गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

आत्मीयतेचा गोड गोड शिरखुर्मा..!






मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


आत्मीयतेचा गोड गोड शिरखुर्मा..!


======================


कुणाचं प्रेमळ मन जाणवायला अगदी सोप असतं. वरपांगी ऐवजी हृदयातून व्यक्त केलेली निरागसता ओळखता आली की नाते निर्माण होते.मग असं प्रेमळ मन जाणवायला अगदी सोपे जाते. मात्र हृदयातील प्रेमळपणा ओळखनं ही देखील एक कला आहे , कौशल्य आहे. कधी कधी रक्ताच्या नात्यात प्रेमळ मन अन् निरागसता दिसून येत नाही, जाणवत नाही.तर कधी कधी रक्त विरहित नात्यात प्रेमळ मन अन् निरागसता दिसून येत , जाणवते. मानवाच्या आयुष्याचा हा प्रवास फार गुंतागुंतीचा ठरतो. मात्र हृदयातून व्यक्त केलेली निरागसता ओळखायला आजकालच्या धकाधकीच्या विकृत सामाजिक व्यवस्थेत जरा कठीणच..! विकृती प्रत्येक समाज व्यवस्थेतील काहींमध्ये ठासून भरलेली आहे. बऱ्याचदा अशी काहींची विकृत समाज व्यवस्था ओळखून देखील न व्यक्त केलेली बरी..! त्याचं कारण काही वेळा व्यक्त करणं प्रगल्भ विचाराने घेतल्या जात नाही. प्रगल्भता समजून घेण्या ऐवजी  तिथं काही षडरिपू प्रकर्षाने जाणवतात.


अंधारी ता .सिल्लोड येथे शिक्षक म्हणून सेवेत असताना काही विद्यार्थी असे भेटले ज्यांचं मन अत्यंत प्रेमळ जाणवलं.गेल्या कित्येक दिवसांपासून प्रिय विद्यार्थी कैफ अशपाक शेख  माझ्या मागे लागला होता की, " सर शिरखुर्मा प्यायला आमच्या घरी चला, आमच्या घरी चला..! " आता पर्यंतच्या माझ्या २९ वर्षाच्या शिक्षकी सेवेत माझं नोकरीच्या गावात जाणं येणं तसं मर्यादितच राहिलं आहे.आपण भलं अन् आपली शाळा भली हे आचरण अंगिकारले. हा मर्यादित निकष अंधारी येथेही होता. आता पर्यंतच्या माझ्या शिक्षकी सेवेतील हा  निकष मुद्दामहून नव्हता, आपसूकच झाला होता. माझे हे वैयक्तिक वर्तन  योग्य की अयोग्य हा ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीचा विषय..! 


असो, कैफ यास मी म्हणालो की, " अरे बेटा कैफ, एकदा घरी आई वडील यांना सांग ,मी नंदन जाधव सर यांना शिरखुर्मा पिण्यासाठी घरी घेऊन येत आहे म्हणून. ऐनवेळी जाणं योग्य नाही. घरच्यांना काही काम असू शकते. माझा मोबाईल घे.घरी कॉल कर अन् सर्वकाही सांग.घरचे घरी असतील तरच चल. उगीचच आपल्यामुळे कुणाचे नियोजन बिघडायला नको. " हे ऐकून कैफने माझ्या मोबाईलवरून त्याच्या घरी कॉल केला.योग्य तो निरोप आला अन् मग मी अन् कैफ त्याच्या घरी पायीच गेलो.


असो, अखेर आज दिनांक २४/४/२०२५ गुरुवार रोजी अंधारी येथे प्रिय विद्यार्थी कैफ अशपाक शेख याच्या अत्यंत प्रेमळ आग्रहाला नकार देऊ शकलो नाही अन् एका निरागस मुलाच्या सोबत शिरखूर्मा पिण्यासाठी जाण्याचा दुग्धशर्करा योग्य जुळून आला.अत्यंत माणुसकी अन् आत्मीयतेने सस्नेह भेट झाली.


विशेष म्हणजे प्रिय विद्यार्थी कैफ यास सोबत घेऊन त्याचे आई अन् वडील गेल्या वर्षी हज यात्रेला गेले होते. कैफच्या मातोश्रीने गेल्या वर्षी हज यात्रेतून आणलेले पवित्र जमजम जल बाटलीबंद अन् तिथली उच्च प्रतीची खजूर मुद्दामहून पॅकिंग करून मला दिली. महादेवाचा प्रसाद समजून श्रद्धेने त्याचा स्वीकार केला.त्यांनी मला ज्यावेळी हज येथील पवित्र जल अन् खजूर दिली त्याचवेळी कैफचे वडील अशपाक भाऊ अन् मातोश्रींना म्हणालो की, " आपण श्रद्धेने मला हज यात्रेहून आणलेले पवित्र जल अन् खजूर दिले आहे.मी ह्या दोन्ही श्रद्धेय वस्तू माझ्या घरी असलेल्या देवघरातील महादेवाच्या पिंडी जवळ श्रद्धेने ठेवील अन् मग महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करील..!" आनंदाने उभयतांनी मला आत्मीयतापूर्ण आदरातिथ्य करून निरोप दिला.


आजच नुकतेच पहाटे तीन वाजता रात्रभर चार चाकी वाहन चालवून कैफचे वडील गुजरात मधील सुरतेहून अंधारी येथे आलेले होते.कापड दुकानदारी व्यवसाय असल्याने त्यांची खरेदी झाली होती.रात्रभर जागरण अन् दगदग झाली होती तरी देखील माननीय अशपाक भाऊ शेख आपल्या मुलाच्या गुरुजीसाठी आदरातिथ्य करत होते. प्रिय विद्यार्थी कैफच्या आग्रहाने अत्यंत आनंदाने रमजान ईद निमित्त असणाऱ्या गोड गोड पदार्थ शिरखुर्मा पिलो अन् मार्गस्थ झालो ,पुढील आयुष्याच्या गोड प्रवासासाठी..!


वंदे मातरम् 

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/४/२०२५, गुरुवार

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा