चिंतन ©️
" महान सम्राट हर्षवर्धन "
( इ. स. ६०६ ते ६४७ )
====================================
प्राचीन भारताच्या इतिहासात अनेकानेक राजे, सम्राट असे होऊन गेले आहेत की, ज्यांच्या आदर्शवादी तत्वनिष्ठ अन् सामर्थ्यवान कार्यकाळात आपल्या देशाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेला आहे. प्राचीन भारताच्या नंतरच्या पुढील इतिहासाच्या कालखंडातील त्या त्या काळातील अनेक थोर भारतीय राजांचे आदर्श हेच प्राचीन भारताच्या इतिहासातील थोर राजे,सम्राट होते.प्राचीन भारताच्या इतिहासात ज्यांचा प्रामुख्याने सन्मानाने उल्लेख करता येईल असे सम्राट हर्षवर्धन होय..!
प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त घराणे प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेले घराणे होय.याच गुप्त घराण्यातील दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त ( इ.स.३३५ ते ३७५) यांची कारकीर्द खूप दैदिप्यमान होती. तो स्वतः कुशाग्र बुद्धीचा अन् शास्त्राचा ज्ञानी होता.अलाहाबाद ( प्रयागराज ) येथील अशोकस्तंभावर दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त यांच्या दिग्विजयाचे वर्णन केलेले आहे.
सम्राट हर्षवर्धन हा, सम्राट समुद्र्गुप्त आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा अन् आचरणाचा सुयोग्य मिश्रण होता. सम्राट हर्षवर्धन यांनी बौद्ध धर्मातील महायान पंथाचा स्वीकार केला होता, त्याचवेळी तो गौतम बुद्धाचा, सूर्याचा अन् शिवाचा देखील भक्त होता. दर पाच वर्षांनी प्रयाग येथे गंगा यमुना नदीच्या तीरावर ७५ दिवस चालणारी महामोक्ष परिषद सम्राट हर्षवर्धन भरवत असे. हिंदू, बौद्ध अन् जैन अनाथ व गोरगरीब जनता तेथे उपस्थित असे. आपल्या राजकोषातील पाच वर्षाची शिल्लक रक्कम,दानधर्मात वाटप करत असे.शेवटी तर आपल्या अंगावरील वस्त्रांचे व दागदागिने देखील दान करत असे.आपली बहीण राजश्रीकडून जुने वस्र मागवून ते परिधान करत असे.सर्वांना, सम्राट हर्षवर्धन सर्वस्वाचे दान करणारा हा जगाच्या इतिहासातील एकमेव सम्राट होता.
माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त कशाला महत्त्व असेल तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाला..! इतिहास साक्षीला आहे,ज्या ज्या गावाने,राज्याने, राष्ट्राने विद्वानांना दुर्लक्षित केले, ते गाव,राज्य अन् राष्ट्र भौतिक सुविधेत भले संपन्न झाले असेल,पण तिथले विद्वान बहिष्कृत झाल्याने असे राज्य असून नसल्यासारखे झालेले होते अन् आहे..!.याच गतकाळातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, विष्णूगुप्त उपाख्य आचार्य चाणक्य अन् तक्षशिला होय. आचार्य चाणक्य सारख्या अतिशय विद्वान व्यक्तीचं मोल त्यांची मूळ भूमी तक्षशिलेतील राजसत्तेला ओळखता आले नाही.तिथून आचार्य चाणक्य यांना तिथल्या राजसत्तेमुळे परागंदा व्हावे लागले.पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच.त्याच तक्षशिलेला अलेक्झांडर ने सहज आपल्या कवेत घेतले. अखेर त्याच आचार्य चाणक्य यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर अन् सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या शौर्याच्या बळावर मौर्य साम्राज्याचा पाया रचला..! म्हणून, जिथं विद्वत्ता असते मग ती कोणत्याही जातीची असो, तिथं राजसत्ता आपोआप निर्माण होत जाते. फक्त त्याचं काळाच्या ओघात स्वरूप भिन्न भिन्न आहे इतकंच..!
सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळात शिक्षणाला प्राचीन भारताच्या इतिहासात सर्वात जास्त महत्त्व दिल्या गेलेले आहे.जगद्विख्यात नालंदा विद्यापीठ हे याच महान सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळातील परमोच्च बिंदू होते. हिंदू, जैन अन् बौद्ध धर्मातील विविध तत्वज्ञान इथेच बहरात आले. सर्वार्थाने परिपूर्ण शैक्षणिक सुख सुविधा याच नालंदा विद्यापीठ परिसरात सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळात होत्या. सम्राट हर्षवर्धन यांच्या कामगिरीचा जरी विसर पडला,तरी एकटे नालंदा विद्यापीठ त्यांच्या कीर्तीची अन् वैभवशाली राजवटीची साक्ष देण्यास समर्थ आहे.
स्वतः सम्राट हर्षवर्धन हा साहित्यप्रेमी होता.सम्राट हर्षवर्धन हा साहित्यावर म्हणजेच शास्त्रावर अन् शस्त्रावर विश्वास असणाऱ्यांपैकी एक महान सम्राट होता. सम्राट हर्षवर्धन यांनी स्वतः रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद ही नाटकं लिहिली आहेत. कोणत्याही राजाला फक्त शस्त्र किंवा फक्त शास्त्र अंगिकारून चालत नाही.तर शास्त्र अन् शस्त्र या दोन्हींचा सुयोग्य असा मिलाप ज्यांनी ज्यांनी केला त्यांचे राज्य सर्वार्थाने सुरक्षित राहिलेले आहे.
ज्या राजांनी फक्त शास्त्र , धर्म , धर्माच्या अंगाने येणारी कमालीची अहिंसा अंगिकारली होती, त्यांचे राज्य इतर बलदंडांनी गिळंकृत केले हा देखील प्राचीन भारताचा इतिहास आहे. महान सम्राट हर्षवर्धन याला अपवाद होता.एका हातात धर्म पताका अन् दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन सम्राट हर्षवर्धन हा खऱ्या अर्थाने प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महान तेजस्वी व्यक्तिमत्व होता.
सम्राट हर्षवर्धन यांनी बौद्ध धर्मातील महायान पंथाचा स्वीकार केला होता.तरी देखील सम्राट हर्षवर्धन यांनी राजधर्म सोडला नाही.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सत्तेवर आलेल्या कोवळ्या वयाच्या हर्षाचे ,सम्राट हर्षवर्धन मध्ये आपल्या कर्तृत्वाच्या अन् बौद्धिक क्षमतेच्या बळावर रूपांतर झाले..!
प्राचीन भारताच्या कालखंडात सम्राट हर्षवर्धन हा भारताचा खऱ्या अर्थानं एकमेव धर्मनिरपेक्ष सम्राट होय.!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
संदर्भ स्रोत - प्राचीन भारत , लेखक - डॉ.धनंजय आचार्य
दिनांक - २६ मे २०२१, बुधवार, बुध्द पौर्णिमा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा