रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

शौर्य तीर्थक्षेत्र भेट - हुतात्मा तुकाराम ओंबळे "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


" शौर्य तीर्थक्षेत्र भेट - हुतात्मा तुकाराम ओंबळे "

_________________________________________

                                                          

आम्ही मे २०१७ च्या सुरुवातीच्या आठवड्यात मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलं धार्मिक तीर्थक्षेत्र, आधुनिक तीर्थक्षेत्र यांचे मनोभावे दर्शन व वैज्ञानिक कुतूहलापोटी प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलो. मे २०१७ च्या परतीच्या प्रवासात वेरावल -गुजरातहून दुपारी १:२०ला रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सकाळी ७:३४ला पोहचली.सकाळी फ्रेश झालो व मुंबईचा वडा पावचा नाश्ता केला.वास्तविक ज्योतिर्लिंग सोमनाथला जातांना ज्यावेळी मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उतरलो होतो;त्यावेळी तेथील गर्दी पाहून व गतकाळातील याच ठिकाणी आपल्या अस्मितेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या स्मृति जाग्या झाल्या होत्या. परंतु सोमनाथला जातानाच्या प्रवास नियोजनात मुंबईचे आधुनिक तीर्थक्षेत्र-तारांगण व विज्ञान केंद्र दर्शन होते.आणि त्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतलाही. सोमनाथहून येतानांच्या प्रवास नियोजनात दर्शन घेण्याची व नतमस्तक होण्याची सारखी हुरहूर लागली होती.


 एका असामान्य तीर्थक्षेत्राची, एका असामान्य शूरवीराच्या प्राणाच्या बलिदानाने पूनित झालेल्या " शौर्य तीर्थक्षेत्र " ला भेट देण्याची...! ते " शौर्य तीर्थक्षेत्र " होते सिंधू सागराच्या किनाऱ्यावरील गिरगाव चौपाटीच्या मुख्य रस्त्यालगत..!आणि त्या शौर्य तिर्थक्षेत्राचे वंदनीय शौर्य पूरूष होते..."हुतात्मा तुकाराम ओंबळे साहेब( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)...!! 


 टॅक्सीतून उतरून आम्ही अथांग सिंधू सागराला नजरेत सामावून घेतले.मुख्य रस्त्यावर आलो.एका शहर पोलिसाला मी विचारले 

" साहेब,इथे शौर्य पूरूष तुकाराम ओंबळेजींचे स्मारक कुठे आहे..?" माझा हा प्रश्न ऐकुन ते शहर पोलिस आश्चर्यचकित व अभिमानास्पद नजरेने माझ्याकडे काही क्षण बघतच राहिले.मग काही क्षणानंतर त्यांनी प्रेमाने ,आत्मीयतेने आमची चौकशी केली.मी त्यांच्या मानसिकतेचा बरोबर अंदाज लावला की, बहुदा हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या स्मारकाची चौकशी केल्याने त्यांना खूप आनंद झाला होता.आम्हाला दुरून ते ठिकाण दाखवून ते आपल्या सेवेसाठी गेले.


गिरगाव चौपाटीवरील मुख्य रस्त्यालगतच ते "शौर्य स्थळ " होते.आम्ही सर्वजण मी ,माझी पत्नी,थोरला मुलगा चि.नमन व धाकटा मुलगा चि.नयनने त्या महान ,देशरक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या थोर सुपुत्रास विनम्र वंदन केले.याच ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राने (त्याला राष्ट्र म्हणायच्या सूध्दा स्थितीत ते सध्या नाही..) पाकिस्तानने दि.२६/११/२००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या अजमल कसाब नावाच्या राक्षसी अतिरेक्याला जिवंत पकडले होते ...हुतात्मा तुकाराम ओंबळेजींनी.मात्र त्या नराधमाने ओंबळेजींना बंदुकीच्या गोळ्यांंनी घायाळ केले होते.स्वतः घायाळ होवून सूध्दा ओंबळेजींनी क्रूरकर्मा दहशतवादी कसाबला आपल्या वज्रबाहूपाशातून सोडले नव्हते.


अखेर तो क्रूरकर्मा जिवंत पकडला गेला; परंतु भारतमातेचा थोर सुपुत्र तुकाराम ओंबळेजी धारातीर्थी पडले..! धारातीर्थी पडले ते सर्वसामान्य मुंबईकरांचे,भारतवासियांचे प्राण वाचविण्यासाठी..! हे विचारचक्र माझ्या मनात चालू होते.त्या "शौर्य तीर्थक्षेत्राला "पूनश्च एकदा वंदन करून आम्ही पुन्हा त्याच शहर पोलिसांकडे आलो.कारण आमचा टॅक्सी थांबा तेथे होता. मुंबईच्या भीषण गरमीत,खूप जाम करणा-या वाहनांना मार्ग दाखवित आपली सेवा ते शहर पोलिस साहेब इमानेइतबारे करत होते. उष्णतेची परवा न करता. त्यांची व माझी फक्त नजरभेट झाली. त्यांना पाहून मला माझ्या सावलीतील नोकरीचा असणारा पोकळ गर्व पार गलितमात्र झाला. मनोमनी त्यांनाही वंदन केले.त्या शहर पोलिस साहेबांच्या नजरेत " आमचा कुणीतरी सन्मान केला, शौर्य तिर्थक्षेत्राला भेट देऊन ...!" हा आत्मगौरवाचा भाव मला जाणवला. एवढ्या घाईत देखील त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले.आम्हाला खूप आनंद झाला होता.


आमची या "शौर्य तीर्थक्षेत्राला" भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. "शौर्य तीर्थक्षेत्र " हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या पुतळ्याखालील लिहिलेल्या ओळी मनात म्हणत होतो... 

                                                               

" प्राणाचे देऊनी बलिदान..वाचविले असंख्य प्राण... हे शूरवीरा ,आपणास मुंबईकरांचा प्रणाम..!"🙏🏻

                                

वंदे मातरम्..!

                                                      

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


लेखन दिनांक:२५ मे २०१७

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

देवभूमी भाग क्रमांक ९




 







मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ९ )

===================================

रात्रीचे दहा वाजले होते. हिमालयातील थंडी काय असते याचा प्रत्यय यायला लागला होता.अधून मधून ओलसर थेंब अंगावर पडत होते. संध्याकाळी सव्वा सहा वाजता दर्शनाच्या रांगेत उभे राहून अखेर रात्री दहा वाजता बाबा केदारनाथाचे मनोभावे दर्शन झाले होते. एकतर साधारणतः पहाटे पाच ते दुपारच्या सव्वा दोन वाजे पर्यंत अत्यंत चढणीचा मार्ग चढत चालल्याने पाय पूर्णतः थकून गेले होते. त्यात पुन्हा संध्याकाळी सव्वा सहा ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेत उभे राहिल्याने पावलं हळूहळू पडायला लागली होती. आमची दोन्ही मुलं मात्र फारसे थकलेले जाणवत नव्हते.आता आम्ही पूर्णपणे शरीर गोठून टाकणाऱ्या हिमालयातील थंडीच्या स्पर्शात मंदिराच्या बाहेरील परिसर होतो. पोटात सगळेच प्राणी ओरडायला लागले होते.खूप भूक लागली होती.मंदिर परिसरातील एका हॉटेल मध्ये जेवणाचे ठरवले. जेवणाची ऑर्डर दिली.त्या हॉटेल मध्ये खूप गर्दी होती. वीस मिनिटांनी आमची जेवणाची थाळी आली. खूप भूक लागलेली असल्यामुळे आम्ही अधाशीपणे त्यावर तुटून पडलो.पहिला घास तोंडात गेल्या गेल्या दोन्ही मुलं, मी अन् माझी पत्नी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो.त्या बघण्याच्या अर्थ एकच होता अन् तो म्हणजे जेवणाच्या ताटातील भात पूर्णतः आंबून गेलेला होता.फक्त गरमागरम होता इतकेच..! तिथं त्या दुकानदाराला याबाबतीत मी म्हणालो पण त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की,
" साब, ताजा किया है, अभी अभी | खाना हैं तो खाव, नही तो बाजू मे रखो |चलो बाजू हटो, बहुत भीड हैं |

जास्त डोकं लावण्यात अर्थ नव्हता.आम्ही भात बाजूला केला अन् उर्वरीत भाजी अन् पोळी खाऊन आमचं जेवण पूर्ण केले.पिण्यासाठी दोन लिटर कोमट असलेले पाणी प्रत्येकी १२०₹ दराने विकत घेऊन आमची तहान भागवून घेतली. आता रात्रीचे अकरा वाजले होते. आम्ही पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिर परिसरात आलो अन् मनोभावे कळस दर्शन घेतले. तिथं काही  साधूंनी पत्र्याच्या डब्यात शेकोट्या पेटविलेल्या होत्या. त्या साधूंच्या एकंदरीत देहबोली वरून ते शीघ्रकोपी जाणवत होते.उशीर होतोय असे वाटले अन् आम्ही पुन्हा नंदी बेस कँप कडे हळूहळू पावलं टाकत टाकत मार्गस्थ झालो.

अंधार रात्री मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज शांतता भंग करत होता.हीच ती मंदाकिनी नदी जिच्या रुद्रावतारामूळे जून २०१३ मध्ये हा संपूर्ण परिसर उध्वस्त झाला होता.त्यात त्या माऊली मंदाकिनी नदीचा काहीही दोष नव्हता. निसर्गाच्या सान्निध्यात किंवा निसर्गावर जेंव्हा जेंव्हा मानव निर्मित बाबी अतिक्रमण करतात तेंव्हा तेंव्हा आई मंदाकिनी किंवा निसर्गातील इतर कोणतेही घटक रुद्रावतार धारण करणारच..! पायाला ठेच लागल्याने माझे विचार चक्र थांबले.नशीब, पायात बुट होता, नसता उजव्या पायाची बोटं नक्कीच रक्तबंबाळ झाली असती. अंधार असल्यामुळे आम्ही नंदी बेस कँप रस्ता परिसरात भेटत असणाऱ्या लोकांना विचारत विचारत अखेर मुख्य रस्त्याला लागलो होतो. इतक्यात एक पठ्ठया आमच्याकडे आला अन् म्हणाला...
" शाब, घोडा चाहिए क्या ? नीचे गौरी कुंड चलने का है क्या?
मी माझ्या मोबाईल मध्ये वेळ बघितली , रात्रीचे ११:२० वाजले होते.मी विचार करू लागलो, एवढी रात्र झाली आहे अन् हा पठ्ठया एवढ्या अंधारात अन् अतिशय कडाक्याच्या थंडीत कसं काय घेऊन जाणार..?
आम्हाला तर काही जायचे नव्हते,पण मी सहज म्हणून त्या पठ्ठयाला विचारले..
" भैय्या, इतनी ठंड और अंधेरेमे आप कैसे जा सकोगे?"
तो व्यक्ती मला  म्हणाला..
" तुमको क्या करने का है, मैं लेके जाऊंगा |
आम्हाला जायचे नव्हते, त्यामुळं मी नकार दिला. वास्तविक एवढ्या रात्री अंधारात घोडे प्रवास बंदी होती,तरी देखील ही माणसं काही प्रवाशांच्या जीवाशी खेळत होती.

आम्ही ११:३० वाजता नंदी बेस कँप मधील आमच्या तंबू मध्ये पोहचलो होतो. आमच्या बिछान्यावर पडल्यापडल्या शरीर एकदम शांत अवस्थेत गेले होते. अंगावर घेण्यासाठी जी व्यवस्था होती,  चैन ओढून बंद करण्याची पिशवी म्हणू शकतो आपण त्यास तिच्यात शिरून आम्ही पहुडलो होतो.आयुष्यात कधीही एवढी थंडी शरीराला माहीत नव्हती, त्यामुळं शरीर कधी एकदा सकाळ होईल अन् कधी सूर्य नारायणाच्या प्रकाशात जाईल या प्रतीक्षेत पहुडले होते. परिसरात शांतता पसरली होती.अधून मधून घोड्यांच्या गळ्यातील घंटीचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्र उलटून गेली होती.मध्यरात्री नंतर दिनांक २१ मे २०२३ ला प्रारंभ झाला होता.रात्री दोन वाजता मला तहान लागली होती.थंडी खूप होती,पण पाणी कमी पिल्यामुळे घशात कोरड पडली होती.मी माझ्या पत्नीला उठवले अन् बाटलीत पाणी आहे का या विषयी विचारले.पाणी नव्हते. दोन्ही मुलं शांत झोपी गेले होते.अखेर मी अन् माझी पत्नी बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या दुकानात पाणी विकत भेटते का हे बघायचे ठरवले.मी अन् माझी पत्नी सोबत बाहेर पडलो. नंदी बेस कँप रस्त्याच्या बाजूला एक छोटे हॉटेल होते.तिथं एक पुरुष अंगावर उबदार कपडे घेऊन बसलेला दिसला.तिथं आम्ही गेलो अन् प्यायला  विकत कोमट पाणी मिळेल का ? असे विचारले. साधे पाणी पिल्या जाणारच नव्हते, इतकी भयंकर थंडी होती.मला पूर्ण खात्री होती की, एकतर खूप रात्र आहे, त्यात समोरचे गिऱ्हाईक अडलेले आहे ही परिस्थिती ओळखून तो दुकानदार माझ्याकडून जास्तीचे पैसे घेणार याची खात्री होती. गरज माणसाला व्यवहार शून्य बनवते याचा प्रत्यय मला याक्षणी येत होता.दुकानदाराने स्वतः पैसे सांगण्याच्या अगोदरच मी त्यांना म्हणालो..
" भैय्या, बहुत ठंडी हैं, एक लिटर गुणगुणा पाणी दिजिये | मैं २०० ₹ देने के लिये तैयार हुं | 
माझे बोलणे ऐकल्यावर तो दुकानदार माझ्याशी बोलला..
" साब , ज्यादा नही लुंगा | जितना आने जाने का खर्चा आता है, वही मिलाकर दीजिये | सिर्फ ८०₹ दीजिये | आप बहुत थके हुए लग रहे हो | और चाहिए तो लिजीए|

मी खूप आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होतो.कारण इथे साधी पाण्याची बाटली ८०₹ मिळत होती.मघाशी एक लिटर कोमट पाणी बाटली १२० ₹ ला मिळाली होती.या व्यक्तीने मला कोमट पाणी करून एक लिटर पाण्याची बाटली फक्त ८० ₹  किमतीत दिली होती. कोमट पाणी असलेल्या दोन लिटरच्या बाटल्या घेतल्या. तिथून निघताना त्या पुरुषाकडे श्रद्धेने बघून तिथून आम्ही निघालो. 

आम्ही पुन्हा नंदी बेस कँप मधील आमच्या तंबूत परतलो अन् झोपी गेलो.त्यावेळी रात्रीचे २:३० वाजले होते. मात्र माझ्या मनात कोमट पाणी प्यायला दिलेल्या त्या देव माणसाविषयी पुढील ओळी‌ येऊ लागल्या होत्या...
' पता नहीं  किस रूप में आकर नारायण मिल जायेगा,
निर्मल मन के दर्पण मे वह राम के दर्शन पायेगा |'

वरील ओळी माझ्या अंतर्मनात येत होत्या, त्याविषयी माझ्या पत्नीला देखील सांगितले.त्यानंतर माझे शरीर कधी झोपी गेले हे समजलेच नाही.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १२  नोव्हेंबर  २०२३, रविवार ( लक्ष्मीपूजन )

क्रमशः


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

दुःखद अश्रू


 


मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


दुःखद अश्रू..!


==================================


काल दिनांक ८/११/२०२३ रोजी शाळेचा शेवटचा दिवस होता.त्यामुळं काहीसे उशिरा शाळेतून निघणे झाले होते. साधारणतः पाच वाजता आळंद येथून बसमध्ये बसलो होतो.बस निघाली. पन्नाशी असलेल्या वयोगटातील एक जोडपे देखील आळंदहुन बसमध्ये बसले होते.अगदी थोडेसे अंतर गेल्यावर कंडक्टरच्या लक्षात आले की, त्या जोडप्यातील पुरुष खूप दारू पिलेला आहे. कंडक्टरने त्या पुरुषाला खाली उतरण्यासाठी सांगितले. तो पुरुष दारू पिलेला असल्याने त्याच्या अंगात नसलेलं बारा हत्तीचे बळ आलेलं होतं.नाही नाही म्हणत तो पुरुष त्या कंडक्टरलाच उलट उद्धट सारखे बोलायला लागला. त्या दारू पिलेल्या पुरुषाच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते.ती माऊली आपल्या दारुड्या नवऱ्याला शांत राहण्यास सांगत होती,पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.काही पुरुषाची जातच मुळी आपल्या बायकोवर दादागिरी करणारी हलकट जमात आहे. त्यात अशा व्यसनी पुरुषांचा प्रवर्ग खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.


अखेर कंडक्टर साहेबांनी बळजबरी त्या दारुड्या पुरुषाला खाली उतरवून दिले.त्याच्या मागोमाग त्याची सोशिक पत्नी डोळ्यात अश्रू घेऊन उतरली. रस्त्याच्या कडेला दोघेही बसले. तिचा नवरा असल्यामुळे तिला आपल्या नवऱ्याला सोडून जाता येणार नव्हते. नवरा किती पण वाईट वागू द्या, नवऱ्याच्या सोबत निमुटपणे अश्रू ढाळत राहणारी आपली भारतीय स्री..! मग ती भारतातील कोणत्याही जाती धर्माची असू द्या..! ती स्री आपल्या दारुड्या नवऱ्याला हाताला धरून त्याला समजावून सांगत होती. ते समजूतदारपणाचे वाक्य बोलत असताना त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.ते दृश्य पाहून मला खूपच वाईट वाटले.माझ्या भावनेचा कांगोरा गहिवरून गेला होता.मी विचार करू लागलो की, दारुडा नवरा असलेल्या स्रीच्या मनाच्या संवेदना खूपच दुर्दैवी ठरतात. तिला त्या संवेदना हक्काने व्यक्त करता येत नाहीत. अशा महिला आपल्या दुर्दैवी आयुष्याला जबाबदार असणाऱ्या दारुड्या नवऱ्याच्या दुःखाला आपल्या अश्रू द्वारे मोकळी वाट करून देत असतात. तिला अशा राक्षसी वृत्तीच्या नवऱ्याच्या समोर आपल्या कोणत्याही भावना व्यक्त करताच येत नाहीत. 


लग्न झालेली स्री जेवढं आपल्या पती जवळ व्यक्त होत असते, तेवढं ती इतर नात्याजवळ होत नाही.आणि नवराच जर आपल्या भावना समजून घेणारा नसेल तर..

समाजात वावरताना अपमानित वर्तन करून वागणारा असेल तर... 

अशा स्रीया आजही राम गणेश गडकरी लिखित ' एकच प्याला ' नाटकातील सिंधू सारख्या दुःखाच्या हिंदोळ्यावर आपलं आयुष्य जगत असतात.थोर नाट्य लेखक राम गणेश गडकरी यांच्या ':एकच प्याला ' नाटकातील असलेले तळीराम , सुधाकर आजही समाजात वावरताना सभ्यपणाचे आव आणून आपल्या सिंधूला कौटुंबिक आयुष्यात अतिशय दुःख देत असतात. फक्त अशा कित्येक सिंधू आपल्या दुःखाला जाहीर होऊ देत नाही. कारण कुटुंबाची जबाबदारी अन् जाणीव फक्त आणि फक्त त्या त्या कुटुंबातील स्रीलाच जास्त प्रमाणात असते. जबाबदारी माणसाला सोशिक बनवते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. आजही समाजात राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटकातील सुधाकर, तळीराम दिसतात. जसा राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटकातील सुधाकर आपल्या तथाकथित प्रतिष्ठेच्या आयुष्याला समाजात दाखवत असताना आपल्या आयुष्यात एकच प्याला जवळ करतो अन् त्यात होरपळ होते सिंधूची..! 


मी साधारणतः प्राथमिक इयत्तेत असेल, तेंव्हा आमच्या पालखेड गावातील महादेवाच्या यात्रेच्या निमित्ताने सादर केलेलं राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटक बघितलेले आहे. त्यात सुधाकर अन् सिंधूची अजरामर भूमिका निभावली होती अनुक्रमे आदरणीय तुळशीदास मुलमुले पा. आणि आदरणीय अशोकराव पा. वाणी यांनी..!आमच्या गावात संगीतप्रधान नाटकातील माझ्या पिढीने पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयाच्या दोन व्यक्तिरेखा याचं दोघांनी सादर केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यावेळी त्या एकच प्याला नाटकातील अर्थ फारसा समजला नव्हता.मात्र पुढे आयुष्यातील प्रवास करताना त्याच एकच प्याला मधील कित्येक सुधाकर , सिंधू अन् तळीराम भेटत गेले. मग त्या त्यावेळी असे जाणवू लागले की, ' अरे, यांना तर आपण आपल्या बालपणी आपल्याच गावात एकच प्याला नाटकात सुधाकर, सिंधू अन् तळीरामाच्या रुपात बघितलेले आहे.' समाजातील कित्येक सुधाकर एकच प्याला जवळ करून आपल्या आयुष्यातील सिंधूला अपमानित करत जगत असतात. अशावेळी सिंधू निमुटपणे अश्रू ढाळत आपलं दुर्दैवी आयुष्य व्यतीत करत असते.जसे की आज मला आळंद येथे याचा प्रत्यय आला.

ज्यांच्या आयुष्यात भावनाशून्य नातं आलं अशा कित्येक डोळ्यात दुःखद अश्रू अनावर होतात. फक्त काही अश्रू दिसून येतात तर काही अश्रूंना डोळे पिऊन घेतात.


ता.क. - स्री ही भावनेची देवता आहे.


फोटो स्रोत - गुगल.


वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९/११/२०२३, गुरुवार.