रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

" तू.. आणलं याला किंमत...हाय..!"



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

तू.. आणलं याला किंमत...हाय..!"
  
===================================

आज दिनांक २०/१०/२०१९ रोजी दुपारी धुंवाधार पाऊस सुरू होता.
मी रस्त्याने माझ्या वाहनात चाललो होतो.
माझ्या खूप पुढे एक वयोवृध्द आजोबा रस्त्याने  पावसात चिंब भिजून पायी चालले होते.त्यांना ओव्हर टेक करून चार पाच चार चाकी वाहने पुढे निघून गेली होती.माझे वाहन त्या आजोबांच्या जवळ आले.
मला रहावले नाही.
मी थांबून त्यांना वाहनात बसून घेतले.
त्यांच्या रंग रुपावरून वारकरी सांप्रदाय मधील होते.
अगदी माझ्या सर्वात मोठ्या सख्ख्या चुलत्यासारखे स्व. कचरू आण्णा पालखेडकर यांच्या सारखेच दिसत होते.आमचे आण्णा पण वारकरी सांप्रदायिक होते..!

थरथरते ओलेचिंब शरीर वाहनात बसले होते.
माझ्या पत्नीने त्यांना अंग पुसण्यासाठी आमच्याकडील कोरडा रूमाल दिला.
त्यांना पुढे फक्त १५० ते २०० मीटर पर्यंतच जायचे होते.
त्यांचे ठिकाण आले,अन् मला म्हणाले....
" भाऊ, पांडुरंगा सारखा भेटलास रे..! "
एवढे बोलून ते आजोबा माझ्या धाकट्या मुलाला १० रू.द्यायला लागले..!
मी त्यांना लगेच थांबवून म्हणालो...
" बाबा, अहो,हे काय करताय..? नका देऊ पैसे..!"
आजोबा म्हणाले- " अरे,लेका...लई गाड्या गेल्या ,पण तूच थांबला रे ..! राहू दे..माऊलीचा प्रसाद म्हणून..!"
मी म्हणालो- " बाबा,मी तुम्हाला फार थोडेच अंतर घेऊन आलो..त्यात काय विशेष..! नका देऊ रुपये..राहू द्या..!"
बाबा- " अरे ,तू..कितीक लांब घेऊन आला,ह्याला नाय किंमत...! तू.. आणलं याला किंमत...हाय..!"

किती मोजक्या शब्दांत आजोबांनी आजच्या समाजव्यवस्थेच्या रुक्ष होत चाललेल्या मुर्दाड व्यवस्थेवर अचूक वेध घेतला होता..!

अखेर वयोवृध्द बाबांचे फक्त १५० ते २०० मीटर पर्यंतच असलेले नियोजित ठिकाण आले अन् माझ्या पत्नीच्या मदतीने बाबांना आडोशाला सावकाश उतरुन दिले..!
उतरुन दिल्यानंतर ते आजोबा माझ्याकडे पाहून दोन्ही हात जोडून म्हणाले.....
"राम...राम ..भाऊ...दम्मानं जाय..!"
मी- ' राम..राम...बाबा..जा..आता...सावकाश...!"

मी माझ्या नियोजित ठिकाणी आलो...तर तिथं आत्ताच मघाशी त्या आजोबांना ओव्हर टेक करून आलेली वाहनं अन् त्यातून फक्त दोघे किंवा तिघे जन उतरताना मी पाहत होतो.म्हणजेच त्या गाड्यांमध्ये आजोबांना बसण्या एवढी जागा शिल्लक होती..! त्या ठिकाणी सर्व भारी भारी गाड्या अन् लई श्रीमंत जाणवणारी माणसं होती. आता ही भारी भारी गाड्या अन् श्रीमंत जाणवणारी माणसं इथे येऊन देवाधर्माच्या गोष्टी ऐकत होते...करत होते..!
माझे मन प्रचंड उदिग्न झाले होते..! 
असा असतो...देवधर्म...?
असे असतात माणसं..?
हे विठुरायाचे संस्कार...?

अजिबात नाही..!खरा विठोबा तो त्या...चिंब पावसात येत होता..! त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही अगदी कमी अंतराच्या सेवेच्या मोबदल्यात १० ₹ देऊ करत होता..!आम्ही मात्र इकडेच त्या विठुरायाला शोधत होतो..! इथेही विठुराया असेलही पण अगोदर त्या पावसात भिजून पायी येणाऱ्या ओल्याचिंब विठोबाला पूजन करायचे राहूनच गेले..!त्या आजोबांनी देऊ केलेल्या फक्त १०₹ ने कित्येकांच्या मुस्काटात लगावली  होती.माझ्या खिश्यात असणाऱ्या पैशांना ती न दिसणारी मुस्काटात पार जमून बसली होती..!

जय हरी माऊली..!
विठ्ठल..विठ्ठल...!

वंदे मातरम् ...!

त्या वयोवृध्द आजोबांना माझ्या वाहनात घेऊन जाण्याचे स्थळ: औरंगाबाद ते अहमदनर महामार्गावरील रामेश्वर मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील  कमान ते रामेश्वर मंदिर,  गोदावरी नदी( कायगाव).

स्वानुभव लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा