शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

" अब मार भला... ! "😊🙄



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" अब मार भला... ! "😊🙄
=====================================

काळ होता.. इ.स.१९९३ चा..!
ऋतु होता..पावसाळ्याचा..ऑगस्ट मधील..!मला नेमकी दिनांक आठवत नाही.आम्ही मोजके डी. एड.चे वर्गमित्र ता.कन्नड शहर,जि.औरंगाबाद येथील समर्थनगर मधील जगातील तत्कालीन काळातील  बहुदा अस्वच्छतेत पहिल्या पाच मध्ये असणाऱ्या वसतिगृहात राहत होतो..! 😊 बाकीचे माझे मित्र डी. एड कॉलेज ला गेले होते.मी काही वेळानंतर जाणार होतो.त्याचे कारण माझ्या बाजरीच्या भाकरी थापायाच्या राहिल्या होत्या..! मी दोन बाजरीच्या भाकरी थापल्या अन् आवरासावर करून कॉलेजला जाण्यासाठी निघालो..!

माझ्या मनात सहज विचार आला की,बस स्थानकावर असणाऱ्या मीर साहेब यांच्या चहाच्या हॉटेलवर जाऊन मस्तपैकी एक कप दूध प्यावे अन् मग नंतर कॉलेजला जावे असे वाटले. मी तेंव्हाही अन् आताही चहा पित नसल्याने चहाची तहान दुधावर भागवायची ठरवले होते..! आमच्या सुंदर..? अशा वस्तीगृहाच्या थोड्याच अंतरावर बस स्थानक होते..!मी पटकन तिथे पोहचलो.

मीर साहेब यांचे हॉटेल त्याकाळी कन्नड मध्ये खूप प्रसिद्ध होते.त्याचे कारणं तीन होते..! पाहिले कारण म्हणजे त्यांनी बनविलेल्या चहाची चव अगदी मस्तपैकी होती.. असं माझे मित्र म्हणायचे..!😂अर्थात मलाही चहाच्या वासाची अलर्जी वगैरे नव्हती..! मी आपली चहाची भूक  फक्त  तिच्या वासावर भागवून घ्यायचो..! ते हॉटेल प्रसिद्ध असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे..तिथे एक कप चहा फक्त १ ₹ ला मिळत असे..! त्यामुळे तिथे चहा पिवय्यांचा नेहमी सुळसुळाट असायचा..!😂  तिसरे कारण म्हणजे मिर साहेब यांचा स्वभाव खूप मायाळू होता..!

मी एक  कप दुधाची  ऑर्डर दिली. मस्तपैकी दूध पीत होतो..इतक्यात..जिथून बस ,बस स्थानकात शिरतात तिथं दोन माणसात भांडण सुरू झाले..असे त्यांच्या ध्वनी प्रदूषणामुळे मला व इतरांना कळले.. ! मी पटपट दूध पिले अन् तो मारधाड लाईव्ह चित्रपट पाहायला गेलो..!

पाहतो तर काय...त्या दोन माणसांपैकी एकजण एकदम हडकुळा तर दुसरा दणकट तब्येतीचा होता..! त्यांच्यातील संवाद व कृती पुढील प्रमाणे होती...
त्या दणकट माणसाने त्या लुकड्या माणसाला एक जोराची थापड कानाखाली ठेवून दिल्या बरोबर...तो लुकडा माणूस जामिनावर पडला..अन् म्हणाला...
लूकडा माणूस - " ऐ...मुझे मारनेका नही भला क्या..!"
असं म्हणल्या बरोबर त्या दणकट माणसाने पुन्हा एक जोराची थापड कानाखाली लावली. त्यावर तो लुकडा माणूस पुन्हा म्हणाला :
" मैं..तेरेको समझाता हु...मेरेको.. मार मत...बहुत महंगा पडेगा तेरे को...!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला.पुन्हा तो लुकडा माणूस म्हणाला : " तू अब मार भला..तेरे को मैं.. दिखाता हुं..!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला..!
त्यावर तो लुकडा माणूस म्हणाला...
" तू अब सिर्फ मुझे हाथ लगाके दिखा..!"
पुन्हा त्याच्या कानाखाली आवाज झाला..!
पुन्हा शेवटी तो लुकडा माणूस म्हणाला...
" मैं..तेरे को अभी छोडता हुं...तुझे मैं..बाद में देखुंगा..!"

असं म्हणून तो लुकडा माणूस तिथून पळून गेला..! मला तेंव्हा पासून ते आज संध्याकाळ पर्यंत एक प्रश्न पडला होता की,
" त्या लुकड्या माणसाने,त्या दणकट माणसाचा एवढा मार खावूनही ,तो लुकडा माणूस असं का बरं म्हणाला होता..की,
" मैं, तेरे को अभी छोडता हुं..तुझे मैं..बाद में देखूंगा..!"
आणि आज संध्याकाळी त्याचे मला दुसऱ्या एका कृतीने उत्तर मिळाले..! ते उत्तर असे की,
" अरे, त्या लूकड्या माणसात तर अजिबात दम नव्हता...तो फक्त पोकळ धमक्या देत होता..!"

ता.क.: मी पाहिलेल्या वरील प्रसंगाचा अन् भारत व पाकिस्तान मध्ये नेहमी होणारे भांडण, यात सांधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..!😊

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक  २८ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २८ फेब्रुवारी २०२०, शुक्रवार

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

" जेंव्हा आम्ही शाळेत होतो..! "




आमचे गाव आमची माणसं

" जेंव्हा  आम्ही शाळेत होतो..! "
===============================
                                                     
 जेंव्हा आम्ही शाळेत होतो,बहुतेक जग मोठं होतं
                     
जेंव्हा पारेश्वर मंदिराच्या गल्लीतून जायचो,रस्त्यावर काय..काय नव्हते
                                                                           
वाळेकर आप्पा तळत असलेली शेव व उत्तम काकांचे डाळीचे लाडू
                                                                                   
आज या वस्तू कुठेही सहज मिळतात पण आप्पा व काकांची लज्जत त्यात नाही
                                                                                   
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय.
                                                 
जेंव्हा आम्ही शाळेत होतो, संध्याकाळ खूप मोठी होती
                                 
अन् रात्र तर त्याहूनही खूप मोठी होती
                                             
असं म्हणतात की,रम्य सकाळ असते
                                               
पण आमच्यातील काहीजणांसाठी रम्य रात्र होती
                                   
रम्य त्या रात्री जागून आम्ही काढल्या
                                   
अनेक गमतीशीर आठवणी त्यात दडल्या
                                                   
अभ्यास करत होतो रात्र..रात्रभर
                                                         
गणेश वाणीच्या बकरीचे दूध चोरत होतो दररोज कपभर
                 
त्या दुधाची सर देवादिकांच्या अमृतातही नाही
                                                   
बहुतेक वाटतयं जग खूप मोठं झालंय
                                                   
रम्य त्या रात्री जागत होत्या आमच्या आभ्यासिका
                                   
अन् कुणी कुणासाठी जीव धोक्यात घालून वाचविले होते एकमेका
                                                                               

आज असे वाचविणारे मित्र भेटत नाही बहुदा
                                               
बहुतेक वाटतयं जग खूप मोठं झालंय
                                                                       
जेंव्हा आम्ही शाळेत होतो,तेंव्हा आमची मैत्री खूप पक्की होती(अर्थात आजही आहे)
                                                                                     
  दोघा तिघांनी हिंडण, मित्रांच्या घरात थेट स्वयंपाक घरात जेवण करणं
                                                                             
   हसणं,रडणं व भांडणही सोबत होतं
                                                             
आज या सर्वांची खूप आठवण येते,कारण ............................

  बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
                                                           
जेंव्हा आम्ही शाळेत होतो तेंव्हा खेळही वेगळेच होते
                             
गावच्या वेशीबाहेर, पिंपळाखाली भोवरा, विटीदांडू इ. बरच काही
                   
आता,इंटरनेट,फेसबुक, वॉट्स अॅप मधून वेळच मिळत नाही              

बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
                                                                         
सर्वच पळताहेत..काय..काय विसरताहेत
                                                                     
बरीच पत्र तर कधीचीच हरवलीयं
                                                         
त्या गतकाळातील रम्य आठवणीत खूप काही दडलंय
                                     
आमच्या सर्वांचे स्मृतीगंध त्यात लपलेयं
                                                                   
आज आम्ही जरी प्रौढ झालो असलो तरी
                                                                   
त्या रम्य काळात जीवन आम्ही आमुचे आजही शोधतोय
                         
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
                                                         
आज संध्याकाळ होत नाही,दिवस सरतो,थेट रात्र होते
                                 
बहुतेक वेळ छोटी झालीयं
                                                                                       
 या मित्रांच्या त्या खोड्या नाहीश्या झाल्या
                               
प्रौढपणाचं आयुष्य जगतांना सर्व आठवणी दाटून आल्या
                         
बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
                                                                   
गेले ते दिवस,राहिल्या त्या रम्य आठवणी
                                                               
मी तर दररोज जगतोय त्या सर्व " आठवूनी "
                                                       
आजही मी माझ्या बालमित्रात बालपण जगतोय
                                         
आयुष्यात कधी व्यथीत झालो तर त्यांच्या घरी जाऊन मनमोकळे करतोय
                                                                                         
  कधी रम्य आठवणी शोधत..तर कधी ह्रदयातील व्यथा मांडत                  

बहुतेक वाटतंय जग खूप मोठं झालंय
                                     
आजही आम्ही बालपण जगतोय
                                                                                             
  श्री.पारेश्र्वर विद्यालय,पालखेड इ.१० वी बॅच इ. स.१९९१-९२ सोबत हिंडतोय,स्नेहाने भांडतोही
                                                                                                           
  हेच जगणं साठवतोय,पुढच्या पिढीला देण्यासाठी
                                                   
बालमैत्रीचे ईश्वरी संस्कार या प्रौढपणाला खेळकर बनविण्यासाठी..!
                                                                           
 आजकाल आयुष्य कमी झालंय असं म्हणतात
                                                     
आपण सर्वजण ऐन आयुष्याच्या आलो अर्ध्यात
                                               
कोणाचं,काय कधी होईल याचा भरवसा नाही
                                                     
म्हणून नम्र विनवणी करतो तुम्हा
                                           
आता खरंच विसरू नका राव एकमेका
                                                                     

आयुष्याच्या जबाबदारीने पार कधी..कधी थकून जातो
               
आठवणीत पुन्हा तोच गतकाळातील तुम्हा सोबतचा दिवस येतो
                                                                                   
  म्हणून मस्त जगा राव..एकमेकांना आठवत,सहाय्य करत
                       
आज शपथ घ्या, त्या सर्व आठवणींची
                                                             
नाही सोडणार साथ एकमेकांची
                                             
आता...आता मला वाटतंय जग खूप जवळ आलंय                       ‌कारण...
             
तुम्हा सर्व वर्गमित्रांच्या सहवासात माझं ह्रदय भरून आलंय
                         
तुमचा मित्र व  एक तात्पुरता कवी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!
                                                                 
 फेसबुकवर लिखाण दिनांक : २१ मार्च २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक : १९ फेब्रुवारी २०२०, बुधवार
                                                       
ता.क.: सदरील कविता मी, दिनांक २१/१/२०१८ रोजी, आमची इ.१० वी च्या बॅच चे स्नेहमिलन‌ च्या वेळी, पालखेड येथे सादर केली होती.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

" मला,जाहीर होऊन न मिळालेले बक्षीस....! "






** आमचे गाव आमची माणसं..! **

" मला,जाहीर होऊन न मिळालेले बक्षीस....! "
====================================

सध्या पुलवामा येथील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना अमकी...मदत तमकी मदत बरेच जण जाहीर करत आहेत..!
संबंधित  माणसांचा हा दातृत्वाचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे..! त्यांना त्याबद्दल त्रिवार वंदन..!
पण..काही ग्रेट दात्रुत्व अन् दान करणारे वगळता यातील काहीजण खरंच अमकी.. अमकी मदत करत असतील का हो...?

याचा एक माझा अनुभव सांगतो..! वास्तविक माझा अनुभव व सध्याच्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देणाऱ्या लोकांच्या भावनेचा व कृतीचा अजिबात संबंध नाही.फक्त एकाच बाबतीत समान संबंध येतो..! अन् तो म्हणजे..दुसऱ्याला मदत करायची हे टाहो फोडून सांगायचे,पण प्रत्यक्षात मात्र काहीच द्यायचे नाही...!

मी  पालखेड ता.वैजापूर येथे श्री पारेश्र्वर विद्यालयात इयत्ता १० वी ला होतो.आमची १० वीची परीक्षा मार्च १९९२ मध्ये होणार होती. तत्पूर्वी आमच्या शाळेत २६ जानेवारी १९९२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम झाला.त्यात आमच्या पालखेड गावातील एका सद्गृहस्थाने..
" जो कुणी यावर्षी १० वी च्या परीक्षेत पहिला क्रमांक घेईल त्याला काही रुपयांचे बक्षीस देण्यात येईल..!"
असे मोठमोठ्या आवाजात सर्वांसमक्ष जाहीर केले होते.

मग काय...मी ही..खूप अभ्यास करायला लागलो.कारण बक्षीस कसही करून मिळवायचेच असा मनात चंग बांधला होता..! आमच्या अभ्यासाच्या खोलीत मी अन्  माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी आम्ही दोघेच खूप खूप अभ्यास करायचो.मार्च महिन्यात इ.१० वी ची परीक्षा दिली.अभ्यास खूप केला असल्याने सर्व पेपर खूप चांगले  गेले होते.

जेंव्हा आमच्या इ.१० वीच्या परीक्षेचा निकाल लागला..त्यात मी आमच्या श्री पारेश्वर विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला होता..! मला खूप खूप आनंद झाला होता.माझे त्यावेळी वय पौगंडावस्थेतील असल्याने खूप आतुरता लागली होती..की...कधी. मला त्या... सद्गृहस्थाने  जाहीर केलेले बक्षीस मिळते याचे..!

गावात ते बक्षीस जाहीर करणारे सदगृहस्थ दररोज मला दिसायचे. ते पण मला पाहायचे..!त्यांनाही माहीत होते की, यानेच इ.१० वी मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे...म्हणून...!
आज...देतील....!
उद्या देतील..!
परवा देतील..!
पण कशाच काय....
त्या न मिळालेल्या बक्षिसाची वाट पाहता..पाहता..माझा डी एड.ला नंबर ही लागला.मी गुरुजी सुध्दा झालो.गुरुजी होऊन तब्बल २४ वर्ष सेवाही झाली..! त्यानंतर पुढील उच्च शिक्षण दोन विद्यापीठात बी.ए. पूर्ण केले, त्यानंतर एम.ए. बी.एड देखील पूर्ण केले,पण...ते  फक्त जाहीर झालेले बक्षीस मला कधीच मिळाले नाही..!

जाऊ द्या..! नका..का..मिळेना..! मी त्या बद्दल कधीच कुणाजवळ विषय काढला नव्हता.त्यांनी जरी  जाहीर करून देखील बक्षीस  मला दिले नाही त्या बद्दल मी नाराज न होता..उलट त्यांनी बक्षीस जाहीर केल्यामुळे मी खूप जिद्दीने अभ्यास केला होता अन् पहिला क्रमांक पटकावला होता..हा सकारात्मक भाव त्यात पहिला..!

फक्त एक सल कायमची माझ्या मनात घर करून बसली की,अजूनही जाती धर्माचा भेदभाव करून अनेक एकलव्यांना एकतर स्पर्धेत उतरू दिल्या जात नाही..! यदा कदाचित एखादा एकलव्य स्पर्धेत यशस्वी झालाच तर त्याला पद्धतशीरपणे खड्या सारखं बाजूला फेकल्या जाते..! आजही समाजात जेंव्हा जाती वरून भेदभाव करणाऱ्या विकृत मानसिकता नजरेत पडल्या की,खूप चीड येते त्यांच्या त्या कृत्यांची..! अजूनही जातीपातीचे बुरुज पूर्णपणे ढासळलेले नाहीत...!

खूप खूप धन्यवाद..मला बक्षीस न देणाऱ्या सद्गृहस्था...!
तुम्ही मला खूप जिद्दीला लावले अन् त्यामुळेच मी इ.१० वी ला श्री. पारेश्वर विद्यालय,पालखेड,ता.वैजापूर  मध्ये पहिला क्रमांक पटकावला होता..!

आजही जेंव्हा..कधी मधी पालखेड येथे जाणे होते,विशेषकरून गावच्या यात्रेला,त्यावेळी ते सद्गृहस्थ नक्की दिसतात.ते पण मला पाहतात अन् मी पण त्यांना पाहतो..! आणि माझ्या मनात आजही तोच प्रश्न कायम आहे..." यांनी असे का केले...होते..? "

ता.क.:  कृपया कुणीही त्या सद्गृहस्थांचे नाव विचारू नये..!नाहीतर उगीचच ते मला त्यावेळी जाहीर केलेले बक्षीस आता माझ्या या प्रौढ वयात मला घरपोच आणून द्यायचे..!

वंदे मातरम्..!

जाहीर झालेले बक्षीस न मिळालेला त्या काळातील पौगंडावस्थेतील एक हळुवार मनाचा विद्यार्थी: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक:१७ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १७ फेब्रुवारी २०२०, सोमवार

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

"अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की...





चिंतन

"अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की...

=====================================

अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की,
                     
अप्रिय मेकॉले भाऊ इंग्लडवाले (आजच्या भारतीय शिक्षण पद्धतीचा आद्य प्रणेता ) तुला समर्पित..!

तू आम्हाला असे काही संमोहित करून टाकले आहे की,आम्हाला तू आखून दिलेल्या वर्तुळातच उड्या ते सुध्दा तुला हव्या तश्याच माराव्या लागत आहे..! " दोर जळाला पण सुंब मात्र बाकी " या उक्तीप्रमाणे तू आमच्या देशातून इंग्लंडला तर कधीचाच गेला आणि तिथून सुध्दा वर कुठं तरी सुध्दा कधीचाच गेलास पण....तू तुझी अशी काही जादू आम्हा भारतीयांवर मोहित करून गेलास की,आम्ही तुझ्या सदैव स्मृतीत वय वर्ष साडे पाच ते.....पुढे माहीत नाही....पर्यंत असतो..!

तुला ,तुझे प्रशासन नीट चालावे याकरिता पुस्तकी व्यक्ती हवे होते अन् ते तू मिळविले सुध्दा..! त्यांची गरज होती व आहे..! पण तू गेल्या नंतर तू आखून दिलेल्या संहिते बाहेर कुणी गेलेच तर तू अशी ही व्यवस्था (मानसिक) करून गेला की, कुणी जमिनीवरील ,ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण घेण्याचा अथवा देण्याचा प्रयत्न जरी कुणी केला तरी सब घोडे बारा टक्के (आजच्या भाषेत १००% प्रगत..!)पाहिजे म्हणून हट्ट धरायला लावला..!

 अप्रिय मेकॉले भाऊ,कसं शक्य आहे हे..? सर्वच सारख्या क्षमतेचे असूच शकत नाही पण...केवळ तू प्रत्यक्ष हजर नसलेल्या पण तुझा सदैव धाक असलेल्या आत्म्याचा धाक समजून आम्ही
" निशाणी डावा अंगठा " तरी किती दिवस वर करावा..?(संदर्भ :हा चित्रपट पाहावा..!)

अप्रिय मेकॉले भाऊ, आमचे थोर राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणायचे की, " हुशार मेंदू ,वर्गातील मागील बॅंचवर सापडतात..!" किती मोठा अर्थ आमच्या या थोर भारतीयाने आम्हाला सांगून दिला..! आम्ही कलाम साहेब यांच्या या सूचक अर्थाचा अर्थ समजून घेतलाच नाही..! जरी एखादा नीट साक्षर झाला नाही म्हणून तो काय अप्रगत समजावा का...? आणि तो अप्रगत समजला म्हणजे त्याला शिकविणारे गुरुजी शिकवत नाही असा अर्थ यातून निघतो का..?

अर्थात सर्व मुलांना शिकवायलाच हवे.त्यात अजिबात कसूर करू नये.ते कदापि क्षम्य नाहीच..! कलाम साहेब यांना अपेक्षित असलेले उत्तर कलाम साहेब यांच्या सूचक वचनात दडलेले नक्कीच आहे..!  माझ्या स्वानुभवावरून..कित्येक मुले औपचारिक शिक्षणात मेकॉले भाऊ च्या आखून दिलेल्या मैदानात खेळात मागे होती...अशी मुले त्यांच्या आयुष्यात आर्थिक,सामाजिक दृष्ट्या यशस्वी ठरली आहेत..! मग अशा वेळी मला आपल्या भारत देशाचे थोर राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या सूचक सुवचनाची प्रकर्षाने आठवण येते..व वंदन करतो त्यांना..!
                                                                                           
असो,अप्रिय मेकॉले भाऊ, काळजी घे..! बहुदा आमच्यातील एकाने जर भारतातील,थोर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांची माहिती असलेला इतिहास राज सत्तेचा वापर करून शिकविण्याचा अट्टाहास धरला तर तुझ्या आखून दिलेल्या मैदानावर तुझे काही आजचे शिष्य विरोध करू शकतात..! तेंव्हा कृपया त्या अट्टहासावर नाराज होऊ नको अन् तुझ्या मृतात्म्यास दुःख होईल असे वाईट वाटून घेऊ नको..!

 चल...आता पत्र पुरे करतो..! काळजी नको करू..!
                                                                                                                         
ता.क. : कृपया मेकॉले शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असा नव्हे...! तर ती एक वृत्ती आहे..! माध्यम कोणतेही असो,फक्त वृत्ती मेकॉले नको असा अर्थ अपेक्षित आहे.सदरील व्हिडिओत डॉ.इंद्रजित देशमुख यांनी सांगितलेल्या उदाहरणातअपेक्षित अर्थ मेकॉले व त्याच्या बहिणीच्या संवादात लपलेला आहे..!
सुज्ञास चटकन समजेल..!

 वंदे मातरम्..!
                                                                                                               
 पत्रलेखक नं:शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
               
  माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: ११/२/२०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ११/२/२०२०, मंगळवार

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

दिलखुलास माणसांची, दिलखुलास भेट..!'





आमचे गाव आमची माणसं..!

"दिलखुलास माणसांची, दिलखुलास भेट..!'
😊
=================================

स्थळ : बाबा चौक,औरंगाबाद,
वेळ: सकाळी ७:४५
दिनांक: १० फेब्रुवारी २०२०,सोमवार.

" गुरुजी..... ओ...गुरुजी....!
असा घरगुती आवाज ऐकू आला..!
मी आपलं एखादं लहान लेकरू खांद्यावर घेऊन पळावं तसं..माझ्या खांद्यावरील पिशवीला घेऊन रिक्षाला पकडण्यासाठी तिच्याकडे धावत सुटलो होतो.

मी मागं वळून पाहिलं तर....
ज्यांच्यावर माझं वैयक्तिक खूप प्रेम आहे अशी दोन आमच्या पालखेड गावातील माझे दोन ज्येष्ठ मित्र आदरणीय अशोकराव पाटील शेळके व आदरणीय रामदास पाटील धनाड सर मला आळीपाळीने आवाज देत होते..! मी थांबून  त्यांचं दर्शन घेऊ लागलो,पण त्यांनी थांबवलं...! बहुदा माझी ही कृती अख्खा बाबा चौक कावराबावरा होऊन पाहत होता..! कारण एवढ्या मोठ्या शहरात अन् एवढ्या मोठ्या चौकात ही दर्शन घेण्याची कृती तो पहिल्यांदाच पाहत असावा..!

लगेच अशोकरावांनी माझ्या दंडाला धरून मला बाजूच्या एका चहाच्या टपरीवर न्यायला लागले. धनाड‌ गुरुजींनी माझा दुसरा हात धरला..! मी त्यांना म्हणालो..
"अहो,माझी अंधारी बस जर हुकली ना...लई...तारांबळ होईल..! राहू... द्या...!नाहीतरी मी चहा पीत नाही...! नंतर पाहू आपण..!"
पण ते दोघेही मला सोडायला तयार नव्हते. त्यांनी दुधाची ऑर्डर दिली.मात्र दूध उकळून तयार होई पर्यंत अजून वेळ जाईल म्हणून मी केवळ गावातल्या प्रेमळ माणसांच्या निव्वळ प्रेमाखातर तब्बल ३१ वर्षानंतर चहाचा एक घोट घेतला अन्  सुपरफास्ट गप्पा करून रिक्षा पकडून बस स्थानकाकडे निघालो..!
( वरील ओळीत " घोट " हा शब्दप्रयोग वापरला आहे.त्याचा संबंध फक्त चहाशी आहे.हल्ली काही शब्दप्रयोग विशिष्ट पेय पदार्थांशीच वापरण्याचा उद्योग सुरू आहे,म्हणून खुलासा केला आहे..!😊)

माझ्या सोबत पांढरा सदरा घातलेले प्रिय ज्येष्ठ मित्र अशोकराव पाटील शेळके..!
अशोकराव,म्हणजे एकदम दिलखुलास माणूस..!
त्यांची अन् माझी भेट झाली अन् एकमेकांना शाब्दिक कोट्या, शालजोडी झाली नाही असे कधीच झाले नाही..!😂 आम्ही एकमेकाची जी काही शाब्दिक कोट्यांची खेचाखेची करतो..त्याने आम्हाला मनमुराद आनंद मिळतो हे मात्र नक्की..!😂 आमच्या पालखेड गावातील "शेळके पाटील " घराण्यावर माझे आजोबा, माझे तीर्थरूप वडील आणि मी ,आम्ही सर्वजण एका सन्मानाने नेहमी पाहत आलेलो आहे..!  समंजस अन् निगर्वी " शेळके पाटील " घराणे पूर्वी,आता अन् माझ्या मुलांच्या पुढील पिढीत देखील राहील यात तिळमात्र शंका नाही..!

दुसरे ज्येष्ठ मित्र आदरणीय डी.रामदास सर..!
आदरणीय रामदास धनाड सर,काय नाहीत...!
तर धनाड सर सर्वकाही करू शकतात..असे अवलिया व्यक्तिमत्त्व..! त्यांनी त्यांची पोषाखाची अशी एकच अशी प्रतिमा कधीच निर्माण होऊ दिली नाही..! त्यांच्या पोशाखात अधून मधून भारत देश झळकत असतो..!कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला हा माणूस..! हजरजबाबीपणा यात यांचा कमालीचा हातखंडा..! शब्दाच्या अशा काही कोट्या करतील...की विचारूच नका..!😂 यांचा अंदाजे २३ वर्षापूर्वी एकदाच मी आणि विजू गायकवाड च्या समक्ष आमचा बालमित्र आण्णासाहेब म्हस्के यानेच शाब्दिक कोट्या मध्ये पराभव केला होता.. विजूच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर..😂 बाकी धनाड सरांचा याबाबतीत पराभव करणे अशक्यच आहे..!

आमच्या पालखेड गावात काही माणसांकडे पाहून पुन्हा पुन्हा जगावे वाटते,त्यातील हे सगळे हसरे व्यक्तिमत्व..! बरं,यांच्या शाब्दिक कोट्या अशा असतात, की ज्याने समोरच्याचे मन दुखावणार नाही अशा..! आमच्या पालखेड गावात फार मोजके असे मित्र,माणसं आहेत,ज्यांच्याशी शाब्दिक कोट्या,विनोद करायला मला खूप आनंदीत करून जाते..! त्यात मला ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यात ,भैय्या भाऊ( विजय) काळे  गुरु, भावराव कोल्हे,अजय काळे गुरु,  आण्णासाहेब म्हस्के, दिलीप जैन,विलास निकम,भगवान पगार,डॉ.दिलीप शेळके,आदरणीय भावराव पाटील शेळके, आदरणीय सुंदर शेठ गायकवाड,रावसाहेब ( गोटया) म्हस्के, आदरणीय डी.रामदास सर उपाख्य रामदास धनाड सर, शेख नासेर शेठ बागवान आणि  अशोकराव पाटील शेळके....!  यातील प्रत्येकाचा स्वभाव , व्यक्तिमत्त्व भिन्न भिन्न आहे.यांच्यात एकच समान धागा आहे अन् तो म्हणजे यांच्याकडे असलेली समयसूचकता अन् त्यावर आधारलेली विनोदबुद्धी..!😊

मला अनुभव आलेली पालखेड येथील शाब्दिक कोट्या करणारी माणसं मी उल्लेखित केलेली आहेत.अजुन या व्यतिरिक्त असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा..!😂 हल्ली आमच्या पालखेड गावात आमच्या पिढीने अनुभवलेली मराठी भाषेच्या शाब्दिक कोट्या करणारी आजच्या पिढीत माणसं आढळत नाहीत असं ऐकण्यात आलेलं आहे..! खरं...काय...अन्...खोटं ..काय... हे आजच्या पिढीतील नवतरुणानांच माहीत..!🙏

वंदे मातरम्...!

शाब्दिक कोट्या विनोदबुद्धी यावर निस्सीम प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १० फेब्रुवारी २०२०, सोमवार

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

" मिठाई सारखा खूप गोड माणूस..! "




#मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मिठाई सारखा खूप गोड माणूस..! "

=====================

" वंदे मातरम्, गुरु देव...!"

असा आवाज कानी पडला की,समजून घ्यायचे.. मला प्रिय जालमसिंग राजपुत यांनी आवाज दिला. त्यानंतर मात्र माझी अन् माझ्या सोबत माझ्या मुलांची पुढे जाण्याची प्रेमळ हिम्मत झालीच नाही. हा आवाज मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे स्थायिक होतो तो पर्यंत..दररोज मी सकाळी गणपती मंदिरात दर्शनाला जायचो त्यावेळी नक्की कानी पडायचा. हा वंदे मातरम् जयघोष करताना मला बऱ्याचदा माझ्या गाडीला मागून किंवा पुढून कुणीतरी धडक देईल की काय याची खूप भीती वाटायची. पण प्रिय जालमसिंग भाऊ, यांच्या त्या प्रेमळ स्वभावाची आणि त्यांच्या दुकानातील स्वादिष्ट मिठाईची शक्ती होती की, असा प्रसंग कडवट प्रसंग अजुन पर्यंत घडला नाही.

यांच्या मिठाई भांडार चा मी हक्काचा गिऱ्हाईक..! अर्थात मी काही दररोजचा गिऱ्हाईक नव्हतो..पण जेंव्हा कधी मिठाई घ्यायची तेंव्हा यांच्याच दुकानातून..! नाहीतर नाहीच..! माणसानं कसं एकनिष्ठ असावं..कुणाशी तरी...हे मी यांच्यावरील माझ्या खाद्य संस्कृती च्या एकनिष्ठ प्रेमामुळेच शिकलो. माझ्या घरात माझे वडील वगळता आम्ही सर्वजण गोड पदार्थ खाण्याच्या बाबतीत जरा जास्तच उतावीळ आणि गोड खवय्ये..! मी लासूर स्टेशन येथील महावीर नगर येथे राहायचो. माझे घर ते यांचे मिठाई भांडार यातील अंतर अंदाजे दीड किलोमीटर. यदा कदाचित यांचे दुकान बंद असले तर मी किंवा माझा थोरला मुलगा नमन गेल्या पावली आम्ही परत यायचो. आम्ही जालमसिंग भाऊ यांच्या मिठाईशी बेइमानी ,विश्वासघात कधीच केला नव्हता. माणसानं कसं एकनिष्ठ असावं हे यांच्यातील त्याच गोडव्या मुळे शिकलो.

आता सध्या मी लासूर स्टेशन येथे राहत नाही.पण जेंव्हा कधी लासूर स्टेशन येथे जातो तेंव्हा जालमसिंग भाऊंच्या दुकानासमोरून गेलोच तर तोच जयघोष नक्की कानी पडतो...
" वंदे मातरम् गुरु देव..!"
मला माझ्या लासूर स्टेशन येथील वास्तव्याच्या कालावधीत मिठाई भांडार मधील खूप आवडलेला खूप गोड माणूस. विविध प्रसार माध्यमांद्वारे आम्ही आजही संपर्कात आहोत.

आज या खूप गोड स्वभावाच्या मित्राचा वाढदिवस आहे. मी जर लासूर स्टेशन येथे राहत असतो तर आज नक्कीच हक्काने काहीतरी मिठाई यांच्या कडून खायला घेतलीच असती.पण जाऊ द्या..! याची भरपाई जेंव्हा कधी माझी लासूर स्टेशन येथे भेट होईल तेंव्हा मिठाईवर मिठाई मोफत या आकर्षक योजने अंतर्गत नक्की घेईल..!

प्रिय जालमसिंग राजपुत भाऊ, आपणास जन्मदिनानिमित्त, जिलेबी ,इम्रती,तऱ्हेतऱ्हेचे पेढे, सडपातळ आणि लठ्ठ असलेले गुलाब जामुन,चंचल स्वभावाचे कलाकंद , अजुन ज्यांचे नाव माहीत नाही पण ज्यांना पाहून जिभेला लई पाणी सुटते अशा अनेकानेक मिठाई सारख्या गोड गोड शुभेच्छा..!😋 😊

वंदे मातरम्..!

शूभेच्छूक लेखक, व गोड पदार्थांवर निस्सीम प्रेम करणारा: 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 दिनांक: २ फेब्रुवारी २०१९

माझा गुरुस्थानी जिवलग मित्र,दत्तू पा.घोगरे सर..! "



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 "माझा  गुरुस्थानी जिवलग मित्र,दत्तू पा.घोगरे सर..! "
====================================

आयुष्यात काही मित्र हे विश्वासाची कोंदणं घेऊन एखाद्याच्या आयुष्यात आलेली असतात..! ही अशी कोंदणं असतात,ज्यांच्या फक्त असण्यान माणसाच्या आयुष्यात खूप मानसिक आणि निव्वळ प्रेमाचं नातं निर्माण होत असते..! माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात मला नियतीने असे मोजकी मित्र दिलीत...ज्यांचे अस्तित्व अगदी वरील रुपात्मक वर्णन असलेल्या विविध अलंकारांनी नटलेल्या मैत्रीच्या देवतेसारखी आहेत..! त्यात माझे डी.एड पासून ते आजतागायत असलेल्या एका जिवलग प्रिय मित्राचे नाव आहे...दत्ता भाऊ घोगरे पा.सर..! माझ्या थेट स्वयंपाघरातील मैत्रीचा हा माझा प्रिय मित्र...दत्ता घोगरे सर..!

मी नुकताच बोराडी,ता.शिरपूर,जिल्हा, धुळे येथून बदलून कन्नड येथील शासकीय अध्यापक विद्यालय येथे हजर झालो होतो..! ते वर्ष होते... इ.स.१९९२. कन्नड ला कुणीच ओळखीचे नव्हते.मी काही दिवस आमच्या गावातील माझ्या बालमित्राच्या सोमनाथ गायकवाड च्या मोठ्या बहिणीच्या घराशेजारी किरायाची खोली घेऊन राहण्याचा निर्णय घेतला होता.पण म्हणतात ना...गावाकडच्या अन् गावातल्या लोकांना गावाकडच्या आठवणी अन् माणसं आकर्षित करतात..अगदी तसेच झाले..!आमच्या डी.एड च्या पुढील वर्गातील आमच्या पालखेड गावापासून खूप जवळ असलेल्या काटे पिंपळगाव ,ता.गंगापूर येथील दोन मित्रांना समजले की, पालखेड येथील कुणीतरी आपल्याच अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षाला आलेले आहे..! मग काय...त्या दोन मित्रांनी मला हुडकून काढून मला बळजबरी..आमच्या अध्यापक विद्यालया च्या वसतिगृहात नेले.ते दोन मित्र होते अर्थात दत्ता भाऊ घोगरे आणि जनार्दन कारभारी राऊत..!

आमचे वसतिगृह म्हणजे जगातील तत्कालीन काळातील अस्वच्छतेत पहिल्या पाच मध्ये नक्की आले असते..! जर कुणी अशी अस्वच्छतेची स्पर्धा आयोजित केली असती तर...!😂 ते वसतिगृह  होते...समर्थनगर ,कन्नड येथे..! आणि त्याच वसतिगृहात आमचा विद्यार्थांचा संसार सुरू झाला होता.मी ,दत्ता सर,जे.के राऊत एकत्र राहू लागलो.आळीपाळीने स्वयंपाक करणे नित्य नियमाने करू लागलो..! मी अन् माझा बालमित्र सोमनाथ गायकवाड इ.१० वी च्या पूर्वी आमच्या गावातील श्री. पारेश्वर् मंदिरात बालगिरी महाराज यांना जो स्वयंपाक करून द्यायचो..ती पाक कला आता उपयोगी येत होती..!

दत्ता भाऊ घोगरे सर..!
अतिशय दारिद्र्य आयुष्य व्यतीत करून शिक्षण घेत होते. घोगरे सरांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती.मला चांगलं आठवतं..सरांना एकच लाल रंगाचा सदरा होता..! तोच..सदरा..सर ,दोन दिवसा आड धुवून घालायचे..! माझ्या आयुष्यातील एखाद्या मित्राला गुरु करण्याच्या तो पहिला प्रसंग होता..! मी अजुन पर्यंत कुणाला सांगितले नाही पण ,आज जाहीरपणे व्यक्त करतो की, माझ्या या मित्राच्या अन् त्याच्या त्या खूप वाईट काळातील त्याच लाल रंगाच्या  सदऱ्याची आठवण म्हणून  तेंव्हा पासून ते आजतागायत निदान एक तरी लाल रंगाचा सदरा माझ्या कडेच असतोच..!  एवढ्या दारिद्र्य आयुष्यात दत्ता सरांनी आपली शिक्षणाविषयी चिकाटी अजिबात सोडली नव्हती..! दत्ता सरांनी आपल्या गरिबीला आपली कमजोरी कदापि होऊ दिली नाही.आणि त्याच गरिबी मुळे रडतही बसले नाहीत..! खूप जवळून गरिबी अन् तिचे चटके सहन केलेला माझा हा प्रिय मित्र..दत्ता भाऊ घोगरे सर..!

आम्ही वसतिगृहात आहे त्या परिस्थितीशी जुळवून दररोज आयुष्याचा अगदी सर्व सामान्य आयुष्यातील आनंद शोधून जगत होतो..! आमच्या खोलीत एक पितळी लोखंडी बादली होती.ती बादली अन् आम्ही एकमेकांना खूप खूप साथ दिली..😂 आता ती साथ काय होती ती फक्त मी ,जे.के.राऊत सर आणि दत्ता घोगरे सर..आम्हालाच माहीत..!😂 थोडक्यात..ही तीच बादली होती जिने आम्हाला..स्वयंपाक, भांडी,धूने, अजुन इतर कामात मदत केली..!😂 आम्ही आहे त्या परिस्थितीत जगलो..! आहे त्या परिस्थितीची किळस केली नाही..!

मी ज्यावेळी इ. स. २०११ साली..वैजापूर मधून गंगापूर तालुक्यात नोकरीसाठी आलो..ते केवळ माझ्या याच प्रिय मित्राखातर...! माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या या मित्राने मला सदैव साथ दिली आहे..आणि मी सुध्दा त्यांना..! एकंदरीत माझ्या या मित्राला मी माझ्या आयुष्यात गुरूचे स्थान दिले आहे..! कारण या  माझ्या मित्राने आज जे काही मिळविले आहे ते सगळे स्वकर्तृत्वावर..!

अशा या माझ्या प्रिय मित्राचा आज जन्मदिन आहे.त्या निमित्त माझ्या या मित्राला दत्ता भाऊ घोगरे पा.सरांना माझ्या संपूर्ण कुटुंबा कडून  मनःपूर्वक शुभेच्छा..!

असो,खूप काही आहे व्यक्त करण्यासारखं पण आता आवरतं घेतो..!😂

शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव व परिवार..!

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!

ता.क.: दत्ता घोगरे सर..आता ती बादली कुठे आहे..तेवढे कळवा हो..?😂
फेसबुकवर लिखाण दिनांक:  १ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १ फेब्रुवारी २०२०, शनिवार