शुक्रवार, २६ जून, २०२०

" व्यथा..भटक्या विमुक्त जमातीची..! "




चिंतन ©️

" व्यथा..भटक्या विमुक्त जमातीची..! "

=================================

ज्या जातींना राजकीय नेतृत्व नसते त्यांच्यावर कुणी पण टीका टिपणी करा,त्यांच्या जातींच्या नावाचा नकारात्मक, उपहासात्मक उल्लेख कुठेही करा तरी काही फरक पडत नाही.आंदोलन ,जाळपोळ लुटालूट होणार नाही.कारण त्यांचे संख्याबळ कमी असते.
पण अशीच टीका टिपणी ज्या जातींचे राजकीय नेतृत्व असते, संख्याबळ असते त्यांच्या बाबतीत असे काही घडले तर ते लगेच निषेध नोंदविल्या जातात. नव्हे नव्हे बऱ्याचदा देशाच्या राष्ट्रीय संपत्तीेेचे अपरिमित नुकसान होते.

याच अशा अनेक घटना ज्यावेळी भटक्या जमाती मधील लोकांच्या बाबतीत घडतात त्यावेळी कुणीही नेता किंवा संवेदनशील माणसं पुढे येऊन एक साधा निषेध देखील व्यक्त करत नाही. काही अपवाद...!

मागील काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात भटक्या जमाती मधील लोकांना चोर समजून लोकांनी भर दिवसा ठेचून,ठेचून मारले. अतिशय भयंकर कृत्य होते ते..! सर्व बाबतीत पोरका समाज असल्याने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचारांना वेदना व्यक्त करता येत नाही.आणि जरी कुणी व्यक्त केली तरी त्याची म्हणावी तेवढी कुणी दखल घेत नाही. अशा वेळी वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची खूप खूप आठवण येते..!मुंढे साहेब यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील भटका समाज राजकीदृष्ट्या पोरका झालेला आहे.

भटक्या जमाती मधील लोकांना स्वतच्या लेकराप्रमाणे जीव लावला तो थोरल्या महाराजांनी..! हिंदवी स्वराज्याची जडणघडण करण्यात भटक्या विमुक्तांच्या कौशल्यांचा खूप उत्कृष्ट उपयोग करून घेतला तो सुध्दा परम वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनीच..! म्हणून पूर्वीही ,आजही अन् भविष्यातही भटक्या विमुक्त समाजातील माणसं आपला माणूस मानतात ते छत्रपती शिवाजी महाराज यांना..! कधी नव्हे तो भटका समाज सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात निःसंकोचपणे आपल्या बिऱ्हाडाच्या सोबत सुरक्षितपणे भटकंती करत असायचा. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी अशीच प्रामाणिक साथ दिली ती महाराणा प्रतापसिंह महाराज यांना..! 

आज भारतात जवळ जवळ पंधरा कोटी भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांची संख्या आहे. पण सगळे भटकंती अवस्थेत विखुरलेले आहेत. विशेष म्हणजे भटक्या जातींच्या प्रवर्गात अनेक जातींचा समावेश आहे. उदा.भटक्या जमाती ब श्रेणीत आरक्षणाची मर्यादा फक्त २.५ टक्के आहे अन् भटक्या जमाती ब श्रेणीत एकूण जातींची संख्या आहे ३८ ..! त्यातही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जे आरक्षण दिलेले आहे,तेही अ,ब,क,ड अशा श्रेणीत विभागून देण्यात आले आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना फक्त जातीचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेता येत नाही. त्यात अजुन समस्या अशी आहे की, उच्च उत्पन्न मर्यादा नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र असल्या शिवाय आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यातील बहुतांशी लोकांना आजही भटक्या अवस्थेत गावोगावी फिरावे लागते.त्यात पुन्हा काही गावातील लोकांच्या संशयी नजरा भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर रोखून असतात. शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या कक्षा फार फार कमी प्रमाणात रुंदावलेल्या आहेत. आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बऱ्याच लोकांच्या वसत्या पाल टाकून ,गावोगावी भटकंती करत आहे.काही भटक्या जातीच्या लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या इतर सदस्यांच्या प्रयत्नांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आरक्षण मिळाले याविषयी दुमत नाही..!

पण अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना फक्त जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सर्व सुख सुविधा,त्यात नोकरी देखील आली, त्या सर्व बाबी मिळत होत्या अन् आहेत.मात्र भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना असा नियम नाही. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नुसते जातीचे प्रमाणपत्र काढून सर्व सुविधांचा लाभ घेता येत नाही..! भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीच्या आधारावर सुविधा मिळविण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतर देखील नाॅनक्रिमीलेयर प्रमाणपत्र काढवेच लागते,तेंव्हा कुठे लाभ घेता येतो..! त्यात समस्या अजुन अशी नाॅनक्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी देखील अजुन इतर पूरक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते, उदा.उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी.

बहुतांशी भटका समाज,गावोगावी भटकंती अवस्थेत विखरलेला असल्याने याकामी अनेक समस्या आजही कायम आहेत..!😔

विशेष म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांची एकत्रित vote bank नसल्याने अशा कित्येक समस्या पूर्वीपासून ते आजतागायत कायम आहेत. आपल्या देशात कोणत्याही मानवी समुदायाला ,लाभ मिळवून घ्यायचा असेल तर त्या त्या मानवी समुदायाची जातीची अन् धर्माची vote bank असणं अत्यंत आवश्यक आहे हे कटू सत्य आहे..!

१४ मार्च २००५ रोजी केंद्र सरकारने रेणके आयोगाची स्थापना केली.उद्देश एकच होता की,भारतातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या अवस्थेचे संकलन करून यातील लोकांना न्याय मिळवून देणे.रेणके आयोगाने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाजाचा सर्वंकष अहवाल इ. स.२००८ मध्ये केंद्र सरकारला सादर देखील केला.पण...त्यावर काहीही निर्णय झालेला नाही..!😔 भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला, त्रासाला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे.

हा लेख आज लिहिण्याचे कारण असे की, २६ जून हा, महाराष्ट्र राज्याने घोषित केलेला " सामाजिक न्याय दिन " सुध्दा आहे म्हणून..!

ता.क. - सदरील छायाचित्र, तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी भेटलेल्या एका वासुदेवाच्या सोबतचे आहे.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: २६ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा