शनिवार, २५ एप्रिल, २०२६

निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र 


=====================


सोबत जिवलग मित्र मनोहर गावडे, 

सोबतीला थंडगार ऊसाचा रस 

अन्.... 

निवांत निशाचर वेळ..!

ठिकाण - छत्रपती संभाजीनगर शहरातील एक निवांत कोपरा..!


निवांतपणा, आपल्याला आपल्यातील आपलं काय आहे याचा शोध घ्यायला शिकवतो.मग तो निवांतपणा एकट्यातील असो अथवा प्रिय मित्राच्या सोबतचा..! त्यात हमखास आपला आपण केलेला शोध नक्कीच सापडतो. त्यातल्या त्यात निवांतवेळी आपलं कुणीतरी सोबत असलं की, मनाचे आयुष्य , दीर्घायुषी होते.निवांत बसल्यावर कुणी आपल्याला एकलकोंडा म्हणो अथवा काहीही म्हणो, मात्र त्या एकांतात आपल्यातील आपलं कुणीतरी नक्कीच सापडतो..!


आज ज्यावेळी प्रिय मित्र मनोहर अन् मी निवांत होतो, त्यावेळी आयुष्याच्या प्रवासातील कित्येक क्षणांना , व्यक्तींना पुन्हा एकदा जिवंत केले.


वास्तविक मी निशाचर नाही,पण काही वेळी व्हावं लागतं, आपला भुतकाळ शोधण्यासाठी..!

आपल्या मनाला जाणून घेणारे कुणी सोबतीला असले की, त्या बैठकीची रंगत काही औरच असते.

अजून यापेक्षा अजून काय हवे..?

त्या गप्पांच्या बैठकीत आम्हा दोघात उपस्थित होता तो आमचा अत्यंत जिवलग वर्गमित्र स्व. विनोद पाटील..! ♥️


विनोद पाटील आम्हाला कायमचा सोडून कधीचाच गेला आहे, मात्र आजही तो नेहमी सोबत असतो.स्व.विनोद पाटील सारखा अत्यंत प्रेमळ अन् खूप मोठ्या मनाचा मित्र आमच्या संपूर्ण डी. एड. बॅच कुणीच नव्हता. नियती पण ना...सर्वांच्या आवडत्यालाच का आपल्या सोबत घेऊन जाते कुणास ठाऊक..?

जसे माझ्या आयुष्याच्या प्रवासातील पालखेड येथील दोन जिवलग बालमित्रांना नियतीने खूप लवकर आपल्यातून कायमचे दूर तिच्या घरी नेले आहे. स्व.आप्पासाहेब सुराशे अन् स्व.शाम शेळके..! दोघेही जिवलग बालमित्र होते..!♥️♥️


माझी फेसबुक मित्र यादी मोजकीच आहे. त्यात कायमचे अढळ स्थान राखून आहे स्व.विनोद पाटील..! विनोद कधीचाच स्वर्गवासी झालेला आहे, मात्र विनोद पाटील यास मी कधीच अनफ्रेंड करू शकत नाही.जिवलग मित्र होता तो..! भावना जपायचा असतात. विनोद, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप आवडता होता.आज मी अन् माझा खूप जिवलग मित्र मनोहर गावडे ज्यावेळी रात्री निवांत बसलो होतो, तेंव्हा विनोदची उपस्थिती आम्हाला गतकाळातील आठवणीत घेऊन गेली.विनोद पाटील हा आमच्या मैत्रीचा सर्वोच पॉईंट होता. कधीतरी लिहिल , त्यावर..! जिवलग मित्राचा मृत्यू हा आपल्या त्या कालखंडाचा मृत्यू असतो. सगळं काही पाठीमागे राहते.


प्रिय मित्र मनोहर अन् मी ऊसाचा रस पिऊन झाल्यावर निघालो , पुन्हा एकदा आमच्या प्रापंचिक आयुष्याच्या प्रवासात..!

पुन्हा कधीतरी भेटू , आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी..!

असेच कुठेतरी..!


आम्हाला भेटायला , फारसा काही खर्च लागत नाही आणि पचायला ७२ तास लागतील असे खाद्य पदार्थ देखील खाण्यात लागत नाहीत. त्याचे कारण आम्ही गुरुबंधू आहोत म्हणून..! 🕉️


जाणीव अन् जाणिवा जिवंत ठेवणारे आयुष्यात सोबत असले की, बाबा केदारनाथाच्या चरणी भरून पावल्याचे आत्मिक समाधान लाभते. साधं,सरळ आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा अजून काही लागत नाही.


असो, शुभ रात्री मित्रांनो..!🙏🙂


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २५/४/२०२६, शनिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा