रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

देवभूमी भाग क्रमांक ९




 







मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ९ )

===================================

रात्रीचे दहा वाजले होते. हिमालयातील थंडी काय असते याचा प्रत्यय यायला लागला होता.अधून मधून ओलसर थेंब अंगावर पडत होते. संध्याकाळी सव्वा सहा वाजता दर्शनाच्या रांगेत उभे राहून अखेर रात्री दहा वाजता बाबा केदारनाथाचे मनोभावे दर्शन झाले होते. एकतर साधारणतः पहाटे पाच ते दुपारच्या सव्वा दोन वाजे पर्यंत अत्यंत चढणीचा मार्ग चढत चालल्याने पाय पूर्णतः थकून गेले होते. त्यात पुन्हा संध्याकाळी सव्वा सहा ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेत उभे राहिल्याने पावलं हळूहळू पडायला लागली होती. आमची दोन्ही मुलं मात्र फारसे थकलेले जाणवत नव्हते.आता आम्ही पूर्णपणे शरीर गोठून टाकणाऱ्या हिमालयातील थंडीच्या स्पर्शात मंदिराच्या बाहेरील परिसर होतो. पोटात सगळेच प्राणी ओरडायला लागले होते.खूप भूक लागली होती.मंदिर परिसरातील एका हॉटेल मध्ये जेवणाचे ठरवले. जेवणाची ऑर्डर दिली.त्या हॉटेल मध्ये खूप गर्दी होती. वीस मिनिटांनी आमची जेवणाची थाळी आली. खूप भूक लागलेली असल्यामुळे आम्ही अधाशीपणे त्यावर तुटून पडलो.पहिला घास तोंडात गेल्या गेल्या दोन्ही मुलं, मी अन् माझी पत्नी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो.त्या बघण्याच्या अर्थ एकच होता अन् तो म्हणजे जेवणाच्या ताटातील भात पूर्णतः आंबून गेलेला होता.फक्त गरमागरम होता इतकेच..! तिथं त्या दुकानदाराला याबाबतीत मी म्हणालो पण त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की,
" साब, ताजा किया है, अभी अभी | खाना हैं तो खाव, नही तो बाजू मे रखो |चलो बाजू हटो, बहुत भीड हैं |

जास्त डोकं लावण्यात अर्थ नव्हता.आम्ही भात बाजूला केला अन् उर्वरीत भाजी अन् पोळी खाऊन आमचं जेवण पूर्ण केले.पिण्यासाठी दोन लिटर कोमट असलेले पाणी प्रत्येकी १२०₹ दराने विकत घेऊन आमची तहान भागवून घेतली. आता रात्रीचे अकरा वाजले होते. आम्ही पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिर परिसरात आलो अन् मनोभावे कळस दर्शन घेतले. तिथं काही  साधूंनी पत्र्याच्या डब्यात शेकोट्या पेटविलेल्या होत्या. त्या साधूंच्या एकंदरीत देहबोली वरून ते शीघ्रकोपी जाणवत होते.उशीर होतोय असे वाटले अन् आम्ही पुन्हा नंदी बेस कँप कडे हळूहळू पावलं टाकत टाकत मार्गस्थ झालो.

अंधार रात्री मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज शांतता भंग करत होता.हीच ती मंदाकिनी नदी जिच्या रुद्रावतारामूळे जून २०१३ मध्ये हा संपूर्ण परिसर उध्वस्त झाला होता.त्यात त्या माऊली मंदाकिनी नदीचा काहीही दोष नव्हता. निसर्गाच्या सान्निध्यात किंवा निसर्गावर जेंव्हा जेंव्हा मानव निर्मित बाबी अतिक्रमण करतात तेंव्हा तेंव्हा आई मंदाकिनी किंवा निसर्गातील इतर कोणतेही घटक रुद्रावतार धारण करणारच..! पायाला ठेच लागल्याने माझे विचार चक्र थांबले.नशीब, पायात बुट होता, नसता उजव्या पायाची बोटं नक्कीच रक्तबंबाळ झाली असती. अंधार असल्यामुळे आम्ही नंदी बेस कँप रस्ता परिसरात भेटत असणाऱ्या लोकांना विचारत विचारत अखेर मुख्य रस्त्याला लागलो होतो. इतक्यात एक पठ्ठया आमच्याकडे आला अन् म्हणाला...
" शाब, घोडा चाहिए क्या ? नीचे गौरी कुंड चलने का है क्या?
मी माझ्या मोबाईल मध्ये वेळ बघितली , रात्रीचे ११:२० वाजले होते.मी विचार करू लागलो, एवढी रात्र झाली आहे अन् हा पठ्ठया एवढ्या अंधारात अन् अतिशय कडाक्याच्या थंडीत कसं काय घेऊन जाणार..?
आम्हाला तर काही जायचे नव्हते,पण मी सहज म्हणून त्या पठ्ठयाला विचारले..
" भैय्या, इतनी ठंड और अंधेरेमे आप कैसे जा सकोगे?"
तो व्यक्ती मला  म्हणाला..
" तुमको क्या करने का है, मैं लेके जाऊंगा |
आम्हाला जायचे नव्हते, त्यामुळं मी नकार दिला. वास्तविक एवढ्या रात्री अंधारात घोडे प्रवास बंदी होती,तरी देखील ही माणसं काही प्रवाशांच्या जीवाशी खेळत होती.

आम्ही ११:३० वाजता नंदी बेस कँप मधील आमच्या तंबू मध्ये पोहचलो होतो. आमच्या बिछान्यावर पडल्यापडल्या शरीर एकदम शांत अवस्थेत गेले होते. अंगावर घेण्यासाठी जी व्यवस्था होती,  चैन ओढून बंद करण्याची पिशवी म्हणू शकतो आपण त्यास तिच्यात शिरून आम्ही पहुडलो होतो.आयुष्यात कधीही एवढी थंडी शरीराला माहीत नव्हती, त्यामुळं शरीर कधी एकदा सकाळ होईल अन् कधी सूर्य नारायणाच्या प्रकाशात जाईल या प्रतीक्षेत पहुडले होते. परिसरात शांतता पसरली होती.अधून मधून घोड्यांच्या गळ्यातील घंटीचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्र उलटून गेली होती.मध्यरात्री नंतर दिनांक २१ मे २०२३ ला प्रारंभ झाला होता.रात्री दोन वाजता मला तहान लागली होती.थंडी खूप होती,पण पाणी कमी पिल्यामुळे घशात कोरड पडली होती.मी माझ्या पत्नीला उठवले अन् बाटलीत पाणी आहे का या विषयी विचारले.पाणी नव्हते. दोन्ही मुलं शांत झोपी गेले होते.अखेर मी अन् माझी पत्नी बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या दुकानात पाणी विकत भेटते का हे बघायचे ठरवले.मी अन् माझी पत्नी सोबत बाहेर पडलो. नंदी बेस कँप रस्त्याच्या बाजूला एक छोटे हॉटेल होते.तिथं एक पुरुष अंगावर उबदार कपडे घेऊन बसलेला दिसला.तिथं आम्ही गेलो अन् प्यायला  विकत कोमट पाणी मिळेल का ? असे विचारले. साधे पाणी पिल्या जाणारच नव्हते, इतकी भयंकर थंडी होती.मला पूर्ण खात्री होती की, एकतर खूप रात्र आहे, त्यात समोरचे गिऱ्हाईक अडलेले आहे ही परिस्थिती ओळखून तो दुकानदार माझ्याकडून जास्तीचे पैसे घेणार याची खात्री होती. गरज माणसाला व्यवहार शून्य बनवते याचा प्रत्यय मला याक्षणी येत होता.दुकानदाराने स्वतः पैसे सांगण्याच्या अगोदरच मी त्यांना म्हणालो..
" भैय्या, बहुत ठंडी हैं, एक लिटर गुणगुणा पाणी दिजिये | मैं २०० ₹ देने के लिये तैयार हुं | 
माझे बोलणे ऐकल्यावर तो दुकानदार माझ्याशी बोलला..
" साब , ज्यादा नही लुंगा | जितना आने जाने का खर्चा आता है, वही मिलाकर दीजिये | सिर्फ ८०₹ दीजिये | आप बहुत थके हुए लग रहे हो | और चाहिए तो लिजीए|

मी खूप आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होतो.कारण इथे साधी पाण्याची बाटली ८०₹ मिळत होती.मघाशी एक लिटर कोमट पाणी बाटली १२० ₹ ला मिळाली होती.या व्यक्तीने मला कोमट पाणी करून एक लिटर पाण्याची बाटली फक्त ८० ₹  किमतीत दिली होती. कोमट पाणी असलेल्या दोन लिटरच्या बाटल्या घेतल्या. तिथून निघताना त्या पुरुषाकडे श्रद्धेने बघून तिथून आम्ही निघालो. 

आम्ही पुन्हा नंदी बेस कँप मधील आमच्या तंबूत परतलो अन् झोपी गेलो.त्यावेळी रात्रीचे २:३० वाजले होते. मात्र माझ्या मनात कोमट पाणी प्यायला दिलेल्या त्या देव माणसाविषयी पुढील ओळी‌ येऊ लागल्या होत्या...
' पता नहीं  किस रूप में आकर नारायण मिल जायेगा,
निर्मल मन के दर्पण मे वह राम के दर्शन पायेगा |'

वरील ओळी माझ्या अंतर्मनात येत होत्या, त्याविषयी माझ्या पत्नीला देखील सांगितले.त्यानंतर माझे शरीर कधी झोपी गेले हे समजलेच नाही.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १२  नोव्हेंबर  २०२३, रविवार ( लक्ष्मीपूजन )

क्रमशः


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा