शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

खूप खूप धन्यवाद मित्रा,आजू..!


 

आमचे गाव, आमची माणसं..!


" खूप खूप धन्यवाद मित्रा आजू..! "

___________________________________________


तू आज दिनांक १५ जुलै २०१८ रोजी भर पावसात..फक्त आणि फक्त भेटण्यासाठी आलास..! अर्थात पाऊस नेहमीप्रमाणेच बुरुबुरू सुरू होता..!

पण तुझ्या आत्मीय सहपरिवार भेटीने निदान आमचे संपूर्ण कुटुंब तरी प्रेमाने न्हावून निघाले..! मित्रा आजू,तुला नेहमी भेटलो की,मला माझ्या गत आयुष्यातील एका खूप भावूक प्रसंग आठवतो मित्रा..!


ज्यावेळी माझी डी.एड.करिता निवड झाली होती.माझा नंबर महाराष्ट्रातील तत्कालीन अती शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे आदरणीय शिक्षण महर्षी व्यंकट आण्णा रणधीर यांचे 

" डॉ.बाबासाहेब आंबेडकर डी.एड.कॉलेज, बोराडी, ता.शिरपूर,जिल्हा धुळे येथे निवड झाली होती. पालखेड येथून मी माझ्या वडिलांसोबत एक लोखंडी पेटी व त्यात दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन निघालो होतो.त्या रोजी पोळ्याचा सण होता..!तुझ्या किराणा दुकानासमोर आम्ही चाललो होतो..तेवढ्यात तू मला आवाज दिला..

" अरे,नंदन..इकडे ये..!" 

मी कुतूहलापोटी गेलो.तर तू मोठ्या श्रद्धेने माझ्या हातावर साखर ठेवलीस अन् म्हणाला होतास...

" नंदन,काही काळजी करू नको,तू आपल्या गावापासून खूप दूर चालला आहेस,पण..मी दिलेल्या या साखरेचा गोडवा तुला सदैव गोड व सुरक्षित ठेवील..!"


माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझी स्व.आई व वडील सोडून कुणीतरी माझी , इतकी भावनिक आधाराची पाठराखण केली होती अन् तो तूच होतास मित्रा आजू..! 


आज तू ,सपत्नीक माझ्या या घरी आलास,याच घराची पूजा करायला तू फक्त माझ्या निख्खळ मैत्रीखातर पालखेड येथून आला होतास..!मला आज हे सांगायला अभिमान वाटतो की,मी ज्यारोजी जी माझ्या घराची पूजा फक्त माझ्या कुटुंबीयांसोबत केली होती..त्यावेळी अनावश्यक खर्चाला कात्री लावून मी तोच माझ्या ऐपती एवढा खर्च एका अनाथाश्रम ला देणगी दिला होता..! कारण ज्यांना भोजनाची खरी गरज आहे त्यांच्या मुखी ते गेल्याचे कृतार्थ भाव माझ्या अंतर्मनात मरे पर्यंत राहील..! त्या भावूक घटनेला म्हणजेच माझ्या घराच्या पूजेला तुझा स्पर्श झाला होता याचा मला नेहमी आनंदच होतो. हे मी आज पर्यंत जाहीर केले नव्हते पण..तुझ्या हस्ते केलेल्या त्याच पूजेचा ,तू आज याच घरी भेट दिल्याने आज सांगावसं वाटला..म्हणून व्यक्त झालो मित्रा..! 


 शाब्दिक कोट्या करायला मला हवेहवेसे ठिकाण म्हणजे तूच आहेस मित्रा..!अर्थात तूही करतोस म्हणा..!😂

तू आज आपल्या पालखेड पंचक्रोशीत हिंदू धर्मातील विविध धार्मिक विधी कार्यक्रमात नाव लौकीक मिळवला आहे याचा खूप आनंद वाटतो मित्रा..!

 

आशा करतो,जर माझ्या दोन्ही मुलांनी मला विचारून लग्न केलेच तर त्यांचे लग्नही तुझ्याच हस्ते लावून,त्यात एक सुमधुर मंगलाष्टक म्हणायला लावून एक सुंदर प्रेमाचं, भावनिक नात्याचं वर्तुळ पूर्ण करील..!


काळजी घे मित्रा..!


वंदे मातरम्..!


लेखक व अजय काळे उपाख्य आजू उपाख्य गुरु चा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

स्थळ: औरंगाबाद.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक:१५ जूलै २०१८

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

" जब्राट फोटो, पण.. आमचा नाही...! "😊


 




आमचे गाव आमची माणसं..!

" जब्राट फोटो, पण.. आमचा नाही...! "😊
________________________________________

आज दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले, या नावाचा इसम त्याच्या जन्मगावी पालखेड येथे गेला होता.तिथं त्याला बराच तऱ्हे तऱ्हेचा बदल जाणवला..!  

आज हा लेख लिहिणारा इसम  सकाळी ज्यावेळी गावात गेला होता त्यावेळी,त्याचे बरेच बालमित्र परगावाहून आलेले नसल्याने या इसमाने काहीवेळ पालखेड गावातीलच एका गल्लीत जिथं आम्ही माध्यमिक वयोगटात असताना चांगल्या कामासाठी बकरीच दूध अक्षरशः चोरलं होतं तिथंच एका ओट्यावर बसून एकांतवासात जाणे पसंत केले होते..!🤭
( त्या बकरीच्या  दुधावर लेख लिहावा वाटतो, पण... दोन प्रिय बालमित्रांची  रीतसर परवानगी घेऊन त्या सत्य घडलेल्या प्रसंगावर लिहिल..!😀 कारण त्या लेखाचे सर्व हक्क या दोघांकडेच राखून आहेत..!😎 ) 

जेंव्हा..या  इसमाचे बालमित्र परगावाहुन ,स्वतः च्या गावात आपलं,दररोजच्या जीवनात कुठं अन् काय...काय चुकतं याच अवलोकन करायला याच इसमाच्या एका बालमित्राच्या ,जो की,गावात पौरोहित्य करतो अजय काळे गुरू त्याच नाव, याच्या दुकानाच्या ओट्यावर एकत्र जमले होते..! ( या इसमाच्या डोक्यावर नोट धरलेला तो मित्र..!) त्याच्या किराणा दुकानासमोर बहुतांशी बालमित्र उभे राहिले   होते. एकमेकांची मापे काढल्यानंतर, फुकटचा मानसिक औषधोपचार झाल्यानंतर गावातीलच एका इसमाला आमच्या सर्वाच्या छबी टिपण्यासाठी कळकळीची नम्र विनंती केली...अन् त्याही इसमाने आमच्या सर्वांच्या......
" छबीदार ,छबी...मी तोऱ्यात उभी,
जशी चांदनी,चमचम नभी...!"
या गीताच्या पुरुषी संस्काराने ,ओतप्रोत भरलेल्या अनेक छबी टिपल्या..!

पण  या सर्व छबी टिपल्यानंतर ,त्या सर्व छबी पाहत असताना माझ्या सहज लक्षात आले की,, आमच्यात कडेला एक अनोळखी इसम क्रमानुसार वाकून उभा होता...! तो असे काय बघत होता..तिकडे की,त्यानं कित्ती...कित्ती सुंदर क्रम बदलला..पाहण्याचा..! मला त्या वाकून क्रमवार पाहणाऱ्या इसमाच्या विविध छब्या लई... जब्राट आवडल्या..!😊

ता.क.: कधी..कधी..आपण ज्यांचे फोटो काढतो,त्यांच्यापेक्षा ,त्या फोटोतील अनोळखी इसमांचे फोटोच लई जब्राट येऊन जातात...!जसे त्या वाकलेल्या इसमाचे..!

वंदे मातरम्..!

फोटो निमित्त : लेखकाच्या पालखेड गावची जत्रा..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ७ डिसेंबर २०१८

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर...




चिंतन ©️

" डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर....! "

====================================

 एखाद्या व्यक्तीचे असणे जितके फार महत्त्वाचे असते.तितकेच फक्त कल्पना करा तीच व्यक्ती जर नसती तर....?

 नसती तर..? या नुसत्या काल्पनिक विचाराने सुध्दा फार भीती वाटते. अंगावर शहारे येतात. भीती कशाची वाटते..? नसण्याच्या फक्त काल्पनिक विचाराने अंगावर शहारे का येतात..?

तर.... " बाप " या ईश्वरीय भक्कम आधारवडाची अनुभूती आलीच नसती..!
बापाची ,त्याच्या " सर्व " लेकरांकरिता होणारी तगमग समजलीच नसती..!
आपल्या " सर्व " लेकरांकरीता त्या बापाची होणारी धडपड समजलीच नसती..! 
तो ,जो कुणी या सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे,तो वेळोवेळी या.. ना त्या रुपात या भूतलावर अवतीर्ण होत असतो याची प्रत्यक्ष अनुभूती आलीच नसती..! " 
सर्वांकरिता " झिजने काय असते याचे जिवंत स्वरूपात प्रात्यक्षिक आपल्याला समजलेच नसते..! 
स्वतःमध्ये अलौकिक शक्ती असूनही सर्वसामान्यांकरिता जमिनीवर राहणे काय असते याचा अनुभव आलाच नसता..! 
फक्त " माहिती " असणे व " ज्ञान " असणे यातील सुक्ष्मभेद आपल्या सारख्या सामान्य जनांना समजलाच नसता..!
 
आपण मराठी माणसं या बाबतीत खूप नशीबवान आहोत की, आपल्याला थोरले महाराज छत्रपती शिवराय यांच्या रूपाने ,सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक महान बापासारखे थोर व्यक्तिमत्त्व पहिल्यांदा भेटले.
                                         
मित्रांनो,अशी अनेक महान व्यक्तिमत्वे या ना त्या निमित्ताने या भूतलावर अवतीर्ण होत असतात. फक्त त्यांच्यातील ईश्वरीय शक्तीचा अधिवास समजून घ्यावा लागतो. आस्तिकता काय असते हे अशा महान व्यक्तिमत्त्वांकडे बघून मनोमन पटते. शेवटी आपली " आस्तिकता " म्हणजे तरी काय असते हो..? तर ती असते निव्वळ श्रध्देचा आंतरिक भाव..! मग ती श्रध्दा कुणाची ,एखाद्या माणसातील देवामाणसांकडे बघून असते. तर कुणाची प्रत्यक्ष कधीही न बघितलेल्या पण क्षणोक्षणी " जाणवणाऱ्या "अदृश्य पण दृश्य अनुभूती देणाऱ्या भावनिक शक्तिंकडे बघून असते. माझ्यामते यालाच " आस्तिकपणा " म्हणतात. नास्तिकता हा प्रकार मुळीच नसतो. ती आपण निर्माण केलेली फक्त " कल्पना " आहे. माझी या दोन्ही दृश्य व अदृश्य शक्तींवर कमालीची श्रध्दा आहे. माझी यांच्या असण्यावर श्रध्दा आहे.. माणसांमधील देवमाणूस,म्हणजेच दृश्य शक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर..! 

एखादा भावनिक माणूस या विचाराने नेहमी सदगदीत होत असतो की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर असो किंवा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब किंवा अजूनही खूप जण आपल्या देशात जन्माला येऊन गेले या विचाराने भारावून जातो. डॉ.आंबेडकर यांच्यावर बालपणी,तरुणपणी जो सामाजिक भेदभाव झाला व ज्या ज्या " झारीतील शुक्राचार्यांनी " तो केला त्यांना डॉ.आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेने सडेतोड उत्तर दिले आहे. फक्त खूप वाईट याचे वाटते की,भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सक्षम झाल्यानंतर त्यांच्यातील अलौकिक बुद्धिमत्ता व शक्ती बाबत देखील भेदभाव होत राहिला याची खंत वाटते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे झारीतील शुक्राचार्य कोण होते..? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांपुरतेच मर्यादित करणारे कोण होते किंवा आहेत..? आजही बरेचजण व काही स्वतःला पुरोगामी म्हणणारे देखील फुले शाहू व आंबेडकर यांचा फक्त नावांचा वापर करून स्वतच्या स्थैर्याचे घरे का बांधून घेत आहेत..? ज्या कम्युनिस्ट विचारधारेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ,त्यांच्या संपूर्ण हयातीत प्रखर विरोध केला,आज काहीजण त्याच विचारधारेच्या साहाय्याने सामाजिक वातावरण का बिघडवत आहेत..? याचा अभ्यासू व्यक्तींना अंदाज आलाच असेल. तो त्यांनी चिंतन मनन करून घ्यावा.

माझ्या मते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ,आपल्या देशाची पुढील बहुतांशी क्षेत्रातील रूपरेषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आखली. ऐनवेळी काहीजण पुढे येऊन स्वतच्या कर्तृत्वाचे टेंभे मिरवत राहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्यांनी ते आटोकाट प्रयत्न का केले असतील..? 

गेल्या सप्टेंबर २०१७ मध्ये आमच्या जिल्हा परिषद प्रा .शा.एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत परिपाठाच्या वेळी ,विद्यार्थांना मी,आईचे महत्त्व सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंग, जेंव्हा डॉ. बाबासाहेब यांचे संविधान लिहून झाले आणि ते सातारा येथील स्व.भिमाईच्या समाधी स्थळी गेले,त्यावेळचे त्यांचे खूप भावनिक विचार सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः खूप रडले. मी खूप भावनिक झालो, तो प्रसंग सांगत असताना. माझ्याकडून एका आई प्रती असलेली ,एका महान मुलाची भावनिक साद सांगणे खूप कठीण झाले,खूप गहिवर निर्माण झाला होता तेंव्हा..! शब्दच फुटेना..! मला त्यावेळी माझ्या शाळेतील शिक्षक सहकारी आदरणीय व्यंकटेश श्रीनेवार सर यांनी सावरले व पुढील परिपाठ पूर्ण करून घेतला.

आपण का कुणासाठी एवढे भावनिक होतो..? याचे कारण सर्व भावनिक माणसे ओळखू शकतात. माझ्या साक्षर होऊन कौटुंबिक स्थैर्य असण्याला कारणीभूत माझे आई -वडील , शिक्षक अन् परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. तसेच आज आम्ही जे काही थोडेफार स्थैर्य प्राप्त केले आहे,ते फक्त माझ्या तीर्थरूप वडीलांमूळेच..! आणि माझ्या वडिलांना साक्षर होऊन जे स्थैर्य प्राप्त झाले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संकुलातील संस्कारामुळे..! याचाच अर्थ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श होते ; परम वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर..!

जात म्हणून आजही आपल्यातील काहीजण मनातून स्पृश्य अस्पृश्य ही अत्यंत धोकादायक मानसिकता सोबत घेऊन समाजात वावरताना आढळून येत असतात. हा भेदभाव दृष्य स्वरूपात दिसत नसेल, पण अदृश्य स्वरूपात समाजात वावरताना दिसत असतो. ही अशी अत्यंत धोकादायक सामाजिक मानसिकता जो पर्यंत मनात राहील तेंव्हा जाणवते की, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठे सामाजिक कार्य या वंचित समाजासाठी करून ठेवलेले आहे. ही सामाजिक जाणीव, जाणीव असणाऱ्या सुज्ञ नागरिकांच्या सहज लक्षात येईल. आज भले आपण प्रजासत्ताक देशात राहत असलो तरी, जातपात पाळणे हा गुन्हा असला तरी, काहींच्या अंतर्रमनातून जो पर्यंत हा भेदभाव जाणार नाही तो पर्यंत ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' हा विचार एक विचार म्हणून समाजात जिवंत असलेला दिसेल. एखादा व्यक्ती अत्यंत बिकट परिस्थितीतून पुढे येतो अन् आपलं आयुष्य एका विशिष्ट ध्येयासाठी समर्पित करून देतो अन् विशेष म्हणजे त्या समर्पित आयुष्याचे सार्थक होते याचे माझ्या मते दोन उदाहरणे सर्वोत्कृष्ट आहेत. ते दोन समर्पित मानवी आयुष्य म्हणजे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!आपल्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून ही दोन्ही राष्ट्रपुरुष आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत राहिली. आजही त्यांनी आखून दिलेल्या वैचारिक अन् बौद्धिक सिध्दांतावर जे मार्गक्रमण करत आहेत तेच खरे त्यांचे अनुयायी..! बाकी इतरांची आपलं केविलवाणं अस्तित्व दाखविण्यासाठी नुसती धडपड सुरू असते.

आज भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त या महामानवास विनम्र अभिवादन..! 🙏🏻
                                                           

ता.क : माझ्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,प्र.के.अत्रे, आचार्य रजनीश(ओशो) यांच्या सारखे परखड लेखक /वक्ते झाले नाही आणि होणारही नाही..! वाचकांनी डॉ.आंबेडकर लिखित " Thought's on Pakistan " हा ग्रंथ किंवा याचे हिंदी/मराठी संस्करण अवश्य वाचावे.मग कळेल डॉ.आंबेडकर किती महान द्रष्टे व परखड मते असणारे लेखक होते म्हणून..!

वंदे मातरम्
जय भीम..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
 
 https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
                                     
दिनांक:६ डिसेंबर २०१७



मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

दिलू, आमचा सचिन तेंडुलकर..!


 

" आमचे गाव ,आमची माणसं ""


         दिलू, आमचा सचिन तेंडुलकर..!

___________________________________________

                             

क्रिकेट...हा सर्व भारतीयांचा आवडता खेळ..!त्यात आमच्या पालखेड , ता.वैजापूर गावात या खेळाविषयी अबाल,वृद्घांना खूप गोडी..!या फोटोत जी व्यक्ती मधोमध उभी आहे,तो आमचा बालमित्र-दिलीप सूराशे..! मी त्याला नेहमी " दिलू " या नावानेच हाक मारतो..!


आमच्या तत्कालीन (१९९५ ते २०००) शिवशक्ती क्रिकेट संघातील खूप महत्त्वाचा फलंदाज होता.आम्ही आमचा संघ खेळण्यास पालखेड परिसरात असलेल्या शिवराई,जळगाव, चोर वाघलगाव, परसोडा,विनायक नगर,लासूरगाव,दहेगाव(शेड), काटे पिंपळगाव इ.ठिकाणी घेऊन जायचो.तिथले संघही आमच्या गावात खेळायला यायचे..!दिलीपच्या फलंदाजीत एक नजाकत होती..!समोर कितीही घातक गोलंदाज असो,हा दिलू, चेंडूला अगदी लीलया पार करायचा..!याला बाद करणे,गोलंदाजांना खूप कठीण जात असे.दिलीपचा स्टेट ड्राईव्ह अतिशय तंत्रशुद्ध असायचा..!दिलीप टेनिस बॉल,लेदर बॉल वर खूप नेत्रदीपक फलंदाजी करत असे..! 


प्रिय बालमित्र दिलीप उपाख्य दिलू , आमच्या गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज होता..! आमच्या पालखेड गावातील ही साधी सरळ अन् गोड स्वभावाची माणसं आहेत, ज्यांना भेटलं की मैत्रीच्या नात्याला अजुन उभारी येते. दिलीप सारखी माणसं, अजातशत्रू असणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्त्व करणारी असतात.माझ्या तरी पाहण्यात आलेले आहे की, प्रिय बालमित्र दिलीप उर्फ दिलू हा कधीही कुणाच्याही वाह्यात फंद्यात पडलेला नाही..! कधीही भेटला तर अगदी सौम्य स्वरूपात हसून अन् प्रेमळ भाषेतच बोलणार ,असा आमच्या दिलुचा स्वभाव आहे..!


आमच्या पालखेड गावातील आमच्या समकालीन मित्रांमध्ये ज्या दोन ग्रेट फलंदाजांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा मी निःसीम चाहता होतो ते दोघे आहेत, प्रिय बालमित्र दिलू सुराशे अन् माझा वर्गमित्र अन् बालमित्र शेख फैय्याज बागवान..! ( ह.मु. औरंगाबाद ) . शेख फैय्याज बागवान आणि दिलीप सूराशे यांचे क्रिकेट संघ पालखेड येथे नव्वदच्या दशकात जेंव्हा समोरासमोर खेळायला उतरायचे तेंव्हा या दोन्ही प्रिय बालमित्रांकडून अप्रतिम अशा फलंदाजीचे सादरीकरण व्हायचे..! त्यात आमचं पालखेड गाव कलेच्या अन् खेळाच्या बाबतीत जरा जास्तच आघाडीवर..! आमच्या गावातील क्रिकेट शौकीनांचे भरभरून प्रेम शेख फैय्याज बागवान अन् दिलीप सुराशे लाभले आहे..!


प्रिय बालमित्र दिलू आणि शेख फैय्याज बागवान या ग्रेट मोजक्या व्यक्तीमुळे आमच्या पालखेड गावातील क्रिकेट खेळाला अन् त्यातील फलंदाजीला तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून नजाकत लाभलेली आहे..!


दिलीपला खेळण्यासाठी योग्य मार्गदर्शन व पुढील ठिकाणे मिळाली असती तर हा दिलीप नक्कीच खूप चमकला असता हा आम्हाला खूप विश्वास होता..!पण त्याकाळी ग्रामीण भागात अश्या तांत्रिक बाबींवर कुणी विचार केला नाही तसेच मुख्य म्हणजे परिस्थितीही आड आली..! 


माझ्या गावातील या सचिन तेंडुलकर ला त्याच्या क्रिकेट खेळातील कलात्मकतेकरिता माझा व खालील छायाचित्रातील कडेचा प्रिय बालमित्र डॉ.संजय राऊतचा मानाचा मुजरा..!


ता.क. : दिलीपला आम्ही कधीच रागावलेले पाहिलेले नाही..!🙏


 वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक :३० नोव्हेंबर २०१७