शनिवार, २९ जून, २०२४

सेम टू सेम अन् विश्वास


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' सेम टू सेम अन् विश्वास '


=================================


आज संध्याकाळी हेल्मेट खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका दुकानात मी अन् माझी धर्मपत्नी गेलो होतो. तिथं गेल्या गेल्या जे सद्गृहस्थ दुकान मालक म्हणून बसलेले होते त्यांना बघितल्या बघितल्या मला भारताचे महान वैज्ञानिक/ अंतरीक्ष शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांची आठवण आली. सदरील सद्गृहस्थ अगदी सेम टू सेम थोर शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्या सारखेच दिसत होते. असं म्हणतात की, या भूतलावर एकाच व्यक्ती सारखे दिसणारे किमान पाच जण असतात.त्याचा प्रत्यय मला तर याचि देही याचि डोळा आज पुन्हा एकदा आला होता. मला असाच सेम टू सेम दिसण्याचा अनुभव मागील वर्षी दिल्ली प्रवासात फिरताना आला होता. त्यावेळी ती व्यक्ती पालखेड गावातील पण हल्ली छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या मित्रासारखी दिसून आली होती.


आकार अन् रंग निवडून हेल्मेट पसंद केले. आमची स्कूटी दुचाकी काहीशी दूरवर पार्किंग मध्ये लावली होती. डिकीत हेल्मेट बसते की नाही याची खात्री करण्यासाठी मी हेल्मेट घेऊन जाऊ शकतो का ? असे विचारले. संबंधित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने " त्यात काय विचारता , घेऊन जा..!" असे म्हंटले. त्यांनी जरी माझ्यावर विश्वास दाखवला होता तरी देखील मी माझा महागडा मोबाईल त्यांच्या जवळ दिला अन् म्हणालो..

" माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. "

यावर ते सद्गृहस्थ म्हणाले - " अहो, मोबाईल कशाला देता " 

मी म्हणालो - " काका, तुमची अन् माझी अजिबात ओळख नाही.तुम्ही विश्वासाने महागडे हेल्मेट माझ्याजवळ दिले आहे. माझी स्कूटी दूरवर लावली आहे. मी तिकडून तिकडेच निघून गेलो तर..!"

त्यावर ते ज्येष्ठ सद्गृहस्थ हसून म्हणाले - " मी माणसं ओळखतो. "

तरीपण मी म्हणालो - " काका, तसे नाही, जग फार विचित्र आहे. कुणाचा भरवसा नाही. कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका. त्यात तुम्ही अन् मी तर अजिबात ओळखीचे नाही. आमची स्कूटी पण दूरवर पार्किंग केली आहे. माझा मोबाईल तुमच्या जवळ असू द्या. मी हेल्मेट स्कूटीच्या डिकीत बसते की नाही याची खात्री करतो अन् पुन्हा परत येतो."


अखेर मी माझा महागडा मोबाईल संबंधित व्यक्तीच्या काउंटरवर ठेवला अन् हेल्मेट घेऊन गेलो. हेल्मेट डिकीत बसते की नाही याची खात्री झाली अन् पुन्हा परत दुकानात आलो. माझा मोबाईल ताब्यात घेतला. संबंधित ज्येष्ठ व्यक्तीने माझ्याशी मग कित्येक वेळ अनौपचारिक गप्पा मारल्या.त्यात अजून वैचारिक खोली अन् त्याद्वारे मंथन झाले.


विश्वास असे मूल्य आहे जे एकदा गेले की, पुन्हा कधीच परत येत नाही. सेम टू सेम माणसं अन् विश्वास खूपच कमी प्रमाणात बघायला मिळतात.


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २९ जून २०२४, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा