आमचे गाव आमची माणसं ©️
" राम.. राम..! " 🙏
================================
माझे जन्मगाव पालखेड, ता. वैजापूर येथे आमच्या घराच्या समोरच ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेव मंदिर आहे.
माझ्या बालपणी मंदिरात प्रवेश करते वेळीच , डाव्या बाजूला कोपऱ्यात भिंतीवर मंदिरातील सर्व लाईट सुरू करण्याचे मुख्य बटण होते. मी त्यावेळी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो. त्यावेळी नेहमीप्रमाणे एक दिवस संध्याकाळी मंदिरात दर्शनाला गेलो होतो.त्यावेळी मंदिरातील सर्व लाईटचे मुख्य बटण आमच्याच गावातील वयोवृध्द व्यक्तिमत्व स्वर्गीय माणिक बाबा डोमाळे चालू करण्यासाठी चालले होते.मी आणि माझा जिवलग बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सुराशे त्यांच्या मागे मागे गेलो.तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांनी लाईट चे बटन दाबल्या बरोबर " राम राम..!" असे म्हणाले..! मी आणि आप्पा ने अवतीभोवती पाहिले तर कुणीही नव्हते..! मला राहावले नाही.मी तिर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांना म्हणालोच.....
" बाबा, तुमच्या आसपास कुणीही नाही,मग तुम्ही " राम राम...!" कुणाला म्हणाले...?
यावर स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आम्हाला म्हणाले....
" पोरांनो, यधळा जव्हा लाईट , दिवा लावला जातो ना, तव्हा, तव्हा राम.. राम असं म्हणायची रीत हाये..! कोणत्या बी कामाची सुरुवात राम राम असं म्हणून करत्या..! यधळा..यधळा समदेजण दमून भागून आलेले असतात..! तेवढंच देवाचं नाव घेतल्यानं मन शांत होत पोरांनो..! "
हेच स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे माझ्या आजोबांचे म्हणजेच चंपतराव जाधव यांचे खूप जिवलग मित्र होते, असे माझे तीर्थरूप वडील आजही सांगतात. तत्कालीन आमच्या पालखेड गावातील वारकरी सांप्रदायाची धुरा तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे यांच्याच खांद्यावर होती.
मग, काय त्या दिवसापासून बालपणी पालखेड येथील आमच्या घरातील चिमणी ( दिवा ) लावायचे काम बऱ्याचदा मीच करू लागलो. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी चिमणी ( दिवा) लागतेवेळी " राम ,राम ...!" म्हणायची जी श्रद्धेय सवय लागली ती, आजतागायत कायम आहे. कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.
तीच सवय आणि तीच गतकाळातील सुखद आठवण माझ्या मुलांना देखील मागेच सांगितलेली आहे. त्यामुळे मुलंही घरातील, पार्किंग मधील दिवे ( लाईट, ट्युब ) लावताना एकट्यात कधी मनातल्या मनात तर कधी हळू आवाजात.." राम राम..!" असं म्हणतात.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात संध्याकाळी दिवा लावते वेळी
" राम..राम..!" म्हणण्याची सुरुवात करतेवेळी असणारे स्वर्गीय तीर्थस्वरुप माणिक बाबा डोमाळे आज हयात नाहीत अन् माझा अती प्रिय बालमित्र स्वर्गीय आप्पासाहेब सूराशे देखील हयात नाही..! पण त्यांच्या आठवणीतील ही श्रध्येय परंपरा मी जपून ठेवली आहे. आणि तीच श्रद्धेय आठवणीतील परंपरा निदान आज तरी मुलं सांभाळून आहेत, बाकी मुलं, ही श्रध्येय परंपरा पुढे सुरू ठेवतील की नाही, माहीत नाही..!
कोणत्याही सुखद आठवणीतील श्रद्धेय परंपरा ,आपल्या सांस्कृतिक वारस्याला पवित्र आठवणीने पुढे नेत असतात. जसे की माझ्या आठवणीतील, संध्याकाळी दिवे लावते वेळी म्हणण्याची श्रद्धेय परंपरा...
" राम, राम..!" 🙏
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : ११/८/२०२०, मंगळवार, गोकुळाष्टमी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा