शनिवार, ३० मार्च, २०२४

एका मंदिराला बघून जाणवलं..!


 










चिंतन ©️

एका मंदिराला बघून जाणवलं..!

==================================

देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांची प्रेमकथा अजरामर आहे. याच त्रिकोणी प्रेमकथेला चौथा कोन देखील आहे, त्याचं नाव आहे कच..!

थोर लेखक वि. स. खांडेकर यांनी ही अजरामर प्रेमकथा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ' ययाति ' द्वारे वाचकांच्या समोर अप्रतिम शब्द सामर्थ्याने प्रस्तुत केलेली आहे. त्याचं प्रेमकथेतील देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांच्यातील नात्याविषयी बऱ्याचदा बोलले जाते, मात्र तितकसं कच विषयी कुणी व्यक्त होत नाही. वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये कच विषयी  लिहिलं आहे.

याच चौकोनी प्रेमकथेत दैत्य गुरू शुक्राचार्य यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरते. दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं विश्वातील बहुदा एकमेव असलेलं एक मंदिर कोपरगाव , जिल्हा - अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर ) येथे आहे. सदरील मंदिर कोपरगाव ते शिर्डी रस्त्याच्या डाव्या बाजूला काहीसे आत मध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कोपरगाव बेट येथे आहे. तेथे दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं मंदिर आहे. मी बऱ्याचदा त्या ठिकाणी भेट दिली आहे. अर्थात त्याला निमित्त ठरले थोर लेखक वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये व्यक्त केलेली कथा..!

काळासोबत व काळाच्याही पुढे जाऊन मानवी वर्तनांचे अचूक वेध घेणारी दूरदृष्टी वि.स. खांडेकर या थोर लेखकास निसर्ग विधात्याने निसर्गदत्त दिली होती. वि. स. खांडेकरांचे लेखन म्हणजे मानवी मनाचे अचूक शब्दबध्द रेखाटलेले शब्दरूपी चित्र..! खांडेकरांचे साहित्य वाचतांना ती भाषाशैली पटकन वाचल्यावर कधीच अर्थबोधीत होत नाही. तर त्यांचे साहित्य वाचन करतांना हवी असते एकाग्रता व एकांतपणा..!  माझ्या मते ययाति हे साहित्य,  साहित्य विश्वातील अथांग महासागरच आहे. असा महासागर ज्यात प्रेम, वासना, शौर्य, सौंदर्य, अहंकार, करूणा, इ. मानवीय भावभावनांचे रस ओथंबून ओतलेय त्यात..! ययाति मधील प्रत्येक शब्द खूप विचारपूर्वक वाचल्यावर कळते काय अफाट सिध्दहस्त दैवी देणगीचा  किमयागार होता हा माणूस...! काळाच्या पूढे जाऊन भूतकाळातील पौराणिक पात्रांना आजच्या वर्तमानात शोधणारा महान लेखक ययाति मधून आपल्याला भेटतो.

शर्मिष्ठा,देवयानी, ययाति , कच अन् दैत्य गुरू शुक्राचार्य यांना आपल्या सहज सुंदर लेखणीच्या माध्यमातून समस्त रसिकांच्या हृदयात उतरवणारे खांडेकर..! काम, वासना अन् प्रेम यातील नाजुकशी किनार आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केली ती ययाति द्वारे..! ययाति हे जरी पुरातन पात्र असेल,मात्र तोच ययाति कित्येक कालखंडापासून समस्त मानवजातीचे प्रतिनिधित्व करत आलेला आहे अन् करत राहणार आहे.

ययाति ने मानवाच्या कोणत्या मानवी वर्तनाचे प्रतिनिधित्व केले...?
तर माझ्या मते....
ययाति हा प्रत्येक मानवातील वासनेचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील शौर्याचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील रसिकतेचे प्रतिनिधित्व करणारा  पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील, स्री जाती विषयी आसक्ती बाळगणारा  पुरुष..!
सौंदर्यावर भाळून त्यात उध्वस्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येक माणसाचे प्रतिनिधित्व देखील याच ययाति ने निभावले...!

मराठी भाषेला, साहित्याला उंचीवर नेणारा प्रेमळ मनाचा अन् मानवी भावना आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा थोर लेखक म्हणजेच वि.स. खांडेकर होय..! 🙏🏻

ययाति चे मुख्य लिखाण संपल्यावर त्यातील शेवटचे जे सारांश असलेले काही प्रकरणे वि. स.खांडेकर यांनी लिहिलेले आहेत ते फक्त आणि फक्त एक सिद्धहस्त लेखकच करू शकतो. मानवी भाव भावनांचे त्यात गहनातले गहन भाव त्यात व्यक्त केल्या गेले आहेत. विशेष म्हणजे स्री, वासना, पुरुष त्याचे होणारे अधःपतन इत्यादी अनेक विषयांना वि. स.खांडेकर यांनी ययाति मध्ये आपल्या लेखणीतून अधोरेखित केलेले आहे.

ता. क. दैत्य गुरू शुक्राचार्य मंदिरात मजकूर लिहिलेले काही फलक आहेत. त्यांचे फोटो सदरील लेखाच्या सोबत प्रदर्शित करत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या मजकूर असलेल्या फोटोंचे  करावे. म्हणजे सदरील स्थळाचे महत्त्व लक्षात येईल.

असो, शुभ दुपार मित्रांनो..! 🙏🏻

वंदे मातरम्

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ३० मार्च २०२४, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा