चिंतन ©️
🎼 ' नक्षीदार , चंद्रमुखी..!'. 🎼
==============================
आज दिनांक ७ मे २०२२ , शनिवार रोजी चंद्रमुखी चित्रपट पाहिला अन् त्यातील प्रत्येक नक्षीदार कलेच्या निखळ प्रेमातच पडलो..!
कला ही नेहमी साज शृंगार चढवून आपलं प्रेम हे समोरच्या रसिक मनाला देत असते.कला ही आपल्यात जसं प्रेम फुलवते,अगदी तसंच प्रेमात देखील कला प्रज्वलित होते.थोडक्यात कला अन् प्रेम ह्या एकमेकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमजोड्यांपैकी एक जोडी आहे.पण जेंव्हा कलेत उच नीचतेचा भेद निर्माण होतो तेंव्हा याच कलेवर स्वतः ला ओवाळून टाकणारी मनं पार होरपळून निघतात, अन् शेवटी उरते ती फक्त त्या दोन मनांची उदिग्नता..! याच कलेवर अन् प्रेमावर स्वार होऊन प्रेमळ आयुष्याचे प्रेमळ स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या दोन मनात जेंव्हा एकाच्या आयुष्याचा स्तर उंच ठरवल्या जातो अन् एकाचा स्तर खालचा तेंव्हा अशा दोन मनांची स्मशानभूमी होऊन जाते.
मी, आज वर व्यक्त केलेल्या साज शृंगाराने सजविलेल्या प्रेमाला ,प्रेमातील त्यागाला ,प्रेमाच्या दोन मनांना समाजव्यवस्थेने उच नीच ठरविलेल्या भावूक प्रेमकथेला पाहिले.निमित्त होते लेखक विश्वास पाटील सर लिखित ' चंद्रमुखी ' कादंबरीवरील मराठी चित्रपट ' चंद्रमुखी ' पाहण्याचे..!
चंद्रमुखी ही कथा लोककलेला वाहून घेतलेल्या अशा स्री ची आहे, जिच्या प्रेमळ संवेदना समाजव्यवस्थेच्या कर्मठ मानसिकतेत मरून जातात अन् तिच्या आयुष्याची प्रेमाची प्रेमळ संवेदना मृत होऊन जाते. चंद्रमुखीच्या आयुष्याची प्रेमकथा जरी मृत होऊन जाते,पण याच प्रेमाचं प्रतीक आपल्या गर्भात घेऊन निघून जाते, पुन्हा त्याच विश्वात, जिथं दौलतराव देशमाने यांना फक्त आठवणीत आठवण्याशिवाय दुसरं तिच्या हाती काहीही नसतं..!
दौलतराव देशमाने हा खासदार असतो.त्याच्यात लपलेला एक रसिक अन् साहित्यिक देखील असतो.याच रसिकतेच्या प्रेमापोटी त्याची अन् चंद्रमुखीची भेट होते. दोघांच्या प्रेमाला शृंगार चढतो.मात्र हा शृंगार चढत असताना दौलतराव देशमाने यांचं राजकीय आयुष्य बाधा ठरते अन् या दोन भावूक मनांची स्मशानभूमी होऊन जाते.
राजकीय व्यवस्थेत अशा कित्येक प्रेमकथा निर्माण होतात ज्यात एक प्रेमी समाजव्यवस्थेतील उच्च गटातील असतो अन् एक प्रेमी एकतर लोककलाकर असतो किंवा ज्या समाजव्यवस्थेकडे आजही तुच्छ नजरेने पाहिल्या जाते त्यातील असतो.यात उध्वस्त होते तेच मन ज्या समाजव्यवस्थेकडे आजही तुच्छ नजरेने पाहिल्या जाते. दौलतराव देशमाने यांचं चंद्रमुखी वर निस्सीम प्रेम असते.पण जेंव्हा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा ,हाच दौलतराव देशमाने,अगदी पालापाचोळा फेकून द्यावा अगदी तसेच चंद्रमुखीच्या स्वच्छ ,सुंदर अन् निस्सीम प्रेमाला अनोळखी करतो. चंद्रमुखी मात्र आपल्या प्रियकराला म्हणजेच दौलतराव देशमाने यांना त्याच्या राजकीय व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दूर निघून जाते, सर्वोच्च त्याग करून..! सर्वोच्च त्याग यासाठी म्हणातोय की, स्री ज्यावेळी एखाद्या पुरुषावर निस्सीम प्रेम करते अन् तो पुरुष ज्यावेळी तिला आपल्या स्वार्थासाठी अनोळखी करतो. त्यावेळी स्री ने आपल्या प्रियकराला त्रास होऊ नये म्हणून केलेला त्याग हा सर्वोच्चच ठरतो.हाच त्याग चंद्रमुखी करते अन् दौलतराव देशमाने यांच्या आयुष्यातून दूर निघून.जाते.मात्र चंद्रमुखी आपल्या सोबत दौलतराव देशमाने यांचा अंश आपल्या गर्भात घेऊन जाते. हा खूप भावूक प्रसंग चंद्रमुखी या चित्रपटात दौलतराव देशमाने ( आदिनाथ कोठारे ) अन् चंद्रमुखी ( अमृता खानविलकर ) यांनी आपल्यातील सर्वोच्च अभिनयाने अजरामर केला आहे.
लोक कलाकार असणाऱ्या स्रीने प्रेम करावं की करू नये या द्विधा मनःस्थितीत हा चित्रपट पुढे पुढे सरकत असतो. चंद्रमुखी ही लोककलेला समर्पित नृत्यांगना असते, मात्र तिच्याच भाषेत सांगायचे झाले तर ती रांड नसते, असते फक्त नृत्यांगना..! दौलतराव देशमाने हा खासदार असलेला राजकारणी चंद्रमुखीच्या संगीत बारीवर सुरुवातीला एक दर्दी रसिक म्हणून येतो अन् कायमचा चंद्रमुखीच्या आयुष्याला हळुवार स्पर्श करून प्रेममय हिस्सा होऊन जातो.दौलतराव देशमाने ,त्यांची पत्नी डॉली ( मृण्मयी देशपांडे ) अन् चंद्रमुखी यांची त्रिकोणी प्रेमकथा ही जशी काळजाला भिडते तसाच या तिघांनी केलेला अभिनय सुध्दा..!
चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच ओघवत्या शैलीत श्री.प्रसाद ओक यांनी केले आहे. ज्या प्रमाणे एखादी शृंगारिक लावणी फडात सादर करावी तसं शृंगारिक दिग्दर्शन केलंय प्रसाद ओक सरांनी..! चित्रपटाची प्रत्येक फ्रेम कशी नक्षीदार झाली आहे..! यातील संवाद हळुवार अन् खूपच अर्थपूर्ण आहेत.यासाठी या चित्रपटाचे संवाद लेखक चिन्मय मांडलेकर यांना नक्कीच दाद द्यायला हवी..! या चित्रपटातील अजुन एक पात्र आपल्या अभिनयाने लक्षात राहते अन् ते म्हणजे बत्ताशा ( समीर चौगुले ) होय.आपल्या सहज सुंदर तमाशा प्रधान अभिनयाने समीर चौगुले यांनी बत्ताशा हे पात्र खूपच छान उभे केले आहे..! आदिनाथ कोठारे यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका चंद्रमुखी या चित्रपटात दौलतराव देशमाने यांच्या रूपाने निभावली आहे. अमृता खानविलकर यांनी देखील त्याच तोडीस तोड चंद्रमुखीचा अभिनय केला आहे.
चंद्रमुखी चित्रपटाचा आत्मा ,या चित्रपटाचे संगीत आहे.अजय - अतुल यांनी एखादी मेहंदी रेखाटावी तसे यातील प्रत्येक गाणं आपल्या सुरेल अशा संगीताने सजवले आहे.मला विशेष आनंद याचा वाटतो की, या चित्रपटातील ' बाई गं..!' ही लावणी संगीतबद्ध करताना यातील तबला वादक म्हणून माझे प्रिय फेसबुक मित्र प्रसादजी पाध्ये यांनी साथ दिलेली आहे.प्रिय प्रसाद भाऊ पाध्ये आपण ज्या नादब्रह्माचे अस्तित्व यात तबला वादक म्हणून सादर केलं आहे, त्या आपल्यातील सारस्वताला माझ्याकडुन विनम्र वंदन..! चंद्रमुखी या चित्रपटाचे मला अजून एक वैशिष्ट्ये जाणवले अन् ते म्हणजे चित्रपट संपल्यावर शेवटी जी नामावली येते त्यात प्रत्येक गाण्याला ज्या ज्या वादकांनी आपली संगीत साथ दिली आहे त्यांचे क्रमवार नावे येतात..!
आज मी औरंगाबाद येथील नुपूर चित्रपटगृहात चंद्रमुखी चित्रपट पाहिला.विशेष म्हणजे मी जो दुपारचा शो पाहिला त्या शो करिता बरीच वयस्कर मंडळी ज्यात स्री अन् पुरुष दोघेही ,ते उपस्थित होते.यातच चंद्रमुखीचे यश आहे..!
शेवटी एक रसिक म्हणून एकच अपेक्षा व्यक्त करतो की, चित्रपटातील भूमिकेसाठी चित्रपट कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो तसाच अस्सल मातीतील लोककलेच्या लोककलावंतांना असा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार द्यायला हवा.जेणेकरून उपेक्षित आयुष्य जगून समाजमनाला आपल्या अस्सल लोककलेने प्रफुल्लित करणाऱ्या लोककलावंतांचा तो खरा सन्मान ठरेल..!🙏🏻
वंदे मातरम्..!
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ७ मे २०२२, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा