शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

देवभूमी 🕉️ भाग क्रमांक ६





 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ६ )

===================================

केदारनाथ घाटी चढताना आता जास्तच प्रमाणात पायात थकवा जाणवायला लागला होता.आम्ही दिनांक २० मे २०२३, शनिवारी पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेली पायी तीर्थयात्रा रामबाडा येथे सकाळी अकरा वाजता पोहोचली होती. तिथून पुन्हा सव्वा अकरा वाजता निघून पुढील प्रवास सुरू केला होता. पायी प्रवासातील भयंकर चढाई अन् त्यात अतिशय थंड हवामान, यामुळं चालताना वेग मंदावला होता. आमचा धाकटा चिरंजीव नयनचे चालणे मात्र त्याच जोशात होते, जे की पहाटे पाच वाजता सुरू केले होते.सकाळच्या सव्वा अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या प्रवासात कमी रुंदीच्या अन् दगडाचे पक्के कच्चे बांधकाम असलेल्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या , घोड्यांच्या धक्क्यांनी आम्ही अधून मधून स्वतः ला वाचवत चाललो होतो.तरी देखील एखादा पायी प्रवासी म्हणा किंवा घोड्यावरील प्रवासी, यांचा धक्का बसतच होता.त्यातल्या त्यात घोड्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या बुटांचा धक्का बसतच होता. पडून गेलेल्या पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावर चिखल झाला होता. तो चिखल मातीचा नव्हता, तर येणाऱ्या जाणाऱ्या घोड्यांच्या विष्ठेमुळे झाला होता.बऱ्याचदा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या घोड्यांच्या पायांच्या दबाई मूळे तो चिखल आमच्या पँटवर, कपड्यांवर उडू लागला होता. अधून मधून त्याच रस्त्यावर तो चिखल एका बाजूला ओढून रस्ता सुरळीत करणारे स्वच्छता कामगार आढळून येत होते.

आता दुपारचे एक वाजले होते.पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या शरीरात थकवा अन् त्यातल्या त्यात घशाला कोरड पडली होती. पाणी पिण्या ऐवजी लस्सी पिऊ असे सर्वानुमते ठरले.पावसाची बुरबुर सुरू झाली होती. नंतर पुन्हा ती बुरबुर बंद झाली. भयंकर थंडी जाणवायला लागली होती.रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये आम्ही थांबलो.अमुल लस्सी पिऊन झाले होते. आराम खूप करावसा वाटत होता,पण अजून ध्येय टप्प्यात आले नव्हते.अमुल लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारी सव्वा वाजता पुन्हा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी निघालो.काही अंतर गेल्यावर बर्फाचे खूप मोठे ग्लेशियर रस्त्याच्या बाजूला दिसले.त्याच बर्फाच्या ग्लेशियरचे आच्छादन पार खाली रस्त्यावर आलेले होते. तिथला रस्ता अतिशय निसरडा अन् धोकादायक होता.काठीचा आता खूप मोठा उपयोग होणार होता. त्या परिसरात काही सुरक्षा रक्षक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना धोक्याची सूचना ,मार्गदर्शन अन् मदत करत होते. आम्ही गौरी कुंड ते इथपर्यंतच्या प्रवासातील सर्वात मोठ्या धोकादायक मार्गावर आलेलो होतो. रस्त्यावर पसरलेल्या त्या बर्फाच्या ग्लेशियरवर दोन मार्ग तयार केलेले होते.एक खालून होता, तर एक मार्ग त्याच्याच बाजूला असलेल्या पण उंचावरून होता.खालच्या बर्फाच्छादित रस्त्यावर घोड्यांच्या खेचरांच्या विष्ठेमूळे चिखल होता तसेच घोडेस्वार, पालखी, पायी प्रवासी यांची खूप गर्दी होती. तर त्याच्याच बाजूला असलेल्या उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावर फक्त आणि फक्त बर्फच बर्फ होता. पायी प्रवासी कमी संख्येने दिसत होते. आम्ही सर्वानुमते उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावरून पुढे हळूहळू जाण्याचे ठरवले.सर्वात पुढे थोरला चिरंजीव नमन, त्याच्या मागे धाकटा चिरंजीव नयन, त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी मी असा क्रम चालण्याचा नक्की केला.पावलं हळूहळू टाकत टाकत त्या अतिशय निसरड्या बर्फाच्छादित रस्त्यावरून आम्ही पुढे पुढे चाललो होतो. त्याचं रस्त्यावर काहीजण येणारे जाणारे प्रवासी देखील होते,पण त्यांची संख्या मर्यादित होती.जर यदा कदाचित पायाखालचा बर्फ ठिसूळ निघाला तर आपण हमखास तिथं पडणार याची पुर्णतः जाणीव होती.नुसते पडणार नव्हतो,तर बाजूला असलेल्या खूप खोल दरीत आपला कायमचा मुक्काम होणारा ही भीती मनात होती.एक एक पाऊल टाकत टाकत त्या रस्त्याच्या शेवटी आलो. उतरणीच्या ठिकाणी बसत बसत उतरलो अन् पुढील दगडाच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.

दुपारचे दीड वाजले होते.आम्ही सर्वानुमते रस्त्याच्या कडेला असलेल्या ओलसर अन् थंडगार दगडी ओट्यावर बसलो. वरतून वय वर्ष नव्वदच्या आसपास असलेली एक वयोवृध्द स्री पायी येताना आम्हाला दिसली.तिच्या सोबत एक प्रौढ वयातील पुरुष अन् स्री होती.ते आमच्याच बाजूला येवून बसले. माझ्या बाजूला येऊन तो प्रौढ वयातील पुरुष अन् ती वयोवृध्द आजी बसली. ती प्रौढ वयातील स्री माझ्या पत्नीच्या अन् मुलांच्या बाजूला येऊन बसली होती. माझ्यातली चौकस वृत्ती जागी झाली. काही वेळ गेल्यावर त्या आजीला मी हिंदीतून विचारले..

" दादी, कहा से आये हो..?"
दादी - " अरे, भैय्या मैं राजस्थान से आई हुं | ये मेरी लडकी हैं और ये मेरे दामादजी हैं | 

मी त्या आजीच्या जावयाकडे पाहून म्हणालो - " हर हर महादेव साब..!" 
त्यांनी प्रत्युत्तर दाखल हर हर महादेव म्हंटले. यानंतर त्या आजीची मुलगी माझ्याशी अन् माझ्या पत्नीशी बोलू लागली..
" हमारी इच्छा थी की, हमारी माताजी को केदारनाथ बाबा के दर्शन करके लावू | आज वो इच्छा पुरी हो गयी | 
मी त्या आजीच्या मुलीस म्हणालो - " आपको भाई नहीं है क्या ?"
आजीची मुलगी म्हणाली - " नहीं, मैं अकेली हूं | हमारे पिताजी बहुत साल पहले गुजर गये हैं | मेरे पती इंजिनियर हैं, और हम राजस्थान के राजसमंद जिले के हैं | अभी हम राजस्थान होकर आये हैं, और साथ में मेरी माँ को लेकर आये हैं | 
मी पुन्हा त्या आजीला विचारले..
" दादी, भोलेनाथ का दर्शन हुआ क्या..? भीड थी क्या..?"
दादी - " अरे, भैय्या पूछो मत, कितनी भीड हैं | बहुत भीड हैं |
मी - " आप दर्शन के लिये कब आये थे ?"
दादी - " हम कल सुबह गौरी कुंड से निकले थे | कल रात को उपर रुके और आज फिर दर्शन कर के निकले हैं |
मी - ' गौरी कुंड से घोडे पर सवार होकर आये होंगे..?"
दादी - " काहे का घोडा..? मैं चलने को थकती नहीं बेटा..! उपर केदारनाथ बाबा के पास पहाड चढकर आने के लिये घोडा, खेचर तुम जैसे जवानो को लगता हैं, मुझे नही !
असे म्हंटल्यावर ती आजी खळखळून हसली. त्या आजीचे मनमोहक हास्य बघून माझ्या मनाला एक प्रकारची नवचेतना मिळाली होती. आपण एखाद्या बालकाच्या, तरुणीच्या किंवा स्री च्या मनमोहक हास्याच्या प्रेमात पडतो. ते हास्य पुरुषाला अजून जगायला प्रेरित करत असते. मात्र मी या वयोवृध्द आजीच्या हास्याच्या प्रेमात पडलो होतो.त्या हास्यात का कुणास ठाऊक मला माझ्या स्व. आईचं खूप मायाळू हास्य जाणवलं होतं. त्या आजीच्या हास्याने पुढील उर्वरीत खूप उंचीच्या चढणीच्या प्रवासाला आम्हा सर्वांना नवसंजीवनी मिळाली होती. जगात आईचं सुमधुर हास्य कोणत्याही लेकराला आयुष्याच्या प्रेमात पडायला मानसिक औषध म्हणून कित्येक पिढ्यानपिढ्या उपयोगी पडत आलेलं आहे हा विचार माझ्या मनात येऊन गेला.माझ्या स्व.आईच्या निधनानंतर असे मायाळू हास्य कधी बघितल्याचे किंवा अनुभवता आलेच नाही .आज पुन्हा एकदा याचं केदारनाथ बाबाच्या, हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेत या आजीच्या रुपात श्रद्धापूर्वक ते प्रेमळ हास्य बघायला मिळाले होते. माझी स्व.आई तर या आजीच्या रूपातून अन् तिच्या सुमधुर मायाळू हास्यातून माझ्या अन् माझ्या कुटुंबियांच्या समोर तर आली नसेल ना..? हा भाबडा पण मायाळू भाव माझ्या मनात आला होता. माणसाचे मन कुठल्या कुठं जाते.पण मनाला आवर पण घालता येत नसतो हेही खरं. मन जे म्हणतं त्यात बऱ्याचदा सत्यता देखील असते यावर माझा तरी ठाम विश्वास होता अन् आहे.

आजीचे बोलणे ऐकून माझ्यातला थोडाफार तारुण्याचा अन् असलेल्या प्रौढ वयातील तब्येतीचा अहंकार तिथल्या तिथंच गळून गेला. माझ्याही पेक्षा माझ्या थोरल्या मुलाचा ऐन तारुण्याचा अहंकार तर कुठल्या कुठं पळून गेला.आम्ही कुटुंबीय एकमेकांकडे बघत होतो अन् आमच्या थकव्याला लपवू बघत होतो, कारण आमच्या बाजूला तारुण्याला लाजवेल असे तारुण्य बसलेले होते अन् ते त्या आजीच्या रुपात होते. केदारनाथ बाबाच्या दर्शनाला तरुण अन् प्रौढ वयातील माणसं घोड्यावर खेचरावर बसून येत जात होती त्यांच्या मुखात सणसणीत चपराक त्या राजस्थानच्या आजीने आपल्या कृतीतून लगावली होती. केदारनाथ पहाडावरील प्रवासातील प्रवासी ज्या घोड्यावर प्रवासी बसून जात येत होते त्या सर्वांकडे मी बघत होतो अन् पुन्हा एकटक त्या कणखर आजीकडे श्रद्धेने बघत होतो. जखमी घोड्यांच्या दिसणाऱ्या अन् न दिसणाऱ्या वेदनांची होणारी आग प्रत्यक्षात त्या मुक्या प्राण्यांना व्यक्त करता येत नव्हती, पण त्या आजीने आपल्यातील दृढ निश्चयाने अन् उत्तम जीवनशैलीने शारीरिक आरोग्य कसे असावे याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केले होते. त्या सन्माननीय भक्तांचा निरोप घेण्यापूर्वी मी त्यांना विचारले की,
" केदारनाथ बाबा का मंदिर अभी कितना दूर हैं ?"
यावर त्या आजीचा जावई म्हणाला - " अगर बिना रूके चलेंगे तो आधा पाऊण घंटे मे आरामसे पहुचेंगे!"

आता दुपारचे दीड वाजून गेले होते. आम्ही पुन्हा सर्वानुमते ठरवले की, आता कुठेही न थांबता चालत राहायचं. रस्त्याने मार्गस्थ प्रवाशांची गर्दी खूप झाली होती.त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही दगडाच्या ओबड धोबड रस्त्याने बाबा केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो.कोणतेही ध्येय जवळ आले की, मनाचा अन् शरीराचा वेग, वेगवान होतो याची अनुभूती येऊ लागली होती.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २९ सप्टेंबर २०२३, शुक्रवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा