चिंतन ©️
" डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर....! "
====================================
एखाद्या व्यक्तीचे असणे जितके फार महत्त्वाचे असते.तितकेच फक्त कल्पना करा तीच व्यक्ती जर नसती तर....?
नसती तर..? या नुसत्या काल्पनिक विचाराने सुध्दा फार भीती वाटते. अंगावर शहारे येतात. भीती कशाची वाटते..? नसण्याच्या फक्त काल्पनिक विचाराने अंगावर शहारे का येतात..?
तर.... " बाप " या ईश्वरीय भक्कम आधारवडाची अनुभूती आलीच नसती..!
बापाची ,त्याच्या " सर्व " लेकरांकरिता होणारी तगमग समजलीच नसती..!
आपल्या " सर्व " लेकरांकरीता त्या बापाची होणारी धडपड समजलीच नसती..!
तो ,जो कुणी या सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे,तो वेळोवेळी या.. ना त्या रुपात या भूतलावर अवतीर्ण होत असतो याची प्रत्यक्ष अनुभूती आलीच नसती..! "
सर्वांकरिता " झिजने काय असते याचे जिवंत स्वरूपात प्रात्यक्षिक आपल्याला समजलेच नसते..!
स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असूनही सर्वसामान्यांकरिता जमिनीवर राहणे काय असते याचा अनुभव आलाच नसता..!
फक्त " माहिती " असणे व " ज्ञान " असणे यातील सुक्ष्मभेद आपल्या सारख्या सामान्य जनांना समजलाच नसता..!
आपण मराठी माणसं या बाबतीत खूप नशीबवान आहोत की, आपल्याला थोरले महाराज छत्रपती शिवराय यांच्या रूपाने ,सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक महान बापासारखे थोर व्यक्तिमत्त्व पहिल्यांदा भेटले.
मित्रांनो,अशी अनेक महान व्यक्तिमत्वे या ना त्या निमित्ताने या भूतलावर अवतीर्ण होत असतात. फक्त त्यांच्यातील ईश्वरीय शक्तीचा अधिवास समजून घ्यावा लागतो. आस्तिकता काय असते हे अशा महान व्यक्तिमत्त्वांकडे बघून मनोमन पटते. शेवटी आपली " आस्तिकता " म्हणजे तरी काय असते हो..? तर ती असते निव्वळ श्रध्देचा आंतरिक भाव..! मग ती श्रध्दा कुणाची ,एखाद्या माणसातील देवामाणसांकडे बघून असते. तर कुणाची प्रत्यक्ष कधीही न बघितलेल्या पण क्षणोक्षणी " जाणवणाऱ्या "अदृश्य पण दृश्य अनुभूती देणाऱ्या भावनिक शक्तिंकडे बघून असते. माझ्यामते यालाच " आस्तिकपणा " म्हणतात. नास्तिकता हा प्रकार मुळीच नसतो. ती आपण निर्माण केलेली फक्त " कल्पना " आहे. माझी या दोन्ही दृश्य व अदृश्य शक्तींवर कमालीची श्रध्दा आहे. माझी यांच्या असण्यावर श्रध्दा आहे.. माणसांमधील देवमाणूस,म्हणजेच दृश्य शक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर..!
एखादा भावनिक माणूस या विचाराने नेहमी सदगदीत होत असतो की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर असो किंवा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब किंवा अजूनही खूप जण आपल्या देशात जन्माला येऊन गेले या विचाराने भारावून जातो. डॉ.आंबेडकर यांच्यावर बालपणी,तरुणपणी जो सामाजिक भेदभाव झाला व ज्या ज्या " झारीतील शुक्राचार्यांनी " तो केला त्यांना डॉ.आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेने सडेतोड उत्तर दिले आहे. फक्त खूप वाईट याचे वाटते की,भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सक्षम झाल्यानंतर त्यांच्यातील अलौकिक बुद्धिमत्ता व शक्ती बाबत देखील भेदभाव होत राहिला याची खंत वाटते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे झारीतील शुक्राचार्य कोण होते..? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांपुरतेच मर्यादित करणारे कोण होते किंवा आहेत..? आजही बरेचजण व काही स्वतःला पुरोगामी म्हणणारे देखील फुले शाहू व आंबेडकर यांचा फक्त नावांचा वापर करून स्वतच्या स्थैर्याचे घरे का बांधून घेत आहेत..? ज्या कम्युनिस्ट विचारधारेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ,त्यांच्या संपूर्ण हयातीत प्रखर विरोध केला,आज काहीजण त्याच विचारधारेच्या साहाय्याने सामाजिक वातावरण का बिघडवत आहेत..? याचा अभ्यासू व्यक्तींना अंदाज आलाच असेल. तो त्यांनी चिंतन मनन करून घ्यावा.
माझ्या मते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ,आपल्या देशाची पुढील बहुतांशी क्षेत्रातील रूपरेषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आखली. ऐनवेळी काहीजण पुढे येऊन स्वतच्या कर्तृत्वाचे टेंभे मिरवत राहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्यांनी ते आटोकाट प्रयत्न का केले असतील..?
गेल्या सप्टेंबर २०१७ मध्ये आमच्या जिल्हा परिषद प्रा .शा.एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत परिपाठाच्या वेळी ,विद्यार्थांना मी,आईचे महत्त्व सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग, जेंव्हा डॉ. बाबासाहेब यांचे संविधान लिहून झाले आणि ते सातारा येथील स्व.भिमाईच्या समाधी स्थळी गेले,त्यावेळचे त्यांचे खूप भावनिक विचार सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः खूप रडले. मी खूप भावनिक झालो, तो प्रसंग सांगत असताना. माझ्याकडून एका आई प्रती असलेली ,एका महान मुलाची भावनिक साद सांगणे खूप कठीण झाले,खूप गहिवर निर्माण झाला होता तेंव्हा..! शब्दच फुटेना..! मला त्यावेळी माझ्या शाळेतील शिक्षक सहकारी आदरणीय व्यंकटेश श्रीनेवार सर यांनी सावरले व पुढील परिपाठ पूर्ण करून घेतला.
आपण का कुणासाठी एवढे भावनिक होतो..? याचे कारण सर्व भावनिक माणसे ओळखू शकतात. माझ्या साक्षर होऊन कौटुंबिक स्थैर्य असण्याला कारणीभूत माझे आई -वडील , शिक्षक अन् परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. तसेच आज आम्ही जे काही थोडेफार स्थैर्य प्राप्त केले आहे,ते फक्त माझ्या तीर्थरूप वडीलांमूळेच..! आणि माझ्या वडिलांना साक्षर होऊन जे स्थैर्य प्राप्त झाले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संकुलातील संस्कारामुळे..! याचाच अर्थ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श होते ; परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर..!
जात म्हणून आजही आपल्यातील काहीजण मनातून स्पृश्य अस्पृश्य ही अत्यंत धोकादायक मानसिकता सोबत घेऊन समाजात वावरताना आढळून येत असतात. हा भेदभाव दृष्य स्वरूपात दिसत नसेल, पण अदृश्य स्वरूपात समाजात वावरताना दिसत असतो. ही अशी अत्यंत धोकादायक सामाजिक मानसिकता जो पर्यंत मनात राहील तेंव्हा जाणवते की, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठे सामाजिक कार्य या वंचित समाजासाठी करून ठेवलेले आहे. ही सामाजिक जाणीव, जाणीव असणाऱ्या सुज्ञ नागरिकांच्या सहज लक्षात येईल. आज भले आपण प्रजासत्ताक देशात राहत असलो तरी, जातपात पाळणे हा गुन्हा असला तरी, काहींच्या अंतर्रमनातून जो पर्यंत हा भेदभाव जाणार नाही तो पर्यंत ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' हा विचार एक विचार म्हणून समाजात जिवंत असलेला दिसेल. एखादा व्यक्ती अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे येतो अन् आपलं आयुष्य एका विशिष्ट ध्येयासाठी समर्पित करून देतो अन् विशेष म्हणजे त्या समर्पित आयुष्याचे सार्थक होते याचे माझ्या मते दोन उदाहरणे सर्वोत्कृष्ट आहेत. ते दोन समर्पित मानवी आयुष्य म्हणजे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!आपल्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून ही दोन्ही राष्ट्रपुरुष आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत राहिली. आजही त्यांनी आखून दिलेल्या वैचारिक अन् बौद्धिक सिध्दांतावर जे मार्गक्रमण करत आहेत तेच खरे त्यांचे अनुयायी..! बाकी इतरांची आपलं केविलवाणं अस्तित्व दाखविण्यासाठी नुसती धडपड सुरू असते.
आज भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त या महामानवास विनम्र अभिवादन..! 🙏🏻
ता.क : माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,प्र.के.अत्रे, आचार्य रजनीश(ओशो) यांच्या सारखे परखड लेखक /वक्ते झाले नाही आणि होणारही नाही..! वाचकांनी डॉ.आंबेडकर लिखित " Thought's on Pakistan " हा ग्रंथ किंवा याचे हिंदी/मराठी संस्करण अवश्य वाचावे.मग कळेल डॉ.आंबेडकर किती महान द्रष्टे व परखड मते असणारे लेखक होते म्हणून..!
वंदे मातरम्
जय भीम..!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक:६ डिसेंबर २०१७