हिडिओ थिएटर बाहेरील फळ्यावर कोणत्या चित्रपटाचे नाव लिहितात याची आतुरतेने वाट पहायचो.आपल्या आवडीच्या नटाचे किंवा नटीचे चित्रपट असले की, संध्याकाळी ६ ते रात्री ९ चा शो पाहण्यासाठी उतावीळ होऊन जायचो..! मोबाईल, टिव्ही सारखी घरगुती करमणुकीची साधने नसल्याने व्हिडिओ थिएटर हेच आम्हा रसिकांचे मनोरंजन स्थळ असायचे..!


मग प्राथमिक शाळेत होतो. तेंव्हा इतर काही करमणुकीची साधने नसल्याने दौलत काका कुमावत यांचे व्हिडिओ थिएटर सर्व रसिक मित्रांसाठी आवडीचे ठिकाण असायचे.मला चांगले आठवते, ज्यादिवशी प्यासा सावन हा हिंदी चित्रपट स्व.दौलत काका कुमावत यांच्या व्हिडिओ थिएटर मध्ये लागला होता त्यावेळी याच खोलीत हाच चित्रपट पाहण्यासाठी तत्कालीन सरपंच आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर ( हल्ली मुक्काम वैजापूर ) माझ्याच बाजूला बसलेले होते.माझे वय ऐंशीच्या कालखंडातील प्राथमिक शाळेतील असल्याने त्याकाळी प्यासा सावन चित्रपट अन् त्याची कथा त्यातील अर्थ लक्षात येत नव्हता.पण माझ्या बाजूला बसलेले आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर हा चित्रपट पाहताना अधून मधून कौतुकाचे शब्द व्यक्त करायचे..! विशेषतः " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" या गीताच्या वेळी तर या जेष्ठ रसिकांच्या आनंदाला उधाण यायचे..!


माझे किंवा माझ्या समकालीन मित्रांचे वय ऐंशीच्या कालखंडातील प्राथमिक शाळेतील असल्याने त्याकाळी प्यासा सावन चित्रपट अन् त्याची कथा वगैरे फारसा त्यातील अर्थ लक्षात आला नव्हता पण, याच चित्रपटातील " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" या अतिशय सुमधुर गीताने आमच्यावर देखील मोहिनी घातली होती हे मात्र नक्की..! त्याचं कारणही तसंच होतं..! या गीताची चाल सुमधुर होती..! 


आजही जेंव्हा कधी " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" हे गीत ऐकतो तेंव्हा तेंव्हा स्व.दौलत काका कुमावत यांची, त्यांच्या व्हिडिओ थिएटरची, आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर यांची नक्कीच भावूक आठवण येते..! रसिक अन् भावूक माणसांच्या आयुष्यात ज्या गोष्टींची भुरळ पडलेली असते, त्या गोष्टी अन् त्या गोष्टी ज्यांच्या सोबत व्यतीत केलेल्या आहेत अशा माणसांच्या आठवणी दीर्घकाळ स्मरणात राहतात हे माझ्या स्वानुभवावरून सांगतो..!


ता.क. : जी मज्जा त्या २ ₹ मध्ये येत होती, ती आत्ताच्या हाय फाय चित्रपटगृहात नाही येत..! कारण......

त्याकाळी सगळं कसं मर्यादेत होतं..! 


" वो भी एक दौर था और ये भी एक दौर हैं..!" 


वंदे मातरम्...!


फुटू क्लिक बाय : धाकटा..!


सदरील फुटू स्थळ - औरंगाबाद शहराचा एक कोपरा..!


आजचे नैसर्गिक नयनरम्य दृश्य पाहून जुन्या आठवणीत रमलेला एक खेडूत रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२/७/२०२०

रविवार, १८ जुलै, २०२१

😊 " वाचन..! " 😊


 

चिंतन


☺ वाचन..! ☺


==================================


पुस्तकांचे वाचन असले की,माणसं वाचायला सहज सोपी जातात..!मला अशा वाचकांची खूप कीव येते की,जे म्हणतात किंवा ज्यांची अशी पक्की मानसिकता असते की,

" मी अमुक..अमुक..विचारांचे ,साहित्यिकांचे साहित्य वाचत नाही किंवा टाळतो..!" वगैरे.


माझे तर वैयक्तीक मत असे आहे की,सर्व प्रकारचे चतुरस्र वाचन हवे..!जेणेकरून कोणता लेखक त्याच्या लेखन प्रपंचात काय..काय दिवे..मेणबत्त्या, चिमण्या लावत आहे किंवा अंधार पाडत आहे..हे हमखास समजते..!


जी माणसं सर्वच प्रकारचे साहित्य वाचण्यास टाळतात..माझ्या मते अश्या माणसांनचा आपल्या विचारांवर आत्मविश्वास नसतो..!त्यांना भीती वाटत असते की,अमुक..अमुक साहित्य वाचल्याने ते माझ्यावर हावी होईल की काय...याचे..!


अपंग असतात ही माणसं..विचाराने..! त्यांना भीती वाटते की,मी जे साहित्य वाचत आहे,त्याचे विचार माझ्यावर अतिक्रमण करेल की काय..! आपले वाचन राजहंसा सारखे असावे..! जे हवं व इष्ट आहे तेच ग्रहण करणे.. व बाकीच्यात असूनही ते पद्धतशीरपणे टाळणे..!


" सर्वच प्रकारचे साहित्य " वाचल्याने " सर्वच प्रकारचे माणसं " खूप खूप सोप्पी जातात वाचायला..!😂


 मी ,माझी जन्मभूमी पालखेड,आयुष्यातील दीड तपाची कर्मभूमी लासूर स्टेशन, सध्याची कर्मभूमी औरंगाबाद, आयुष्यातील प्रवासादरम्यान भेटलेली माणसं, शिक्षक म्हणून व्यतीत केलेल्या वैजापूर,गंगापूर व सिल्लोड तालुक्यातील शाळा व तेथील विविध 

" सर्वच " मानवी घटक यांचे मस्तपैकी वाचन करत आलेलो आहे..!☺


अगदी असंच,आपल्या आयुष्यात अशी माणसं नको...तशी माणसं नको..हेही योग्य नाही..! उलट आपण अशा " सर्वांच्या "सहवासात, भले तो अल्प का असेना पण असा सहवास असावाच..! अशांच्या संगतीत राहून खूप छान वाचन करता येते..अशांचे..!जे दुर्गुण आपल्यात नाही त्यांचे मोफत प्रात्यक्षिक समोरच्यावर होताना ,होणाऱ्या परिणामांची मस्त मेजवानी असते ती आत्मपरीक्षण करण्याची..! मी स्वतः अधून मधून 😂 मात्र या उपक्रमात ज्यांच्या जवळ प्रचंड संयम आहे अशांनीच सहभाग नोंदवावा..!

नसता....


ता.क.: काजल की कालीख खुद को लग जाने की संभावना बहुत होगी..!😂


वंदे मातरम्..!


सर्वांच्या संगतीत राहणारा व आतापर्यंत संयम ठेवण्याचा प्रयत्न करणारा लेखक: 

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १९ जूलै २०१८

" प्रेमळ अभिनेता, राजेश खन्ना उपाख्य काका...! "



चिंतन


" प्रेमळ अभिनेता, राजेश खन्ना उपाख्य काका...! "


==================================


" ज़िन्दगी के सफर में गुज़र जाते है जो मकाम..

वो फिर नहीं आते..

वो फिर नहीं आते...!"


खरंच या माणसानं, सत्तरच्या दशकात माणसाला भरभरून जगायला शिकवलं..! त्याच बरोबर आयुष्याची चित्तरकथा देखील विविध गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केली..!


ज्याला कुणाला अती प्रचंड प्रमाणात नैराश्य आले आहे..त्या इसमाने एकतर आचार्य अत्रे लिखित " मी कसा झालो..!" हे पुस्तक वाचावे किंवा सदाबहार अभिनेता राजेश खन्ना अभिनित " आनंद " चित्रपट पाहावा..! ही दोन उत्कृष्ट औषधे आहेत..स्वतच्या  गोड आत्म्याची हत्या करणाऱ्याचा  विचार आणनाऱ्यांसाठी..!


" बाबू मोशाय, आनंद मरा नही करते, आनंद मरते नहीं..!"


तरुणांना अन् तरुणींना आपल्या विशिष्ट शैलीमुळे काकांनी आपल्या प्रेमात आकंठ बुडायला लावले होते. एखाद्या अभिनेत्यावरील रसिक प्रेक्षकांतील तरुणींच्या प्रेमाची परिभाषाच काकांनी बदलून टाकली होती. असं वाचण्यात आलं आहे की, त्याकाळी कित्येक तरुणींनी आपल्या रक्ताने काकांना प्रेमपत्रे लिहिली होती. राजेश खन्ना यांची कार निघून गेल्यावर त्याच कारच्या चाकाच्या खाली आलेली माती त्याकाळच्या तरुणी स्वतच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं म्हणून लावत असे..!  एवढं निख्खळ प्रेम फक्त आणि फक्त राजेश खन्ना उपाख्य काकांच्याच वाट्याला आले होते. 


हिंदी चित्रपट सृष्टीत असे काही मोजके अभिनेते होऊन गेले अन् आहेत, ज्यांची नृत्यशैली खास त्यांचीच म्हणून ओळखल्या जाते.त्यात प्रामुख्याने स्व.भगवान दादा, धर्मेंद्र आणि स्व.  राजेश खन्ना उपाख्य काका..! काकांच्या नाचण्यात एक लाजाळूपणा अन् प्रेमळपणा जाणवायचा.एक हात वर अन् एक हात कमरेच्या बाजूला घेऊन वाकडी मान करून नाचण्याची नजाकत काही औरच असायची काकांची..!👌एखाद्या अभिनेत्यावर तरुणींनी जीवापाड प्रेम करावं अन् ते फक्त आणि फक्त काकांच्या वाट्याला यावं हे एकमेव उदाहरण आहे..!  भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीत हे अढळ स्थान काकांच्याच नशिबी अद्याप तरी कायम आहे..!🌹


हाच सर्वांचा प्रेमळ  माणूस, त्याच्या सर्वोच्च यशोशिखरावर असताना, हिंदी चित्रपट सृष्टीतील दुसऱ्या सुपरस्टारची म्हणजेच अमिताभ बच्चन यांची दणक्यात एन्ट्री झाली अन् हळूहळू काकांची ती नाजाकत लोप पावत गेली..! आयुष्याच्या शेवटी हा महान अभिनेता एकटाच राहिला..! अगदी मृत्यू पावल्यावर देखील ,त्याच्या जिवंतपणीच्या अजरामर ' आनंद ' चित्रपटातील त्याच्याच मृत्यू नंतरचा संवाद, खऱ्या आयुष्यातील खऱ्या मृत्यू नंतर उपस्थित सर्वांना त्याच्याच इच्छेखातर ऐकवून गेला..!😔

राजेश खन्ना यांना यश पचवता आले नाही.यशाच्या शिखरावर असताना धूम्रपान, कामाच्या प्रती असणारी बेपर्वाई इत्यादी अहंकारी वृत्तीने राजेश खन्ना यांना यशोशिखरावरून प्रेक्षकांनी जमिनीवर आदळवले.


ता.क.: आज राजेश खन्ना उपाख्य काकाजी यांचा स्मृतिदिन आहे..!( मृत्यू दिनांक - १८/७/२०१२ ) त्यानिमित्त राजेश खन्ना उपाख्य काकांना विनम्र अभिवादन..! 🙏🏻🌹


वंदे मातरम्..!


राजेश खन्ना उपाख्य काकांचा एक चाहता :नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १८ जूलै २०२१, रविवार

 

रविवार, ११ जुलै, २०२१

" वारकरी बंधुची, मोफत दाढी सेवा ..! "


 


चिंतन


" वारकरी बंधुची, मोफत दाढी सेवा ..! "


================================

                                                                                                 आपल्या महाराष्ट्रात हिंदू धर्मातील महान वारकरी संप्रदायात, धार्मिक उत्सवांमध्ये प्रत्येकजण ,आपापल्या क्षमतेनुसार ,कौशल्याने समाजसेवेचे योगदान देण्याची महान परंपरा आजतागायत राखून आहे..! मला याची प्रचीती ह.भ.प.गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह,मुंबई-नागपूर, लासूर स्टेशन महामार्गालगत इ.स.२०१७ साली साजरा झालेल्या धार्मिक उत्सव स्थळी आली होती..!


मी त्यावेळी लासूर स्टेशन येथे राहत होतो.सदरील अखंड हरिनाम सप्ताह स्थळ,लासूर स्टेशन पासून ५ किलोमीटर अंतरावर आयोजित करण्यात आला होता.मी सहपरिवार दररोज संध्याकाळी एक स्वयंसेवक या नात्याने तिथं शाळेतून आल्यावर जात होतो.सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी केशकर्तन करणाऱ्या वारकरी बंधूने सप्ताह स्थळी येणाऱ्या भाविक भक्तांची दाढी करून देण्याकरिता अगदी मोफत सेवा सुरू केली होती..!सदरील केश कर्तन दुकान फार काही आलिशान नव्हते,पण ही सेवा पुरविणाऱ्या सेवेकरी माणसाची मनाची श्रीमंती जगातील सर्वोत्तम श्रीमंती नक्कीच जाणवत होती..! या सेवेकरी बंधूने याच हरिनाम सप्ताह स्थळी नुसते इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरणाऱ्या काही सफेदपोष असणाऱ्यांना आपल्या कृतीतून चपराक लगावली होती .! आसपास ही सेवा पुरविणारे बंधू दिसतात का याचा शोध घेतला पण खूप खूप गर्दीमुळे दिसले नाही..! मला पण पंगत वाढायला जायची घाई असल्याने मी लवकर तिथून निघालो.


दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर हात पाय तोंड धुवून पुन्हा त्याच स्थळी गेलो असता तिथं सदरील वारकरी बंधूची मोफत केश कर्तन सेवा दुकान दिसले नव्हती..! बहुदा त्या हरिनाम सप्ताह स्थळी ऐन मधोमध सदरील दुकान लावल्याने कुणीतरी त्यांना दुसऱ्या जागी दुकान लावायला सांगितले असेल..!


पूर्णत:समर्पण भावनेने,आपल्या क्षमतेनुसार,कौशल्यानुसार 

" सेवा " करणा-या त्या सेवेकरीचे कार्य बघून या महान वारकरी संप्रदायातील सेवेकरी परंपरेची प्रत्यक्ष बघून खात्री पटली..! 


आज दिनांक १२ जुलै २०१९ रोजी आषाढी एकादशी आहे..! त्यानिमित्त या महान परंपरेला सर्व सामान्य वारकरी बंधू भगिनी ,अनेक संतजन यांनी आपापल्या परीने,सर्व सामान्य माणसा करिता याचे दारे उघडी केलेली आहे...!

त्या सर्वांना विनम्र वंदन..!


वारकरी सांप्रदाय याचमुळे श्रेष्ठ आहे..!


वंदे मातरम्..!

जय हरी माऊली..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


सदरील छायाचित्र स्थळ: ह.भ.प.गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह,मुंबई-नागपूर, लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद महामार्ग

इ.स.जुलै- ऑगस्ट २०१७


दिनांक: १२ जूलै २०१९, आषाढी एकादशी.

बुधवार, ७ जुलै, २०२१

" ती..!"


 

चिंतन


                        " ती...! "



===================================


आज दिनांक ८ जुलै २०१८ रोजी भल्या सकाळी आम्ही N3...एका निवांत स्थळी,एका अंतर्गत रस्त्यावर..!

सोबतीला होती..ती..!


तब्बल दहा वर्षांपासून तिने मला भल्या सकाळी दररोज लासुर स्टेशन पासून ते आजतागायत अगदी निष्ठेने साथ दिली आहे..!अर्थात त्या पूर्वीही असेच साथ देणारे होते...पण..तुझ्या इतका दीर्घ सहवास..इतर कुणालाही माझ्या बरोबर निभावता आलाच नाही..!


ती सकाळी सोबत नसली की...अख्खा दिवस आळसात जातो..!इतकं तीच अन् माझं नात घट्ट जुळलं आहे..!

एका चिमुकल्याला त्याच्या या भूतलावर आगमनाच्या वेळी तू आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब दिली आहे हे कसे विसरू मी..?


तर अशी ती..! 

जीने मला दररोज भल्या सकाळी साथ दिली..ती काळाच्या ओघात अस्वस्थ होत चालली आहे..! पण काय करणार तुझं अन् माझं इतकं नात घट्ट जुळले आहे की,तुला एखाद्या भल्या सकाळी जर सोबत नाही घेतले तर.. तो संपूर्ण दिवस..खूप आळसाचा,कंटाळवाणा जातो..!


तुझा रंग काळा सावळा आहे..! काळा सावळा रंग..हा मध्यमवर्गीयांना( सौंदर्याने मध्यमवर्गीय..!) हवाहवासा वाटणारा रंग..!त्या रंगाला ना कधी अहंकाराचा गर्व चढतो...ना कधी...न्यूनगंड..! तो नेहमी समांतर असतो..आपल्या आयुष्यात..! अर्थात सर्वच धवल रंग गर्वाचे असतात असे कदापि नाही बरं का..! ते ही खूप चांगले असतात..! सखे, तू आता तुझ्या वयोमानानुसार हळूहळू तुझ्या वार्धक्याकडे चालली आहेस,पण तुझ्या त्याही वार्धक्यातील सौंदर्यावर मी अविरत प्रेम करत राहणार याबाबतीत तू निश्चिंत राहा..! सखे, तू होतीस म्हणून आज मी जसा आहे तसा असतो..! सखे, तू नसती तर मीही माझ्या देहाच्या व्याधींना कधीचेच कवटाळून बसलेलो असतो..! अर्थात माझ्याही देहाला आयुष्याच्या प्रवासात कधी ना कधी तरी व्याधी जडणाराच..! पण माझ्या वार्धक्यातील त्या व्याधींवर देखील तू प्रेम करतच राहशील याची खात्री वाटते, कारण तुच तर माझी पहाटेची, सकाळची प्रिय सखी आहेस..!


कित्येक वर्षांपासून तू माझी प्राणपणाने साथ दिली आहे..भल्या सकाळी..! आता एकच आशा करतो की,तुझी अशीच साथ जी..लासूर स्टेशन येथे भल्या सकाळी लासूरगाव रोड वरील आदरणीय मांगीलाल शेठ यांच्या बंद पडलेल्या बर्फाच्या कारखान्याचा ओटा असो...कधी भानवाडी रस्त्याला असणारे स्व.हारकचंदजी छाजेड कांदा मार्केट चे प्रशस्त मैदान असो...त्या..त्या सर्व ठिकाणी तूच मला माझे आज पर्यंतचे आरोग्य निरामय ठेवण्यास खूप मदत केली आहे ..तशीच यापुढेही असू दे..!


माझ्या घरातील पुढील पिढी तुझा उपयोग करून आपला स्वार्थ साधेल की नाही याबाबत काही सांगता येणार नाही..! आशा करूया ते तुझा किंवा तुझ्या कुळातील पुढील वारशांचा नक्कीच उपयोग करतील..त्यांच्या स्वतच्या भविष्याकरिता..! पण यात मला शंका वाटते ,कारण आजची पिढी " मॉडर्न " आहे..!☺


तुझी तब्येत काळाच्या ओघात अस्वस्थ होत आहे याची मला जाणीव आहे..सखे..! पण काय करणार माझा मुळात स्वभाव कृतघ्न नाही गं...! मी तुला , जो पर्यंत तुझ्यात शेवटचा श्वास असेल तो पर्यंत सांभाळणार..!कारण तुझ्यामुळे माझे आजचे स्वास्थ बरे आहे..!उद्या किंवा वयोमानारूप ते पुढे कसे होईल हे त्या नियंत्यालाच माहीत..!

 

" गोड फळाला कीड लवकर लागते..!" असे एक वचन महान लेखक वि.स.खांडेकर लिखित " ययाती " या पुस्तकात मी बऱ्याचदा वाचले आहे..! माणसाला उद्देशून खांडेकरांनी हे सुवचन लिहिले होते, आणि मी माणूस आहे..! पण तरीही एक मात्र नक्की की,ते माझे भविष्यातील शारीरिक रूप कसेही असू दे..! तू मात्र माझ्या सदैव स्मरणात राहशील..! जरी अत्यवस्थ अवस्थेत झाली तरीही तू नेहमी माझ्या घरात राहशील..!


अशी ती माझी प्राण प्रिय शाल..!


याच शालीत माझा धाकटा मुलगा चि.नयन याचा तब्बल दहा वर्षापूर्वी जन्म झाला होता,त्यावेळी त्याला इच्यातच गुंडाळून पहिल्यांदा आणले होते..! बाळाच्या कामातील तुझा उपयोग संपल्यावर मी याच शालीवर बसून भल्या सकाळी मी दररोज काही योगासने ,त्रोटक व्यायाम करत आहे..! अर्थात पूर्वीही करत होतो..पण " ती " ही त्यावेळी सोबत नव्हती..! सदरील छायाचित्रात " ती " माझ्या खांद्यावर विसावलेली आहे..!☺ कुणावर तरी निष्ठेने अन् चिरंतन प्रेम करावं या सिध्दांतावर माझी श्रद्धा आहे ग सखे..! 🌹


ता.क. - सुरुवातीला शृंगारिक वाटणारे पण.....

नंतर एखाद्या रेशमाच्या दोऱ्याचा गुंता उलगडत जावा..असे उत्कंठावर्धक लेखन प्रकारातील एक छोटासा प्रयत्न..केला आहे..!

कृपया वाचकांनी निर्भेळ वाचनाचा शृंगारिक पण कृतज्ञता मूल्याचा आनंद घेत...घेत वाचावे..!

वाकड्यात शिरू नये..!🙏😊


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ८ जुलै २०१८

स्थळ: औरंगाबाद.

सोमवार, ५ जुलै, २०२१

" ती, लेमन गोळी..! "😋


 


चिंतन


" ती, लेमन गोळी..! "😋

__________________________________________


ती गोड आहे, दिसायला देखील छान आहे..! थोडी कडक आहे,पण तिच्यात गोडवा असल्याने तिच्यातील कडकपणा सुसह्य होऊन जातो..! तिचा सुसह्यपणा जसजसा नरड्याच्या आतमध्ये जाईल तसतसा तिच्यातील गोडवा अजुन वाढतच जातो..! तिच्यातील गोडवा आंबट शौकीनांसाठी सर्वोत्तम मेजवानीच आहे. तिला जिभेवर चघळत असताना जो स्वर्गीय आनंद मिळतो ,तो तिला एकाच दणक्यात तिच्या शरीराचे लचके तोडून मिळत नाही..! तीनं तिचा रंग अजूनही बदललेला नाही त्यामुळं तिची तिच्या रंग रुपावरील निष्ठा वाखाण्याजोगी नक्कीच जाणवते..! तिचा तो केशरी रंग जेंव्हा माझ्यासारख्याला दिसतो तेंव्हा माझ्या जिभेतील विश्वामित्र आपला संयम सोडून आपल्या लाळग्रंथीद्वारे तिला आपलेसे करण्याचा मेनकारुपी प्रयत्न करतो..! ती जेव्हा जिभेवर रेंगाळते तेंव्हा माझ्यासारख्याला ती जो पर्यंत जिभेवर आहे तो पर्यंत... 

" स्वर्गसुख हेच आहे, स्वर्गसुख हेच आहे, स्वर्गसुख हेच आहे..!" असेच जाणवत असते. अगदी बालपणापासून ते आजतागायत तिच्यातील त्या गोडव्यावर अविरत चवदार आंबट प्रेम टिकवून ठेवून मी एकनिष्ठतेचं उदाहरण समस्त आंबट शौकीनांच्या समोर उदाहरण प्रस्तुत केलेलं नाही, तर तुम्हीही तिला जिभेवर रेंगाळत ठेवून असंच तिच्यावर प्रेम करा हे दाखवण्याचा चवदार प्रयत्न केला आहे..! 


आज दिनांक ६ जुलै २०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानकावर खूप दिवसांनी लेमन गोळी खायला मिळाली..! गोळी खाद्य पदार्थ मधील माझी सर्वात आवडती खायची गोळी..लेमन गोळी..! लहानपणी मी पालखेड येथे आमच्या गावातील किराणा दुकानदार स्वर्गीय आदरणीय पंडित आबा ऋषिपाठक,स्व.आदरणीय विठ्ठल काका जैन, स्वर्गीय सुभाष शेठ छाजेड यांच्या दुकानातून लेमन गोळी हमखास घ्यायचो..अन् मस्तपैकी खायचो..! 😋


आज,जुन्या काळातील बहुतांशी खाद्य पदार्थांमध्ये बदल झाला आहे,त्यात नवनवीन चवी समाविष्ट झाल्या आहेत..!पण लेमन गोळी आजही आपली तिची तीच गुणवत्ता टिकवून आहे, हे मला आज प्रत्यक्ष खाल्यावर पुन्हा समजले..! 


ही लेमन गोळी,कुठेही नाही मिळालीच तर कोणत्याही बस स्थानकावर नक्कीच मिळते..!ज्याला खायची तीव्र इच्छा झाली असेल त्यांनी कोणत्याही बस स्थानकावर संपर्क साधावा..! 


ज्यांना कुणाला " इतर काहीही बचाबचा खाऊन,किंवा पिऊन " स्वतच्या आसपास काही सेंटिमीटर पर्यंत वायू प्रदूषण करण्याची सवय आहे, त्यांना ही लेमन गोळी अजिबात आवडणार नाही..!

 

ता.क. - प्रस्तुत उजवा तळहात माझाच आहे..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ६ जुलै २०१८