मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई
=====================
लिंगभेद विसरून एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला माणूस मग तो कोणत्याही वयोगटातील असो तो भेटला की जपावा, कदाचित पुढच्या भेटीच्या वेळी भेटेलंच असं नाही..!
एकतर्फी अथवा एकमेकांना आवडलेला त्या क्षणात भेटलेल्या त्या काही क्षणापुरते का होईना, आपण कुणाला तरी आपलंसं करावं.आठवण म्हणून वस्तू तर आपण देऊच, मात्र त्या तेवढ्या क्षणासाठी आपलंसं केल्याने जो आनंद प्राप्त होतो तो मनाला सुखावणारा असतो.कारण दूरच्या प्रदेशात आपलं पुन्हा जाणे होईल की नाही माहित नसतं. जरी यदा कदाचित जाणे झालेच तर पुन्हा तो माणूस भेटेल की नाही याची खात्री नसते.
दिनांक ६ जून २०२६, शनिवार रोजी रावेर खेडी मध्यप्रदेश येथील पहिले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात एक माणूस ज्याला वयोगटाच्या भाषेत बालक म्हणतात तो मला भेटला होता. काही वेळ त्याच्याशी हिंदी भाषेत संवाद साधला.जास्त बोलला नाही.लाजाळू जाणवला. त्या निरागस जीवाला यथायोग्य ते दिले.तिथल्या परिसरातील काही पुरुषांशी संवाद साधला असता बोलता बोलता मी सांगितले की, " हम महाराष्ट्र से आये हैं!" हे ऐकल्या ऐकल्या त्यातील एकजण लगेच म्हणाला...
" आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!"
हा आपुलकीचा संवाद ऐकल्यावर मन भरून आले.त्या पुरुषांचा आणि आमचा काहीच परिचय नव्हता.ज्याला जात धर्म म्हणतात आणि त्या एकमेकांना माहीत झाल्यावर जात धर्म माहित झालेला, त्यातल्या त्यात आपल्या जातीतील अन् आपल्या धर्मातील माणूस जर भेटला तर माणूस जरा जास्तच आपुलकी दाखवतो हा पुरोगामी सिद्धांत आहे. त्याही बाबी आम्हाला एकमेकांच्या माहित नव्हत्या. आम्ही हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या महाराष्ट्रातील आहोत हाच धर्म अन् हीच जात रावेर खेडी येथील त्या अनोळखी व्यक्तीला आमच्यात जाणवली होती.याची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी साधारणतः पाच मिनिटे त्या तिथल्या पुरुषांच्या सोबत संवाद साधत होतो. मात्र जेंव्हा आम्ही महाराष्ट्रातील आहोत हे ऐकल्या ऐकल्या त्यांनी ज्या आत्मियतेने " आप तो बाजीराव पेशवा सरकार के यहा से हो | पानी पिने को चाहिए क्या..? घरसे लाता हुं..!" हे वाक्य जेव्हा त्याच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा आपली जात अन् आपला धर्म पहिले बाजीराव पेशवा सरकारच जाणवले.
सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भौगोलिक कक्षा रुंंदावणारा थोर सेनानी , छत्रपती शिवरायांना परम स्थानी मानणारा हिंदवी स्वराज्यातील एक अद्वितीय योद्धा पहिले बाजीराव पेशवे यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत याचा सार्थ अभिमान त्यावेळी जाणवला.पेशवा सरकार यांच्या मूळच्या भूमीतील आपण आहोत हे ऐकल्यावर रावेर खेडी येथील त्या अनोळखी पुरुषाने थेट त्यांच्या घरून आम्हाला प्यायचे पाणी आणून देण्याबाबतची जी आत्मियता व्यक्त केली होती ती आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची पुण्याई होती.
पहिले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधी स्थळाच्या बाजूलाच वाहणाऱ्या आई नर्मदेने आपल्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्यांना सोळाव्या शतकापासून ते आजतागायत जपले आहे. आपले कित्येक पूर्वज आई नर्मदेच्या परिसरात कायमचे विसावले आहेत.ते आपले पूर्वज जरी मुळचे आपल्या महाराष्ट्रातील होते, तरी पण आई , आई असते..! आई नर्मदेने आपल्या महाराष्ट्राच्या कन्येला, कित्येक शूरवीर सेनानींना आपल्या परिसरात मायेने आपलेसे केले.आज जेव्हा कधी माझ्यासारखा भटकंती करणारा एखादा भटका आई नर्मदेच्या परिसरात भटकतो तेव्हा आजही आपल्या सोबत सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, मल्हार बाबा होळकर, महादजी बाबा पाटील शिंदे, आई अहिल्यादेवी होळकर आहेत याची कृतीतून जाणवणारी जाणीव होते.
वंदे मातरम्
आयुष्याच्या प्रवास मार्गावरील एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : २०/६/२०२६, शनिवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा