आमचे गाव आमची माणसं ©️
मित्रा,आप्पा..!
====================================
थोर लेखक सुहास शिरवळकर यांनी दुनियादारी हे पुस्तक लिहिलं खरं, मात्र याच दुनियादारी पुस्तकातील प्रत्येक पात्र मला माझ्या आयुष्यात भेटत गेले.याचे संपूर्ण श्रेय जाते ते माझा जीवलग बालमित्र स्व.शाम मुरलीधर शेळके यालाच..! माझ्या अन् माझ्या काही बालमित्रांच्या आयुष्यात स्व.शाम शेळके नसता तर आमच्या आयुष्याची दुनियादारी कधी बहरलीच नसती हे ते सर्व मित्र दिवसाच्या चोवीस तासात अन् वर्षाच्या तीनशे पासष्ट अथवा तीनशे सहासष्ट दिवसात कधीही मान्य करतील. याच आयुष्याच्या प्रवासात जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके मुळे अजुन काही मित्रांचा प्रवेश झाला,त्यात राजू दाजी शेळके पाटील अन् आप्पा जाधव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
माझा जिवलग बालमित्र स्व. शाम मुरलीधर शेळके मुळे प्रिय मित्र आप्पा जाधव, प्रिय मित्र राजू दाजी शेळके अन् असे काहीजण जे पालखेड येथे शामच्या आयुष्याचा अतूट घटक होते ते माझ्या आयुष्यात मित्र या कक्षेत सामील झाले.
या सर्वांना बघितले की, शाम ची खूप आठवण येते. आप्पा जाधव, राजू पाटील दाजी, इत्यादी सर्व मित्रमंडळी खूपच चांगल्या स्वभावाची आहेत. प्रिय मित्र स्व.शाम अन् त्याच्या अवती भोवती वावरणाऱ्या या सर्व मित्रांमुळे माझ्या आयुष्याचे असे वर्तुळ पूर्ण झाले जे की, पूर्ण होण्यात तारुण्याचा अन् त्या तारुण्यात भेटलेल्या अनेक सुखद क्षणांचा पसारा पूर्ण झाला.
आयुष्यात फक्त गुळमुळीत अन् गुळमट मित्र असून चालत नाही.तर माझ्या मते मित्र हे आपल्याला कोणत्याही रुपात स्वीकारणारे असावेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याशी नाळ जोडलेली असावेत.अगदी आपल्या ढोंगी पदाच्या ढोंगी अहंकाराच्या गुर्मीत असणाऱ्या आयुष्याला लाथाडणारे असावेत. मी शिक्षक म्हणून जरी नोकरीला लागलो होतो,तरी देखील स्व.शाम अन् त्याच्या अवती भोवती असणाऱ्या मित्रांच्या गराड्यात मला कधीच जाणवले नाही की,मी एक शिक्षक आहे किंवा मी नोकरीला लागलेलो आहे.मी स्वतः ला नशीबवान समजतो की, स्व.शाम शेळके, राजू दाजी शेळके, आप्पा जाधव इत्यादी काही मित्रांमध्ये मला नेहमी आयुष्याचा आनंद लुटता आला, जो अमाप संपत्ती देऊन सुध्दा जगाच्या कोणत्याही बाजारात मिळणार नाही. स्व. शाम शेळके यांच्या मुळे जे मित्र अन् मैत्री माझ्या आयुष्यात लाभली ती सदैव मला शाम वगळता इतर सर्वजण " मास्तर " या नावाच्या उल्लेखाने उल्लेखित करायची. मात्र त्यात निव्वळ अनौपचारिक नात्याच्या ओलाव्यात ती मास्तरकी फिरत राहिली अन् फिरत राहील यात तिळमात्र शंका नाही.
प्रिय मित्र आप्पा जाधव असो किंवा राजू दाजी शेळके पाटील असो ही मित्र अगदी बांधावर बसून सर्व रंगांच्या छटांचे फुगे उडवून यांच्या सोबत गप्पांचे फड रंगवावेत अशा मैफिलीतील आहेत. याचं संपूर्ण श्रेय जाते ते देखील स्व.शाम शेळके यालाच..! आप्पा जाधव असो किंवा राजू दाजी शेळके असो यांना ज्या ज्यावेळी भेटतो , त्या त्यावेळी स्व.शाम शेळके याची प्रकर्षानं आठवण येते. ज्यांना आपला इतिहास, भूगोल माहीत असतो तिथं मनमोकळेपणाने बोलायला माणूस कंजुषी करत नाही. आपल्याला एखादे पद मिळाले किंवा आपण आर्थिक बाबतीत थोड्या फार प्रमाणात स्थिर झालो किंवा आपण आपल्या कामात स्थैर्य प्राप्त केले किंवा आपण नोकरीला लागलो तरी त्यात तेच निव्वळ अनौपचारिक मैत्रीचे नाते राहते जे मनाला अघळपघळ आनंद देते.माणसाच्या आयुष्यात आपल्या भूतकाळाशी प्रतारणा करणारे, आपल्याच ढोंगी अहंकाराच्या गुर्मीत वावरणारे देखील काहीजण असतात.भले ते वयाने मोठे असो अथवा समवयस्क असो अथवा आपल्या वयापेक्षा लहान असो. वयाच्या या तिन्ही प्रकारात अन् आपल्याच तोऱ्यात वावरणारे देखील असतात.मात्र स्व. शाम शेळके, आप्पा जाधव, राजू दाजी शेळके इत्यादी काही मित्रांना बघितले की, आयुष्यातील सर्व बेगडी गोष्टी उन्मळून पडतात अन् शिल्लक राहतो तो फक्त आणि फक्त मैत्रीचा वटवृक्ष..!
प्रिय आप्पा जाधव तुला आज जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी प्रत्यक्ष उपस्थित नाही.पण आपले दाजी राजू पाटील शेळके यांच्या हस्ते तुझा आज जन्मदिनाच्या निमित्ताने सत्कार झालेला फोटो बघितला अन् माझी मलाच तिथं माझी उपस्थिती असल्याची जाणीव झाली..! खूप दिवसांपासून आपली भेट नाही.स्व. शाम शेळके याच्या अंत्यविधी वेळी छत्रपती संभाजीनगर येथे आपली भेट झाली होती.येत्या काळात आपली भेट होईल अशी आशा करूया..!🙏🏻😊
असो, प्रिय मित्र आप्पा जाधव तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा..!🌹
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : ९/४/२०२३, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा