चिंतन
" सोप्या भाषेचे महान लेखक आण्णाभाऊ साठे ..! "
====================================
सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत,सर्वसामान्यांचे नायक उभे करून महान साहित्य संपदा निर्माण करण्याचे कसब व असे साहित्य निर्माण करणारे लेखक माझ्या मते एकमेव ...आण्णाभाऊ साठे हेच असावे..!
आण्णांच्या प्रत्येक साहित्य संपदा मध्ये जे..जे नायक उभे केल्या गेले आहेत ते सर्व तळागाळातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत..!मग फकिरा या साहित्यातील फकिरा असो किंवा वारणेचा वाघ मधील नायक असो..!सगळे वंचित घटकातील लोकांचे नायक म्हणून तेही वास्तवाला सामोरे जाऊन उभे केल्या गेले आहेत.अन् ते उभे करण्याचे कसब कुणी केले तर ...फक्त एक ते दीड दिवस शाळेत गेलेल्या एका सर्वसामान्य माणसातील असामान्य लेखकाने..!आपल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी..!
कसं शक्य झाले हे...?
आपण पाहतो, पूर्वीही अन् आताही कित्येक लोकांनी अनेक औपचारिक शिक्षणाच्या पदव्या संपादन केल्या..!कुणी आपल्या समाजाच्या पाठिंब्याने..तर कुणी आपल्या जवळील धन संपत्तीच्या मदतीने..तर कुणी कवडीची अक्कल नसताना फक्त त्या शैक्षणिक संस्थेच्या वर्तुळातील नातेवाईकांचा जवळचा असल्याने..!या व्यतिरिक्त जे कुणी विद्वान ठरले ते नक्कीच वंदनीय ठरले होते,आहेत..अन् राहतील सुध्दा..!
पण... आण्णांच्या आयुष्यात तर असे काहीही नव्हते..!बालपण निव्वळ कोरडे वाळवंट. !असे वाळवंट..ज्यात मैलोदुर नुसता..अंधार होता..!
कशाचा अंधार..होता..?
दारिद्र्याचा अंधार..!
निरक्षर आयुष्याचा अंधार..!
निसर्गाच्या सुंदर अशा मानवाच्या जीवनात भेदाभेदीचा अंधार..!
उद्याच्या जेवणाच्या भ्रांतीचा अंधार..!
मूलभूत गरजांचा अंधार..!
आण्णांना व कुटुंबीयांना जाणवलेला भयानक जातीय विषमतेचा अंधार..!
अशा सगळ्या अंधार पसरविणाऱ्या काळया मनाच्या दृष्ट प्रवृत्तींना लढा देऊन..आण्णांनी आपले स्वतंत्र असे भावविश्व उभारले..!ही गोष्ट वाटते तेवढी सोपी अजिबात नव्हती..!अंधकारातून उषःकालाकडे वाटचाल केली ती एका अती सर्व सामान्य मुलाने..तरुणाने..पुरुषाने..! एक असामान्य माणूस होऊन..!
मी मागे मुंबईला सहपरिवार गेलो होतो.त्यावेळी तेथील आजच्या मराठीची..मराठी माणसाची जी वर्दळ दिसते..तिला जे लोकनायक निमित्त ठरले. त्यात प्र.के.अत्रे, शाहीर अमर शेख,स्व.बाळासाहेब ठाकरे ,आण्णाभाऊ साठे... इ. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी आण्णांनी त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रातील जनजागृती करून तत्कालीन मोरारजी देसाई यांना भंडावून सोडले होते.ते कला क्षेत्र होते..तमाशा..!याच तमाशातील विविध वगनाट्याद्वारे तत्कालीन यंत्रणेवर आसूड ओढले ते आण्णांच्या सिद्धहस्त लेखणीतून..!आण्णांनी असे काही तमाशातील वगनाट्य लिहिली की..अखेर मोरारजी देसाईंनी तमाशा या लोककलेवर बंदी आणली.पण भितील ते आण्णाभाऊ कसले..!आण्णांनी तमाशाचे नामांतर केले........
" लोकनाट्य " अन् उतरले पुन्हा मैदानात..!
आपल्या देशात एक फार मोठे दुर्दैव आहे की,जर एखाद्या असामान्य माणसाने जर यश मिळवले तर त्याला आपल्या बाजूने ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.असा प्रयत्न पूर्वीही होता..अन् आताही..!आता सुज्ञ माणसांच्या लक्षात आले असेलच अशी ओढणारी पंचवार्षिक मंडळी कोण ती...?
वास्तविक अशी अनेक असामान्य माणसं ही कधीच कोणत्या विशिष्ट पंथाची,धर्माची,जातीची प्रतिनिधित्व करणारी नव्हती..!
ती त्यांच्या अंगी असलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या ,वंचित घटकातील लोकांसाठी लढणाऱ्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारी महान मंडळी होती..!त्यात आण्णाभाऊ देखील आले..!
मी माझी जन्मभूमी पालखेड येथील माध्यमिक शालेय जीवनात असताना स्व.दौलत काका कुमावत हे त्यावेळी व्हिडिओ द्वारे चित्रपट दाखवायचे. त्यावेळी काकांकडे " वारणेचा वाघ " हा अती सुंदर मराठी चित्रपट पाहिला होता.त्यावेळी तो चित्रपट खूप आवडला होता.आण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित तो चित्रपट होता..!प्रत्येकाने एकदा तरी हा चित्रपट पाहावाच..इतकी सुंदर व रोमांच उभे करणारी कथा या चित्रपटाची आहे..!
असो, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी खूप काही व्यक्त करता येईल..पण थांबतो..!
आज थोर लेखक,शाहीर, आण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अतुलनीय कार्याला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून विनम्र अभिवादन..!
वंदे मातरम्..!
ता.क.: कलेवर निस्सीम प्रेम करणारी माणसं एका विशिष्ट गटाची कधीच नसतात.तर..ती..त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माणसांची असतात..!
जसे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे..!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१ ऑगस्ट २०१८


















