बुधवार, १ जुलै, २०२६

बाई, रंगभूमीला पोरक्या करून गेल्या..!😔


 

 




#चिंतन

बाई, रंगभूमीला पोरक्या करून गेल्या..!😔

=====================

अख्ख्या भारतात कुठेही नसेल एवढं महान कार्य मराठी माणसांनी नाट्य साहित्य, नाट्य साहित्यिक, नाट्य कलाकार अन् त्या नाट्य कलेला उंच शिखरावर नेण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे.विशेष म्हणजे अख्ख्या भारतात कुठेही नसेल एवढी समृद्ध नाट्य परंपरा याच आपल्या महाराष्ट्रात भरभराटीला आली.

नाट्य कलेला उंच शिखरावर नेण्यात अनेकांनी आपले आयुष्य वेचले. त्या अनेकातील एक थोर नाट्य दिग्दर्शिका वंदनीय विजया मेहता यांचे निधन झाले अन् रसिकजन पोरके झाले.

मला कधी कधी प्रश्न पडतो की, आपल्या मराठी नाट्यसृष्टीत थोर लेखक विजय तेंडुलकर सर, Dr.श्रीराम लागू , निळू भाऊ फुले आणि विजया मेहता यांच्या सारखे अस्सल सारस्वत जर जन्माला आले नसते तर....

कदाचित आज आपण बघतोय एवढी प्रगल्भ प्रतिभा असलेली नाट्य संस्कृती बहरलीच नसती.मी उपरोक्त नाट्य सारस्वतांचा उल्लेख केला आहे. व्यक्तिपरत्वे रसिकांच्या आवडीनिवडी भिन्न भिन्न असून त्यात अजून इतर मान्यवरांची नावे श्रेष्ठत्वांच्या यादीत येऊ शकतात. विजया मेहता यांना सन्मानाने अन् आदरयुक्त ' बाई ' हे नाव दिले तेही थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी..! विजया मेहता तहहयात त्यांच्या कित्येक शिष्यांसाठी ' बाई ' म्हणूनच जगल्या..! आपण मराठी माणसं बाई मध्ये आई शोधणारी रसिक अन् तरल मनाची माणसं आहोत.थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी विजया मेहता यांच्यातील नाट्य कलेच्या बाबतीतील ममत्व जाणले अन् विजया मेहता या ' बाई ' म्हणून अजरामर झाल्या.

आपली बंद पडलेली झापडं ,प्रखर साहित्य कृतीतून प्रस्तुत करणारे लेखक विजय तेंडुलकर सर..! त्याच विजय तेंडुलकरांच्या सोबत विजया मेहता यांनी नाट्य क्षेत्राला अजरामर केले आहे.विजया खोटे यांना वयाच्या फक्त तिशीच्या नंतर आलेले विधवापण, मात्र त्याला आपली कमजोरी न होऊ देता , त्या विजया मेहता झाल्या आणि उंचच उंच भरारी घेत राहिल्या.नाना पाटेकर यांच्यावर विजया बाईं पुत्रवत प्रेम करत राहिल्या.विजया बाईं नसत्या तर नाना पाटेकर अभिनेते झाले असते का..? मला तरी खात्रीने वाटते , अजिबात नाही..! विजया बाईंच्या निधनानंतर नाना पाटेकर अत्यंत दुःखी झाले असतील याची मला पूर्णतः खात्री आहे. अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील असलेल्या नाना पाटेकर यांना अभिनयाचे धडे दिले ते विजया बाईं यांनीच..!

एकदा एका कार्यक्रमात नाना पाटेकर मंचावर आपले विचार व्यक्त करत असतात.इतक्यात प्रेक्षकात वयाने थकलेले विजय तेंडुलकर सर नानांच्या नजरेस पडतात.नाना पाटेकर बोलणे थांबवतात.अतिशय सन्मानाने विजय तेंडुलकर सर यांना मंचावर घेऊन येतात.ज्यावेळी खुर्चीत बसून विजय तेंडुलकर सर आपले मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतात, त्यावेळी नाना पाटेकर त्याच मंचावर मांडी घालून तल्लीनतेने शब्द प्रभू विजय तेंडुलकरांना ऐकतात..! आपण मोठे अभिनेते झालो आहोत हा तिळमात्र अहंकार न येऊ देता नाना पाटेकर विजय तेंडुलकर सारख्या सारस्वताला श्रध्येने ऐकत अन् बघत राहतात.नाना पाटेकर यांच्या त्या संस्कारात विजया बाईं यांच्या संस्काराची शिकवण दिसून आली होती.ही माणसं असामान्य होती अन् आहेत म्हणून ही माणसं सामान्यपणे जगत राहिली अन् जगत आहे..!

कला ,कलाकार एक आयुष्य घेऊन या भूतलावर आपले आयुष्य जगत असतात.त्या कलाकारांचे ग्लॅमर लाभलेले आयुष्य आपल्याला वरपांगी दिसत असते.मात्र त्या कलाकारांच्याही आयुष्यात कुठेतरी वेदना , दुःख असते.फक्त ते कलाकार ती वेदना अन् दुःख उघडपणे व्यक्त करत नाहीत.दादा कोंडके यांच्या आयुष्यावर असलेले ' एकटा जीव ' आणि विजया बाईं मेहता यांचे आत्मचरित्र ' झिम्मा ' जर वाचले तर कलेच्या क्षेत्रात कमालीचे कौतुक लाभलेल्या कलाकारांच्या वेदना आणि दुःख काय असतात याची उपरोक्त दोन्ही पुस्तके वाचताना जाणीव होते. विजया बाईं मेहता यांचे आत्मचरित्र झिम्मा वाचताना तर काही वेळा डोळे पाणावतात.हा माझा स्वानुभव आहे..!

असो,नाट्य क्षेत्रातील महान सारस्वत, कित्येकांना पुत्रवत जीव लावणाऱ्या,खंबीर, प्रगल्भ आणि ममत्त्वरूपी बाई, स्वाभिमानी स्त्रीत्वाचे उदाहरण विजया बाईं मेहता यांचे दिनांक ३०/६/२०२६ रोजी निधन झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

वंदे मातरम् 

एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १ जुलै २०२६, बुधवार


शनिवार, २० जून, २०२६

आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई

आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई




 मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई


=====================


लिंगभेद विसरून एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला माणूस मग तो कोणत्याही वयोगटातील असो तो भेटला की जपावा, कदाचित पुढच्या भेटीच्या वेळी भेटेलंच असं नाही..!


एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला त्या क्षणात भेटलेल्या त्या काही क्षणापुरते का होईना, आपण कुणाला तरी आपलंसं करावं.आठवण म्हणून वस्तू तर आपण देऊच, मात्र त्या तेवढ्या क्षणासाठी आपलंसं केल्याने जो आनंद प्राप्त होतो तो मनाला सुखावणारा असतो.कारण दूरच्या प्रदेशात आपलं पुन्हा जाणे होईल की नाही माहित नसतं. जरी यदा कदाचित जाणे झालेच तर पुन्हा तो माणूस भेटेल की नाही याची खात्री नसते.


दिनांक ६ जून २०२६, शनिवार रोजी रावेर खेडी मध्यप्रदेश येथील पहिले बाजीराव पेशवे यांच्या  समाधी स्थळाच्या परिसरात एक माणूस ज्याला वयोगटाच्या भाषेत बालक म्हणतात तो मला भेटला होता. काही वेळ त्याच्याशी हिंदी भाषेत संवाद साधला.जास्त बोलला नाही.लाजाळू जाणवला. त्या निरागस जीवाला यथायोग्य ते दिले.तिथल्या परिसरातील काही पुरुषांशी संवाद साधला असता बोलता बोलता मी सांगितले की, " हम महाराष्ट्र से आये हैं!" हे ऐकल्या ऐकल्या त्यातील एकजण लगेच म्हणाला...

" आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!"

हा आपुलकीचा संवाद ऐकल्यावर मन भरून आले.त्या पुरुषांचा आणि आमचा काहीच परिचय नव्हता.ज्याला जात धर्म म्हणतात आणि त्या एकमेकांना माहीत झाल्यावर जात धर्म माहित झालेला, त्यातल्या त्यात आपल्या जातीतील अन् आपल्या धर्मातील माणूस जर भेटला तर माणूस जरा जास्तच आपुलकी दाखवतो हा पुरोगामी सिद्धांत आहे. त्याही बाबी आम्हाला एकमेकांच्या माहित नव्हत्या. आम्ही हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या महाराष्ट्रातील आहोत हाच धर्म अन् हीच जात रावेर खेडी येथील त्या अनोळखी व्यक्तीला आमच्यात जाणवली होती.याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी साधारणतः पाच मिनिटे त्या तिथल्या पुरुषांच्या सोबत संवाद साधत होतो. मात्र जेंव्हा आम्ही महाराष्ट्रातील आहोत हे ऐकल्या ऐकल्या त्यांनी ज्या आत्मियतेने " आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!" हे वाक्य जेव्हा त्याच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा आपली  जात अन् आपला धर्म पहिले बाजीराव पेशवा सरकारच जाणवले. 


सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भौगोलिक कक्षा रुंंदावणारा थोर सेनानी , छत्रपती शिवरायांना परम स्थानी मानणारा हिंदवी स्वराज्यातील एक अद्वितीय योद्धा पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत याचा सार्थ अभिमान त्यावेळी जाणवला.पेशवा सरकार यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत हे ऐकल्यावर रावेर खेडी येथील त्या अनोळखी पुरुषाने थेट त्यांच्या घरून आम्हाला प्यायचे पाणी आणून देण्याबाबतची जी आत्मियता व्यक्त केली होती ती आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई होती.


पहिले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधी स्थळाच्या बाजूलाच वाहणाऱ्या आई नर्मदेने आपल्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्यांना सोळाव्या शतकापासून ते आजतागायत जपले आहे. आपले कित्येक पूर्वज आई नर्मदेच्या परिसरात कायमचे विसावले आहेत.ते आपले पूर्वज जरी मुळचे आपल्या महाराष्ट्रातील होते, तरी पण आई , आई असते..! आई नर्मदेने आपल्या महाराष्ट्राच्या कन्येला, कित्येक शूरवीर सेनानींना आपल्या परिसरात मायेने आपलेसे केले.आज जेव्हा कधी माझ्यासारखा भटकंती करणारा एखादा भटका आई नर्मदेच्या परिसरात भटकतो तेव्हा आजही आपल्या सोबत सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, मल्हार बाबा होळकर, महादजी बाबा पाटील शिंदे, आई अहिल्यादेवी होळकर आहेत याची कृतीतून जाणवणारी जाणीव होते.


वंदे मातरम् 


आयुष्याच्या प्रवास मार्गावरील एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २०/६/२०२६, शनिवार


बुधवार, १७ जून, २०२६

Made in India - A Titan story..! भारताच्या ब्रँडची कथा..!


Made in India - A Titan story..!



भारताच्या ब्रँडची कथा..!


 


#चिंतन


Made in India - A Titan story..!


भारताच्या ब्रँडची कथा..!


=======================


वेब सीरिज म्हणजे उघडी नागडी अश्लीलता, हे समीकरण बनून गेले आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य देखील आहे.जसे चित्रपटांसाठी सेन्सर बोर्ड आहे तसे वेब सीरिजसाठी सेन्सर बोर्ड नसल्यामुळे वेब सीरिज उघड्या नागड्या सुसाट सुटलेल्या आहेत.वास्तविक वेब सीरिज करिता देखील सेन्सर बोर्ड असायलाच हवे असे मला वाटते.


मी वेब सीरिज सहसा बघतच नाही; मात्र याही उघड्या नागड्या सुसाट सुटलेल्या विविध वेब सीरिज मध्ये एक अशीही वेब सीरिज मित्राच्या सांगण्यावरून पाहण्यात आली, जिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.कडक उन्हाच्या दुष्काळी छायेत थंडगार मृग नक्षत्राच्या गोड पाण्याच्या सरी कोसळल्यानंतर जो आत्मिक आनंद प्राप्त होतो तोच आनंद Made in India - A Titan story ही वेब सीरिज बघितल्यावर येतो.


खूप छानसे सादरीकरण, अधून मधून तत्कालीन काळातील हिंदी आणि तामिळ चित्रपटातील सुमधुर गाणी , भारताला , अखिल भारतात आणि अखिल विश्वात सिद्ध करण्याची सांघिक धडपड म्हणजेच Made in India - A Titan story होय. 


चावीच्या घड्याळीतून सेलवर सुरू होणाऱ्या अस्सल भारतीय उत्पादनाची यशस्वी धडपड म्हणजेच Made in India - A Titan story..!


आपल्या भारताचे थोर पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदीजी यांनी जो स्टार्ट अप इंडियाचा मूलमंत्र दिला आहे त्याची चुणूक गतकाळात दाखविणाऱ्या भारतीयांची खरी खुरी कथा म्हणजेच Made in India -A Titan story..!


भारतरत्न वंदनीय जे. आर. डी. टाटा साहेब यांनी ज्या आत्मियतेने अन् स्वाभिमानी वृत्तीने आपले अस्सल भारतीयत्व अखिल विश्वाच्या पटलावर भारताचा ब्रँड म्हणून स्थापित केले त्याची कथा म्हणजेच Made in India - A Titan story..!


वंदनीय जे.आर. डी.टाटा सारखा असा मालक / बॉस जो स्वतःला मालक / बॉस न समजता आपल्या सहकाऱ्यांना एक मित्र समजतो अन् वेळोवेळी समर्पक मार्गदर्शन करतो याचं वास्तववादी प्रस्तुतीकरण म्हणजेच Made in India - A Titan story..!


थोर भारतरत्न जे. आर. डी. टाटा साहेब यांच्या स्वप्नातील ध्येयाला सत्यात उतरविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या झेरक्सेस देसाई या ध्येयवेड्या व्यक्तीची कथा म्हणजेच Made in India - A Titan story..!


बाकी कथा काही सांगत नाही.एक मात्र नक्की, नसीरुद्दीन शहा, जिम सर्भ , वैभव तत्ववादी यांच्या अप्रतिम अन् संयत अभिनयाची सर्वोत्कृष्ट प्रस्तुती बघायची असेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी Made in India - A Titan story बघा..!


अल्झायमर विस्मृती सारखा आजार ,त्यावेळी आपल्या बापाची काळजी घेणारा वैभव तत्ववादी याचा अभिनय, आणि आपल्या नातवंडांत अत्यंत जीव असणारा अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेला वयोवृध्द आजोबा हा नातेसंबंध खूप छान अभिनयाने प्रस्तुत केला आहे.


मला जर भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची नावे विचारली तर त्यात दिलीपकुमार साहेब आणि नसीरुद्दीन शहा साहेब यांचा क्रम सर्वात वर राहील.नसीरुद्दीन शहा जे.आर.डी.टाटा साहेब यांना प्रस्तुत करताना अक्षरशः प्रत्येक क्षण जगले आहेत.हॅट्स ऑफ सर..!


जिम सर्भ ♥️

जिम सर्भ या अभिनेत्याने झेरक्सेस देसाई यांना जीव ओतून आपल्या समोर प्रस्तुत केले आहे. जिम सर्भ यांनी अगदी सहजपणे केलेला अभिनय आपल्याला आपण एखादी वेब सीरिज आणि त्यातील गतकाळातील एक कर्तृत्ववान व्यक्तिरेखा न बघता वास्तवातील खरेखुरे झेरक्सेस देसाई यांनाच बघत आहोत असेच वाटते. नसीरुद्दीन शहा सारख्या उच्च कोटीच्या अभिनेत्याच्या तोडीस तोड अभिनय जिम सर्भ यांनी केला आहे. हॅट्स ऑफ सर..!


कुठेही रडारड न करता अत्यंत अल्पसंख्याक असूनही पारशी समाजातील लोकं भारताविषयी किती कृतज्ञतेचा आणि जाणीव असणारा भाव ठेवून आहेत याचा अभिमान वाटतो.

नतमस्तक..!🙏🙏


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १७/६/२०२६, बुधवार 

( शुभ रात्री )

रविवार, १४ जून, २०२६

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली 







 


#आमचे गाव आमची माणसं ©️


कट्यार काळजात घुसली 


=====================


मी सोशल मीडिया व्हॉट्स ॲपवर संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील ' सुरत पिया की छिन बिसराये ' या नाट्य पदाचा व्हिडिओ ऐकला अन् बघितला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिषेकजी काळे यांनी गायन केलेले नाट्य पद ऐकल्यावर ईश्वरीय सानिध्यात गेलो.अभिजितजी काळे यांना हृदयातून वंदन केले.तसेच कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या बाबतीत ज्येष्ठांनी सांगितलेल्या आठवणीत रमून गेलो.


पालखेड येथे वास्तव्यात असताना माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा यांच्या जवळ त्यांच्या वार्धक्यात मी अधून मधून बसत असायचो.ज्येष्ठांच्या जवळ बसलं अन् त्यांना बोलतं केलं की, बराच इतिहास आपल्याला माहित होतो हा माझा स्वानुभव आहे. हाच अनुभव मला आणि आमच्या दोन्ही मुलांना माझे स्व.तीर्थरूप वडीलांच्या वार्धक्यात त्यांच्या जवळ नेहमी संध्याकाळी बसल्यावर यायचा.


असो, पालखेड येथे वास्तव्यास असताना एकदा माझे सख्खे चुलते स्व.कचरू चंपतराव जाधव यांच्या जवळ पालखेड येथील आमच्या आळीतील  ओट्यावर बसलेलो होतो. त्यांना आपल्या गावातील नाट्य परंपरेविषयी बोलते केले होते.त्यावेळी ' कट्यार काळजात घुसली ' या संगीतप्रधान नाटकाचा विषय मी काढला होता.तीर्थस्वरूप कचरू आण्णा यांनी सांगितले होते की, " आपल्या पण गावात कार्तिकी यात्रेच्या वेळी कट्यार काळजात घुसली या नाटकाचा नाट्य प्रयोग झाला होता.आपल्याच गल्लीतील जैन नाट्य मंडळ मधील कलाकारांनी हा नाट्य प्रयोग केला होता.त्यावेळी तू लई लहान असशील.पंडित भानू शंकर शास्री ही भूमिका शांतीलाल शेठ जैन यांनी सादर केली होती आणि खाॅंसाहेब आफताब हुसेन यांची भूमिका राजा नाना जैन यांनी केली होती. याच नाटकाला हार्मोनियमवर साथ दिली होती कचरू शेठ जैन यांनी आणि तबल्यावर साथ दिली होती आपल्याच गल्लीतील सखाराम पगार यांनी.त्यानंतर या नाटकाचा प्रयोग पुन्हा आपल्या गावात झाला नाही. त्याचं कारण नाटकातील सर्व  नाट्य पदे शास्त्रीय संगीतावर होती.त्याचे गायन आणि संगीत साथ द्यायला कुणी पुढे आले नाही."


आमच्या पालखेड गावात तत्कालीन काळात प्रामुख्याने शास्त्रीय संगीत प्रधान नाट्य मंडळे दोन होती.त्यातले एक होते रोकडीया हनुमान नाट्य मंडळ आणि दुसरे होते जैन नाट्य मंडळ..!रोकडीया हनुमान नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझे सख्खे चुलते तीर्थस्वरूप स्व.कचरू चंपतराव जाधव उपाख्य आण्णा द्यायचे आणि तबल्यावर स्व.तीर्थस्वरूप गीताराम काका कुमावत द्यायचे.विशेष म्हणजे दोघेही बालमित्र होते. तीर्थरूप अण्णांनी मला सांगितले होते की, आम्हा दोघांचा जन्म एकाच दिवशी झाला होता.स्व.गीताराम काका कुमावत हे आमचे आदरणीय अनौपचारिक प्रिय मित्रवर्य नारायणराव कुमावत सर ( शिक्षण विस्तार अधिकारी ) यांचे वडील होते.


पालखेड गावातील तत्कालीन काळातील दुसरे शास्त्रीय संगीत नाट्य मंडळ होते जैन नाट्य मंडळ..! जैन नाट्य मंडळ मध्ये हार्मोनियमवर साथ माझा जिवलग बालमित्र नितीन जैन याचे आजोबा स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन द्यायचे आणि तबल्यावर साथ आमच्याच आळीतील स्व.सखाराम पगार द्यायचे. विशेष म्हणजे स्व.तीर्थस्वरूप कचरू भाऊ जैन एका डोळ्याने अंध होते, मात्र उच्च कोटीचे सारस्वत होते.माझ्या मते आमच्या पालखेड गावात शास्त्रीय संगीत मध्ये हार्मोनियमवर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते तीन सारस्वत क्रमवार पुढील प्रमाणे होत..१) माझे आजोबा स्व.चंपतराव देविदासराव जाधव २) माझे चुलते स्व.कचरु आण्णा जाधव आणि ३) स्व.कचरू भाऊ जैन..!तसेच माझ्या मते आमच्या पालखेड गावात तबला मृदुंगावर सिद्धहस्त असलेले तीन सर्वश्रेष्ठ सारस्वत होऊन गेलेले आहेत.ते क्रमवार पुढील प्रमाणे..१) स्व.तीर्थस्वरूप सखाराम काका पगार २) माझे चुलते नागोराव काका जाधव आणि ३) स्व.सखाहरी काका गायकवाड मिस्तरी..!


कला देवतेच्या कृपाशीर्वादाने श्रीमंत झालेली आमच्या गावातील उपरोक्त सारस्वतांची पिढी आता हयात नाही.मात्र त्यांनी त्यांच्या काळात आमच्या पालखेड गावात नाट्य परंपरेची जी समृद्ध परंपरा रुजवली, जपली , वाढवली त्याचा एक पालखेडकर म्हणून सदैव अभिमान वाटतो.आजही जेव्हा कधी टीव्हीवर, मोबाईलवर एखादे नाट्य पद ऐकू येते, बघायला मिळते तेव्हा तेव्हा आमच्या पालखेड गावातील समृद्व कलेचा वारसा स्मरणात येतो.ते स्मरण करते वेळी पालखेड गावातील  ज्या ज्या सारस्वतांनी नाट्य परंपरेला रुजवलं, जपलं आणि वाढवलं त्या सर्वांना हृदयातून  विनम्र वंदन करतो..!🙏


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १४/६/२०२६, रविवार



मंगळवार, ९ जून, २०२६

महेश्वर..!🕉️


                     महेश्वर..!🕉️
















#मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


महेश्वर..!🕉️


=======================


काही ठिकाणी गेल्यानंतर आपलेपणाची भावना आपसुकच निर्माण होते.त्यातल्या त्यात अशा ठिकाणी, जिथं आपल्या आईचे वास्तव्य आजही जाणवते.आई या शब्दाची महती तेंव्हा सर्वश्रेष्ठ वाटते जेव्हा एखादी माय माऊली सर्व सामान्यांना आपलंसं करते. आपल्या भारताच्या वैभवशाली इतिहासात अशा काही कर्तृत्ववान अन् मायाळू स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत ज्या समाजव्यवस्थेला आदर्श ठरलेल्या आहेत.


त्यात आई अहिल्यादेवी होळकर ह्या एक आहेत.आई अहिल्यादेवी होळकर यांची आजच्या मध्यप्रदेश राज्यातील नर्मदेच्या किनाऱ्यावरील राजधानी महेश्वर.!महेश्वर येथील किल्ल्याचे राजवाड्याचे भव्य बांधकाम तत्कालीन राजसत्तेची आजही आठवण करून देतो. आई अहिल्यादेवी होळकर यांच्या कित्येक समाजपयोगी कामांची, शौर्याची, उत्कृष्ट प्रशासनाची माहिती संग्रहालयातील विविध माहिती फलकांच्या द्वारे आपल्याला मिळते.


महेश्वर येथील राजवाड्याच्या आतील बाजूत संग्रहालय आहे.तिथे फोटो व्हिडिओ काढायला बंदी आहे. मात्र राजवाड्याच्या बाहेरील अंतर्गत वाड्यात जे काही फोटो , मजकूर आहेत त्यांचे फोटो आपण काढू शकतो. राजवाड्याच्या प्रवेश दाराच्या बाजूला भारताचा नकाशा आहे.आई अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात हिंदू धर्मांतील ज्या ज्या ठिकाणच्या तीर्थस्थळांचा जिर्णोद्धार केला आहे,अशा एकूण २९ तीर्थस्थळांची ठिकाणे नावासह त्यावर दर्शविलेली आहेत.


१ ऋषिकेश ( उत्तराखंड )

२ गंगोत्री ( उत्तराखंड )

३ विष्णू प्रयाग ( उत्तराखंड )

४ केदारनाथ ( उत्तराखंड )

५ हरिद्वार ( उत्तराखंड )

६ बद्रिनाथ ( उत्तराखंड )

७ वृंदावन ( उत्तर प्रदेश )

८ अयोध्या ( उत्तर प्रदेश )

९ प्रयागराज ( अलाहाबाद ) ( उत्तर प्रदेश )

१० वाराणसी ( उत्तर प्रदेश )

११ गया ( उत्तर प्रदेश )

१२ पुष्कर ( राजस्थान )

१३ नाथ द्वारा ( राजस्थान )

१४ उज्जैन ( मध्य प्रदेश )

१५ इंदोर ( मध्य प्रदेश )

१६ ओंकारेश्वर ( मध्य प्रदेश )

१७ महेश्वर ( मध्य प्रदेश )

१८ अमरकंटक ( मध्य प्रदेश )

१९ द्वारका ( गुजरात )

२० सोमनाथ ( गुजरात )

२१ नाशिक ( महाराष्ट्र )

२२ वेरूळ ( महाराष्ट्र )

२३ पुणे ( महाराष्ट्र )

२४ जेजुरी ( महाराष्ट्र )

२५ चौंडी ( महाराष्ट्र )

२६ पंढरपूर ( महाराष्ट्र )

२७ राजापूर ( महाराष्ट्र )

२८ गोकर्ण ( कर्नाटक )

२९ रामेश्वरम् ( तामिळनाडू )


एक स्री आपल्या कारकीर्दीत एवढे मोठे कार्य भारतभर करते हे बघून अन् वाचून त्या माय माऊलीच्या म्हणजेच आई अहिल्यादेवीच्या कार्यासमोर आपण नतमस्तक होऊन जातो.


आई अहिल्यादेवी होळकर ह्या परम शिवभक्त होत्या.त्या ज्या शिवलिंगाचे नित्य नियमाने पूजन करायच्या ते चांदीत मढवलेले भव्य शिवलिंग , पूजेचे सामान इत्यादी वस्तू सुरक्षितपणे जतन करून ठेवलेल्या आहेत.किल्ल्याचे मजबूत दगडी बांधकाम आखीव रेखीव आहे.त्यावरील शिल्पकला अप्रतिम आहे. किल्ल्याच्या समोरच नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे.


सुभेदार मल्हारराव होळकर आणि पहिले बाजीराव पेशवे यांचातील नाते अत्यंत विश्वासू होते.हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्याचा विस्तार करताना काही विश्वासू सरदारांची फळी निर्माण केली.त्यात प्रामुख्याने मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे,पवार घराणे, स्वतःचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे होते.


महेश्वर येथील आई अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर आम्ही सह परिवार नतमस्तक झालो आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचे आत्मिक समाधान लाभले.


वंदे मातरम् 

जय मल्हार


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


महेश्वर येथे सह परिवार भेट दिनांक - ७ जून २०२६, रविवार

 

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र 


=====================


सोबत जिवलग मित्र मनोहर गावडे, 

सोबतीला थंडगार ऊसाचा रस 

अन्.... 

निवांत निशाचर वेळ..!

ठिकाण - छत्रपती संभाजीनगर शहरातील एक निवांत कोपरा..!


निवांतपणा, आपल्याला आपल्यातील आपलं काय आहे याचा शोध घ्यायला शिकवतो.मग तो निवांतपणा एकट्यातील असो अथवा प्रिय मित्राच्या सोबतचा..! त्यात हमखास आपला आपण केलेला शोध नक्कीच सापडतो. त्यातल्या त्यात निवांतवेळी आपलं कुणीतरी सोबत असलं की, मनाचे आयुष्य , दीर्घायुषी होते.निवांत बसल्यावर कुणी आपल्याला एकलकोंडा म्हणो अथवा काहीही म्हणो, मात्र त्या एकांतात आपल्यातील आपलं कुणीतरी नक्कीच सापडतो..!


आज ज्यावेळी प्रिय मित्र मनोहर अन् मी निवांत होतो, त्यावेळी आयुष्याच्या प्रवासातील कित्येक क्षणांना , व्यक्तींना पुन्हा एकदा जिवंत केले.


वास्तविक मी निशाचर नाही,पण काही वेळी व्हावं लागतं, आपला भुतकाळ शोधण्यासाठी..!

आपल्या मनाला जाणून घेणारे कुणी सोबतीला असले की, त्या बैठकीची रंगत काही औरच असते.

अजून यापेक्षा अजून काय हवे..?

त्या गप्पांच्या बैठकीत आम्हा दोघात उपस्थित होता तो आमचा अत्यंत जिवलग वर्गमित्र स्व. विनोद पाटील..! ♥️


विनोद पाटील आम्हाला कायमचा सोडून कधीचाच गेला आहे, मात्र आजही तो नेहमी सोबत असतो.स्व.विनोद पाटील सारखा अत्यंत प्रेमळ अन् खूप मोठ्या मनाचा मित्र आमच्या संपूर्ण डी. एड. बॅच कुणीच नव्हता. नियती पण ना...सर्वांच्या आवडत्यालाच का आपल्या सोबत घेऊन जाते कुणास ठाऊक..?

जसे माझ्या आयुष्याच्या प्रवासातील पालखेड येथील दोन जिवलग बालमित्रांना नियतीने खूप लवकर आपल्यातून कायमचे दूर तिच्या घरी नेले आहे. स्व.आप्पासाहेब सुराशे अन् स्व.शाम शेळके..! दोघेही जिवलग बालमित्र होते..!♥️♥️


माझी फेसबुक मित्र यादी मोजकीच आहे. त्यात कायमचे अढळ स्थान राखून आहे स्व.विनोद पाटील..! विनोद कधीचाच स्वर्गवासी झालेला आहे, मात्र विनोद पाटील यास मी कधीच अनफ्रेंड करू शकत नाही.जिवलग मित्र होता तो..! भावना जपायचा असतात. विनोद, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप आवडता होता.आज मी अन् माझा खूप जिवलग मित्र मनोहर गावडे ज्यावेळी रात्री निवांत बसलो होतो, तेंव्हा विनोदची उपस्थिती आम्हाला गतकाळातील आठवणीत घेऊन गेली.विनोद पाटील हा आमच्या मैत्रीचा सर्वोच पॉईंट होता. कधीतरी लिहिल , त्यावर..! जिवलग मित्राचा मृत्यू हा आपल्या त्या कालखंडाचा मृत्यू असतो. सगळं काही पाठीमागे राहते.


प्रिय मित्र मनोहर अन् मी ऊसाचा रस पिऊन झाल्यावर निघालो , पुन्हा एकदा आमच्या प्रापंचिक आयुष्याच्या प्रवासात..!

पुन्हा कधीतरी भेटू , आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी..!

असेच कुठेतरी..!


आम्हाला भेटायला , फारसा काही खर्च लागत नाही आणि पचायला ७२ तास लागतील असे खाद्य पदार्थ देखील खाण्यात लागत नाहीत. त्याचे कारण आम्ही गुरुबंधू आहोत म्हणून..! 🕉️


जाणीव अन् जाणिवा जिवंत ठेवणारे आयुष्यात सोबत असले की, बाबा केदारनाथाच्या चरणी भरून पावल्याचे आत्मिक समाधान लाभते. साधं,सरळ आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा अजून काही लागत नाही.


असो, शुभ रात्री मित्रांनो..!🙏🙂


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २५/४/२०२६, शनिवार

रविवार, १२ एप्रिल, २०२६

आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.


 


#चिंतन ©️


आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.


=====================


लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, आता आशा दीदी गेल्या.मृत्यूच्या डोहात दोन स्वर कायमचे विसावले. जरी लता दीदी आणि आशा दीदी यांच्या वर्तमानातील आयुष्यातील स्वर कायमचे थांबले असले तरी त्यांनी गायन केलेला प्रत्येक स्वर पिढ्यानपिढ्या, स्वरांची पूजा करणाऱ्या कित्येक भक्तांना ऐकू येत राहील.


काही चित्रपटावर लिहायला हळुवार मन थांबते.कारण त्या चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवाचे असते.व्यक्त करायला लागलो की भावना स्तब्ध होते.माझ्या भावविश्वात असे दोनच चित्रपट आहेत ज्यांना फक्त आणि फक्त अनुभवून आत्मिक आनंद प्राप्त करत असतो.त्या भावविश्वातील एक चित्रपट आहे सी.प्रेमकुमार लिखित अन् दिग्दर्शित ' 96’ आणि दुसरा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे गुलजार साहेब लिखित आणि दिग्दर्शित इजाजत..! या दोन्ही चित्रपटांवर लिहायला लेखणी थांबते , कारण ह्या दोन्ही चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवत असतो. काही भावना व्यक्त न करता हृदयाच्या देव्हाऱ्यात जपून ठेवायच्या असतात.


माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखादे दीर्घ काव्य ठरावे असा एकमेव चित्रपट आहे अन् तो म्हणजे इजाजत..! इजाजत चित्रपटाची कथा अन् पटकथा जर थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी लिहिली असती तर तो काहीसा प्रखर भाष्य करणारा चित्रपट झाला असता.मात्र इजाजत चित्रपटाला साहित्य विश्वातील अत्यंत मृदु , संवेदनशील लेखक कवी गुलजार साहेब यांनी प्रस्तुत केले आणि एक अत्यंत तरल भावनाशील चित्रपट इतिहासात अजरामर झाला.

संपूर्ण इजाजत चित्रपटच एक छानसे काव्य आहे अन् त्या काव्यातील सर्वोत्तम काव्य आहे...

" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." 

या दीर्घ पद्य रचनेला जेंव्हा गुलजार साहेब यांनी लिहिले अन् संगीतकार पंचमदा ( आर. डी.बर्मन ) यांच्या समोर ठेवले तेंव्हा पंचमदांना वाटले चित्रपटातील सीन लेखन असावे. मात्र गुलजार साहेब यांनी सांगितले हा मजकूर सीन लेखन नसून काव्य लिहिले आहे.यावर पंचमदा बुचकळ्यात पडले अन् आश्चर्यचकित होऊन म्हणाले...

" एवढे मोठे काव्य..? "

बाजूला आशा दीदी भोसले बसलेल्या होत्या.त्यांनी या काव्याच्या पहिल्या ओळी गुणगुणल्या. असे करत करत एका अजरामर गीताच्या , दीर्घ काव्याला संगीतात बंदिस्त करून रसिकांच्या समोर पंचमदांनी प्रस्तुत केले." मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." या काव्यातील प्रत्येक ओळ तरल भावूक मनाच्या भावना व्यक्त करते. एखादे सुंदरसे फूल एखाद्या स्रीने आपल्या डोक्यावर लावावे अन् त्या फुलाचे सौंदर्य वाढवावे तसेच काहीसे या काव्यामुळे आशा दीदी यांनी गुलजार साहेब यांच्या या काव्याचे सौंदर्य अजून वाढवून इतिहासात अजरामर केले. याचं काव्य लिखाण बद्दल गुलजार साहेब यांना आणि अत्यंत सुरेल आवाजात गायन केल्या बद्दल आशा दीदी भोसले यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.


आत्मिक आनंद देणाऱ्या बाबींना जपून ठेवून निवांत वेळी अनुभवायचे असते.जसे की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात गुलजार साहेब लिखित दिग्दर्शित इजाजत चित्रपटाला अनुभवत असतो.


असो, आज गायन क्षेत्रातील चतुरस्त्र सारस्वत आशा दीदी भोसले यांचा स्वर्गवास झाला आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


फोटो स्रोत : सोशल मीडिया 


वंदे मातरम् 


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १२/४/२०२६, रविवार