शनिवार, ५ जुलै, २०२५

श्रद्धा , विचार अन् आठवणी


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


श्रद्धा , विचार अन् आठवणी


======================


माझी स्व.आई अत्यंत धार्मिक होती. न चुकता दररोज सकाळ संध्याकाळ पालखेड गावातील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात जायची. मंदिरातून आल्यावर अगदी साध्या कुंकवाच्या करंड्यात असलेला साखरेचा प्रसाद घरातील सदस्यांना देत असायची. तो साखरेचा प्रसाद एकदम भारी , महागडा अजिबात नव्हता,पण त्यात अत्यंत पावित्र्य सामावलेले असायचे. 


माझी स्व. आई जो पर्यंत हयात होती, तो पर्यंत माझे स्व.वडील धार्मिक बाबतीत फारसे रमले नाहीत. माझ्या स्व.वडिलांचा धर्मापेक्षा कर्मावर अत्यंत विश्वास होता. माझ्या स्व. वडिलांचा धर्मापेक्षा कर्मावर अत्यंत विश्वास असण्याचे कारण त्यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक वटवृक्षाखाली हालाखीच्या परिस्थितीत ' कमवा व शिका ' या उक्तीतून घेतलेलं शिक्षण होते.


माझी आई स्वर्गवासी झाल्यावर माझ्या स्व. वडिलांनी धार्मिकता काही प्रमाणात अंगिकारली. टीव्हीवरील रामायण, महाभारत, बाबा महाराज सातारकर , रेडिओवरील भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी यांचा मन की बात इत्यादी मूल्यवर्धित कार्यक्रमांचा श्रद्धेने आनंद घेऊ लागले. वास्तविक माझे स्व.वडील कोपरगाव येथे त्यांच्या महाविद्यालयीन वयोगटात असताना राष्ट्र सेवा दलाचे सदस्य होते. कोपरगाव तालुक्यात गावोगावी माझे वडील अन् त्यांचे तरुण मित्र मंडळी सायकलवर प्रवास करून राष्ट्र सेवा दलाचे काम करत असत.त्याचवेळी माझ्या स्व.वडिलांचे महाविद्यालयीन मित्र कंगले आण्णा ( वैजापूरकर ) हे कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असत. कंगले आण्णा अन् माझे वडील यांच्या विचारधारा भिन्न होत्या,मात्र वैयक्तिक मैत्रीचे संबंध कायम टिकून राहिले.


काळाच्या ओघात माझा लग्नाचा सोयरे संबंध कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे झाला. त्या नंतर तेथील औताडे पाटील अन् रोहमारे पाटील घराण्यातील काही वयोवृध्द ज्येष्ठांच्या गप्पांच्या बैठकीत माझे स्व.वडील त्यांच्या महाविद्यालयीन काळातील कित्येक आठवणी त्यांच्या जवळ व्यक्त करत असायचे. 


वरील आठवण व्यक्त करण्याचा उद्देश एकच की, वरील एका ओळीत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या ' मन की बात ' याचा उल्लेख केल्याने एखाद्याचा राजकीय / अराजकीय गैरसमज दूर व्हावा हा प्रांजळ अन् प्रगल्भ हेतू होय. जिथं जे योग्य आहे तिथले योग्य ते वेचावे अन् बाकीच्यांना दुर्लक्षित करावे हा मूलमंत्र माझ्या स्व.वडिलांनी कृतीतून दिला.


दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो आला की, माझे स्व.वडील त्या फोटोला व्यवस्थित कापून ते जिथं नेहमी बसत असत त्याठिकाणी भिंतीवर चिकटवून द्यायचे. लासूर स्टेशन अन् छ्त्रपती संभाजीनगर स्थित घरी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रातील विठू माऊली माझ्या स्व.वडिलांच्या नित्य नियमाच्या ठिकाणी भिंतीवर चिकटवून तो फोटो जो पर्यंत सुव्यवस्थित राही तो पर्यंत विराजमान होत असत.


काळाच्या ओघात माझ्या स्व.वडिलांचा स्वर्गवास झाला. आताही दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो येत असतो. आता आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो आला की,त्या फोटोला व्यवस्थित कापून माझे स्व. वडील जिथं नेहमी बसत असत त्याच ठिकाणी भिंतीवर चिकटवून द्यायची आत्मिक अन् श्रद्धेय जबाबदारी मी सांभाळत आहे.


श्रद्धा , विचार अन् आठवणी या तिघांची एकमेकात योग्य ती सांगड घातली की,माणूस खऱ्या अर्थानं प्रगल्भ होतो. माणूस एकमेव असा प्राणी आहे जो या तिघांची एकमेकात सांगड गुंफून आपल्या पूर्वजांना आपल्या वर्तमानात नेहमी जिवंत ठेवू शकतो. मृत्यू तर शाश्वत सत्य आहे. मात्र ज्या ज्येष्ठांवर आपलं सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून केलेलं निस्सीम प्रेम असतं, त्यांच्या आठवणींवर जर अजून जास्त निस्सीम प्रेम केलं की, आपले पूर्वज नेहमी आपल्याच सोबतच असतात याची अनुभूती येते. हा माझा स्वानुभव आहे. 


यात पण एक मेख आहे. प्रत्यक्ष सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून न करता , ज्येष्ठांना त्रास देणाऱ्यांना ज्येष्ठांच्या आठवणी अशा स्री अन् पुरुषाला जिवंतपणी आयुष्यभर छळतात..!


असो, आज आषाढी एकादशी आहे. आजच्या वर्तमानपत्रात देखील विठू माऊलीचा छानसा फोटो छापून आला आहे. त्या फोटोला व्यवस्थित कापून माझे वडील नेहमी जिथं बसत असत तिथं बाजूला असलेल्या भिंतीवर विठू माऊलीच्या फोटोला चिकटवून दिला आहे.  


जय हरी माऊली 🙏

वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ६/७/२०२५, रविवार ( आषाढी एकादशी )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा