#चिंतन
तरल स्वभावाचे ही मॅन धर्मेंद्र..!
====================
माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अस्सल शेतकरी असलेले अन् शेवट पर्यंत शेतीवर निस्सिम प्रेम करणारे पहिले अन् बहुदा शेवटचे अभिनेते धर्मेंद्र देओल हेच होते. पंजाबच्या मातीतील धष्टपुष्ट व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले आहे.
धर्मेंद्रजी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत उत्कट भाव विश्वातील आयुष्य जगले. त्या उत्कट प्रेमाच्या वैवाहिक आयुष्यात गतकाळातील अन् तद्नंतरच्या आयुष्यात त्यांनी कुणालाही अंतर दिले नाही हे विशेष आहे. आपल्या आयुष्यातील दोन्ही कुटुंबावर फक्त आणि फक्त निस्सिम प्रेम करत राहिले. दोन्ही कुटुंबावर एवढे निस्सिम प्रेम केले की, त्यांना दोन्ही कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तळहातावरील फोडा प्रमाणे जपलं. पुरुषाच्या दोन वैवाहिक आयुष्यात सहसा असे भावनिक अन् निखळ प्रेमळ आयुष्य आढळून येत नाही. धर्मेंद्र यांच्या निखळ प्रेमाची ती किमया अन् कमाई होती.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकानेक उत्तमोत्तम भूमिका केल्या, मात्र हिंदी चित्रपटसृष्टीने त्यांचा यथायोग्य सन्मान केला नाही. उत्तमोत्तम भूमिका करून देखील पुरस्कार मिळाला नाही याची खंत त्यांनी एकदा बोलून दाखवली होती. लोकांचे लोकप्रिय धर्मेंद्र हे नातं अख्ख्या हिंदी चित्रपटसृष्टीत धर्मेंद्र यांच्याच वाट्याला आले. धर्मेंद्र यांच्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. पुरस्कारासाठी कुणालातरी मॅनेज करणे हे धर्मेंद्र यांना जमलेच नाही. स्वाभिमानी पंजाबी जाट असल्याचे ते स्वाभिमानी क्षत्रिय लक्षण होते.
मी अन् माझ्या कित्येक बालमित्रांनी पालखेड येथे बालपणी अन् माध्यमिक वयोगटात असताना स्व.दौलतराव काका कुमावत यांच्या घरी असणाऱ्या VCR व्हिडिओ वर धर्मेंद्र यांचे काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले होते.त्यात प्रामुख्याने हुकूमत , लोहा, मेरा गाव मेरा देश यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. " कुत्ते, कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा..!" ही डरकाळी फक्त धर्मेंद्र यांच्याच मुखी शोभत असायची. एवढ्या ताकदीचा संवाद म्हणण्याची वास्तवातील अस्सल ताकद धर्मेंद्र यांच्या नंतर फक्त त्यांचा मुलगा सनी देओल यांच्याच व्यक्तिमत्वाला शोभून दिसली.
सत्यकाम, चुपके चुपके , गुलामी या चित्रपटातील धर्मेंद्र यांचा अभिनय सर्वोत्तम होता.जे. पी.दत्ता दिग्दर्शित गुलामी हा चित्रपट माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी गुलामी या चित्रपटात साकारलेला रंजित चौधरी ही व्यक्तिरेखा त्या तमाम अन्यायग्रस्त अन् सरंजामशाही प्रवृत्तीच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांची प्रतिनिधित्व करते. गुलामी चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण फतेहपुर शेखावटी ( राजस्थान ) येथे झालेले आहे. आयुष्यात एकदा तरी फतेहपूर शेखावटी येथे भेट द्यायची आहे. दिग्दर्शक जे.पी.दत्ता अन् ऋषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांच्यातील सर्वोत्तम अभिनयाला गुलामी अन् चुपके चुपके या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या समोर प्रस्तुत केले. धर्मेंद्र उत्कृष्ट कवी होते.मात्र त्यांची ती अलौकिक प्रतिभा पुढे आली नाही.
एक अत्यंत तरल स्वभाव असलेले , अस्सल मातीशी इमान राखून असलेले, अत्यंत भावोत्कट असणारे आणि अस्सल देहयष्टी लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणून धर्मेंद्र हे शेवटचे अभिनेते आहेत असे वाटते.हिंदी चित्रपटसृष्टीत हा अस्सल वारसा धर्मेंद्र यांचे थोरले चिरंजीव सनी देओल हेच एकमेव पुढे चालवत आहेत असे वाटते.त्यानंतर उपरोक्त उल्लेखित अस्सल वारसा इतर कुणाकडे आहे असे जाणवत नाही.
पंजाबच्या मातीतील धष्टपुष्ट व्यक्तिमत्व धर्मेंद्रजी आज अनंतात विलीन झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏
वंदे मातरम्
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २४/११/२०२५, सोमवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा