चिंतन ©️
" सर,नवरात्रीचे उपवास का करतात..?"
===================================
मी जेंव्हा पासून माझ्या सध्याच्या शाळेत उपस्थित झालेलो आहे,तेंव्हा पासून मला पालखेड येथील काही व माझ्या डी एड च्या काही मित्रांसोबत घालविलेला प्रत्येक क्षण भेटत आहे..अन् भेटणार आहे. कारण येथील काही माझी मुलं अगदी त्याच माझ्या जुन्या काळातील काही मित्रांसारखी आहे.. जमिनीवरील...!
मला नवरात्रीचे उपवास आहेत हे माझ्या एका मुलाला समजले.मग काय ..एक दिवस माझ्याकडे आला अन् मला म्हणाला......
" सर,तुम्हाला पण नवरात्रीचे उपवास अन् मला बी...!
या मग इकडच, सोबतच बसू आपण फराळ करायला..! "
असं नितीन तायडे हा माध्यमिक वर्गातील माझा मुलगा मला म्हणाला..!
आम्ही थेट शाळेच्या मैदानावर असलेला एक कोपरा निवडून तिथं अजुन काही नेहमी जेवायला बसणाऱ्या मुलांच्या सोबत सुरू केले...फराळ..नऊ दिवस..! अर्थात इतर वेळीही यांच्या सोबत मी कधी मधी जेवण करत असतोच. या छायाचित्रातील सगळेच उपासकरु नाहीत. माझ्या अगदी समोर बसलेला माध्यमिक वर्गातील नितीन तायडे अन् मीच तेवढा उपासकरु..! बाकीचे मस्तपैकी चाटून पुसून जेवण करणारे खवय्ये..!
यातील माझ्या एका विद्यार्थ्याने मला फराळ करताना विचारले की,
" सर,नवरात्रीचे उपवास का करतात..?"
मी त्याला सांगितले की,
" बेटा, हिंदू धर्मातील प्रत्येक सण,उत्सव ,परंपरा यामागे निसर्गाशी नाते सांगणारे आरोग्य विज्ञान आहे..! जसे की ,हे नवरात्रीचे उपवास..!"
विद्यार्थी- ' कसं काय सर..?"
मी त्यांना सांगितले की,
" हे पहा, नवरात्र उत्सव साधारणतः ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.त्यावेळी निसर्गातील ऋतु बदल होत असतो.हा ऋतू बदल होत असताना ज्याला आपण ऑक्टोंबर हिट असे म्हणतो ती भयंकर स्वरूपात निर्माण झालेली असते.म्हणजेच त्या हिट मुळे आपल्या शरीरात पित्त प्रकोप वाढलेला असतो.याच काळात जर आपण लई काही काही खाल्ले तर अजुन पित्त प्रकोप वाढून आपल्याला अजुन त्रास होतो.आपल्या पूर्वजांनी स्री शक्तीची उपासना करत असताना याला आरोग्य विज्ञानाची जोड देऊन याच काळात उपवास करण्याच्या आरोग्यदायी परंपरेला प्रारंभ केला. जसे या काळात कमी आहार अन् हलका आहार घेणे, पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवणे इ. जेणेकरून पित्त प्रकोप कमी वाढेल किंवा वाढणार नाही. शेवटी आपण किती ही पथ्य पाळले तरी एक शरीर म्हणून आपण आजारी पडणारच पण ते शरीर सतत आजारी पडण्याला बराच प्रतिबंध या अशा अनेक उत्सवातील आरोग्य विज्ञानामुळे शक्य होतो..!"
यावर अजुन एका मुलाने प्रतिप्रश्न केला की,
" सर, मग देवीचेच पूजन का बर..?"
मी म्हणाले...
" देवीचे पूजन करण्याचा उद्देश असा की, स्री चा सन्मान व्हावा, आपल्या समाजात स्री कडे पाहण्याला एक भक्तीची , श्रद्धेची नजर असावी..! स्री एक शक्ती आहे,म्हणून तिचे पूजन व्हावे , आदी शक्ती म्हणून तिला नऊ दिवस प्रतिनिधिक स्वरूपात मानाचे स्थान देऊन पूजन करणे अन् तेच पूजन आपल्या मनात संपूर्ण वर्षभर असावे हा या नवरात्रीच्या देवीचा पूजन करण्याचा उद्देश..! जगात फक्त आपल्याच भारत देशाला मातेचे स्थान देऊन एक प्रकारे सर्व स्री समुदायाचे पूजन करण्याचे मूल्य त्यातून प्रदर्शित होते..!
तसेच नवरात्रीच्या निमित्ताने महिलांच्या दररोजच्या घर अन् कुटुंब या मर्यादित क्षेत्रातील वातावरणाला जोड म्हणून आनंद,उल्हास अन् मनोरंजन व्हावे म्हणून गरबा दांडिया खेळ आयोजित केला जातो.जेणेकरून महिलांचा आनंदोत्सव साजरा होऊन त्यांचे भावविश्व अजुन प्रफुल्लित होईल.त्याचा फायदा त्यांच्या भावविश्वाला,पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला होतो, कारण कोणताही खेळ ,कोणत्याही मनाला अन् शरीराला ताजा ,टवटवीत ,प्रफुल्लित करत असतो..! "
नवरात्र उत्सव हा स्री शक्तीचा उत्सव आहे. माझ्या मते गरबा दांडिया महिलांनीच एकत्रीत साजरा करायला हवा.जिथं महिला गरबा दांडिया खेळत असतील तिथं पुरुषांनी अतिक्रमण करू नये.ज्या पुरुषांना देखील गरबा दांडिया खेळायला आवडत असेल त्यांनी आपली चूल वेगळी मांडायला हवी.जेणेकरून महिलांना, महिलांच्या समवेत अनौपचारिक नाते संबंध निर्माण होऊन अंतर्मनातील आनंद खऱ्या अर्थानं व्यक्त करता येईल. हे माझे वैयक्तिक मत आहे.कुठेही स्री पुरुष समानतेच्या बौद्धिक गप्पा करणाऱ्यांची मते भिन्न असू शकतात. मात्र माझ्या मते सर्वच ठिकाणी स्री पुरुष समानतेच्या बौद्धिक गप्पा कृतीतून यशस्वी होत नसतात. हे माझे वैयक्तिक मत आहे.
हिंदू धर्मातील प्रत्येक उत्सवांकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उपाख्य तात्याराव सावरकर यांना अभिप्रेत असलेल्या विज्ञानवादी हिंदू धर्म या नजरेने पाहावे..! या विविध सणांच्या वेळी आढळणाऱ्या काही अनिष्ट रूढी परंपरा,अंधश्रद्धा यांचा अंगीकार अजिबात करू नका..! यामुळे खरा हिंदू धर्म अन् त्यातील निसर्ग पूजन, विज्ञाननिष्ठ आरोग्य दुर्लक्षित राहून जाते..! या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा मुळे चुकीचा संदेश समाजात जातो..!"
या सगळ्या गप्पांच्या ओघात आमच्या डब्ब्यात असलेले फराळ संपले होते.आम्ही सर्व जण पुन्हा निवांत तिथंच बसून बाजूला जी दांडग्या तब्येतीची मुलं कब्बडी खेळत होती त्यांच्या खेळाचा आनंद घेऊ लागलो. त्यांच्या दांडग्या खेळावर नंतर लिहिलंच मी..!☺
ता.क.: निसर्ग, आरोग्य विज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे हिंदू धर्मातील विविध सण,उत्सव..!
वंदे मातरम्..!
आईचा उपासक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: ५ ऑक्टोंबर २०१९, नवरात्र उत्सव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा