बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

मराठवाडा स्वातंत्र्य दिन



** चिंतन **


नेमके काय...?

मराठवाडा मुक्ती  संग्राम दिन...की ,

मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?

________________________________________


वास्तविक इंग्रज राजवट व मराठवाडा यांचा फारसा काही संबंध आला नाही.थोडक्यात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा तडाखा मराठवाड्याला बसला नाही..!

 

पण.....

त्याहून जबर तडाखा मराठवाड्याला बसला..! तो तडाखा असा काही क्रूर होता..की त्यात कित्येक महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली..! क्रूरकर्मा रझाकार व निजाम यांच्या  जुलमी वृत्तीने आपल्या मराठवाड्यातील इज्जतीचा जाहीर पंचनामा झाला. बऱ्याच जणांनी विरोध केला..! गोदावरीबाई टेके सारख्या रणरागिणी लढल्या...पण शरण नाही गेल्या..त्या क्रूर रझाकरांच्या समोर..! 


दरवर्षी माझ्या मनात एकच प्रश्न आजच्या रोजी येतो की,

आपण आजही काहीतरी गफलत करत तर नाही ना..?

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... की.... मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?


थोडेसे अर्थाने पाहूया....


मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे..स्वातंत्र्य ...किंवा सुटका..! आणि संग्राम याचा अर्थ होतो लढा..!

मग दरवर्षी जो उल्लेख केल्या जातो.." मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " याच्यातील मराठवाडा हा आपल्या भौगोलिक परिसराचा शब्द..! अन् त्याला लागून शब्द येतो..मुक्ती संग्राम...! मग आपण काय मराठवाड्याशी संग्राम करून मुक्त झालो का..?

याचे उत्तर सर्वांना मान्य आहे.." अजिबात नाही..!"


 हैद्राबाद हे आज जरी एक शहर असले तरी १७ सप्टेंबर १९४८ पूर्वी ते एक स्वतंत्र संस्थान होते..! नव्हे..नव्हे तो एक स्वतंत्र देश होण्याच्या मार्गावर होता..! पण आपल्यावर खूप खूप मेहरबानी सरदार वल्लभभाई पटेल यांची..! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिशय कणखर नेतृत्व गुणांनी आपण त्यारोजी निजाम राजवटी पासून स्वतंत्र्य झालो..!ते आपल्या मराठवाड्याचे 

" राष्ट्रपिता " म्हंटले तरी वावगे ठरणार नाही..!


म्हणजेच त्यादिवशी मराठवाडा स्वतंत्र्य झाला..!


ताजा कलम: आपण " मराठवाडा स्वातंत्र्य दिन " म्हणणे योग्य राहील..!


 " मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो..! "


वंदे मातरम्...!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ सप्टेंबर २०२०

 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

" आमचे,आदरणीय बापू, संजय जाधव पाटील सर..!"


 

मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" आमचे,आदरणीय बापू, संजय जाधव पाटील सर..!"


==================================


त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे..!त्यांच्या सानिध्यात आम्ही व्यतीत केलेला कालखंड ,जगातली माणसं कशी ओळखायची हे शिकवून गेला..! त्यांच्या सहवासात जेंव्हा आम्ही होतो,तेंव्हा त्यांनी आम्हाला सख्ख्या भावासारखा जीव लावला..! त्यांच्यातील सामाजिक भान अन् माणसांची जाण ,आयुष्यात खूप काही शिकवून गेली..! आमच्या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होते,अन् आहे..! त्यांची आपल्यातील असणाऱ्या सर्व सामान्य माणसाला जवळ करण्याची प्रेमळ साद आपलीशी करून गेली..! जगात अनेकांच्या बाह्यांगात, अंतर्मनात तऱ्हेतऱ्हेचा अहंकार बऱ्याचदा जवळून तर कधी दुरून पाहायला मिळाला, मिळत आहे..! पण आमचे आदरणीय बापू या सर्वांना नक्कीच अपवाद होते अन् आहेत..! आमच्यासाठी नेहमीसाठी आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे,आदरणीय बापू..! अर्थात संजय जाधव पाटील ( सर ) वारेगाव- किनगावकर ( ता. फुलंब्री )


कालखंड नव्वदच्या दशकातील..!


मी तर त्यावेळी नोकरीला देखील लागलेलो नव्हतो.माझे थोरले बंधू सुनील भाऊ, हडको ,औरंगाबाद येथे राहत होते. बंधू  अविवाहित होते.सुनील भाऊ, एका खाजगी कंपनीत काम करत असे.माझे डी. एड झाल्यावर मीही, झेपेल ते काम करण्याच्या उद्देशाने काही दिवस सुनील भाऊ कडे गेलो होतो. अर्थात झेपेल ते काम करण्याची गरज पडलीच नाही,कारण शिक्षक म्हणून नोकरी लवकर लागली होती..! मात्र याच कालखंडात औरंगाबाद येथील तत्कालीन आमचे सख्खे शेजारी म्हणून आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्याशी अतिशय जवळून संपर्क आला..!


आम्ही म्हणायला औरंगाबाद शहरात राहत होतो पण,आदरणीय बापूंच्या अतिशय प्रेमळ स्वभावामुळे शहरातील ' लिमिटेड ' जीवनाचा अनुभव कधी आलाच नाही.आदरणीय बापूंचा स्वभाव मुळात अतिशय प्रेमळ..! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय जाधव सर,यांचा मुळ पिंड खेड्यातील असल्याने आमच्यातील अनौपचारिक नात्यातील संबंध वृद्धिंगत होत गेले..!आदरणीय जाधव सरांनी आम्हा दोघाही भावंडांना खूप जीव लावला..! एखाद्याला जीव लावणं आणि एखाद्याशी ओळख असणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो.आम्हाला बापूंनी जीव लावलेला आहे..! अगदी त्यांच्या घरातलं जेवणाचं ताट आमच्यासाठी बऱ्याचदा हक्काने तयार असायचे..! बहुतांशी संध्याकाळी आदरणीय जाधव सर उपाख्य बापू,आमच्या रुममध्ये आयुष्यातील अनुभवांवर आमच्याशी गप्पा करायचे..! 


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, तसे मुरब्बी शिक्षकी नेते..!  राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची मुहुर्तमेढ आदरणीय जाधव सर यांनीच रोवली..! मी तसा वैयक्तिक कोणत्याही शिक्षक संघटनेचा अधिकृत सदस्य नव्हतो आणि सध्याही नाही..! पण काही शिक्षक संघटनेतील काही माणसं, मला सदैव आपली जाणवली,म्हणून वैयक्तिक अशा ,माझ्या दृष्टीने ग्रेट असणाऱ्या शिक्षक नेत्यांच्या निव्वळ प्रेमात होतो अन् आहे..! त्या मोजक्या ग्रेट शिक्षक नेत्यांपैकी आदरणीय संजय जाधव पाटील सरांचे स्थान सदैव सर्वोच्च स्थानी आहे..! त्याचं कारणही तसंच आहे..! माणसाच्या आयुष्यात पहिलं जे काही असतं, ते ,कोणताही भावूक माणूस ,त्याच्या आयुष्यात त्या पहिल्याला सदैव हृदयाच्या गाभाऱ्यात हळुवारपणे पुजत असतो..! अगदी असंच काहीसं, माझ्याही आयुष्यात शिक्षक होण्याच्या मार्गावर असतानाच आदरणीय जाधव सरांसारखे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व भेटले,त्यामुळे त्यांच्यावरील एक शिक्षक नेता म्हणून असलेलं पाहिलं प्रेम तहहयात राहील यात तिळमात्र शंका नाहीच..! मी नोकरीलाही नव्हतो तेंव्हा नव्वदच्या दशकात आदरणीय जाधव सरांच्या सोबत, त्यांच्या तत्कालीन शिक्षक संघटनेसाठी, आलेल्या शिक्षकांची सरबराई करण्याची  संधी मिळाली हे माझे नशीब..! ठिकाण होते  सिद्धार्थ उद्यान औरंगाबाद..!


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू,यांनी  मराठवाडा पदवीधर शिक्षक निवडणूक देखील लढवलेली आहे.  माणसातील पहिल्या प्रेमासाठी कोणताही माणूस आसक्त असतो,अगदी त्याच भावूक नात्याने आदरणीय जाधव सरांसाठी अदृश्य सेवा करण्याची संधी त्यावेळी मिळाली हे देखील माझे नशीबच..!


आदरणीय संजय जाधव सरांना आमच्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, आणि आमच्याही वडिलांना आदरणीय संजय जाधव सरांचा खूप अभिमान वाटतो..! आजही कधी कधी आमचे वयोवृध्द तीर्थरूप वडील, आदरणीय बापूंची आवर्जून आठवण काढतात अन् नेहमी म्हणतात...

" संजय जाधव सरांच्या सारखा निगर्वी शिक्षक नेता सापडणे मुश्किल..! आपल्या घरातला माणूस, लई माणुसकी संजय जाधव सरांना..! "


माझे इ. स.२००० मध्ये ज्यावेळी लग्न जमले होते त्यावेळी आदरणीय संजय जाधव पाटील सरांना, माझ्या लग्नपत्रिकेच्या पहिल्याच पानावर श्रद्धेने स्थान दिले होते..! कारण आमच्यासाठी आदरणीय संजय जाधव पाटील सर , घरातलीच प्रेमळ आणि श्रद्धेय व्यक्ती होती..! आजही आमच्या लग्नाची ती लग्नपत्रिका जपून ठेवलेली आहे..! माझ्या लग्नाच्या दिवशीच वैजापूर येथील शिक्षक पतपेढीचा प्रचार सुरू होता.त्या अतिशय धामधुमीतून , शाम भाऊ राजपूत आणि आदरणीय संजय जाधव पाटील सर लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते..! विशेष म्हणजे आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, माझ्या लग्नाच्या दिवशी  थेट, वाटी ( वधू वर यांना निरोप देई पर्यंत)  लावणेपर्यंत हक्काने उपस्थित होते ,हे त्यांच्यातील असलेली सर्व सामान्य माणसाला आपला अमूल्य वेळ देण्याची नैतिकता दर्शविते..! लासूर स्टेशन येथील माझ्या घरी आदरणीय बापू,ज्यावेळी आले होते,त्यावेळी आम्हा उभयतांची अगदी मोठ्या भावासारखी आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस आम्हाला सुखावून गेली होती..!


आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्यासारखी ग्रेट माणसं, माणसातील माणुसकीच्या संस्कृतीच्या वहनाचे , वृद्धिंगत होण्याची कार्य करत आहेत म्हणून तर बरीच सर्व सामान्य माणसं आजही ,अशा माणसात  ' आपला माणूस ' शोधण्याचा प्रेमळ प्रयत्न करत असतो..! जसे की आम्ही आदरणीय संजय जाधव सरांमध्ये शोधतो आणि अनुभवतो सुध्दा..! 🙏🌹

 

वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : ९ सप्टेंबर २०२०, गुरुवार

** परतफेड नियतीची..! **


*** मला प्रवासात भेटलेली माणसं..! ***


*** परतफेड नियतीची..! ***


______________________________________________


एकदा एक इसम दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानक येथील ,एका रिक्षात सर्वात अगोदर येऊन बसला होता.

त्या रिक्षात हळूहळू अनेक प्रवासी येऊन बसले .

तो इसम अलीकडेच उतरणार होता.बाकीचे प्रवासी थेट उतरणार होते.

थोड्या वेळाने अजुन काही प्रवासी रिक्षात ,थेट पर्यंत जाण्यासाठी आले,अन् रिक्षावाल्याने त्यांना रिक्षात बसवून घेतले... अन्....थेट पर्यंतच्या प्रवाशांना जागा शिल्लक राहिली नाही म्हणून त्या रिक्षावाल्याने सर्वात अगोदर स्वतः हुन बसवून घेतलेल्या त्या इसमाला ,रिक्षा सुरू होण्यापूर्वीच उतरवून दिले होते.अन् म्हणाला .........


" साहेब, तुम्ही दुसऱ्या रिक्षाने या..!"


तो इसम निमूटपणे उतरला अन् दुसऱ्या रिक्षांची वाट पाहू लागला..अन् ती रिक्षा धूर सोडीत भूर्रकन निघून गेली होती.


चार दिवसानंतर......................................................


वेळ दुपारची २ वाजेची होती. ठिकाण देखील तेच होते.तोच इसम ,नेहमीप्रमाणे त्याच रिक्षा स्टँडवर आला होता.त्या इसमाला ,पुन्हा तोच रिक्षावाला पुन्हा नजरेस पडला . तोच रिक्षावाला त्या इसमाला खूप गयावया करून म्हणत होता की,

" ओ,साहेब...माझ्या रिक्षात बसा ना...! आज रिक्षात बसायला कुणीच नाही आले हो..!आज लई धंदा लई कमी झाला..! "

त्या इसमाने त्या रिक्षावाल्याकडे पाहत मंद स्मित केले होते.अन् तो इसम त्याच रिक्षावाल्याला नम्रपणे म्हणाला .......


" भाऊ, तुम्ही मला ओळखलं का..?"


रिक्षावाला म्हणाला- " नाही साहेब..!"


तो इसम - " भाऊ ,मी तोच आहे, ज्याला तुम्ही चार दिवसांपूर्वी सर्वात अगोदर येऊन सुध्दा ,तुमच्या गाडीत बसून उतरवून दिले होते..! कारण काय तर तुम्हाला फक्त ५ ₹ जास्तीचे प्रवासी मिळाले होते.."


तो रिक्षावाला खूप खजील झाला होता.


तो इसम काहीच बोलला नाही.दुसरी रिक्षा आली अन् त्या रिक्षात बसून तो इसम आपल्या घराकडे रवाना झाला..!

तो पहिला रिक्षावाला शून्य नजरेने व पश्चाताप मुद्रेने पाहत राहिला..!


ता.क.: नियती जसेच्या तसेच परतफेड करत असते,नेहमी...!😊🙏


वंदे मातरम्..!


तो इसम: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:२२ ऑगस्ट २०१८
 

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

बरं झालं मी माणूस नाही..!


 


चिंतन


" बरं झालं मी माणूस नाही..! "

( एका पक्षाचे मनोभाव )


=================================


माणसांच्या गोंगाटात दिवसभर माझा जीव पार घाबरून जातो..! संध्याकाळ केंव्हा होईल अन् त्यानंतर रात्र केंव्हा होईल याच प्रतीक्षेत देखील मी पार थकून जातो..!


अखेर ती रात्र येते अन् मी निवांत होतो, एकांतात बसुन माणसावर आत्मचिंतन करायला..!

या आत्मचिंतनात माझ्या विचाराची अखेर होते, आणि स्वतः शीच व्यक्त होतो...

" बरं झालं मी माणूस नाही..! कारण माणसाने, माणसांची निवातंपणाची क्षेत्रे कधीचीच काबीज केली आहेत, सर्वार्थाने अतिक्रमण करून..! आमच्यात माणसा सारखे नाही होत, याकरिता त्या अदृश्य शक्तीला माझे त्रिवार वंदन..! 


मला पुन्हा उद्याच्या सकाळची भीती वाटते..! सकाळ झाल्यावर पुन्हा तोच गोंगाट, तोच माणूस, पुन्हा पाहायला मिळणार आणि पुन्हा मला एक संपूर्ण दिवस जीव मुठीत धरून काढावा लागणार..! पूर्वी जिथं आम्ही निवांत होतो,आज तिथं देखील आक्रांत होत आहे,विविध प्रसारणांचा..!त्या आक्रांतात, आमचा निसर्गतः लाभलेला  एकांत, माणसामुळे भिवून जातो..! आमच्या त्याच एकांताला गेल्या काही वर्षांपासून माणसाची नजर लागली आहे..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


म्हणून मी, याच निवांत रात्रीची दररोज रात्री आतुरतेने वाट पाहत असतो अन् त्यात स्वतःला एकांतात ध्यानस्थ करून घेत असतो..! ज्याला माणसात ' डिप्रेशन ' असं म्हणतात, तसला काही एक प्रकार आमच्यात अजिबात नसतो..! बहुदा ' डिप्रेशन ' ही अखिल माणसाला माणसाने दिलेली सर्वोत्तम देणगी असावी, माणसाचं मन उध्वस्त करणारी..! 

 बरं झालं मी माणूस नाही..!


याच निवांतपणात आम्हाला सापडतो, त्याच नियंत्याचा ,निवांत अमृत सहवास..! दिवसाच्या गोंगाटात तोच अमृत सहवास, पार भेदक स्वरूप धारण करतो अन् पुन्हा एकांतातील ,आम्हाला उध्वस्त करत सुटतो..!

 बरं झालं मी माणूस नाही..!


मी असं ऐकलंय की, कुठेतरी एक माणूस, आमच्यातील एकांतवास प्रभू केदारनाथाच्या सानिध्यात शोधतोय म्हणे..! नियतीने आमच्यातील संवेदना माणसाच्या रुपात कुठे का होईना, कुणाला का होईना देण्याचं नक्की केलेलं दिसतंय..! अशी काही माणसं बघितली, पाहिली की, आमच्याही मनात विचार येतो की....

हे विधात्या, त्या वैराग्य प्राप्त माणसासारखं ,वैराग्य आम्हालाही दे..!


ता.क. - सदरील पक्षी, दररोज रात्री, आमच्या घराच्या गॅलरीत बसायला निवांतपणे येत असतो. आज त्याच पक्षाच्या अंतर्मनातील बहुदा असणारे मनोभाव ,माझ्या लेखणीच्या द्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे..!


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - ४/९/२०२०, शुक्रवार.

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔



 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


==================================


मी ज्यावेळी इ. स.१९९५ ला शिक्षक म्हणून वैजापूर तालुक्यात नोकरीला लागलो तेंव्हा असे मनात धरून चाललो होतो की, माझ्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यातील सेवा ही आमच्याच वैजापूर तालुक्यात विविध गावात जाईल. मात्र जे आपल्या मनात असतं ते बऱ्याचदा होत नाही, अन् असं न होण्यामागे त्या नियतीनेच आपल्याला अजुन इतर विश्वाचा पसारा दाखवायचं नक्की केलेलं असतं..! वैजापूर तालुक्याच्या बाहेर, इ. स.२०११ साली गंगापूर तालुक्यात शिक्षक म्हणून प्रवेश झाला..! गंगापूर तालुका ,तसा आमच्याच वैजापूर तालुक्याचा जुळाभाऊ..! आणखी विशेष म्हणजे  याच गंगापूर तालुक्यात माझे डी एड चे खूप जिवलग मित्र जसे की, दत्ता भाऊ घोगरे, जनार्दन राऊत, दादाभाऊ, सुनील जाधव, भगवान हिवाळे इत्यादी असल्याने आपल्याच तालुक्यात सेवा करायला मिळणार या मानसिकतेत मी होतो..!


मात्र....

शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणामुळे मला बदली होऊन सिल्लोड तालुका अन् त्यातील अंधारी गाव मिळाले. कधी आयुष्यात सिल्लोड तालुक्यात जाण्याचा प्रसंग आला नाही,आणि अंधारी नावाचे गाव पहिल्यांदाच ऐकले अन् तिथं हजर होण्यासाठी फुलंब्रीच्या पुढे विचारत विचारत गेलो. अंधारी शाळेत उपस्थित होण्याच्या दिवशीच गावाच्या बाहेरील पुलावर एका काहीशा अंध व्यक्तीला मी शाळेचा नेमका पत्ता विचारला,त्यावर त्या व्यक्तीने मला सांगितले की,

" मी शाळेतच चाललो आहे, चला माझ्या सोबत.मी तिथं शिपाई म्हणून आहे, कैलास उबाळे माझं नाव..!" 

हे ऐकल्यावर मला अजुन आधार जाणवला. शाळेत जाऊन हजर झालो.मी लगबगीने बाहेर आलो.उबाळे मामा, बाहेरच उभे होते.मी त्यांना माझा सर्व परिचय दिला.त्यावर त्यांचं एक वाक्य कायमचं मनात घर करून गेलं, अन् ते वाक्य होतं,

" सर, तुम्ही औरंगाबाद, बजाजनगर हून दररोज येणार आहात, तुमच्या  घरी  म्हातारं माणूस ( माझे वडील ) हाये, म्हाताऱ्याची काळजी घ्या..! प्रवासात घाई करू नका, अडीअडचणीत कामं येईल म्हणून एक रजेचा अर्ज माझ्याकडं राहू द्या..! "

या त्यांच्या अतिशय समजूतदार वाक्यांनी मला खूप गहिवरून आलं होतं,पण काही भावना व्यक्त करायच्या नसतात,त्या स्पर्शाच्या जाणिवेतून व्यक्त करायच्या असतात या भावनेतून मी आदरणीय उबाळे मामांच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला..! कोण,कुठला नंदन ,अन् या निव्वळ अपरिचित गावात हक्काच्या मायेनं बोलणारं पहिलं जर कुणी भेटलं असेल तर ते आदरणीय उबाळे मामाच..! ज्यांना भावनेच्या जाणिवांची जाणीव असते,त्यांच्यासाठी असे प्रसंग चिरकाल स्मरणात राहणारे असतात..! बाकी निष्ठुर मनाला यात काहीही जाणवणार नाही हेही तितकंच खरं..!


मग काय...अंधारी शाळेत उपस्थित झाल्यापासून दररोज आपण एखाद्या देवळात प्रवेश केल्यानंतर जशी पवित्र निनादाची घंटी वाजवतो,अगदी तसेच , शाळेत प्रवेश केल्या केल्या आदरणीय उबाळे मामांना......

" राम, राम मामा..!" अशी साद घातल्यानंतरच माझी दररोजची शिक्षक हजेरी पटावर स्वाक्षरी होऊ लागली..!


मी माझ्या ऑफ पिरियड ला देखील वर्गातच असायचो,तेंव्हा बऱ्याचदा उबाळे मामा,माझ्या वर्गात हळूहळू चालत यायचे अन् मायेनं म्हणायचे...

" सर, आता बस करा, तुम्ही सकाळपासून वर्गातच आहात, जा खाली, आरामशीर बसा आता..!"

उबाळे मामांचे हे हक्काचे प्रेमळ बोलणे ऐकून माझ्या मनातील भावनेचा कोपरा अजुन टवटवीत व्हायचा..! सकाळी शाळेत गेलो की, आदरणीय उबाळे मामा, बऱ्याचदा हक्काने मला, त्यांची शिक्षक हजेरी पटावर त्यांचा हात धरून स्वाक्षरी करायला सांगायचे..! मी ज्यावेळी शाळेत हजर झालो त्यावेळी ,अगदी सुरुवातीला इयत्ता आठवीच्या वर्गात ज्यावेळी उबाळे मामा, विद्यार्थी गोषवारा रजिस्टर घेऊन आले होते,तेंव्हा त्यांनी त्यांच्या भाषेत वर्गातील सर्व विद्यार्थांना सांगितले होते की,

" पोरांनो, जाधव सरला त्रास देऊ नका रे..!"

वाक्य अगदी साधं होतं,पण त्यातील भावार्थ खूप मोठा होता..!


आदरणीय उबाळे मामा, तसे गाण्याच्या बाबतीत देखील रसिक होते,हे त्यांच्या विविध गाण्यांच्या आवडीनिवडी वरून माझ्या लक्षात आले होते.आदरणीय उबाळे मामा यांचं खूप आवडतं गाणं होतं,  ' अशीही बनवाबनवी ' या चित्रपटातील " हृदयी वसंत फुलताना,प्रेमात रंग यावे..!"

केवळ याच गाण्याच्या प्रेमापोटी मामांनी त्यांच्या मोबाईलची रिंग बॅक ट्यून याच गाण्याची ठेवली होती, हे मामांनी मला आवर्जून सांगितलेलं होतं..! आमच्या अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षकांचे अन् विद्यार्थांचे खूप आवडते होते,आदरणीय उबाळे मामा..!


दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रक्षाबंधन हा एक उत्सव माणसांच्या एकमेकांच्या नात्यात माणुसकीचा, मायेचा, आत्मीयतेचा धागा घट्ट व्हावा म्हणून त्याच पवित्र भावनेने साजरा केला जातो.मी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आदरणीय उबाळे मामांना राखी बांधायचो..! त्यावेळी उबाळे मामांना झालेला आनंद ,माझ्या मनाला अतिशय सुखावून जायचा..!


नियती जितकी प्रेमळ असती तितकीच ती निष्ठुर देखील असते.याच निष्ठुर नियतीने काल दिनांक २/९/२०२० रोजी आदरणीय उबाळे मामांना,आपल्यातून हिरावून घेतले..!अंधारी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एका नात्याला कायमचे पोरके झाले..! आता मी जेंव्हा जेंव्हा अंधारी प्रशालेतील इमारतीत सकाळी सकाळी प्रवेश करील तेंव्हा तेंव्हा आता " राम राम मामा..!" अशी प्रेमळ हाक घालायला उबाळे मामा तिथं नसणार..! आता तिथं फक्त आणि फक्त उबाळे मामांच्या अनेक स्मृती एकवटलेल्या असतील..!त्या प्रत्येक एकवटलेल्या आठवणीत उबाळे मामांच्या  आठवणीतील सहवासाचा  फक्त गहिवर माझ्या सोबत असेल..! मात्र प्रत्यक्ष मधुर सहवासाचा तो उल्हास त्यात नसेल..! 


माझी शिक्षक म्हणून जी काही सेवा सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्रशालेत होत आहे ती या तालुक्यातील शेवटचीच सेवा राहील,कारण मी कधी ना कधी गंगापूर किंवा वैजापूर तालुक्यात परत जाईल,पण...या अंधारी प्रशालेतील  आदरणीय उबाळे मामांच्या सोबतचा आठवणीतील सुंदर असा गहिवर नक्कीच सोबत घेऊन जाईल..! शेवटी माणसाचं आयुष्य तरी काय असतं हो..? अगदी साधं सोपं म्हणजे, आपल्या आयुष्यातील वाटेवर भेटणाऱ्या विविध प्रवाशांच्या आठवणींचा देव्हारा अन् त्याच देव्हाऱ्यात मांडून ठेवावीत अशी मोजकी पण खूप चांगली भेटलेली प्रेमळ माणसंच, दुसरं काय..! 🙏


आदरणीय स्वर्गीय उबाळे मामांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

तुम्ही सदैव आठवणीत राहशाल, यात तिळमात्र शंका नाही..! आता फक्त माझ्या मनात एकच खंत राहील..

" आता पुन्हा तो " राम राम..!" होणे नाही..! "😔


वंदे मातरम्...!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक : ३/९/२०२०, गुरुवार