मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

प्रेमळ मित्र डॉ.योगेश राजपूत सर


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


प्रेमळ मित्र  - डॉ.योगेश राजपूत सर.!


___________________________________________


स्थळ बदलले की,भाषा बदलते, परिसर बदलतो, एकंदरीत बदललेला परिसर आपल्याला खूप काही नवनवीन गोष्टी अगदी मोफत देतो. त्यात माणसं अन् त्यांचे स्वभाव आलेच.नियतीने मुक्तहस्ताने उधळण करून ही माणसांची ,माणसं भेटण्याची सोय करून ठेवली आहे फक्त...त्याचा कोण अन् कसा आनंद घेतो हे ज्या..त्या..माणसावर अवलंबून असते. मी मात्र मला भेटलेल्या प्रत्येक माणसाला सहसा सोडीत नाही..! कारण माझा माझ्या सर्व सामान्य आयुष्याचा एक सर्वसाधारण सिध्दांत आहे की.......

" माणसानं माणसावर जातपात विरहित नितांत प्रेम करावं..! अर्थात स्वभावाला अनुरूप किंवा त्याच्या आसपास कुणी असेल तरच त्याचा आनंद घ्यायचा आनंद काही औरच असतो..! नाही कुणी असा भेटला तर.. चला पुढे...गुपचूप..! "


माझी काहीही ओळख...ना...पाळख...असलेल्या भौगोलिक परिसरात..म्हणजेच अंधारी हायस्कूल येथे बदली झाली अन् हुरहूर होती...दररोजच्या प्रवासात कुणीतरी... " आपलं " भेटेल का... याची..! पण माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात पदोपदी नियतीने असे कित्येक माणसं पाठवून दिले अन् मला पुन्हा आयुष्यात नवीन माणसं सामील करायला अजून एक दार उघडून दिले..!


डॉ.योगेश राजपुत सर..!

मला अंधारी च्या प्रवास मार्गावर भेटलेले अतिशय गोड स्वभावाचे व्यक्तिमत्त्व..! एकदम जमिनीवर वर्तन असलेला हा माणूस..! वास्तविक डॉ.योगेश राजपुत सर क्लास टू दर्जाचे वैद्यकीय अधिकारी आहेत; पण या माणसाला त्या पदाचा व विद्वत्तेचा अजिबात गर्व नाही.आणि असली माणसं मला जाम आवडतात.


एकदा आमची बस फुलंब्री येथे बंद पडली होती.आम्ही सर्व प्रवासी खाली उतरून बस ला दे धक्का देऊ लागलो..तर..डॉ.साहेब हे पदाचा अहंकार मनात न आणता ते ही दे धक्का देऊ लागले होते. नाहीतर आजकालची नवीन पिढी...यांचं सगळचं कसं टाईट.. फिट..कडक इस्त्री चा मामला. नुसती याला..त्याला वाकड्यात घुसून अक्कल पाजळणारी..! पण डॉ.योगेश राजपुत त्याला नक्कीच अपवाद आहेत.


मागे एकदा एका आंदोलनाच्या दरम्यान सर्व बस बंद होत्या. डॉ.योगेश राजपुत सर मला स्वतः फोन करून विचारायचे...

" सर,तुम्ही आता कुठे आहात..? आज बस बंद आहेत चला माझ्या गाडीवर जाऊया..!" 

एवढं आत्मीयतेने संवाद साधून आपलंस करणारा ग्रेट माणूस..!

डॉ. योगेश राजपुत यांच्यात अन् माझ्यात आठवड्यातून बहुतेक वेळा सध्याच्या..पूर्वीच्या...अन्...भविष्यात होऊ पाहणाऱ्या अनेकानेक चर्चेच्या मैफिली होतात. पण त्या पोरकट अन् माझंच खरं या श्रेणीतल्या कधीच नसतात. असतात..प्रगल्भ विचाराने सजलेल्या..! प्रगल्भ विचाराने सजलेला खूप चांगला माणूस..खूप छान नवीन मित्र..!


आज माझ्या या नवीन आदरणीय मित्राचा जन्मदिन आहे..!

खूप खूप शुभेच्छा डॉ.साहेब..!


ता.क.: डॉ.साहेब, उद्या कोणत्या बसने जायचे आहे..?😊


वंदे मातरम्..!


डॉ.योगेश राजपुत यांचा प्रवासी मित्र: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १/११/२०१८

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

शरदाचे चांदणे..!









 



चिंतन ©️


शरदाचे चांदणे..!


आयुष्यात काही माणसं अमावस्येच्या अंधार रात्री सारखी भेटली. त्यांनी अंधार अन् त्यातून  स्वतः चे उध्वस्त  होणारे आयुष्य  शिकवलं.


आयुष्यात काही माणसं अशीही भेटली जी चंद्राच्या शीतल छायेत स्वतः चे देहभान हरपून स्वतः चा अन् आपल्या भावोत्कट मनाचा विकास करायला त्यांनी शिकवलं..!


शेवटी,आनंदाचे अन् माणसाच्या मनाचे नाते तरी काय असते हो..?

आनंद अन् मन या दोन्हीत दृढ भाव असतो तो भावूक मनाचा अन्  त्या भावूक विश्वात सापडलेल्या निर्मळ मनाचा.


निर्मळ मन, असे कुठेही अन् कुणालाही भेटत नसते.त्यासाठी स्वतः ला, स्वतः विषयी अत्यंत प्रामाणिक अन् कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल प्रकाशमय असावे लागते.


शरदाच्या शीतल चांदण्यात आपलं मन , दुधाच्या मधुर चवी सारखे अन् खडी साखरेच्या पाकात भिजून जाणारे बेभान होणारे असावे लागते.


मनात असणारी न्यूनता अन् त्यातून निर्माण होणारी मानवी उद्विग्नता का होते समजावून सांगण्यासाठी अन् समजून घेण्यासाठी आपल्यातली आपली आई सदैव जिवंत असावी लागते.


मनाची अन् भावनेची देवता अशीच एकमेकांच्या हातात हात धरून आयुष्याचा प्रवास करत असते.

त्या प्रवासात त्यांच्या सोबत असते ती शरदाच्या चांदण्यातील शीतलता  अन् कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाची मधुरता.


असो, आज शरदाच्या चांदण्यात न्हावून निघणारी कोजागिरी पौर्णिमा आहे. ज्यांचं मन आपल्या आई सारखं प्रेमळ अन् निर्मळ आहे त्यांना आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल अन् दुधात विरघळलेल्या खडी साखरे सारख्या गोड गोड शुभेच्छा..!😊🌹🙏🏻


ता. क. - वरील लेखन गद्य आहे की पद्य हे ज्याने त्याने आपापल्या परीने ठरवावे अन् वाचनाचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच्या गोड गोड दूधा सारखा आनंद मानून घ्यावा.


सदरील दुधाचा फोटो, हरिद्वार येथील एका दुग्धालयातील आहे. मी स्वतः क्लिक केलेला आहे.


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २८/१०/२०२३, शनिवार, ( कोजागिरी पौर्णिमा)

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

आम्ही बॅक बॅंचर..!😊


 


मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


आम्ही बॅक बॅंचर..!😊


===============================


मला वैयक्तिक प्राथमिक, माध्यमिक अन् उच्च शिक्षण घेत असताना जो आनंद बॅक बॅंचर म्हणून लाभला तो आनंद त्या त्या कालखंडात पुढे अथवा मध्यभागी बसून लाभला नाही. बॅक बॅंचर म्हणून काहीतरी ग्रहण करणे सर्वार्थाने सहज अन् सोपे जाते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझ्या माध्यमिक वयोगटातील वर्गात शिक्षण घेत असताना जे काही मोजके जिवलग बॅक बॅंचर बालमित्र होते, त्यात प्रामुख्याने भागिनाथ गोरे, आण्णासाहेब म्हस्के, शेख खाजा बागवान, स्व.शाम शेळके , संताराम काळे ( खिर्डीकर ) ,काकासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर घेर अन् लक्ष्मण बोरसे. ( हे तिघेही रा.जळगाव ता. वैजापूर ) लक्ष्मणला आम्ही ' लखु ' या नावाने उल्लेखित करत असायचो.अर्थात आजही त्यात बदल झाला नाही. याचा अर्थ आमच्या वर्गात पुढे बसणारे चांगले नव्हते असे अजिबात नाही.ती सर्वजण खूप चांगली मित्र मंडळी होती अन् आहेत.पण माझ्या मते बॅक बॅंचर मध्ये जी मज्जा असायची ती इतरत्र आयुष्यात लाभली नाही अन् आजही लाभत नाही हा माझा स्वानुभव आहे.


लखु तसा मूळचा पळसवाडी, ता. खुलताबाद येथील राहणारा.पण मामाच्या गावाला म्हणजेच जळगाव ता. वैजापूर राहायला होता.मामा तरी कोण..? त्याच्याच वयाचा अन् आमचा वर्गमित्र ज्ञानेश्वर घेर..! दोघेही मामा भांजे जळगावहुन पायी तर कधी सायकल वर पालखेड येथे माध्यमिक शाळेत येत असत. 


वर उल्लेखित केलेली भागिनाथ गोरे, आण्णासाहेब म्हस्के, शेख खाजा बागवान, स्व.शाम शेळके , संताराम काळे ( खिर्डीकर ) ,काकासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर घेर अन् लक्ष्मण बोरसे. लक्ष्मण बोरसे अन् मी स्वतः ( बॅक बॅंचर मधील अजून कुणी राहिले असेल तर, कुणीतरी सांगा रे भो..! ) आम्ही निदान वर्गात बसताना अन् मैदानावर हिंडताना सोबत असायचो. वर्गातील इतरही जिवलग मित्र मंडळी होती,पण ती नेहमी पुढे किंवा मध्यभागी बसत असायची.त्यामुळं बॅक बॅंचर म्हणून अध्ययन करताना अन् कुणीतरी शिक्षकाने अध्यापन करत असताना जो आनंद घेता यायचा तो आमच्या पुढच्यांना मिळत नसे.त्यावर आनंददायी हक्क आमचाच असायचा असे वाटायचे. आता बॅक बॅंचर म्हणून असा कोणत्या मुलखाचा आनंद मिळायचा याचा अनुभव जे कुणी बॅक बॅंचर म्हणून विद्यार्थी दशेत आयुष्य जगले त्यांनाच ठाऊक..! तो आनंद आम्हा बालमित्रांपैकी एकाने भूगोलाच्या पुस्तकात शोधला. नव्हे नव्हे भूगोलाचे पुस्तक आनंद निर्मितीचे उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य होते हे आमच्या तत्कालीन वर्गातील फारच कमी मित्र जाणून होते. वर्गात फरशीवर खाली बसून आम्ही आमचं पौगंडावस्थेतील हळुवार वय जगलो. अर्थात पौगंडावस्थेतील हळुवार वय जगत असताना वर्गातली सगळी मित्र मंडळी कुणालाही नाहक उपद्रव होणार नाही या अर्थाने पोटभरून जगली यात तिळमात्र शंका नाहीच..! त्यात खोडकरपणा असायचा,पण उपद्रवी मूल्य नसायचे.


लक्ष्मण पाटील बोरसे उपाख्य लखु आज बजाजनगर येथे स्वयंपाकाच्या विविध संसाधनासह एक उत्कृष्ट आचारी अन् मंडप असलेलं भांडवल सांभाळून आपलं कौटुंबिक आयुष्य सुखाने जगत आहे. आम्ही काही वर्षापूर्वी आमच्या वर्गमित्रांचे जे स्नेह मिलन पालखेड येथील महादेवाच्या मंदिरात आयोजित केले होते, त्यावेळी लखु आपल्या संपूर्ण कुटुंबासह आवर्जून उपस्थित होता. आम्ही जो आमच्या वर्गातील मित्रांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता, त्याचा पहिला निकष हाच होता की, जे कुणी वर्गातील बॅक बॅंचर म्हणून आयुष्य जगले होते, त्यांना पहिलं हक्काचे अन् आग्रहाचे सह परिवार उपस्थित राहण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते. विशेष म्हणजे सर्वजण आपापल्या कुटुंबासह त्यावेळी उपस्थित राहिले होते.


आयुष्याची दोरी हळूहळू आपला पीळ ढिला करत चालली आहे. प्रत्येक दिवस येतो अन् असाच निघूनही जातो.त्या प्रत्येक दिवशी आपल्या गतकाळातील आठवणी आपल्या वर्तमानात आपल्या आयुष्यात भेटलेल्या प्रवाशांच्या सोबत व्यतीत होऊन निघून जात आहेत. पाठीमागे उरतो तो फक्त आणि फक्त सहवासातील सुखद अनुभव..! आम्ही कसे होतो अन् आम्ही सध्या काय आहोत हे आमच्या आम्हालाच माहीत. आम्हाला बॅक बॅंचर म्हणून जगण्यात जो आनंद आयुष्यात लाभला तो आज आयुष्याच्या पुढ्यात येऊन आपल्या आठवणींना उभा करत असतो. कोणत्याही क्षेत्रात मुळात बॅक बॅंचर म्हणून जगत असताना ग्लॅमर भेटलेले नसते. मात्र त्याच बॅक बॅंचर या ठिकाणी सर्वात पाठीमागे बसून आपल्या पुढच्यांचे निरीक्षण, अवलोकन करून स्वतः मध्ये थोडेफार आत्मचिंतन करण्याचं अगदी थोडेफार का होईना ज्ञान प्राप्त होते हा माझा स्वानुभव आहे.


असो, मित्रा लखु, भेटत राहू..! त्याचं बॅक बॅंचर म्हणून असलेल्या अनौपचारिक नात्याने..! कारण त्यात कोणत्याही प्रकारचे ग्लॅमर नसते.


ता.क. - लखुशी कुणाला त्याच्या कौशल्याच्या बाबतीत सेवा म्हणून संपर्क करायचा असेल तर आमच्या फोटोच्या मागे भिंतीवर त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला आहे. झूम करून बघा..!


वंदे मातरम्


एक बॅक बॅंचर - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २५/१०/२०२३, बुधवार.

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

देवभूमी भाग क्रमांक ८





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ८ )

===================================

केदारनाथ पर्वत रांगेत असलेली शांतता अन् कडाक्याची शीतलता मनाला अन् शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. आम्ही नंदी बेस कँप सोडून बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने निघालो होतो.आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते.साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर बाबा केदारनाथ मंदिर होते. परिसरातील शांतता मनाला अन् त्याच परिसरात हिमालयाच्या उत्तुंग थंडगार शिखरांमूळे,त्यातल्या गारव्यामुळे निर्माण झालेली शीतलता शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. चालण्याचा वेग मंदावला होता.मात्र ज्याच्या दर्शनाची ओढ लागलेली होती, ती ओढ अंगात बळ निर्माण करत होते. कुणाच्या विषयी असलेली ओढ आपल्या मनाला अन् शरीराला अजुन टवटवीत अन् तरतरीत करते याची अनुभूती येऊ लागली होती. मनाच्या संवेदना जागृत असलेल्या माणसाला कुणाच्या विषयी लागलेली ओढ, आपल्या ध्येयाकडे ओढीत नेते हा आत्मिक अनुभव यायला लागला होता. ओढ असल्याशिवाय प्रेमाची, अध्यात्माची अन् आत्मिक आनंदाची अनुभूती येत नाही. यातील अध्यात्मातील आत्मिक आनंदाची अनुभूती घेण्यासाठी आमची पावलं दिनांक २० मे २०२३ रोजीच्या संध्याकाळी केदारनाथ मंदिराच्या दिशेने झपझप पडू लागली होती.

आजूबाजूला भाविकांची पायी वर्दळ दिसू लागली होती. आम्ही आमच्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या भयंकर थंडीचा अनुभव घेत होतो. उजव्या ,डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा उत्तुंग पर्वत येणाऱ्या भाविकांच्या स्वागताला नम्रपणे उभा आहे असा भासू लागला होता. संपूर्ण दिवसभर केदारनाथ घाटी चढल्यामुळे पायात खूप थकवा आलेला होता, पण आता त्याच थकव्याला आजच्या शेवटाकडे आम्ही घेऊन चाललो होतो.रस्ता सपाट होता.हळूहळू दुरून बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. मंदिराचा परिसर नजरेच्या टप्प्यात येऊ लागला होता.बाजूला खळखळ वाहणारी मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता. आम्ही दर्शनाचे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले होते , त्याची पावती त्याच परिसरात असलेल्या एका कँप मध्ये दाखवली अन् पुढे मुख्य मंदिर परिसरात जाण्यास परवानगी मिळाली होती.छोटासा पुल ओलांडून आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेशित झालो होतो.

आयुष्यात जे स्वप्न माझ्या बालपणी , पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. आयुष्यात कधीतरी एकदा बाबा केदारनाथाचे दर्शन घेईल हे साधे भोळे स्वप्न उराशी बाळगून या क्षणापर्यंत आयुष्याची वाटचाल सुरू होती. बाबा केदारनाथ मंदिर परिसरातील जो सपाट जमिनीचा भूभाग होता तो आता आला होता.मी पायातील बुट बाजूला काढले अन् बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर माझे मस्तक श्रद्धेने टेकवले अन् आपोआप माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.काही क्षण  त्याच  नतमस्तक  अवस्थेत एकचित्त होतो. माझ्या बाजूला उभे असलेले आमची दोन्ही मुलं अन् माझी पत्नी यांनी देखील श्रद्धेने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर आपापले मस्तक श्रद्धेने टेकवले होते. काही वेळाने मी माझे मस्तक बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने केले अन् पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझ्या पत्नीने मला सावरले होते.तिलाही माझ्या डोळ्यातील श्रद्धेय अश्रूंचा अंदाज आला होता.ती देखील गहिवरुन गेली होती. आपण आपल्या आयुष्यात जे स्वप्न बघत असतो,ते जेंव्हा मोठ्या मेहनतीने साकारले जाते तेंव्हा डोळ्यातून येणारे अश्रू त्याच अमृताचे जलकण असतात, जे विधात्याने भूतलावर पाठवलेले असते. मी माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच या पवित्र अन् श्रद्धेय भावूक अनुभवांचा अनुभव घेत होतो. माझे स्व.आई - वडील स्वर्गवासी झाल्यानंतर ज्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते, ते अश्रू अन् आज या क्षणी बाबा केदारनाथाच्या पायरीवर मस्तक ठेवल्यावर डोळ्यात आलेले अश्रू माझ्यातील आत्म्याला अनेक आठवणीत घेऊन गेले होते. अश्रू तेंव्हाच डोळ्यात येतात, जेंव्हा काहीतरी श्रद्धेय दिसणाऱ्या चैतन्याला आपण बघत असतो किंवा पुन्हा कधीही न दिसणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रेमळ चैतन्याला आपण आठवून जाणून घेत असतो. याक्षणी माझ्या डोळ्यातील अश्रू हे माझ्या समोर जे चैतन्यमय बाबा केदारनाथाचे शिवालय दिसू लागले होते त्यामुळं येऊ लागले होते.मला हा असा अनुभव यापूर्वी अनेक देवस्थानांचे दर्शन घेतले पण त्यावेळी आला नव्हता. माझ्या पत्नीने अन् मुलांनी मला त्या श्रद्धेय भावूक प्रसंगातून सावरले अन् आम्ही थेट मंदिराच्या अगदी जवळील परिसरात गेलो.

सूर्य कधीचाच मावळला होता.मात्र हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या उजेडात अजूनही आजूबाजूला पुसटसा उजेड जाणवत होता. बाबा केदारनाथाला अर्पण करायचे पूजेचे सामान परिसरातील दुकानातून खरेदी केले. आमच्या पायातील बुट त्याच दुकानदाराच्या दुकानात बाजूला काढून ठेवले अन् दर्शनाच्या रांगेत थेट सर्वात मागे जाऊन उभे राहिलो होतो.आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. हिमालयाच्या कुशीत असलेली अतिशय क्रूर, हो क्रूरच..! अतिशय क्रूर थंडी शरीराला थिजून टाकू लागली होती. काहीवेळ अनवाणी पायांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो पण पाच सहा मिनिटांनी  पायाखालील अतिशय थंडगार जमिनींचे थंडगार चटके तळपायाला बसू लागले होते.आयुष्यात चटका अन् उष्णता हे समीकरण अनुभवलेले होते,पण आज पहिल्यांदाच थंडीमुळे देखील चटका बसू शकतो याचा अनुभव येऊ लागला होता. मी आमच्या समोरील रांगेत उभे  असणाऱ्या बऱ्याच भाविकांच्या पायात बुट घातलेले बघत होतो.मी चि. नमन यास सांगितले की, आपण ज्याठिकाणी आपले बुट काढून ठेवलेले आहेत तिथून ते घेऊन ये.पायात बुट घातले तरच आपल्याकडून पुढे चालणे शक्य होईल.नसता नाही..! दोन्ही मुलं पुन्हा मुख्य मंदिराच्या परिसरात गेले अन् त्या दुकानाच्या ठिकाणाहून आमचे बुट घेऊन आले.आम्ही सर्वांनी पायात पुन्हा बुट घातले अन् याचं दर्शनाच्या रांगेत थेट मंदिराच्या अलीकडे बुट काढून पुढे अनवाणी पायांनी जाण्याचे ठरवले.

दर्शनाच्या रांगेत उभे असणाऱ्या सर्वच भक्तांना थंडीने गारठून टाकले होते.आम्ही दर्शनाच्या रांगेत संध्याकाळी सव्वा सहा वाजता उभे राहिलो होतो.हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो. उभे राहून राहून पायात गोळे येऊ लागले होते.पहाटे साडे तीन ते या क्षणापर्यंत सरासरी उभेच होतो.फक्त साधारणतः एक तास आराम केला होता. प्रचंड चढणीच्या प्रवासामुळे पायात त्राण उरले नव्हते,पण बाबा केदारनाथाच्या ओढीने ते त्राण पळून जात होते.आभाळातून अधून मधून पाण्याचे अतिशय थंडगार थेंब अंगावर पडत होते.दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था नव्हती,त्यामुळे उभे राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता रात्रीचे आठ वाजले होते.संध्याकाळच्या सव्वा सहावाजे पासून आम्ही उभेच पुढे पुढे दर्शनाच्या रांगेत सरकत होतो. रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास आम्ही अगदी मुख्य मंदिराच्या जवळ आलो होतो.पायातील बुट बाजूला काढले अन् हळूहळू पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो.

रात्रीच्या सव्वा नऊ वाजता आम्ही बाबा केदारनाथाच्या‌ मुख्य दरवाजात पाऊल ठेवले अन् एक वेगळ्याच शाश्वत अनुभूतीची जाणीव झाली. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या वास्तूची,मंदिराची उभारणी या अतिशय दुर्गम भागात केली होती तिथं पाऊल ठेवताच त्या आपल्या पूर्वजांना अंतर्मनातून साष्टांग दंडवत केला. काय असतील ती माणसं, ज्यांनी बाबा केदारनाथाला या हिमालयाच्या अतिशय दुर्गम भागात सुरक्षित केले होते. महादेवाला सुरक्षित करणारे ते कोण..? कारण तोच महादेव सर्वांना सुरक्षित ठेवतो.पण भाबडी समजूत सहज मनात आली होती. भाविकांच्या गर्दीने बाबा केदारनाथ मुख्य मंदिर फुलून गेले होते. आतमध्ये पाच पांडवांच्या क्रमवार मूर्ती होत्या.जे पांडव बाबा केदारनाथाच्या अस्तित्वाला निमित्त ठरले होते ते त्याच बाबा केदारनाथाच्या मुख्य मंदिरात श्रद्धेने विराजमान झालेले होते. वैराग्याच्या भेटीला, मानव जातीचा प्रतिनिधित्त्व करणारा माझ्या सारखा, माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखा अतिशय क्षुल्लक भक्त बाबा केदारनाथाच्या समोर आला होता.उत्पत्ती स्थिती अन् लय हे या सजीव सृष्टीचे कधीही न संपणारे चक्र..! त्यापैकी लय अर्थात मृत्यू जो की , शाश्वत सत्य आहे त्याचा स्वामी बाबा केदारनाथाच्या, भोलेनाथाच्या सानिध्यात आम्ही पोहोचलो होतो.एकटक बघत बघत डोळ्यात बाबा केदारनाथाला साठवून घेतले. दर्शन रांगेत उभे होतो तेंव्हा पासून जो मंत्र घोष अंतर्मनात सुरू होता त्याचे सार्थक आत्मिक समाधान लाभले होते.मनातून केलेले समर्पण आत्मिक आनंद देऊन गेले होते. 

मानवी संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मानव जातीला ज्याने माणूस म्हणून जगायला शिकवले होते तो शिव शंकर..!
 माणसाच्या आयुष्यात जसा जन्माचा आनंद व्यक्त केला जातो, अगदी त्याच मानवाच्या आयुष्यात चिरंतन शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूची जाणीव करून देणारा शिव शंकर..!
 मानवाच्या आयुष्याच्या प्रवासातील अंतिम ठिकाण स्मशान भूमी अन् तिथला स्वामी शिव शंकर..! 
तुम्ही कोण कुठले का असेना, शेवटी तुम्हाला माझ्या दरबारात यावेच लागेल,त्या दरबाराचा स्वामी शिव शंकर..!
 बुध्दी थकल्यावर अध्यात्माचा प्रांत सुरू होतो.त्या अंतिम प्रांताचा स्वामी शिव शंकर..! 
माझ्या, तुमच्या ,सर्वांच्या आयुष्याचा अंतिम साक्षीदार बाबा केदारनाथ महादेवाचे आम्ही नतमस्तक होऊन दर्शन घेतले अन् थोडेसे बाजूला झालो. मी यापूर्वी  वेरुळ येथे अनुष्ठान केले होते. त्यावेळी जप करण्यासाठी जी रुद्राक्ष माळ उपयोगात आणली  होती ती बाबा केदारनाथ गर्भगृहात असलेल्या पुजारी यांना विनंती करून तिथल्या श्रध्येयांना स्पर्श करून द्यायला सांगितली.त्यांनी माझी नम्र विनंती ऐकली. पवित्र स्पर्श झालेली रुद्राक्ष माळ पुन्हा मला तिथल्या पुजाऱ्यांच्या मार्फत परत मिळाली अन् आम्ही बाबा केदारनाथाच्या मंदिरातून बाहेर पडलो. आता रात्रीचे दहा वाजले होते.बाहेर येताच अतिशय थंडीमुळे दातावर दात आदळायला सुरुवात झाली होती.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २४ ऑक्टोंबर २०२३, मंगळवार ( विजयादशमी )

क्रमशः



 

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

पार्थिवन की लिओ दास..?


 


चिंतन ©️


पार्थिवन की लिओ दास..?


=================================


आपला क्रूर बाप अन् आपल्या त्याच क्रूर बापाचा भाऊ यांचा काळाकुट्ट भूतकाळ..!

त्याचं काळाकुट्ट भूतकाळातील आपलं क्रूर आयुष्य..!

काळाच्या ओघात आपला क्रूर भूतकाळ विसरू पाहणारा लिओ दास..!

वर्तमानात आपल्या छोट्याश्या लेकीवर निस्सीम प्रेम करणारा बाप..!

वर्तमानातील आपलं कुटुंब अन् त्याची जबाबदारी पार पाडू पाहणारा कुटुंब प्रमुख..!

भूतकाळातील क्रूर आयुष्य जगून वर्तमानात सज्जनतेचे आव आणून जगू पाहणारा कुटुंब प्रमुख..!

मात्र तो क्रूर भूतकाळ वर्तमानकाळात पिच्छा न सोडणारा..!

तो क्रूर भूतकाळ वर्तमानकाळात वेळोवेळी भेटत असतो अन् त्यात ससेहोलपट होते ती वर्तमानातील कुटुंबाची..!

थलपती विजयने लिओ दास चांगला सादर केला आहे. 


कैथी अन् त्यातला डिल्ली, 

विक्रम अन् त्यातला रोलॅक्स

अन् आता लिओ ,त्यात भेटणारा कैथी मधील पोलीस हवालदार अन् सर्वात शेवटी पुन्हा भेटणारा विक्रम...! हेच तर वैशिष्ट्ये आहे, दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या चित्रपटांचे..! प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रत्येक चित्रपटात कुठे ना कुठे तरी भेटून आपला संदर्भ अधोरेखित करून जाते..! काही चित्रपट हे त्या त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसाठी बघायचे असतात.त्यापैकी लोकेश कनगराज हे एक आहेत.


लोकेश कनगराज यांच्या आता पर्यंतच्या प्रत्येक चित्रपटातलं वैशिष्ट्ये म्हणजे त्यातलं क्रौर्य, त्यातील क्रूर व्यक्तिरेखांची क्रूरता, व्यक्तीरेखांचा संशयास्पद वावर अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅक ग्राउंड संगीत..! बॅक ग्राउंड संगीत हा लोकेश कनगराज यांच्या प्रत्येक चित्रपटाचा आत्मा आहे.लिओ मध्ये देखील बॅक ग्राउंड संगीताचा प्रभाव चित्रपटाच्या अगदी सुरुवाती पासून ते अंतिम क्षणापर्यंत दिसून येतो.


लिओ चित्रपटातील बरीच दृश्ये ही क्रुरतेचा कळस आहेत.अंगावर येणारी आहेत.बहुदा त्यामुळं हा चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे असं वाटतं.


दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ज्या प्रकारे अंडरवर्ल्डचे क्रूर आयुष्य आपल्या विविध चित्रपटाच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारे सादर केले आहे.अगदी त्याच प्रकारे ड्रग, अमली पदार्थ आणि त्या विश्वातील क्रूर आयुष्य दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या प्रत्येक चित्रपटात बघायला मिळते. विजय द मास्टर, कैथी, विक्रम अन् आता लिओ हे चित्रपट त्याचे उत्तम उदाहरणे आहेत. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाचे चाहते असणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी लिओ बघायला हरकत नाही.


ता.क. - समाजातील बरीच माणसं आपलं वर्तमानातील आयुष्य जगत असताना पार्थिवन की लिओ दास..या द्विधा मनःस्थितीत जगत असतात. क्रूर अन् दुसऱ्याला वेदना देणारा भूतकाळ हा वर्तमानकाळासोबत सतत वावरत असतो. त्यापासून कुणाचीही सुटका नाहीच..! 

हाच लिओ आहे..!


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २०/१०/२०२३, शुक्रवार.

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ७ )





 



मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ७ )

===================================

दिनांक २० मे २०२३ शनिवार रोजी हिमालयातील केदारनाथ पर्वत रांगेतील केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या खडतर प्रवास रस्त्याच्या चढाई असलेल्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आता चढाई करू लागलो होतो. काही वेळापूर्वी दुपारी दीड वाजता राजस्थान मधील भेटलेल्या आजीच्या रुपात एक ऊर्जेचा स्रोत भेटला होता. त्यामुळं शरीर जरी थकले असे जाणवत होते,मात्र मन ऊर्जेच्या प्रवाहात पुढे पुढे जा असे म्हणू लागले होते. आयुष्यात भेटलेल्या अशा अनेक ऊर्जेच्या स्रोतांचा आपल्या आयुष्यात प्रेरक शक्ती म्हणून उपयोग होऊन पुढे मार्गक्रमण करण्यास उपयोग होतो हे जाणवायला लागले होते.वरतून येणाऱ्या खेचर घोड्यांची वर्दळ प्रचंड वाढली होती. त्या प्रचंड वर्दळीचा मोबाईल मध्ये फोटो काढावा असे वाटले,पण मोबाईल हातात धरून फोटो क्लिक करायला जागा उपलब्ध होत नव्हती. जरी यदा कदाचित फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता, तर मोबाईल त्या गर्दीत कुणाचा तरी धक्का लागून खाली पडण्याची पुरेपूर खात्री होती. खिशातला मोबाईल हातात घ्यायला गेलेला हात पुन्हा हातातल्या काठीवर आला होता.

आता काहीसा सपाट जमिनीचा भूभाग लागला होता.आम्हा सर्वांना खूपच दम लागला होता.मात्र घाम येत नव्हता.घाम येणार तरी कसा..? अतिशय कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती.पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून निघाल्या नंतर पहिल्यांदाच सपाट जमिनीचा भूभाग दिसू लागला होता.समोर खेचर घोड्यांची खूप गर्दी दिसू लागली होती. खेचर घोडे अन् त्यांना सोबत घेऊन ने आण करणारे माणसं यांनी तिथला परिसर फुलून गेला होता.घोडा पडाव नजरेच्या समोर होता. हुश्श..! म्हणून आम्ही काही क्षण तिथं उभे राहिलो. जास्त वेळ तिथं थांबून जमणार नव्हते.नियोजित स्थळी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते.आता दुपारचे दोन वाजून दहा मिनिटे झाली होती.मागील थांब्याच्या  ठिकाणाहून साधारणतः दुपारी पावणे दोन वाजता सुरू केलेला पायी प्रवास घोडा पडाव पर्यंतचा खूपच चढणीचा दुपारच्या दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत अखंड सुरू होता.गौरी कुंड येथून पहाटे पाच वाजता सुरू केलेल्या प्रवासापासून ते घोडा पडाव पर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात केलेल्या प्रवासांपैकी शेवटचा टप्पा जास्त वेगात पार पडला होता.आम्ही नंदी बेस कँप येथे पोहोचलो होतो.ज्या स्थळी मुक्कामी थांबायचे होते तिथं चौकशी केल्यानंतर आम्हाला आमच्या नियोजित तंबूच्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी पोहोचून दिले. नंदी बेस कँप मधील तंबूत पोहोचल्या बरोबर आम्ही चौघांनी आपापल्या जागा ताब्यात घेतल्या. तिथल्या विभागातर्फे तंबूत एकूण दहा जणांच्या मुक्कामाची सोय होती. कडक स्पंज असलेली गादी अन् अंगावर घ्यायला उबदार वाटणारी, मात्र प्रत्यक्षात प्रचंड थंडगार असलेली पिशवी प्रत्येकाला मिळालेली होती. या अंथरूण पांघरूणाने आपल्याला उब मिळेल यावर माझा विश्वास बसेना.त्याचं कारण असलेली कडाक्याची थंडी अन् अतिशय थंडगार पडलेले अंथरूण पांघरूणाचे कपडे..! रात्र थंडीच्या वैऱ्याची होणार याची जाणीव झाली होती.अंगावर जे घ्यायचे होते,ती एक प्रकारची पिशवीच होती. आपले पाय अगोदर त्यात टाकायचे, मग शरीराचा उर्वरीत भाग हळूहळू त्यात ढकलायचा अन् मग आपल्या चेहऱ्याच्या जवळ येणाऱ्या त्या पिशवीच्या चैनीने पूर्ण डोक्या पर्यंत ती पिशवी बंद करायची.अशी एकंदरीत पांघरुण घेऊन झोपायची सोय झालेली होती. अतिशय थंड प्रदेशात आपल्या भारतीय सैनिकांना या अशाच पांघरूण घेणाऱ्या कपडयांची सोय केलेली असते असे तिथल्या व्यक्तीने सांगितले. आम्ही नंदी बेस कँप मधील तंबूत बरोबर दुपारच्या 2:28 वाजता पोहोचलो होतो. पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेला पायी प्रवास दुपारच्या दोन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत झाला होता. म्हणजेच नऊ तास अठ्ठावीस मिनिटं एवढा एकूण वेळ आम्ही हिमालयातील पर्वत रांगा चढत चढत नंदी बेस कँप पर्यंत आलो होतो. मी माझ्या मोबाईल मधील स्टेप्स counting म्हणजेच आपण किती पावलं चाललो आहोत याची सेटिंग गौरी कुंड येथून निघतानाच सुरु केलेली होती. पाऊल क्रमांक एक पासून सुरू झालेला पायी प्रवास केदारनाथ मंदिर परिसरातील नंदी बेस कँप पर्यंत  33,667  एवढ्या पावलांचा झाला होता. गौरी कुंड ते नंदी बेस कँप पर्यंत एकूण अंतर जवळ जवळ वीस किलोमिटर आहे. नंदी बेस कँप पासून बाबा केदारनाथ मंदिर अजून दोन किलोमिटर अंतरावर होते.

थोरला चिरंजीव नमन याने तंबूत पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या पाठीवर असलेली वजनदार सॅक बॅग पहिली खाली टाकली.आम्हा चौघात सर्वात जास्त त्रास त्याला झाला होता,पण त्याने तो व्यक्त केला नव्हता.आता मात्र त्याने त्याच्या पाठीवरचे ओझे उतरवून तो त्याच्या गादीवर बसला होता. धाकटा चिरंजीव नयन मात्र फारसा थकल्याचे दिसत नव्हता.मी अन् माझी पत्नी मात्र खूप थकलो होतो.मी सर्वांना सांगितले की, " आपण एक  तास आराम करणार आहोत. आराम झाल्यानंतर एक तासानंतर बाबा केदारनाथ महादेवाच्या दर्शनाला जाणारा आहोत.आता पटकन झोपून घ्या..!" माझ्या सांगण्याकडे फारसे कुणीच गांभीर्याने बघत नव्हते.मी सर्वांची मानसिकता ओळखली होती.सर्वांच्या मानसिकतेत मला एकच उत्तर जाणवले होते की, " आता कुठं आम्ही पोहोचलो आहोत अन् यांचं  झालं पुन्हा  सुरू पुढील प्रवासाचे..! " मात्र मला पुढील नियोजित नियोजन सांगणे आवश्यक होते अन् ते मी माझे काम केले होते. त्याचं कारण केदारनाथ मंदिर परिसरातील हवामान कधी बदलेल याचा काहीच नेम नव्हता.त्यामुळं जेंव्हा सुरळीत हवामान मिळेल तेंव्हा बाबा केदारनाथाचे दर्शन घेणे अत्यावश्यक होते. वेळ, परिसर  अन् परिस्थिती  बघून काही निर्णय घ्यावे लागतात याची जाणीव असल्याने माझे कर्तव्य मी केले होते. काही वेळातच दोन्ही मुलं थंडगार असलेल्या उबदार पिशवीत शिरून झोपी गेली होती. खूपच कडाक्याची थंडी पडलेली होती. पहाटे साडे तीन वाजता आम्ही उठलेलो होतो. डोळ्यावर आता झापड यायला लागली होती. कधी डोळा लागला कळलेच नाही.

दुपारी तीन वाजता आम्ही झोपी गेलो.शांत झोप कशाची येते..? खूपच कडाक्याच्या थंडीमुळे अधून मधून जाग येत होती.अखेर दुपारी चार वाजता मी सर्व प्रथम झोपेतून उठलो.क्रमवार इतरांना उठवले. साडे चार वाजता आम्ही नंदी बेस कँप परिसर मधून बाहेर पडलो होतो.बाहेर आल्या बरोबर अतिशय थंडगार वारा अंगाला स्पर्श करून शरीर थिजून टाकू लागला होता.बाहेर आल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतली.थोडेसे कोमट असलेले पाणी संबंधित दुकानदारांकडून खरेदी केले होते.८०₹ ला एक लिटर पाण्याची बाटली होती.त्याच दुकानात आमच्या बाजूला उभा असलेला एक पुरुष संबंधित दुकानदाराशी गरम पाण्याच्या भावावरून हुज्जत घालू लागला होता.त्या दुकानदाराने थेट सोनप्रयागहुन इथपर्यंत अतिशय उंच पहाड चढून विविध वस्तू  आणण्याच्या त्रासाबाबत अन् भाडे बाबत संबंधित वाद घालणाऱ्या व्यक्तीला परिस्थिती समजावून सांगितली होती.तरी देखील तो व्यक्ती वाद घालतच होता.मला त्या वाद घालणाऱ्या व्यक्तीचा खूप राग आला होता. या दुकानदारांना कोणत्या परिस्थितीत, किती खडतर प्रवास करून तेही कुणाच्यातरी किंवा स्वतः च्या अंगाखांद्यावर विविध वस्तू दुकानात विक्री करायला ठेवाव्या लागत होत्या. सोनप्रयाग किंवा उत्तर काशी येथून खूप उंचावर असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरात विविध वस्तू दुकानात विक्रीला ठेवणे  याचा प्रवासाचा खर्च खूप होता.तो खर्च संबंधित दुकानदार काढून घेणारच होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या उंचीवरील भौगोलिक प्रदेशात आपल्याला काही जीवनावश्यक वस्तू मिळत होत्या हे खूप महत्त्वाचे होते. समोरचा दुकानदार कोणत्या परिस्थितीत आपली सेवा करत आहे किंवा आपल्याला सुविधा पुरवत आहे याची जाणीव निदान केदारनाथ यात्रेतील  सर्व प्रवाश्यांनी तरी ठेवायला हवी असे मला वाटते. माझ्या मते केदारनाथ यात्रेला येणाऱ्या सर्वांनी आपलं व्यावहारिक ज्ञान किंवा आपली व्यावहारिक अक्कल मैदानी प्रदेश अन् तिथं सहज उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठाच्या ठिकाणी पाजाळायला हवी..! या इथे अतिशय बिकट भौगोलिक प्रदेशात आपली व्यावहारिक अक्कल गुप गुमान ठेवायला हवी. असा विचार मी माझ्या पत्नीला अन् मुलांना सांगितला अन् आम्ही पुढे केदारनाथ बाबाच्या दर्शनाला संध्याकाळच्या वेळी मार्गस्थ झालो होतो.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ८ ऑक्टोंबर २०२३, रविवार.

क्रमशः